नैराश्यापासून सुटका – २९

नैराश्यापासून सुटका – २९

(पाँडिचेरी येथील श्रीअरविंद आश्रमामध्ये कायमच्या वास्तव्यास येऊ इच्छिणाऱ्या पण परिस्थितीमुळे तसे करणे शक्य होत नसलेल्या एका साधकाला श्रीअरविंद मार्गदर्शन करत आहेत…)

तुमच्यावर निराशेचे, निरुत्साहाचे मळभ कधीही येऊ देऊ नका आणि ‘ईश्वरी कृपे‌’बाबत कधीही अविश्वास बाळगू नका. बाह्यत: कितीही अडचणी असू देत किंवा तुमच्या स्वत:मध्येसुद्धा कोणत्याही दुर्बलता असू देत पण, तुम्ही जर दृढ श्रद्धा आणि अभीप्सा बाळगलीत तर, ती अदृश्य ‘शक्ती‌’ तुम्हाला त्या साऱ्यामधून पार करेल आणि परत येथे (आश्रमात) घेऊन येईल.

तुम्ही विरोधामुळे आणि अडचणींमुळे अगदी खचून गेलात, जरी तुम्ही डळमळीत झालात, तुम्हाला जरी मार्ग खुंटल्यासारखा वाटला तरीसुद्धा तुमची अभीप्सा (मात्र सदोदित) जागती ठेवा. कधी तुमची श्रद्धा झाकोळल्यासारखी झाली तर, अशा वेळी नेहमीच मनाने आणि अंतःकरणातून आमच्याकडे वळा; म्हणजे ते झाकोळलेपण दूर केले जाईल. …पण मार्गावर दृढपणे वाटचाल करत राहा. मग गोष्टी स्वतःहून उलगडत जातील आणि सरतेशेवटी परिस्थिती आंतरिक चैतन्याला शरण येईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 101)

श्रीअरविंद