ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

नैराश्यापासून सुटका – ३१

नैराश्यापासून सुटका – ३१

आपण सदासर्वकाळ मनोमय प्रतिमा, मनोरचना (formation) निर्माण करत असतो. आपल्याही नकळतपणे आपण अशा प्रकारच्या प्रतिमा वातावरणामध्ये पाठवत असतो. मग त्या प्रतिमा, त्या मनोरचना वातावरणात इतस्तत: फिरत राहतात. त्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात, त्या मनोरचनांना त्यांचे सहचर भेटतात, कधीकधी त्या एकत्रित येतात आणि आनंदाने एकत्र राहू लागतात. कधीकधी त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतात; तर कधी त्यांच्यामध्ये लढायासुद्धा होतात. कारण बऱ्याचदा या मानसिक प्रतिमांमध्ये इच्छेचा एक लहानसा घटक मिसळलेला असतो आणि तो स्वतःला प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग, प्रत्येकजणच तशा मनोरचना वातावरणात पाठविण्याचा प्रयत्न करत राहतो, जेणेकरून ती मनोरचना कृती करू शकेल आणि मग त्या व्यक्तीला हव्या त्यानुसार गोष्टी घडून येऊ शकतील. पण प्रत्येकजणच अशा रितीने वागत असल्याने त्यातून सर्वसाधारणपणे एक गोंधळ निर्माण होतो.

वातावरणातील या सर्व मनोरचना पाहण्याची दृष्टी आपल्याकडे असेल तर, आपल्याला अगदी आश्चर्यकारक गोष्टी दिसून येतील. युद्धभूमी, मनोलहरी, छोट्या छोट्या मनोमय अस्तित्वांच्या झुंडी जिथे दाटीवाटीने राहत आहेत अशी आश्रयस्थानं, अशा अनेक गोष्टी तिथे तुम्हाला दिसतील. ही मनोमय अस्तित्वं सारखी बाहेर हवेमध्ये फेकली जात असतात आणि ती अस्तित्वं सतत मूर्त रूपात येण्याचा प्रयत्न करत असतात.

या सर्व मनोरचनांमध्ये एक समान प्रवृत्ती आढळून येते आणि ती म्हणजे त्यांना मूर्त रूप धारण करण्याची इच्छा असते, त्यांना शारीरिक रूपामध्ये प्रत्यक्षात येण्याची इच्छा असते आणि या मनोरचना अगणित असल्याने – या सर्व मनोरचना येथे पृथ्वीवर आविष्कृत व्हायच्या असतील तर त्यासाठी येथील जागा अपुरी पडेल इतकी त्यांची संख्या प्रचंड असते – या मनोरचना ढकलाढकली करतात, ढोपरांनी एकमेकांना ढोसतात, त्यांच्याशी सहमत नसलेल्या मनोरचनांना त्या मागे ढकलण्याचा प्रयत्न करतात किंवा कधीकधी तर त्या रचना आपापली सैन्यदलंसुद्धा स्थापन करतात आणि चाल करून येतात. काळ आणि अवकाश या दोन्ही ठिकाणी त्या स्वतःसाठी जागा मिळवू पाहतात. या मनोरचनांची संख्या पाहता त्याच्या तुलनेत येथे उपलब्ध असणारी जागा अगदीच अल्पशी असते आणि म्हणून, व्यक्तिशः हे असे होत राहते.

लोकांना हे काही माहीत नसते आणि तरीही लोकं अशा मनोरचना तयार करत राहतात, बहुधा प्रत्येकजणच अशा रचना तयार करत असतो. आणि ते सातत्याने एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर आदळत राहतात, ते कधी आशावादी असतात, ते कधी इच्छावासना बाळगतात, कधी त्यांचा अपेक्षाभंग होतो, तर कधी ते आनंदी असतात, कधी ते हताश होतात, कारण त्यांचे या मनोरचनांवर कोणतेच नियंत्रण नसते किंवा प्रभुत्व नसते. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीमाताजी (CWM 09 : 386-387)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

21 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago