(एका विभागामध्ये काम करणाऱ्या ‘क्ष’ व्यक्तीबाबत तेथील व्यवस्थापकांनी श्रीमाताजींकडे तक्रार केली आहे आणि त्या व्यक्तीच्या कामचुकारपणाबाबत व अप्रामाणिकपणाबाबत त्याला काही समजावून सांगावे अशी विनंती त्यांनी केली आहे. त्यावर श्रीमाताजींनी दिलेले हे उत्तर…)

अप्रामाणिकपणा हा एक असाध्य दोष आहे असे दिसते आणि त्या दोषामुळे व्यक्तीमधील ईश्वरी कृपेचे कार्यसुद्धा नामशेष झाल्यासारखे होते. या अप्रामाणिकपणामुळेच कालीमातेला या जगामध्ये तिच्या रौद्ररूपाद्वारे हस्तक्षेप करणे भाग पडते.

मी ‘क्ष’सारख्या अप्रामाणिक माणसाला काहीही सूचना करणार नाही कारण तो त्याला ढोंगीपणाने प्रतिसाद देईल आणि तो आत्ता ज्या अंधकारामध्ये बुडालेला आहे, तो अंधकार त्याच्या ढोंगीपणामुळे अधिकच वाढेल.

– श्रीमाताजी (CWM 17 : 343)

 

व्यक्तीकडे संपूर्णपणे पारदर्शी प्रामाणिकपणा असला पाहिजे. प्रामाणिकपणाचा अभाव हेच आज आपल्याला भेडसावत असणाऱ्या सर्व अडचणींचे कारण आहे. सर्व माणसांमध्ये अप्रामाणिकपणा आहे. संपूर्णपणे प्रामाणिक अशी अवघी शंभरच माणसं या पृथ्वीवर असतील. माणसाची प्रकृतीच त्याला अप्रामाणिक बनविते, ती खूप जटिल आहे. मनुष्य सातत्याने स्वत:ला फसवत असतो, स्वत:पासून सत्य लपवत असतो, स्वत:साठी सबबी शोधत असतो.

योग हा सर्वांगाने प्रामाणिक बनण्याचा मार्ग आहे. संपूर्णत: प्रामाणिक असणे अवघड असते पण एखादी व्यक्ती किमान मानसिकरित्या तरी प्रामाणिक होऊ शकते…

दिव्य शक्ती विद्यमान आहे, पूर्वी कधीही नव्हती अशा रितीने ती आज उपस्थित आहे; पण माणसांच्या अप्रामाणिकपणामुळे ती येथे अवतरित होण्यापासून रोखली जात आहे, त्यामुळे तिची अनुभूती येऊ शकत नाही. सर्व जगच खोटेपणामध्ये, असत्यामध्ये जगत आहे. आत्तापर्यंतचे माणसांमाणसांतील सर्व नातेसंबंध हे खोटेपणा व फसवणुकीवर आधारलेले आहेत.

राष्ट्राराष्ट्रांमधील राजनैतिक संबंधही खोटेपणावर आधारलेले आहेत. त्यांना ‘शांती हवी आहे’ असा ते एकीकडे दावा करत असतात आणि त्याचवेळी ते स्वत:ची सामरिक ताकद वाढवीत चालले आहेत. माणसांमधील व राष्ट्राराष्ट्रांमधील पारदर्शी प्रामाणिकपणामुळेच रूपांतरण झालेले जग अस्तित्वात येऊ शकेल.

– श्रीमाताजी (CWM 13 : 268)

 

माणसं नेहमीच जटिल असतात आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये गुण व दोष परस्परांमध्ये इतके मिसळलेले असतात की, ते वेगळे करता येणे जवळजवळ अशक्य असते. एखादी व्यक्ती जे बनू इच्छिते किंवा इतरांच्या मनात तिच्याविषयी जी प्रतिमा असावी असे तिला वाटते त्यापेक्षा, ती व्यक्ती वास्तवात पूर्णपणे वेगळी असू शकते. कधीकधी त्या व्यक्तीच्या स्वभावाची एक बाजू दिसते, तर कधी तिच्या स्वभावाची दुसरीच बाजू व्यक्त होते किंवा अमुक एका संदर्भात व्यक्ती जशी वागते त्यापेक्षा अगदी भिन्नपणे ती इतरांच्या बाबतीत वागू शकते.

