साधना, योग आणि रूपांतरण – २८४

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

नमस्कार वाचकहो,

‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये आपण आजवर साधना या विभागांतर्गत ध्यान, कर्म व भक्ती यांचा विचार केला. योग या विभागांतर्गत प्रामुख्याने ‘पूर्णयोग’ व त्याची वैशिष्ट्ये जाणून घेतली.

रूपांतरण (transformation) या विभागामध्ये आपण आंतरात्मिक (psychic), आध्यात्मिक (spiritual) व अतिमानसिक (supramental) रूपांतरण याचा अभ्यास केला. त्यानंतर मनाचे, प्राणाचे व शरीराचे रूपांतरण म्हणजे काय, ते कसे करायचे असते, त्यातील अडथळे कोणते असतात याचा सविस्तर विचार केला.

मनाचे, प्राणाचे व शरीराचे रूपांतरण करूनही श्रीअरविंद व श्रीमाताजी यांना अभिप्रेत असणारे रूपांतरण पूर्णपणे साध्य होत नाही. कारण अजून अवचेतन (subconscient) व अचेतन (inconscient) यांचे रूपांतरण शिल्लक असते. आपल्या कनिष्ठ प्रकृतीची पाळेमुळे अवचेतन व अचेतन प्रांतामध्ये रुजलेली असतात. तेथूनच मुख्यत: साधनेमध्ये अडथळे उद्भवत असतात.

प्रकृतीचे पूर्णत: रूपांतरण होण्यासाठी अवचेतन व अचेतन या दोन्हीमध्येदेखील रूपांतरण होणे आवश्यक असते. आणि एकंदर, मानवाच्या आध्यात्मिक इतिहासामध्ये या रूपांतरणाचा विचार आणि त्यासाठीचा प्रयत्न श्रीअरविंद व श्रीमाताजी यांनीच प्रथमत: केला आहे. त्यामुळे हा विचार समजावून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. हे असे काही आपल्या वाचनात प्रथमच येत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित हा भाग समजण्यास काहीसा अवघड वाटेल. परंतु तो नीट समजावून घेतला तर ‘पूर्णयोगा’चे वेगळेपण लक्षात येण्याची अधिक शक्यता आहे.

म्हणून उद्यापासून आपण ‘अवचेतन व अचेतन प्रांताचे रूपांतरण’ हा भाग नेटाने समजावून घेण्याचा प्रयत्न करू या.

संपादक,
‘अभीप्सा’ मराठी मासिक

साधना, योग आणि रूपांतरण – २८३

शरीराचे रूपांतरण

आपण जेव्हा (शरीराच्या) रूपांतरणाबद्दल (transformation) बोलत असतो तेव्हा अजूनही त्याचा काहीसा धूसर अर्थच आपल्या मनामध्ये असतो. आपल्याला असे वाटत असते की, आता काहीतरी घडणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून सारे काही सुरळीत, चांगले होणार आहे. म्हणजे आपल्याला काही अडचणी भेडसावत असतील तर त्या अडचणी नाहीशा होऊन जातील, जे आजारी असतील ते बरे होतील, शरीर अशक्त आणि अक्षम असेल तर शरीराच्या त्या साऱ्या दुर्बलता आणि अक्षमता नाहीशा होऊन जातील, अशा काहीतरी गोष्टी आपल्या कल्पनेमध्ये असतात. पण मी म्हटले त्याप्रमाणे, हे सारे अगदी धूसर असे आहे, केवळ एक कल्पना आहे.

शारीर-चेतनेच्या (body consciousness) बाबतीत एक उल्लेखनीय बाब अशी असते की, जोपर्यंत तिच्याबाबत एखादी गोष्ट अगदी पूर्ण होण्याच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचत नाही तोपर्यंत तिला (शारीर-चेतनेला) ती गोष्ट अगदी नेमकेपणाने आणि पूर्ण तपशिलवारपणे कळू शकत नाही.

