अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही आजवर नेहमीच आध्यात्मिक जीवनासाठी अतिशय सुयोग्य मानण्यात आली आहे. तसेच सात्त्विकतेमुळे आध्यात्मिक जीवनाची पूर्वतयारी होते, असेही मानले जाते. तर राजसिक प्रकृती इच्छाआकांक्षाच्या आणि आवेगांच्या भाराखाली दबून गेलेली असते.

त्याच बरोबर हेही खरे आहे की, आध्यात्मिकता ही द्वंद्वातीत असते आणि त्यासाठी ऊर्ध्वमुख असणाऱ्या अभीप्सेची सर्वाधिक आवश्यकता असते. आणि ही अभीप्सा सात्त्विक प्रवृत्तीच्या व्यक्तीइतकीच राजसिक प्रवृत्तीच्या व्यक्तीमध्येही निर्माण होऊ शकते. एखादी सात्त्विक प्रवृत्तीची व्यक्ती जशी तिच्या सद्गुणांच्या अतीत जाऊ शकते तशीच, राजसिक प्रवृत्तीची व्यक्तीही तिच्या अवगुणांच्या, इच्छाआकांक्षांच्या अतीत होऊन, दिव्य शुद्धता, दिव्य प्रकाश आणि दिव्य प्रेमाकडे वळू शकते.

अर्थात, अशी राजसिक प्रवृत्तीची व्यक्ती जेव्हा स्वतःच्या कनिष्ठ प्रकृतीवर विजय मिळवेल आणि स्वतःमधून ती कनिष्ठ वृत्ती काढून टाकेल तेव्हाच ही गोष्ट घडून येईल. कारण अशी व्यक्ती जर पुन्हा एकदा त्याच कनिष्ठ प्रकृतीमध्ये जाऊन पडली, तर ती मार्गभ्रष्ट होण्याची शक्यता असते किंवा अगदीच काही नाही तर, जोपर्यंत ती व्यक्ती त्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये रमलेली असते तोपर्यंत तरी तिची आंतरिक प्रगती खुंटते.

परंतु धार्मिक आणि आध्यात्मिक इतिहास पाहिला तर त्यामध्ये, मोठमोठ्या गुन्हेगारांचे महान संतांमध्ये किंवा अवगुणी किंवा कमी गुणवान व्यक्तींचे आध्यात्मिक साधकांमध्ये आणि भक्तांमध्ये रूपांतर झाल्याची उदाहरणे वारंवार आढळून आली आहेत. उदाहरणार्थ युरोपमध्ये सेंट ऑगस्टिन, भारतामध्ये (चैतन्य महाप्रभुंचे अनुयायी झालेले) जगाई आणि मधाई, बिल्वमंगल यासारखी अनेक उदाहरणे आहेत.

भलेही एखाद्या माणसाच्या हातून गतकाळात अनेक चुका झालेल्या असतील किंवा त्याला अनेक ठोकरा बसल्या असतील, पण त्यानेसुद्धा जर ईश्वराच्या निवासाचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावले तर, ते त्याच्यासाठी कधीच बंद नसतात. (किंबहुना) जो जो कोणी ईश्वराच्या निवासाचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावतो, त्याच्यासाठी ते कधीच बंद नसतात.

मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतरंगात असणाऱ्या ईश्वरी तत्त्वावरील अनुक्रमे तेजस्वी व अंधकारमय आवरणे असतात. पण आत्म्याच्या उंचीप्रत जाताना, जेव्हा ती दोन्ही आवरणे भेदली जातात तेव्हा, ती जळून जाऊ शकतात. (म्हणजेच द्वंद्वातीत असणाऱ्या आत्मतत्त्वाच्या दिशेने चाललेल्या प्रवासात साधकाचे गुण व दोष दोन्ही गळून पडतात.)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 42)

 

(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे. त्याने तसे श्रीअरविंदांना कळविले आहे. त्यावर श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर…)

