ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

जीवन जगण्याचे शास्त्र – ०९

जीवन जगण्याचे शास्त्र – ०९

मनुष्य आणि ईश्वर यांच्या भेटीचा अर्थ नेहमीच, मनुष्यामध्ये ईश्वरत्वाचा प्रवेश आणि समावेश तसेच मनुष्याचा दिव्यत्वामध्ये आत्मोदय असा होतो. परंतु हा उदय विलयनाच्या स्वरूपाचा नसतो. (या जगामध्ये ज्या सगळ्या घडामोडी घडत असतात) त्या शोधाची, धडपडीची, दुःखभोगाची, परमानंदाची परिपूर्ती निर्वाण ही असूच शकत नाही. निर्वाण हाच जर या लीलेचा अंत असता, तर या लीलेचा आरंभच कधी झाला नसता. परमानंद हे रहस्य आहे. विशुद्ध आनंद अनुभवण्यास शिका म्हणजे तुम्ही ईश्वर जाणून घ्याल.” – श्रीअरविंद (CWSA 13 : 203-204)

*

(श्रीअरविंद लिखित वरील उताऱ्यावर एका साधकाने प्रश्न विचारला आहे.)

साधक : काय केल्यास व्यक्ती ‘विशुद्ध आनंद घेण्यास’ शिकू शकेल?

श्रीमाताजी : सर्वप्रथम, सुरुवात करायची झाली तर, तुम्ही सतर्कपणे निरीक्षण करून जाणिवसंपन्न झाले पाहिजे. इच्छावासना आणि त्यांच्या उपभोगातून जे सुख मिळते ते अस्पष्ट, अनिश्चित, मिश्रित, क्षणभंगुर आणि पूर्णपणे असमाधानकारक असे सुख असते, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. सहसा ही जाणीव हा आरंभबिंदू असतो.

तुम्ही जर बुद्धिनिष्ठ असाल तर, इच्छावासना काय असतात हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे आणि तुमच्या इच्छावासनांची पूर्ती करणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून तुम्ही स्वतःला रोखले पाहिजे. त्यांचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, तुम्ही त्यांना नकार दिला पाहिजे.

…‘इच्छावासनांची तृप्ती करण्यामधील आनंदापेक्षा, त्यांचा निरास करण्यामध्ये आणि त्यांच्यावर विजय संपादन करण्यात अनंतपटीने अधिक आनंद सामावलेला असतो.’ आणि हे निरपवाद सत्य आहे, असे प्रत्येक प्रामाणिक आणि निष्ठावान साधकाला आज ना उद्या, कधी कधी अगदी त्वरेने तर कधी कालांतराने, अनुभवास येते. जे सुख अगदीच चंचल आणि भेसळयुक्त असते, त्या वासनापूर्तीच्या सुखापेक्षा, इच्छावासनांवर मात करण्याचा आनंद हा अतुलनीय उच्चकोटीचा असतो. ही दुसरी पायरी असते.

आणि मग स्वाभाविकपणे, अशा प्रकारे सातत्याने केलेल्या अभ्यासामुळे, अगदी थोड्या अवधीतच तुमच्या वासना तुमच्यापासून दूर जातील आणि नंतर त्या तुम्हाला त्रास देणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या अस्तित्वामध्ये थोडे अधिक खोलवर जाण्यासाठी मोकळे होऊ शकाल आणि आनंदाचे निधान असणाऱ्या, ईश्वराप्रति, ईश्वरी तत्त्वाप्रति, ईश्वरी कृपेप्रति अभीप्सा बाळगत खुले होऊ शकाल. आणि तुम्ही जर हे अगदी प्रामाणिकपणे आत्मदानाच्या (self-giving) भूमिकेतून केलेत, म्हणजे जणू काही तुम्ही स्वतःला पूर्णपणे देऊ केलेत, स्वतःला अर्पण केलेत आणि त्या अर्पणाच्या मोबदल्यात कोणत्याच गोष्टीची अपेक्षा बाळगली नाहीत तर, तुम्हाला एक प्रकारची आल्हाददायक ऊब जाणवेल; आणि ज्याने तुमचे हृदय भरून जाईल असे, संतोषजनक, आत्मीय, प्रकाशमान असे काहीतरी तुम्हाला जाणवेल, आणि ती गोष्ट आनंदाची अग्रदूत असेल. यानंतरचा मार्ग सोपा असतो… (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 21)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

14 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago