जीवन जगण्याचे शास्त्र – ०८

सामान्य आनंदाचा उगम प्राणामध्ये असतो; तो आनंद अशुद्ध असतो आणि परिस्थितीवर अवलंबून असतो. (मात्र) खऱ्या आनंदाचा उगम ईश्वरत्वामध्ये असतो; तो विशुद्ध आणि परिपूर्ण असतो.

*

साधेपणाने राहायचे, साधी सदिच्छा बाळगायची; फार लक्षणीय असे काही करण्याची गरज नसते मात्र सर्वोत्तम असे जे करता येणे शक्य असेल ते ते करायचे आणि ते उत्तमातील उत्तम रितीने करायचे; प्रगतीसाठी, प्रकाशासाठी, सद्भावनापूर्ण शांतीसाठी अभीप्सा बाळगायची आणि तुम्ही काय केले पाहिजे व कोण झाले पाहिजे यासंबंधीचा निर्णय, या जगातील सारेकाही जो जाणतो त्या ईश्वराला घेऊ द्यायचा, हे उचित असते. तेव्हा व्यक्ती चिंतामुक्त असते आणि ती पूर्णपणे आनंदी राहू शकते.

– श्रीमाताजी (CWM 17 : 18) & (CWM 06 : 248)

जीवन जगण्याचे शास्त्र – ०७

साधक : कधीकधी मला असे वाटते की, मी माझ्या सर्व दैनंदिन गोष्टी (उदाहरणार्थ मैदानावर खेळणे, वाद्यवादन, अभ्यास इत्यादी) सोडून द्याव्यात आणि सर्व वेळ फक्त (तुम्ही नेमून दिलेल्या) कामावरच लक्ष केंद्रित करावे. पण माझ्या तर्कबुद्धीला हे पटत नाही. माझ्या मनात ही अशी कल्पना कोठून आणि का येते?

श्रीमाताजी : येथे तुमची तर्कबुद्धी जे सांगत आहे ते योग्य आहे. जटिल परिस्थितीला तोंड न देता, जगण्याची परिस्थितीच सोपी करण्याची एक तामसिक प्रवृत्ती बाह्य प्रकृतीमध्ये बरेचदा आढळून येते. परंतु तुम्हाला जर सर्वांगीण प्रगती करायची असेल तर, अशा प्रकारचे सुलभीकरण (simplification) करणे तितकेसे इष्ट नाही.

– श्रीमाताजी (CWM 16 : 301)

जीवन जगण्याचे शास्त्र – ०६

(व्यक्तित्व विभागलेले असताना कशी स्थिती असते, ते आपण कालच्या भागात पाहिले. प्रामाणिकपणासाठी काम करणे कसे आवश्यक आहे तेही श्रीमाताजींनी अधोरेखित केले. आता ते कसे करायचे यासंबंधी त्या मार्गदर्शन करत आहेत.)

तुमच्या व्यक्तित्वामधील एखादा भाग तुम्हाला (तुमच्या ध्येयाच्या) विरुद्ध दिशेने खेचत आहे, असे जेव्हा तुमच्या लक्षात येते तेव्हा तुम्ही त्याला काळजीपूर्वक हाताळले पाहिजे. एखाद्या बालकाला समजावून सांगावे त्याप्रमाणे, त्याला समजावून सांगितले पाहिजे आणि त्याला केंद्रवर्ती अस्तित्वाशी सुसंवादी केले पाहिजे. हे करणे म्हणजे प्रामाणिकपणासाठी कार्य करणे आणि ते अत्यावश्यक असते.

जेव्हा व्यक्तित्वाच्या सर्व भागांमध्ये ऐक्य असते, सहमती असते, सर्व इच्छांमध्ये सुसंगती असते तेव्हा तुमचे व्यक्तित्व साधे, सालस आणि कृती व प्रवृत्तींमध्ये एकसंध असते. तुमचे समग्र व्यक्तित्व जेव्हा एकाच मध्यवर्ती तत्त्वाभोवती गुंफले जाते तेव्हाच तुम्ही सहजस्फूर्त (spontaneous) बनू शकता. कारण जर, तुमच्यामध्ये, असे काहीतरी असेल की, जे ईश्वराभिमुख आहे आणि अंतःस्फूर्ती व प्रेरणा मिळावी यासाठी प्रतीक्षा करत आहे आणि त्याचवेळी तुमच्यामधीलच एक भाग त्याच्या स्वतःच्याच स्वार्थासाठी धडपडत असेल, स्वतःच्या वासना भागवण्याच्या दृष्टीने धडपडत असेल तर तुम्ही घेतलेली भूमिका नक्की काय आहे हेच तुम्हाला कळेनासे होते. तसेच तुमच्या बाबतीत काय घडणार आहे हेदेखील तुम्हाला कळेनासे होते. कारण तुमच्यामधील एक भाग हा, दुसरा भाग जे करू इच्छित असतो ते केवळ उद्ध्वस्तच करतो असे नाही तर, तो त्याला पूर्ण विरोध करत असतो.

काय आवश्यक आहे आणि काय केले पाहिजे हे आपण इथे स्पष्टपणे पाहिले. परंतु हे प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कोणतीही जबरदस्ती करता कामा नये किंवा अतिरेकी घाई देखील करता कामा नये. कारण त्यामुळे दिव्य चेतनेच्या अभिव्यक्तीसाठी आवश्यक असणाऱ्या शांती, समचित्तता आणि स्थिरता या गोष्टींना हानी पोहोचू शकते.

आणि सरतेशेवटी आपल्या असे लक्षात येते की, येथे संतुलन (Balance) अत्यावश्यक असते. कोणत्याही दोन टोकाच्या गोष्टी काळजीपूर्वक टाळू शकेल असा एक मार्ग आवश्यक असतो. अति घाई तुम्हाला संकटात लोटते; अधीरता तुम्हाला प्रगत होण्यापासून अडवते. आणि त्याचबरोबर हेही खरे आहे की, अति संथपणा, जडता (inertia) तुमचे पाय मागे खेचते. आणि म्हणूनच, गौतम बुद्ध ज्याला ‘मध्यम मार्ग’ असे संबोधतात तो मार्ग सर्वोत्तम असतो.

– श्रीमाताजी (CWM 08 : 284-285)

जीवन जगण्याचे शास्त्र – ०५

(सहजस्फूर्त असण्याचे महत्त्व काय असते याबाबत श्रीमाताजींनी केलेले विवेचन आपण गेल्या दोन भागात पाहिले. त्या आता त्याच संदर्भातील अधिक बारकावे उलगडवून दाखवत आहेत.)

आता प्रश्ना असा निर्माण होतो की, “सहजस्फूर्त (spontaneous) कसे व्हायचे?”

“सहजस्फूर्त असण्यासाठी तुम्ही संपूर्णतया साधे असले पाहिजे.” आणि त्यातून मग पुन्हा आणखी एक प्रश्न निर्माण होतो की, संपूर्णतया साधे कसे बनायचे?

“संपूर्णतया साधे बनण्यासाठी तुम्ही पूर्णतया प्रामाणिक (sincere) असले पाहिजे.”

आणि आता पुन्हा प्रश्न निर्माण होतो, पूर्णतया प्रामाणिक बनायचे म्हणजे काय?

“पूर्णतया प्रामाणिक असणे म्हणजे तुमच्या व्यक्तित्वामध्ये कोणतीही दुफळी नको किंवा कोणतीही विसंगती अथवा कोणताही विरोधाभास नको.”

तुमचे व्यक्तित्व जर तुकड्यातुकड्यांनी बनलेले असेल तर त्या तुकड्यांमुळे तुमच्या व्यक्तित्वामध्ये एक प्रकारची दुफळी तयार होते. हे तुकडे केवळ वेगवेगळेच असतात असे नाही तर, बऱ्याचदा ते परस्पर विसंगत असतात. उदाहरणार्थ, तुमच्यामधील एक भाग दिव्य जीवनाची आस बाळगत असतो; ईश्वराला जाणण्याची, त्याच्याशी ऐक्य पावण्याची, त्याच्यासमवेत पूर्णतया जीवन जगण्याची आस बाळगत असतो. आणि त्याच वेळी तुमच्यामधील दुसरा एक भाग मात्र असा असतो की, जो इच्छावासना, आसक्ती बाळगून असतो. त्यांना तो भाग ‘गरजा’ असे संबोधतो आणि तो भाग या गोष्टींच्या नुसत्या प्राप्तीची अभिलाषाच बाळगतो असे नाही तर, त्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर तो अस्वस्थसुद्धा होतो. इतर कोणत्याही विसंगतीपेक्षा ही विसंगती सर्वात जास्त सुस्पष्ट असते.

अशा आणखीही काही विसंगती असतात. उदाहरणार्थ, व्यक्तीला ईश्वराप्रति संपूर्ण समर्पण करण्याची इच्छा असते, ईश्वरी संकल्पाला आणि ईश्वराच्या मार्गदर्शनाला पूर्णपणे शरण जावे अशी तिची इच्छा असते. आणि जेव्हा तसा खरोखरच अनुभव येतो तेव्हा आपण कोणीच नाही, आपण काहीच करू शकत नाही, इतकेच काय पण जर ईश्वर अस्तित्वात नसता तर आपण जगूच शकलो नसतो आणि काहीच करू शकलो नसतो, आपण कोणीच नसतो… हा अनुभव व्यक्तीला येतो. (व्यक्ती जेव्हा ईश्वराप्रति खरोखरच प्रामाणिकपणे आत्मदान करण्याचा प्रयत्न करते तेव्हा, योगमार्गावर येणारा हा सार्वत्रिक अनुभव असतो.)

वास्तविक, संपूर्ण आत्मदानाच्या मार्गावरील एक साहाय्य या भूमिकेतून तो अनुभव आलेला असतो. परंतु हा अनुभव येतो तेव्हा, तुमच्या व्यक्तित्वामध्ये एक भाग असा असतो की, जो अचानक भयंकर बंड करून उठतो आणि म्हणतो, “पण का? मला ‘मी’ म्हणून अस्तित्वात राहायचे आहे, मी पण कोणीतरी आहे, मला सर्व गोष्टी स्वतःच करायच्या आहेत, मला माझे (स्वतंत्र) व्यक्तिमत्त्व हवे आहे.” आणि मग स्वाभाविकपणे, पहिल्या भागाने (आत्मदान केलेल्या भागाने) जे काही केले होते ते दुसऱ्या भागाकडून नामशेष केले जाते. ही उदाहरणे अपवादात्मक आहेत असे नाही तर, हे असे नेहमी घडत असते. मी तुम्हाला यासारखी, व्यक्तित्वातील परस्परविरोधाची अगणित उदाहरणे सांगू शकते. म्हणजे जेव्हा तुमच्यामधील एखादा भाग पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा, दुसरा भाग आडवा येतो आणि सर्व काही उद्ध्वस्त करून टाकतो. आणि तुम्हाला परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 08 : 283-284)

जीवन जगण्याचे शास्त्र – ०४

(सहजस्फूर्त असणे म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय, यासंबंधीचा विचार कालच्या भागात आपण केला. मनोकल्पित रचनांच्या पलीकडे जात, अंत:प्रेरणेवर विसंबून कार्य कसे करायचे याचाही निर्देश त्यामध्ये देण्यात आला होता. आता योगसाधनेमधील त्याची आवश्यकता व त्यामधील धोके श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