म्हणून, जेव्हा रूपांतरणाची प्रक्रिया अगदी सुस्पष्ट होईल, म्हणजे ती प्रक्रिया कोणत्या टप्प्यांमधून जाणार आहे, त्या संपूर्ण रूपांतरणाच्या दरम्यान कोणकोणते बदल घडून येणार आहेत, म्हणजे त्यांचा क्रम कसा असेल, त्यांचा मार्ग कोणता असेल, त्यातील कोणत्या गोष्टी आधी होतील, त्यानंतर कोणत्या गोष्टी घडतील, इत्यादी सारा तपशील जेव्हा अगदी पूर्णपणे ज्ञात होईल, तेव्हा ते प्रत्यक्षात येण्याची घटिका आता जवळ आली आहे, याची ती निश्चित खूण असेल. कारण ज्या ज्या वेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीचा इतक्या अचूकपणाने तपशिलवार बोध होतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की, आता तुम्ही ती गोष्ट साध्य करण्यासाठी सक्षम झाला आहात. त्या क्षणी तुम्हाला (त्या गोष्टीबाबत) समग्रतेची दृष्टी प्राप्त होऊ शकते.

उदाहरणार्थ, आता हे पूर्ण निश्चितपणे सांगता येऊ शकते की, अतिमानसिक प्रकाशाच्या (supramental light) प्रभावाखाली सर्वप्रथम शारीर-चेतनेचे रूपांतरण होईल; त्याच्या पाठोपाठ, शरीराच्या विविध अवयवांच्या कार्यावर, त्यांच्या सर्व गतिविधींवर नियंत्रण आणि प्रभुत्व निर्माण होईल; त्यांनतर, हे प्रभुत्व क्रमाक्रमाने गतिविधींमध्ये एक प्रकारचे मूलगामी परिवर्तन घडवून आणेल आणि त्यानंतर मग स्वयमेव अवयवांच्या घडणीमध्येच परिवर्तन घडून येईल. जरी या साऱ्याचा बोध अजूनही पुरेसा नेमकेपणाने झालेला नसला तरीही, हे सारे आता निश्चितपणे घडून येणार आहे.

परंतु अंतिमतः हे सारे कसे घडून येईल? तर, जेव्हा विविध अवयवांची जागा विविध शक्तींच्या, विविध गुणधर्मांच्या आणि प्रकृतीच्या एकीकृत केंद्रांद्वारे घेतली जाईल, तेव्हा त्यातील प्रत्येक केंद्र त्याच्या स्वतःच्या विशिष्ट पद्धतीने कार्य करेल. अजूनही या साऱ्या गोष्टी संकल्पनात्मक पातळीवरच आहेत आणि (त्यामुळे) शरीराला या साऱ्याचे चांगल्या रीतीने आकलन होऊ शकत नाही कारण या साऱ्या गोष्टी प्रत्यक्षात यायला अजून पुष्कळ अवकाश आहे. आणि (मी सुरुवातीला म्हटले त्याप्रमाणे) शरीर जेव्हा स्वतः एखादी गोष्ट करू शकते तेव्हाच म्हणजे, त्या टप्प्यावर आल्यावरच शरीराला खऱ्या अर्थाने त्या गोष्टीचे आकलन होऊ शकते.

– श्रीमाताजी (CWM 15 : 280-281)

साधना, योग आणि रूपांतरण – २८२

शरीराचे रूपांतरण

दु:ख येते तेव्हा ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते आणि जितक्या लवकर आपण हा धडा घेऊ तितक्या प्रमाणात दु:खाची गरज कमी होते आणि जेव्हा आपल्याला त्याचे रहस्य कळते, तेव्हा दु:खाची शक्यताच मावळून जाते. कारण ते रहस्य आपल्याला कारणाचा उलगडा करून देते; दु:खाचे मूळ, त्याचे ध्येय आणि त्याच्या पलीकडे जाण्याचा मार्ग प्रकट करते.

व्यक्तीने अहंभावाच्या वर उठून, त्याच्या तुरुंगातून बाहेर पडावे, ‘ईश्वरा’शी स्वत:चे ऐक्य साधावे, त्याच्यामध्ये विलीन व्हावे, आपण ‘ईश्वरा’पासून दुरावले जाऊ अशी संधी व्यक्तीने कोणत्याही गोष्टीला देऊ नये; (हे व्यक्तीला उमगावे म्हणून दु:खभोग असतात,) हे ते रहस्य आहे. आणि एकदा का व्यक्तीला हे रहस्य गवसले आणि तिने स्वत:मध्ये त्याची अनुभूती घेतली की, दु:खाचे प्रयोजनच संपून जाते आणि दु:खभोग नाहीसे होतात. हा एक सर्वात शक्तिमान उपाय असून अस्तित्वाच्या केवळ सखोल भागांमध्ये, आत्म्यामध्ये, किंवा आध्यात्मिक चेतनेमध्येच तो शक्तिमान ठरतो असे नव्हे, तर तो उपाय जीवन आणि शरीर यांच्या बाबतीतही उपयोगी असतो. या रहस्याचा जो शोध लागलेला असतो त्यास किंवा ते रहस्य प्रत्यक्षात उतरविण्याच्या कृतीस विरोध करू शकेल असा कोणताच आजार किंवा कोणताच विकार नसतो. म्हणजे असा आजार केवळ व्यक्तीच्या उच्चतर भागांमध्येच नव्हे तर, शरीराच्या पेशींमध्येदेखील असू शकत नाही.

पेशींना त्यांच्या आतमध्ये दडलेल्या वैभवाविषयी शिकविण्याची युक्ती जर व्यक्तीला कळली; तसेच त्या पेशी ज्यामुळे अस्तित्वात आहेत, ज्यामुळे त्यांना जीवन प्राप्त झाले आहे त्या वास्तविकतेची जाण एखादी व्यक्ती जर त्यांना करून देऊ शकली, तर त्या पेशीसुद्धा संपूर्ण सुसंवादी होतात आणि ज्याप्रमाणे व्यक्तीचे इतर सारे विकार नाहीसे होतात अगदी त्याचप्रमाणे शारीरिक विकारही नाहीसे होतात.

परंतु असे व्हायला हवे असेल तर व्यक्तीने भित्रे किंवा भीतीग्रस्त असता कामा नये. जेव्हा एखादी शारीरिक व्याधी येते तेव्हा व्यक्तीने घाबरून जाता कामा नये किंवा तिच्यापासून पळ काढता कामा नये, तर व्यक्तीने त्या व्याधीला धीराने, शांतस्थिरतेने, विश्वासाने आणि खात्रीने सामोरे गेले पाहिजे. त्या व्यक्तीला ही खात्री असली पाहिजे की, आजारपण हे मिथ्यत्व आहे, आणि व्यक्ती जर पूर्णपणे, अगदी पूर्ण विश्वासाने, संपूर्ण अविचलतेने ‘ईश्वरी कृपे’कडे वळली तर ती कृपा, जशी व्यक्तीच्या अंतरंगामध्ये खोलवर प्रस्थापित झालेली असते तशीच ती या पेशींमध्ये स्थिर होईल आणि शाश्वत ‘सत्य’ व ‘आनंदा’मध्ये या पेशीसुद्धा सहभागी होतील.