अपूर्णता असल्या आणि अगदी कितीही अपूर्णता असल्या किंवा त्या कितीही गंभीर स्वरूपाच्या असल्या तरीही, योगमार्गातील प्रगतीसाठी अपूर्णता या कधीही कायमचा अडथळा ठरू शकत नाहीत. एकच अडथळा हा कायमस्वरूपी अडथळा ठरू शकतो आणि तो म्हणजे अप्रामाणिकपणा. अर्थात हा अडथळासुद्धा कायम राहण्याची गरज नाही कारण त्यामध्येसुद्धा परिवर्तन करता येते. अपूर्णता हा जर योगमार्गातील अडथळा असता तर कोणताही मनुष्य योगमार्गामध्ये यशस्वी होऊ शकला नसता; कारण प्रत्येक जणच अपूर्ण असतो…

योगसाधनेमध्ये एकच गोष्ट अंतिमतः महत्त्वाची असते आणि ती म्हणजे प्रामाणिकपणा. आणि त्याबरोबर आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे मार्गावर टिकून राहण्यासाठी आवश्यक असणारा धीर. अर्थात बरेच जण धीर नसतानासुद्धा ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. कारण, साधकामध्ये बंडखोरीची भावना असली किंवा अधीरता, नैराश्य, विषाद, थकवा या गोष्टी असल्या किंवा काही काळासाठी त्याची श्रद्धा गमावल्यासारखी झाली तरी किंवा, साधकाच्या मनावर त्या गोष्टींचे मळभ आणि धुके आलेले असतानादेखील, साधकाच्या बाह्यवर्ती ‘स्व‌’पेक्षा अधिक सामर्थ्यशाली असणारी शक्ती, आत्मशक्ती किंवा जिवाला ईश्वरप्राप्तीची जी निकड वाटते ती प्रेरणा या गोष्टी ते मळभ बाजूला सारून, त्याला त्याच्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जातात.

• श्रीअरविंद (CWSA 31 : 661)

 

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल आणि कुरूप स्पंदनामुळे पूर्णयोगाच्या या मार्गाकडे कधीही पाठ फिरविता कामा नये. तुमच्यापाशी दुर्दम्य धैर्य, परिपूर्ण प्रामाणिकपणा असला पाहिजे. तुम्ही कोणताही विकल्प उपयोगात न आणता किंवा सौदेबाजी न करता संपूर्ण आत्मदान केले पाहिजे. अर्पण करताना त्याच्या मोबदल्यात काहीतरी मिळावे अशी अपेक्षा तुम्ही बाळगता कामा नये. मी स्वतःला ईश्वरार्पित केले तर त्यामुळे माझे संरक्षण होईल या हेतुने तुम्ही ते अर्पण करता कामा नये. तुमच्या श्रद्धेला पुराव्याची आवश्यकता भासता कामा नये. (पूर्णयोगाच्या) मार्गावर प्रगत व्हायचे असेल तर या सर्व गोष्टी अनिवार्य असतात; (कारण) या गोष्टीच तुम्हाला सर्व संकटांमध्ये आश्रय देतात.

* श्रीमाताजी (CWM 15 : 190)

 

तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही केली पाहिजे आणि ती म्हणजे तो आवेग पुन्हा येऊ नये अशी इच्छा बाळगली पाहिजे. मात्र, तो आवेग नाहीसाच होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल, तर तो आवेग तसाच ठेवा, पण असे असेल तर मग योगसाधना करण्याचा प्रयत्नही करू नका.

योगमार्गाचे अनुसरण करायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही सर्व अडीअडचणींवर मात करण्याचा संकल्प केला पाहिजे. तसा संकल्प जर तुम्ही केला नसेल तर, योगमार्गाचा अवलंबच करू नका. योगमार्गाचे अनुसरण करण्याचा तुमचा निर्णय अगदी प्रामाणिक आणि समग्र असला पाहिजे.

• श्रीमाताजी (CWM 04 : 77)

 

तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या शिल्लक राहात नाही. फक्त प्रश्न असतो तो प्रामाणिक असण्याचा. तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर योगसाधनेची सुरुवातच करू नका. मानवी व्यवहारांमध्ये फसवणूक होऊ शकते, पण ईश्वराबरोबरच्या संबंधांमध्ये फसवणुकीची अजिबातच शक्यता नसते. तुम्ही जर विनम्र असाल, अंतरंगातून खुले असाल आणि तुमचे एकमेव उद्दिष्ट ईश्वराचा साक्षात्कार व त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच आपला ‘चालविता धनी’ व्हावा हे तुमचे उद्दिष्ट असेल तर तुम्ही (पूर्णयोगाच्या) या मार्गावरून सुरक्षितपणे वाटचाल करू शकाल.

– श्रीमाताजी (CWM 03 : 05)

 

योगमार्गाच्या वाटचालीस प्रारंभ करण्यासाठी पुढील तीन गोष्टी अनिवार्य असतात –

०१) संपूर्ण अस्तित्वामध्ये आणि त्याच्या सर्व गतिविधींमध्ये परिपूर्ण प्रामाणिकपणा.

०२) हातचे काहीही राखून न ठेवता केलेले संपूर्ण आत्म-समर्पण.

०३) स्वतःवर धीराने काम करत राहायचे आणि त्याच वेळी, परिपूर्ण अविचल शांती व समत्व स्थिरावेल असा विजय संपादन करायचा.

• श्रीमाताजी (CWM 14 : 41)

 

कोणत्या गुणामुळे व्यक्ती (योगमार्गासाठी) सुपात्र ठरते किंवा कोणत्या गुणाच्या अभावामुळे ती अपात्र ठरते हे सांगणे तसे कठीण आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये तीव्र कामवासना असेल, किंवा तिच्यामध्ये शंकाकुशंका असतील, किंवा तिची वृत्ती बंडखोर असेल आणि असे असूनदेखील तिला अंतिमतः यश मिळू शकते; तर दुसरी एखादी व्यक्ती अपयशी ठरू शकेल. मात्र, एखाद्या व्यक्तीकडे जर मूलभूत प्रामाणिकपणा असेल, सर्व गोष्टींवर मात करून पुढे जाण्याची इच्छाशक्ती असेल आणि मार्गदर्शन घेण्याची त्या व्यक्तीची तयारी असेल, तर साधनेमधील ते सर्वोत्तम संरक्षण ठरते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 33)

फक्त दिव्य सत्याचीच इच्छा बाळगणे; दिव्य मातेप्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे; या एका अभीप्सेव्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वैयक्तिक मागण्या व वासना यांना नकार देणे; जीवनातील प्रत्येक कृती म्हणजे ईश्वराने दिलेले कार्य आहे हे जाणून, त्याच्या आड कोणताही अहंकार येऊ न देता, ते कार्य करणे आणि ते ईश्वराला समर्पित करणे म्हणजे पूर्णपणे प्रामाणिक असणे. हाच ‘दिव्य जीवना‌’चा पाया आहे.

व्यक्ती एकाएकी पूर्णपणे तशी होऊ शकत नाही. पण जर तिने सातत्याने तशी अभीप्सा बाळगली आणि ईश्वरी शक्तीने साहाय्य करावे म्हणून साध्यासरळ इच्छेने नेहमी आणि अगदी अंतःकरणपूर्वक तिचा धावा केला तर, या (दिव्य) चेतनेमध्ये व्यक्ती अधिकाधिक उन्नत होत राहते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 51)

योगमार्गावर प्रगत होत राहण्यामध्येच खरा प्रामाणिकपणा सामावलेला असतो कारण तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहू शकत नाही. तुम्ही दिव्य जीवनासाठी स्वत:ला समर्पित करता कारण त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. तुम्ही स्वत:चे रूपांतर करण्यासाठी आणि दिव्य प्रकाशामध्ये उदय पावण्यासाठी धडपडता, कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही, कारण तेच तुमच्या जीवनाचे मूळ प्रयोजन असते. जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.

– श्रीमाताजी (CWM 15 : 378)

प्रामाणिकपणा म्हणजे काय? आधी साध्य झालेल्या उच्चतम चेतनेच्या आणि साक्षात्काराच्या स्तरापर्यंत, अस्तित्वाच्या सर्व गतीविधी उन्नत करत नेणे म्हणजे प्रामाणिकपणा! प्रामाणिकपणा हा केंद्रीय दिव्य संकल्पाभोवती संपूर्ण अस्तित्वाचे, त्याच्या अंगप्रत्यंगासह व सर्व गतिविधींसह एकसूत्रीकरण आणि सुसंवादीकरण घडवितो.

– श्रीमाताजी (CWM 14 : 65)