मानवी प्रकृतीच्या दृष्टीने पाहता, पूर्णपणे प्रामाणिक असणे, सरळमार्गी असणे, खुले असणे ही काही साधीसोपी उपलब्धी नाही. केवळ आध्यात्मिक प्रयत्नांनीच ही गोष्ट साध्य होऊ शकते. त्यासाठी व्यक्तीच्या आत्म-परीक्षणात्मक दृष्टीमध्ये निर्मम-वस्तुनिष्ठता असणे आवश्यक असते. तिच्यामध्ये आत्मनिरीक्षणाची स्वसमर्थन न करणारी चिकित्सा आवश्यक असते. बरेचदा भल्या भल्या साधकांकडे किंवा योग्यांकडेदेखील ही क्षमता नसते. केवळ प्रकाशमान अशा ‘ईश्वरी-कृपे‌’मुळेच, साधकाला स्वतःचा शोध लागतो आणि त्याच्यामध्ये ज्या उणिवा असतात, त्या भरून काढून, त्यांचे रूपांतरण घडविण्याची क्षमता केवळ त्या ‘ईश्वरी-कृपे‌’मध्येच असते. (आणि हे सुद्धा केव्हा शक्य होते?) तर, साधक जेव्हा ईश्वरी कार्यासाठी स्वतःला समर्पित करतो आणि तसे करण्यास तो सहमती दर्शवितो तेव्हाच हे घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 51)

 

…एखाद्या व्यक्तीने तुम्हाला तुमचा एखादा दोष दाखविला तर, त्याने तुम्हाला जणू एखादा खजिनाच दाखविला असे समजावे. म्हणजे याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष आढळतो किंवा तुमच्यामध्ये आकलनक्षमतेचा अभाव असल्याचे आढळते; एखादी अक्षमता, दुर्बलता आढळते; अप्रामाणिकपणा किंवा प्रगतीपासून रोखणारे असे काही तुम्हाला तुमच्यामध्ये आढळते, तेव्हा जणू काही एखादा अद्भुत खजिनाच सापडला आहे, असे तुम्हाला वाटले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 220-221)

(व्यक्ती बाह्य परिवर्तन [म्हणजे स्वत:च्या मन, प्राण व शरीरात परिवर्तन] करू इच्छित असेल तर, आंतरिक अनुभूती व साक्षात्कार या गोष्टींची त्यास मदत होते का? असा प्रश्न एका साधकाने विचारला आहे; त्याला श्रीमाताजींनी दिलेल्या उत्तरातील हा अंशभाग…)

आपल्यामध्ये परिवर्तन घडावे ही प्रामाणिक इच्छा जर व्यक्तीकडे असेल तर तिला आंतरिक अनुभूती व साक्षात्कार यापासून खूप साहाय्य मिळते; कारण त्यातून व्यक्तीला परिवर्तनासाठी आवश्यक असणारी शक्ती आणि परिवर्तनासाठी आवश्यक असणारा आधार मिळतो. मात्र परिवर्तन घडावे अशी खरी प्रामाणिक इच्छा त्या व्यक्तीकडे असली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 04 : 349)

साधक : प्रामाणिक असणे आणि निष्ठावान असणे यामध्ये काही फरक आहे का?

श्रीमाताजी : हो, या दोन गोष्टी भिन्न आहेत. अर्थात, मला वाटतं की, प्रामाणिक नसताना निष्ठावान असणे आणि निष्ठावान नसताना प्रामाणिक असणे या दोन्ही गोष्टी अतिशय अवघड असतात. पण मला अशा काही व्यक्ती माहीत आहेत की, ज्या निष्ठावान होत्या पण त्यांच्याकडे प्रामाणिकपणाचा अभाव होता. याच्या उलट म्हणजे प्रामाणिक असूनही निष्ठा नसणे, हे मात्र फारसे दुर्मिळ नाही. एक गुण असेल तर पाठोपाठ दुसरा दुसरा येतोच असे नाही. पण हे उघड आहे की, सचोटी, ऋजुता, निष्ठा आणि प्रामाणिकपणा या गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे संबंधित असतात.

साधक : एखाद्या गोष्टीशी वा व्यक्तीशी संबंधित असणारी निष्ठा ही सीमित भावना असते ना? यापेक्षा प्रामाणिकपणा अधिक व्यापक असतो ना?

श्रीमाताजी : हो, बरोबर आहे. निष्ठेमध्ये एक प्रकारच्या श्रेणीबद्ध संबंधाचा अंतर्भाव होतो, म्हणजे येथे कोणाशी तरी किंवा कोणत्यातरी वस्तुशी निष्ठा असते. त्यामध्ये एक प्रकारचे परस्परावलंबित्व असते. दिलेला शब्द पाळणे, स्वतःचे कर्तव्य अत्यंत काटेकोरपणे बजावणे म्हणजे निष्ठा, अशी सर्वसामान्य समजूत आहे. व्यक्ती अरण्यामध्ये एकटीच जीवन व्यतीत करत असेल तर ती परिपूर्ण प्रामाणिकपणाचे आचरण करू शकते, परंतु निष्ठेचे आचरण मात्र तुम्हाला सामाजिक जीवनातच करता येते, इतर लोकांशी संबंधित असतानाच करता येते. अर्थात, एखादी व्यक्ती ईश्वरी उपस्थितीप्रत आंतरिक श्रद्धायुक्त कृतीने पूर्णपणे समर्पित असेल तर ती त्या उपस्थितीशी एकनिष्ठ असू शकते.