– श्रीमाताजी (CWM 09 : 42-43)

साधना, योग आणि रूपांतरण – २८१

शरीराचे रूपांतरण

तुमच्या साधनेसाठी पहिली आवश्यक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे तुमच्या शारीरिक अस्तित्वामध्ये (physical being) तुम्ही संपूर्ण खुलेपणा प्रस्थापित केला पाहिजे. आणि त्यामध्ये शांत-स्थिरता, सामर्थ्य, विशुद्धता आणि हर्ष यांचे अवतरण स्थिर केले पाहिजे. तसेच त्याबरोबरच तुमच्यामधील श्रीमाताजींच्या ‘शक्ती’च्या उपस्थितीची आणि कार्याची जाणीवसुद्धा स्थिर केली पाहिजे. या खात्रीशीर आधारावरच व्यक्ती ‘ईश्वरी’ कार्यासाठीचे संपूर्णतया प्रभावी असे साधन (instrument) बनू शकते.

व्यक्ती असे साधन झाली तरीदेखील अजून या साधनभूत व्यक्तीचे गतिमान रूपांतरण (dynamic transformation) साध्य करून घेणे शिल्लक असते. आणि ते रूपांतरण मन, प्राण आणि शरीरामध्ये होणाऱ्या उच्चतर आणि अधिक उच्चतर अशा चेतनाशक्तीच्या अवतरणावर अवलंबून असते. अतिमानसिक ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ यांच्या जे अधिकाधिक समीप आहे, त्याचा अर्थबोध येथे ‘उच्चतर’ अस्तित्व या शब्दाने होतो.

मी ज्याचा उल्लेख केला त्याच्या आधारावरच या उच्चतर शक्तीचे अवतरण करणे शक्य असते. त्यासाठी चैत्य पुरुष (psychic being) सातत्याने अग्रभागी राहणे तसेच साधनभूत झालेल्या मन, प्राण व शरीर आणि अस्तित्वाच्या या उच्चतर स्तरांच्या दरम्यान त्याने मध्यस्थ म्हणून कार्य करणे आवश्यक असते. म्हणून प्रथम हे पायाभूत स्थिरीकरण (stabilisation) पूर्ण झाले पाहिजे.

*

शारीर-चेतनेमध्ये उच्चतर स्तरावरील समग्र ऊर्जा किंवा अनुभूती खाली उतरविणे शक्य नसते. रूपांतरणकार्यासाठी साहाय्य करण्यासाठी म्हणून त्यांचा फक्त प्रभाव खाली येतो. एकदा का हे रूपांतरण घडून आले की मग, शरीर अधिक सक्षम होईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 362, 362-363)

साधना, योग आणि रूपांतरण – २८०

शरीराचे रूपांतरण

(शरीराच्या एखाद्या भागाचे) रूपांतरण घडविताना, अडचणींना सामोरे जाणे आणि व्यक्तित्वाच्या प्रत्येक भागामध्ये जे काही उद्भवते त्याच्यावर मात करणे किंवा त्यामध्ये परिवर्तन करणे अध्याहृत असते; जेणेकरून तो भाग, उच्चतर गोष्टींना प्रतिसाद देऊ शकेल. परंतु समग्र व्यक्तित्वामध्ये संपूर्ण परिवर्तन हे ‘ऊर्ध्वस्थित’ असणाऱ्या ‘ईश्वरा’प्रत केलेल्या आरोहणाद्वारे आणि ‘ईश्वरा’च्या अवतरणाद्वारे शक्य होते. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘आत्म्या’चा साक्षात्कार आणि अगदी शारीर-स्तरापर्यंत येत, उच्चतर शांतीचे झालेले संपूर्ण अवतरण ही त्याची पहिली पायरी असते.

*

हो, नक्कीच. आणि म्हणूनच मी, ज्या जडभौतिक भागाने स्वतःला इतके अग्रस्थान देऊ केले आहे, त्या भागामध्ये साक्षात्कार व्हावा यावर एवढा भर देत आहे. व्यक्तीमधील एखादा भाग जेव्हा अशा रीतीने स्वतःचे सारे दोष व मर्यादा दाखवून देत लक्ष वेधून घेतो, तेव्हा त्या गोष्टींवर मात केली जावी या हेतुने तो पृष्ठस्तरावर येत असतो. येथे (तुमच्या उदाहरणामध्ये) जडत्व किंवा अक्षमता (अप्रवृत्ती), अंधकार किंवा विस्मरण (अप्रकाश) या साऱ्या गोष्टी, त्या नीट व्हाव्यात या हेतुने आणि त्यांचे प्रथमतः किंवा प्राथमिक रूपांतरण व्हावे यासाठी पृष्ठस्तरावर आल्या आहेत.

