ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

मार्गावर प्रगत होत राहण्यामध्ये प्रामाणिकपणा

 

उत्तमरितीने प्रशिक्षित असा रणक्षेत्रातील हत्ती, बाणांच्या भडिमाराने इतस्तत: पळायला सुरुवात करत नाही. तो वेदना सहन करतो. झुंजारपणे प्रतिकार करणाऱ्या वीराच्या वृत्तीने तो पुढे पुढे चालतच राहतो. ज्याला सन्मार्गाचे अनुसरण करायचे असते, त्याला स्वाभाविकपणे सर्व प्रकारच्या दुरिच्छांच्या हल्ल्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. कारण इतर जण त्याला समजून घेऊ शकत नाहीत आणि एवढेच नव्हे तर, त्यांना जे समजत नाही त्याचा ते द्वेष करू लागतात.

सामान्य लोक तुमच्याविषयी जे द्वेषपूर्ण उद्गार काढतात त्यामुळे, जर तुम्ही चिंताग्रस्त, दुःखीकष्टी किंवा नाउमेद झालात तर तुम्ही योगमार्गावर फार प्रगत होऊ शकणार नाही. दुरिच्छादी गोष्टी तुमच्या वाट्याला येतात याचे कारण तुम्ही दुर्दैवी आहात किंवा तुमच्या नशीबातच सुख नाही हे नसते तर, उलट (प्रगतिपथावर वाटचाल करण्याचा) तुमचा संकल्प दिव्य चेतनेने व दिव्य कृपेने गांभीर्याने घेतला आहे आणि तुमचा हा संकल्प, हा निश्चय कितपत प्रामाणिक आहे; मार्गातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही कितपत खंबीर आहात हे पाहण्यासाठी, (सोन्याचा) कस पाहणाऱ्या दगडाप्रमाणे, कसोटीचा दगड म्हणून आजूबाजूच्या परिस्थितीचा दिव्य चेतनेने उपयोग केलेला असतो. (हे त्याचे खरे कारण असते.)

त्यामुळे कोणी जर तुमचा उपहास केला किंवा कोणी तुमच्याविषयी अपशब्द काढले तर पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे ती अशी की, अंतर्मुख होऊन, आपल्यातील कोणत्या दुर्बलतेमुळे वा कोणत्या अपूर्णतेमुळे असे घडले ते पाहिले पाहिजे. तसेच, तुमची खरी किंमत काय आहे त्याची लोकांना काही कदरच नाहीये असे समजून तुम्ही उदास, संतप्त किंवा उद्विग्न होता कामा नये. त्यापेक्षा तुमचा कोणता दोष, कोणती दुर्बलता वा कोणती विकृती दुरुस्त केली पाहिजे हे दाखवून दिल्याबद्दल, तुम्ही दिव्य कृपेचे ऋणी असले पाहिजे. म्हणून दुःखीकष्टी होण्याऐवजी उलट, तुम्ही समाधानी झाले पाहिजे आणि तुमच्या विरोधात, तुमचे अहित व्हावे म्हणून जो घाट घातला गेला होता त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे.

तुम्हाला जर खरोखरच या मार्गाचे (पूर्णयोगाचे) अनुसरण करायचे असेल आणि योगसाधना करायची असेल, तर तुम्ही ती कोणाकडून कौतुक मिळावे किंवा सन्मान मिळावा यासाठी करता कामा नये; तर तुम्ही साधनेव्यतिरिक्त अन्य कोणत्या मार्गाने आनंदी होऊच शकणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला ती केलीच पाहिजे, अशी आणि इतकी ती तुमच्या जिवाची अनिवार्य निकड असली पाहिजे. लोकांनी तुमची प्रशंसा केली काय किंवा नाही, ती गोष्ट अजिबात महत्त्वाची नाही. तुम्ही आधीच स्वत:ला हे समजावले पाहिजे की, तुम्ही सामान्य माणसांपेक्षा जेवढे अधिक प्रगत व्हाल आणि तुम्ही जसजसे त्यांच्या सामान्य जीवन-पद्धतीपासून दूर जाल, तेवढे लोकं तुमची प्रशंसा कमी करू लागतील; कारण हे उघड आहे की, ते तुम्हाला नीट समजून घेऊ शकणार नाहीत. आणि मी पुन्हा एकदा सांगते की, ते अजिबात महत्त्वाचे नाही.

तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहूच शकत नाही म्हणून, मार्गावर प्रगत होत राहण्यामध्येच ‘खरा प्रामाणिकपणा’ सामावलेला आहे. तुम्ही दिव्य जीवनासाठी स्वत:ला समर्पित करता कारण त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही; तुम्ही स्वत:चे रूपांतरण करण्यासाठी धडपडता, प्रकाशाला उन्मुख होता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही, कारण तेच तुमच्या जीवनाचे प्रयोजन असते. जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.

• श्रीमाताजी [CWM 03 : 281-283]

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

चैत्य पुरुष म्हणजे काय?

अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…

8 hours ago

तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व

ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…

17 hours ago

चैत्य पुरुष खुला होणे

जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…

2 days ago

दिव्य अस्तित्वाचा शोध

  आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…

3 days ago

आत्मनिरीक्षण कसे करावे?

  (उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…

4 days ago

अंतरात्म्याचा शोध

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…

5 days ago