– श्रीमाताजी (CWM 15 : 299-300)

साधेसरळ असणे (Straightforwardness) म्हणजे व्यक्तीने स्वतःशी व ईश्वराशी अगदी प्रामाणिकपणाने, सचोटीने वागणे आणि आचरणामध्ये कुटिलता न बाळगणे.

स्वतःची चूक ओळखण्याची (आणि ती मान्य करण्याची) इच्छा नसणे आणि अमुक एखादी गोष्ट चुकीची आहे असे श्रीमाताजींनी सांगूनदेखील, त्यांच्याशी प्रतिवाद करत, मीच कसा बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा आटापिटा करणे म्हणजे स्व-समर्थन (Self-justification) करणे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 54)

नुसते बाहेरून चांगले ‘दिसण्यापेक्षा‌’ प्रत्यक्षात तसे ‘असणे‌’ अधिक बरे. आपला प्रामाणिकपणा जर परिपूर्ण असेल, तर आपण चांगले आहोत असे ‘दाखविण्याची’ गरज भासणार नाही. ‘परिपूर्ण प्रामाणिकपणा‌’ याचा आमचा अर्थ असा की, आपले सर्व विचार, भावना, संवेदना आणि कृती यांमधून अन्य काही नाही तर, आपल्या अस्तित्वाचे केंद्रवर्ती सत्‌‍-तत्त्व‌च (central Truth of our being) आविष्कृत झाले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 268)

साधक : आध्यात्मिक जीवनासाठी स्वत:ला सज्ज करायचे तर त्यासाठी कोणत्या मूलभूत सद्गुणाची जोपासना केली पाहिजे?

श्रीमाताजी : वास्तविक मी ही गोष्ट अनेकदा सांगितली आहे, पण त्याबद्दल पुनश्च एकदा सांगण्याची ही संधी आहे. तो गुण आहे प्रामाणिकपणा (sincerity). हा प्रामाणिकपणा निरपेक्ष आणि परिपूर्ण असला पाहिजे, कारण प्रामाणिकपणा हेच अध्यात्म-मार्गावरील तुमचे एकमेव संरक्षण असते.

तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर अगदी पुढच्याच पावलावर तुम्ही पडणार व तुमचा कपाळमोक्ष होणार हे निश्चित. आपल्या सभोवार सर्व प्रकारच्या शक्ती, इच्छा, प्रभाव, जीव वावरत असतात आणि तुमच्या प्रामाणिकपणामध्ये एखादी तरी लहानशी फट आढळते का, याच्या ते शोधातच असतात आणि तशी फट दिसताच तिच्यामधून ते झपाट्याने तुमच्यामध्ये शिरकाव करतात आणि तुम्हाला गोंधळात टाकतात.

म्हणून, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी, कोणत्याही गोष्टीला प्रारंभ करण्यापूर्वी, कोणतीही गोष्ट करून पाहताना सर्वप्रथम याची खात्री करून घ्या की, तुम्ही प्रामाणिक आहात ना? आणि एवढेच नव्हे तर, अधिकाधिक प्रामाणिक बनण्याचा तुम्ही प्रयत्न कराल ना? (तुम्हाला स्वत:बद्दल ही खात्री पटणे आवश्यक आहे.) कारण प्रामाणिकपणा हेच तुमचे एकमेव संरक्षण असते.

– श्रीमाताजी (CWM 08 : 247-248)

आध्यात्मिक उत्क्रांती ही एकाच वेळी विभिन्न मार्गांनी वाटचाल करणारी एक विशाल आणि जटिल प्रक्रिया असते. पूर्णयोगाच्या साधकाकडे जे गुण अत्यावश्यक असतात त्यापैकी एक गुण म्हणजे प्रामाणिकपणा (sincerity).

आपण व्यवहारात वावरत असताना ज्याला प्रामाणिकपणा म्हणतो तो प्रामाणिकपणा आणि श्रीअरविंद व श्रीमाताजी ज्याचे प्रतिपादन करतात, तो प्रामाणिकपणा; या दोन्हीमध्ये काही साम्य-भेद आहेत का, हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते.

साधनेच्या संदर्भात तर या प्रामाणिकपणाचे मोल अधिकच उजळलेले दिसते. कारण आपण आपली साधना किती प्रामाणिकपणाने करत आहोत यावर साधनेची यशस्विता अवलंबून असते. तेव्हा श्रीअरविंद व श्रीमाताजी यांना अभिप्रेत असणारा प्रामाणिकपणा म्हणजे नेमके काय, तो अंगी कसा बाणवता येतो, यासंबंधीचा विचार येथे केला आहे. प्रामाणिकपणाचे साधनेतील स्थान किती महत्त्वाचे आहे, तसेच अप्रामाणिकपणाचे निर्मूलन कसे करावे या मुद्द्यांचाही विचार आपण करणार आहोत.

उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘प्रामाणिकपणा‌’ या मालिकेचे आपण नेहमीप्रमाणेच स्वागत कराल अशी आशा आहे.

– संपादक,
अभीप्सा मराठी मासिक