मनामध्ये शांती आणि प्रकाश, हृदयामध्ये प्रेम आणि सहानुभूती, प्राणामध्ये शांतस्थिरता आणि ऊर्जा, शरीरामध्ये स्थायी ग्रहणशीलता व प्रतिसाद (प्रकाश, प्रवृत्ती) या गोष्टी निर्माण होणे म्हणजे आवश्यक असणारे परिवर्तन होय.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 362, 366)

साधना, योग आणि रूपांतरण – २७९

शरीराचे रूपांतरण

(श्रीअरविंद एका साधकाला लिहीत आहेत…)

साधनेच्या वाटचालीदरम्यान आता तुमची चेतना ही कनिष्ठ शारीर-प्रकृतीच्या (lower physical nature) संपर्कामध्ये आली आहे. आणि मनाद्वारे, किंवा अंतरात्म्याद्वारे किंवा आध्यात्मिक शक्तीद्वारे नियंत्रित केलेली नसताना ती जशी असते तशीच ती तुम्ही पाहत आहात. ही प्रकृती मुळातच कनिष्ठ आणि अंधकारमय इच्छावासनांनी भरलेली असते. मानवाचा तो सर्वाधिक पशुवत भाग असतो. तेथे काय दडलेले आहे हे कळावे यासाठी आणि त्याचे रूपांतरण करण्यासाठी व्यक्तीला या भागाच्या संपर्कात यावेच लागते.

पारंपरिक प्रकारातील बरेचसे साधक आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक प्रांतामध्ये उन्नत होण्यामध्ये धन्यता मानतात आणि या कनिष्ठ शारीर-प्रकृतीला आहे तशीच सोडून देतात. परंतु त्यामुळे ती होती तशीच, म्हणजे तिच्यामध्ये काही परिवर्तन न होता तशीच शिल्लक राहते. भलेही ती बहुतांशी शांत झाली असली तरीसुद्धा तिच्यामध्ये संपूर्ण रूपांतरण शक्य होत नाही.

उच्चतर ‘शक्ती’ने या अंधकारमय शारीर-प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवावे यासाठी तुम्ही अविचल व स्वस्थ राहा आणि त्या शक्तीला त्यावर कार्य करू द्या.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 359)

साधना, योग आणि रूपांतरण – २७८

शरीराचे रूपांतरण

(श्रीअरविंद एका साधकाला लिहीत आहेत…)

तुम्ही तुमच्या साधनेमध्ये दीर्घकालीन विश्रांतीच्या किंवा रितेपणाच्या कालावधीमध्ये पोहोचला आहात, असे मला जाणवले. विशेषतः व्यक्ती जेव्हा शारीर आणि बहिर्वर्ती चेतनेमध्ये ढकलली जाते तेव्हा सहसा हे असे घडून येते. अशा वेळी मज्जागत व शारीरिक भाग हे प्रमुख होतात आणि योगचेतना लुप्त झाल्यामुळे, ते भागच व्यक्तित्वाचे जणू प्रमाण असल्यासारखे वाटू लागतात. आणि तेव्हा मग तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे बाह्य, छोट्याछोट्या गोष्टींबाबत तुम्ही (अति)संवेदनशील होता. तथापि, नव्या प्रगतीपूर्वीची ही मध्यंतराची स्थिती असू शकते.