तुम्ही योगसाधना करू इच्छित असाल आणि तुम्ही योगमार्गामध्ये प्रवेश केलात तर, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनोरचनांच्या हातचे बाहुले बनता कामा नये, ही गोष्ट अतिशय आवश्यक असते. तुम्हाला जर तुमच्या अनुभवांवर विश्वास ठेवायचा असेल तर, जे अनुभव यावेत असे तुम्हाला वाटते किंवा त्याविषयी तुमची जी कल्पना असते, जे रूप पाहण्याची तुम्हाला इच्छा किंवा अपेक्षा असते, तशा मनोमय रचना तुमच्या मनामध्ये निर्माण न करण्याची अतिशय काटेकोर काळजी तुम्ही घेतली पाहिजे.

कारण मनोमय रचना या बऱ्याचदा एक प्रकारच्या वास्तव रचना (real formation) असतात, ती एक खरी निर्मिती असते. आणि तुम्ही तुमच्या कल्पनेच्या साहाय्याने अशी रूपं तयार करता की, जी काही ठरावीक प्रमाणात तुमच्यापासून स्व-तंत्र असतात आणि ती रूपं जणू बाहेरून आल्यासारखी तुमच्यापाशी परत येतात आणि ती रूपं तुम्हाला ‘अनुभव आल्याचा’ भास निर्माण करतात. परंतु हे ईप्सित असलेले अनुभव किंवा ज्याच्या मागे तुम्ही धावत असता ते किंवा तुम्हाला अपेक्षित असणारे अनुभव सहजस्फूर्त नसतात आणि ते आभासी असल्याने त्यामध्ये जोखीम असते. कधीकधी तर ते अतिशय धोकादायक असे भ्रम असतात.

म्हणून जेव्हा तुम्ही मानसिक साधनेचे (mental discipline) अनुसरण करत असता तेव्हा, तुम्ही विशिष्ट अनुभवांविषयी कोणतीही पूर्वकल्पना न करण्याची किंवा ते प्राप्त व्हावेत अशी अभिलाषा न बाळगण्याची सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे. कारण तसे केलेत तर, तुम्हीच तुमच्यासाठी या अनुभवांचा एक भ्रम तयार करता. योगाच्या क्षेत्रामध्ये, ही अगदी काटेकोर आणि कठोर सहजस्फूर्तता अगदी अपरिहार्य असते. या मार्गावर खात्रीने आणि निर्भयपणे पुढे जायचे असेल तर, त्यासाठी, तुमच्यामध्ये कोणतीही आकांक्षा किंवा इच्छा किंवा बेसुमार कल्पना असता कामा नयेत; किंवा ज्याला मी ‘आध्यात्मिक स्वप्नरंजन’ (spiritual romanticism) म्हणते ते असता कामा नये किंवा चमत्कारसदृश गोष्टींची आवडदेखील असता कामा नये; या सर्व गोष्टी तुम्ही अगदी काळजीपूर्वक दूर सारल्या पाहिजेत. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 08 : 282-283)

जीवन जगण्याचे शास्त्र – ०३

(सर्वसाधारणपणे मनुष्य प्राधान्याने मानसिक जीवन जगत असतो. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन, जीवन सहजस्फूर्तपणे कसे जगता येते आणि त्यामुळे ते अधिक सुकर कसे होते, यासंबंधी श्रीमाताजी येथे मार्गदर्शन करत आहेत.)

एखादी गोष्ट विचारपूर्वक, आखणी करून, ठरवून, स्वतःच्या व्यक्तिगत इच्छेने साध्य करण्याचा खटाटोप न करणे म्हणजे सहजस्फूर्त (spontaneous) असणे होय. खरी सहजस्फूर्तता काय असते हे समजावे म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण सांगते.

