आपण खूपच जटिलतेने भरलेल्या वातावरणात राहत असतो, पण नेहमीच एक अशी जागा असते की, जिथे सारेकाही खुले, साधे, सरळ असते; हे अनुभवलेले सत्य मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही त्याच त्या परिघात गोल गोल फिरत राहता, धडपड करत राहता, त्यावर काम करत राहता आणि मग कुठेतरी कुंठित झाल्यासारखे होते; आणि अशा वेळी तुमच्या आंतरात्मिक दृष्टिकोनातून (psychic attitude) तुम्हाला एखादा मार्ग गवसतो आणि सारे काही मोकळे होते आणि हे अगदी सहजतेने होते. मला असा अनुभव बऱ्याच वेळेला आलेला आहे.
….श्रीअरविंद नेहमी असे म्हणत असत की, “साधे राहावे, साधे असावे. जे तुम्हाला जाणवते ते साधेपणाने व्यक्त करा. साधे असा! साधे असावे!’’ यावर त्यांचा खूप भर असे. म्हटले तर हे केवळ शब्द आहेत. पण पहिल्यांदा जेव्हा हे शब्द त्यांनी उच्चारले, तेव्हा मला माझ्यासमोर जणू एक प्रकाशमार्गच खुला होताना दिसला आणि सारे काही खूप साधे-सोपे होऊन गेले. ‘एकावेळी एकच पाऊल पुढे टाकायचे आहे, मग दुसरे पाऊल. आपल्याला एवढेच तर करायचे आहे,’ असे मला जाणवून गेले. म्हणूनच ते नुसते शब्द नाहीत तर ती वस्तुस्थिती आहे.
श्रीमाताजी (स्वतःच्या कपाळाकडे निर्देश करत) म्हणतात, सारी जटिलता इथे (मनामध्ये) आहे. खूप जटिल आहे ते, त्याच्याशी जुळवून घेणे खूप अवघड आहे. ‘साधेसरळ असावे,’ असे जेव्हा श्रीअरविंद म्हणाले, तेव्हा काय आश्चर्य! तेव्हा जणू काही त्यांच्या डोळ्यांमधून प्रकाश बाहेर पडत होता. अचानकपणे आपण जणू प्रकाशाच्या बागेतच आलो आहोत असे वाटावे असे काहीसे झाले. जणू काही ती बाग प्रकाशात न्हाऊन निघाली होती. साध्या गोष्टीवर केवढा मोठा भर दिला होता त्यांनी! तुम्हाला जे दिसते, तुम्हाला जे माहीत आहे तेच साधेपणाने बोला, सहजपणाने बोला.
… श्रीअरविंद येथे ज्याला ‘साधेसरळ असणे’ असे म्हणत आहेत, ती एक अगदी आनंददायी उत्स्फूर्तता आहे, सहजता आहे. कृतीमध्ये, अभिव्यक्तीमध्ये, प्रत्येक हालचालीमध्ये, जीवनामध्ये साधे असावे, सरळ असावे. एक आनंदी सहजता! उत्क्रांतीमधील सहजस्वाभाविक व आनंदी अवस्था – ज्याला ते ‘दिव्य’ म्हणतात ती अवस्था – आपण पुनर्प्राप्त करून घ्यावी, अशी श्रीअरविंदांची आपल्याकडून अपेक्षा आहे. …आपण एखाद्या उमलत्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे सहजसाधेपणाने आनंदी असावे, असे त्यांना अभिप्रेत आहे. आणि मी जेव्हा हे ऐकले, मी जेव्हा हे पाहिले, तेव्हा सुवर्ण प्रकाशाचा जणू एक झराच वाहत होता, जणू एक सुगंधित बाग असावी असे काहीसे ते होते. सारे, सारे, सारे काही खुले झाले होते.
– श्रीमाताजी (Conversation with a Disciple, September 16, 1961)
(फक्त कर्मफलच नव्हे तर, संपूर्ण कर्मच ईश्वराला समर्पित केले पाहिजे. किंबहुना आपल्या माध्यमातून ती ईश्वरी…
साधक : प्रसन्नचित्ताने ईश्वराला शरण कसे जायचे, ते आम्हाला सांगाल का? श्रीमाताजी : ती शरणागती…
व्यक्तित्वाची घडण व्हावी यासाठी अहंकाराची आवश्यकता होती. पण म्हणूनच त्याचा विनाश हा तितकाच अवघड असतो.…
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) श्रीमाताजींच्या दिशेने अभिमुख झालेले असणे आणि त्यांना आवाहन करणे हे…
मी तुम्हाला हे खात्रीपूर्वक सांगू शकते की, रूपांतरण इत्यादी गोष्टी प्राणावर सोपविल्या तर तो…
(साधकाला जर जादुटोणा वगैरे गोष्टींचा धोका असेल तर काय करावे, अशा आशयाचा प्रश्न एका…