तुम्ही काय केले पाहिजे? तर, ध्यानासाठी काही वेळ राखून ठेवण्याबाबत आग्रही राहिले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ज्यावेळी अगदी कमीत कमी अडथळा येईल अशी दिवसभरातील कोणतीही वेळ निवडावी. ध्यानाच्या माध्यमातून तुम्ही (योगचेतनेच्या) पुन्हा संपर्कात आले पाहिजे. शारीर-चेतना ही अग्रभागी आल्यामुळे काही अडचणी येतील परंतु चिकाटीने बाळगलेल्या अभीप्सेमुळे, योगचेतना पुन्हा प्राप्त करून घेता येईल.

(अशा रीतीने) आंतरिक आणि बाह्य अस्तित्वामधील संबंध पुनर्प्रस्थापित झाल्याचे तुम्हाला एकदा का जाणवले की मग, सर्वाधिक बाह्य मन आणि अस्तित्वामध्ये नित्य चेतनेसाठी एक आधार तयार करण्यासाठी, (आवश्यक असणारी) शांती, प्रकाश आणि शक्ती बाह्य अस्तित्वामध्ये अवतरित व्हावी म्हणून त्यांना आवाहन करा. असे केल्यामुळे, ध्यानामध्ये आणि एकांतामध्ये जशी चेतना असते तशीच चेतना तुमच्यासोबत तुमच्या कर्मामध्ये, कृतींमध्येदेखील टिकून राहील.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 368)

साधना, योग आणि रूपांतरण – २७७

शरीराचे रूपांतरण

(श्रीअरविंद एका साधकाला लिहीत आहेत…)

दीर्घ काळ मानसिक व प्राणिक स्तरावर राहिल्यानंतर आता तुम्ही शारीर-चेतनेविषयी (physical consciousness) सजग झाला आहात ही वस्तुस्थिती आहे आणि प्रत्येकामधील शारीर-चेतना ही अशीच असते. ती जड, आणि जे आहे त्यालाच चिकटून राहणारी (conservative) असते, तिला कोणतीही हालचाल किंवा बदल करण्याची इच्छा नसते. ती तिच्या सवयींना (लोकं यालाच त्यांचे व्यक्तिमत्त्व असे संबोधतात.) चिकटून राहते किंवा तिच्या सवयी (सवयीच्या गतिप्रवृत्ती) शारीर-चेतनेला चिकटून राहतात. आणि घड्याळाचे काटे जसे सतत यांत्रिकपणाने फिरत राहतात त्याप्रमाणे त्या सवयी स्वतःची पुनरावृत्ती करत राहतात. जेव्हा तुम्ही तुमच्या प्राणाचे काही प्रमाणात शुद्धीकरण करता तेव्हा त्यामधील गोष्टी खाली जातात आणि त्या शारीर-चेतनेमध्ये जाऊन बसतात. तुम्ही स्वतःविषयी सचेत झालात आणि यदाकदाचित तुम्ही दबाव टाकलात तरी, शारीर-चेतना अतिशय संथपणे प्रतिसाद देते. तो इतका संथ असतो की, प्रथमतः त्यामध्ये तसूभरसुद्धा बदल झाल्याचे जाणवत नाही.

त्यावर उपाय काय? तर, स्थिर आणि अविचल अभीप्सा, धीराने केलेले कार्य, शरीरामध्ये अंतरात्म्याची जागृती, आणि या अंधकारमय भागांमध्ये ऊर्ध्वस्थित प्रकाश व शक्तीसाठी आवाहन करणे. प्रकाश येताना स्वतःबरोबर उच्चस्तरावरील चेतना घेऊन येतो, त्याच्यापाठोपाठ शक्तीला यावेच लागते आणि (शारीर-चेतनेमधील अनावश्यक गतिविधींमध्ये) परिवर्तन होत नाही किंवा त्या नाहीशा होत नाहीत तोपर्यंत त्या शक्तीला त्यावर कार्य करावे लागते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 360)