श्रीअरविंदांनी ‘आर्य’ नियतकालिकासाठी लेखन सुरू केले तेव्हाची ही गोष्ट आहे. त्यामध्ये त्यांनी जे लेखन केले ते केवळ मानसिक ज्ञान नव्हते किंवा ती मनोमय रचनादेखील नव्हती. लेखनाआधी ते त्यांचे मन शांत करत असत आणि टंकलेखन यंत्रासमोर बसत असत आणि मग जे काही लेखन करायचे असे, ते वरून म्हणजे उच्चतर स्तरांवरून, जणू काही अगदी तयार होऊन येत असे. उच्चतर स्तरांवरून येणाऱ्या त्या ज्ञानाला आणि एवढेच नव्हे तर, त्याच्या अभिव्यक्तीला श्रीअरविंदांच्या माध्यमातून, त्यांच्या मनाच्या शांत अवस्थेत वाव मिळत असे. तेव्हा श्रीअरविंदांना टंकलेखन यंत्रावरून फक्त बोटे फिरवावी लागत असत आणि त्यानंतर ते लेखन (अगदी सहजगत्या) कागदावर उमटत असे. अशा रितीने श्रीअरविंद ‘आर्य’ मासिकाची दरमहा चौसष्ट छापील पाने होतील एवढे लेखन करत असत. या पद्धतीमुळेच ते एवढे लेखन करू शकत असत. श्रीअरविंद जर केवळ मानसिक स्तरावर खटपट करून लेखन करत असते तर, त्यांच्या हातून असे आणि एवढे लेखन झाले नसते. ही असते खरी मानसिक सहजस्फूर्तता!

आणि याबाबत आणखी थोडे पुढे जाऊन सांगायचे तर असे म्हणावे लागेल की, (व्यक्तीला जर लेखनात व भाषणात अशी सहजस्फूर्तता विकसित करायची असेल तर) तिला जे लिहायचे असते किंवा जे बोलायचे असते त्याचा तिने अगोदर विचार करता कामा नये किंवा तिने त्याची आधीच आखणी करता कामा नये. (त्यापेक्षा) तिला तिचे मन शांत करता आले पाहिजे आणि एखाद्या धारकपात्राप्रमाणे (receptacle) ते मन उच्चतर चेतनेच्या दिशेने वळविता आले पाहिजे आणि जे काही वरून येते, जे काही ग्रहण केले जाते ते त्या व्यक्तीने मानसिक निश्चल-नीरवतेमध्ये आविष्कृत केले पाहिजे. ही खरी सहजस्फूर्तता ठरेल.

अर्थातच, ही गोष्ट काही साधीसोपी नाही. त्यासाठी पूर्वतयारीची आवश्यकता असते. तुम्ही आणखी खाली प्रत्यक्ष व्यवहारात उतरलात तर मग, ते अधिकच अवघड होते. कारण सहसा, तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट तर्कसंगत रितीने करायची असते तेव्हा, तुम्हाला जे काही करायचे असते त्याचा तुम्हाला आधी विचार करावा लागतो; ती कृती करण्यापूर्वी तुम्हाला योजना आखावी लागते. अन्यथा खऱ्या अंतःप्रेरणेऐवजी (inspiration), त्यापासून कित्येक योजने दूर असणाऱ्या सर्व प्रकारच्या इच्छाआकांक्षा आणि आवेगांवरच तुम्ही हेलपाटत राहण्याची शक्यता असते. आणि तसे झाले तर, (खऱ्या अंतःप्रेरणेऐवजी) ‘कनिष्ठ प्रकृती’ तुम्हाला कृती करण्यास भाग पाडत आहे, असा त्याचा सरळसरळ अर्थ होईल. त्यामुळे, जोपर्यंत तुम्ही प्रज्ञेच्या आणि निर्लिप्ततेच्या अवस्थेपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत, तुम्ही तुमच्या दैनंदिन कृतींमध्ये सहजस्फूर्ततेचा अवलंब करता कामा नये. अन्यथा तुम्ही सर्वाधिक विस्कळीत आवेगांच्या आणि प्रभावांच्या हातचे बाहुले बनून राहण्याचा धोका संभवतो. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 08 : 281-282)