साधना, योग आणि रूपांतरण – २७६

शरीराचे रूपांतरण

शारीर-साधनेमध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो.
१) जडभौतिकाच्या जडत्वापासून, आणि शारीर-मनाच्या (physical mind) शंकाकुशंकांपासून, मर्यादांपासून, त्याच्या बहिर्मुख प्रवृत्तीपासून सुटका करून घेणे.
२) प्राणिक-शारीर (vital physical) नसांच्या सदोष ऊर्जांपासून सुटका करून घेणे, आणि त्याच्या जागी खरी चेतना तेथे आणणे.
३) शारीर-चेतना (physical consciousness) ही ‘ईश्वरी संकल्पा’चे परिपूर्ण साधन व्हावे म्हणून, ऊर्ध्वस्थित असणारा उच्चतर प्रकाश, शक्ती, शांती आणि आनंद त्या चेतनेमध्ये उतरविणे.

*

शारीर-चेतना ही संतुलित व्हावी लागते, ती ऊर्ध्वस्थित असणाऱ्या प्रकाशाने आणि शक्तीने भरून जाणे आवश्यक असते आणि सचेत व प्रतिसादक्षम होणे आवश्यक असते. या साऱ्या गोष्टी एका दिवसात होणे शक्य नसते. त्यामुळे, नाउमेद व अधीर न होता, स्थिरपणाने वाटचाल करत राहा.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 367-368, 371)

साधना, योग आणि रूपांतरण – २७५

शरीराचे रूपांतरण

शारीर-चेतनेचे परिवर्तन करण्यासाठी काही जणांकडून अतिरेक केला जातो. परंतु त्याचा काही उपयोग होत असेल यावर माझा विश्वास नाही. शारीर-चेतना ही एक मोठी हटवादी अडचण असते यात काही शंका नाही, परंतु ती शारीर-चेतना प्रकाशित केली पाहिजे, तिचे मतपरिवर्तन केले पाहिजे, तिचे परिवर्तन व्हावे म्हणून (प्रसंगी) तिच्यावर दबाव टाकण्यासही हरकत नाही, पण तिचे दमन करता कामा नये किंवा तिचे परिवर्तन व्हावे यासाठी कोणताही अतिरेकी मार्गदेखील अवलंबता कामा नये. (परिवर्तनासाठी) मन, प्राण आणि शरीराबाबत लोकं अतिरेक करतात कारण ते उतावीळ झालेले असतात. परंतु याबाबतीत माझ्या नेहमीच असे निदर्शनास आले आहे की, त्यामधून अधिक विरोधी प्रतिक्रिया आणि अधिक अडथळे निर्माण होतात आणि त्यातून खऱ्या अर्थाने प्रगती होत नाही.

*

एकदा का तुम्हाला ‘ईश्वरी शक्ती’चा संपर्क प्राप्त झाला की, त्या शक्तीप्रत खुले होण्यावर लक्ष केंद्रित करा. तिच्या विरुद्ध असणाऱ्या शारीर-चेतनेच्या सूचनांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्या बाह्यवर्ती, शारीर-चेतनेशी स्वतःला अभिन्न मानता, – खरंतर, तो तुमच्या आत्म्याचा केवळ एक छोटासा बहिर्वर्ती भाग असतो, – परंतु तुम्ही त्याच्याशी स्वतःला अभिन्न मानल्यामुळे सगळी अडचण येत आहे. तुम्ही तुमच्या उर्वरित अस्तित्वामध्ये, म्हणजे जे अधिक खरे, अधिक अंतर्मुख आहे, जे ‘सत्या’प्रत खुले आहे अशा अस्तित्वामध्ये राहण्यास शिकले पाहिजे. तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमची शारीर-चेतना ही एक बाह्य गोष्ट आहे, आणि तिच्यावर खऱ्या चेतनेच्या माध्यमाद्वारे कार्य करता येणे आणि तिच्यामध्ये ‘दिव्य शक्ती’द्वारे परिवर्तन घडविता येणे शक्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 371, 370)