जीवन जगण्याचे शास्त्र – ०२

ज्या क्षणी आविष्काराचा खटाटोप नाहीसा होतो तेव्हा, तो आविष्कार सहजस्वाभाविक होऊन जातो. एखादे फूल जसे सहजतेने उमलते, त्याचे सौंदर्य अभिव्यक्त करते; कोणताही गाजावाजा न करता किंवा कोणत्याही आवेशाविना अगदी सहजतेने आपला सुगंध पसरविते तसा तो आविष्कार असतो. या सहजतेमध्ये मोठी शक्ती सामावलेली असते, ती शक्ती निर्भेळ असते; त्यामुळे त्यातून कोणत्याही विघातक प्रतिक्रिया उद्भवत नाहीत; उद्भवल्याच तर त्या अगदीच अल्प असतात.

प्राणाच्या (vital) शक्तीवर फार विसंबून राहता कामा नये कारण ती कर्ममार्गावरील प्रलोभक (tempter) असते. तिच्यामुळे तुम्हाला त्वरित परिणाम अनुभवता येतात त्यामुळे तिच्या जाळ्यामध्ये फसण्याचा नेहमीच धोका असतो. कर्म चांगले करण्याच्या आपल्या अतिउत्साहामुळे, त्या शक्तीचा उपयोग करण्याच्या नादात, आपण वाहवत जातो. मात्र असे केल्यामुळे, योग्य दिशेने चाललेल्या आपल्या सर्व प्रयत्नामध्ये अचानकपणे बाधा निर्माण होते आणि आपण जे काही करत असतो त्यामध्ये भ्रांतीचे आणि विनाशाचे बीज पेरले जाते.

सहजता, सहजता! हे ईश्वेरा, तुझ्या उपस्थितीची विशुद्धता किती मधुर आहे!

– श्रीमाताजी (CWM 01 : 17)

जीवन जगण्याचे शास्त्र – ०१

एका साधकाने श्रीमाताजींच्या सान्निध्यात काम करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने ‘मला काही संदेश द्यावा,’ अशी विनंती त्यांना केली.

तेव्हा श्रीमाताजींनी त्याला असा संदेश दिला की,
“साधेसरळ असा,
आनंदी राहा,
अविचल राहा,
शक्य तितक्या उत्तम रीतीने कर्म करा,
माझ्याप्रति खुले, उन्मुख राहा,
तुमच्याकडून एवढेच अपेक्षित आहे.”

‘जीवन जगण्याचे शास्त्र’ ही आपली नवीन मालिका या संदेशावर आधारित आहे. वाचक त्याचे स्वागत करतील अशी आशा आहे. धन्यवाद!

संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

आत्मसाक्षात्कार – २८

(मागील भागावरून पुढे…)

(आत्मसाक्षात्कार २४ ते २८ हे भाग एकत्रित वाचल्यास श्रीअरविंद प्रणीत ‘दिव्य अतिमानव’ ही संकल्पना अधिक चांगल्या रितीने समजेल, असा विश्वास वाटतो.)

अतिमानस (Supermind) म्हणजे अतिमानव; त्यासाठी मनाच्या अतीत होणे ही अनिवार्य अट आहे.

अतिमानव होणे म्हणजे दिव्य जीवन जगणे, देव बनणे. कारण देव-देवता या ईश्वराच्या शक्ती असतात. तुम्ही मानववंशामधील ईश्वराची शक्ती बनून राहा.

दिव्य अस्तित्वामध्ये वसती करून जीवन जगणे आणि आत्म्याच्या चेतनेला व परमानंदाला, आत्म्याच्या संकल्पशक्तीला व ज्ञानाला तुमचा ताबा घेऊ देणे आणि त्यांना तुमच्या समवेत व तुमच्या माध्यमातून लीला करू देणे, हा त्याचा अर्थ आहे.

हे तुमच्या अस्तित्वाचे सर्वोच्च रूपांतरण असते. स्वत:मध्ये ईश्वराचा शोध घेणे आणि स्वत:च्या सर्व गोष्टींमध्ये त्याला प्रकट करणे हे सर्वोच्च रूपांतरण असते. त्याच्या अस्तित्वामध्ये जीवन जगा, त्याच्या प्रकाशाने उजळून निघा, त्याच्या शक्तीसहित कृती करा, त्याच्या परमानंदामध्ये न्हाऊन निघा. तुम्ही तो अग्नी व्हा, तो सूर्य व्हा, आणि तो महासागर व्हा. तुम्ही तो आनंद, ती महत्ता आणि ते सौंदर्य बना.

यांपैकी अंशभाग जरी तुम्ही प्रत्यक्षात जीवनामध्ये उतरवू शकलात तर, तुम्ही अतिमानवतेच्या (supermanhood) पहिल्या काही पायऱ्या गाठल्याप्रमाणे होईल.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 152)

‘आत्मसाक्षात्कार’ ही मालिका येथे समाप्त होत आहे. धन्यवाद!!

आत्मसाक्षात्कार – २७

(मागील भागावरून पुढे…)

उठा, (जागे व्हा आणि) स्वतःच्या अतीत जा, तुमचे स्वत:चे मूळ स्वरूप प्राप्त करून घ्या. तुम्ही माणूस आहात आणि माणसाची समग्र प्रकृतीच अशी असते की, त्याने स्वत:पेक्षा अधिकतर व्हावे. एकेकाळी जो मानवामधील पशु-मानव (animal man) होता, तो आता त्याहूनही वरच्या श्रेणीत प्रविष्ट झाला आहे. तो विचारवंत आहे, कारागीर आहे, तो सौंदर्योपासक आहे. पण त्याने आता विचारवंतापेक्षाही अधिक असे काही बनले पाहिजे; तो आता ज्ञानद्रष्टा झाला पाहिजे. त्याने आता कारागीरापेक्षा अधिक काही बनले पाहिजे; तो निर्माणकर्ता आणि त्याच्या निर्मितीचा स्वामी झाला पाहिजे. त्याने आता केवळ सौंदर्योपासक न राहता, अधिक काही बनले पाहिजे; कारण तो सर्व सौंदर्य आणि सर्व आनंद यांचा आस्वाद घेऊ शकतो.

मनुष्य हा शरीरधारी असल्यामुळे, तो त्याचे अमर्त्य सत्त्व (substance) मिळविण्यासाठी धडपडतो; तो प्राणमय जीव असल्यामुळे, तो अमर्त्य जीवनासाठी आणि त्याच्या अस्तित्वाच्या अनंत सामर्थ्यासाठी धडपडतो; तो मनोमय जीव असल्यामुळे आणि त्याच्याकडील ज्ञान आंशिक असल्यामुळे, तो संपूर्ण प्रकाश आणि शुद्ध दृष्टी यांच्या प्राप्तीसाठी धडपडतो.

हे सर्व प्राप्त करून घेणे म्हणजे अतिमानव बनणे; कारण तसे बनणे म्हणजे मनामधून अतिमानसाकडे उन्नत होणे. त्याला ‘दिव्य मन’ किंवा ‘दिव्य ज्ञान’ किंवा ‘अतिमानस’ काहीही नाव द्या; ते दिव्य संकल्पाची आणि दिव्य चेतनेची शक्ती व प्रकाश असतात. चैतन्याने (Spirit) अतिमानसाच्या माध्यमातून पाहिले आणि त्याने या जगतांमध्ये (worlds) स्वत:ची निर्मिती केली, अतिमानसाच्याद्वारे ते चैतन्य त्या जगतांमध्ये निवास करते आणि त्यांचे शासन करते. त्याच्यामुळेच ते स्वराट आणि सम्राट, म्हणजे अनुक्रमे स्व-सत्ताधीश आणि सर्व-सत्ताधीश आहे. (क्रमश:)

श्रीअरविंद (CWSA 12 : 151-152)