साधना, योग आणि रूपांतरण – १३९

(ईश्वरी कार्याचे साधन झालेल्या साधकामध्ये ‘दिव्य शक्ती’ अवतरित होऊ लागते, त्याला स्वतःमध्ये एक प्रकारची विशेष ऊर्जा जाणवू लागते. त्या ऊर्जेचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी श्रीअरविंद येथे मार्गदर्शन करत आहेत.)

एक ‘दिव्य शक्ती’ येते आणि ती तुम्हाला कार्यप्रवृत्त करते आणि ही गोष्टदेखील आध्यात्मिक जीवनाच्या इतर सर्व गोष्टींइतकीच अस्सल असते. ती विशेष ‘ऊर्जाशक्ती’ व्यक्तीमधील कर्म-कर्त्याचा (worker) ताबा घेते आणि ती त्या व्यक्तीच्या माध्यमातून स्वतःची परिपूर्ती करते. एखाद्या व्यक्तीमध्ये अशा रीतीने त्या शक्तीने पूर्णतः कार्य करणे ही गोष्ट खरोखर कल्याणकारी असते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, व्यक्तीने त्याचा अतिरेक करता कामा नये. म्हणजे (त्याचा परिणाम म्हणून,) शरीरातील सगळी ऊर्जाच संपुष्टात आल्यासारखे होणे किंवा शारीरिक जडत्व येण्याइतपत शीण येणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

समर्पणाच्या बाबतीत सांगायचे तर, (हातून घडलेले प्रत्येक कर्म) ईश्वराला नित्य अर्पण करण्याचा संकल्प केला पाहिजे. जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही प्रार्थना केली पाहिजे, ईश्वराचे स्मरण केले पाहिजे. (कर्माच्या संदर्भात मला असे म्हणायचे आहे.) एक विशिष्ट दृष्टिकोन सुनिश्चित होण्यासाठी मी हे करायला सांगत आहे. कालांतराने, तुमच्या अंतरंगामधील अधिक खोलवरचे समर्पण खुले करण्यासाठी, या गोष्टीचा एखाद्या किल्लीसारखा उपयोग ती शक्ती करून घेऊ शकेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 270-271)

साधना, योग आणि रूपांतरण – १३८

जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटते तेव्हा अतिश्रम करू नका; विश्रांती घ्या. तेव्हा फक्त सामान्य जीवनव्यवहार चालू ठेवा. अस्वस्थपणे, हे नाही तर ते, असे सारखे काहीतरी करत राहणे हा थकवा दूर करण्याचा उपाय नव्हे. जेव्हा शीणल्याची, दमल्याची जाणीव होते तेव्हा अंतरंगामध्ये आणि बाह्यतःसुद्धा अविचल, स्वस्थ (quiet) राहणे गरजेचे असते. (वास्तविक) नेहमीच तुमच्या सभोवार एक प्रकारची शक्ती असते, तिला तुम्ही आवाहन करू शकता आणि ती शक्ती शीण, थकवा यासारख्या गोष्टी पळवून लावू शकते, परंतु ती शक्ती ग्रहण करण्यासाठी, अविचल कसे राहायचे हे तुम्ही शिकले पाहिजे.

*

अतिश्रम करणे चुकीचे असते कारण कालांतराने त्याचे परिणाम दिसून येतात. तुमच्यापाशी जर ऊर्जा असेल तर, ती सर्वच्या सर्व खर्च करता कामा नये. शरीरप्रणालीची कायम स्वरूपाची (permanent) ताकद वाढविण्यासाठी म्हणून त्यातील काही ऊर्जा साठवून ठेवली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 274)

साधना, योग आणि रूपांतरण – १३७

एक संकल्पना अशी आहे की, अगदी सामान्य जीवनामध्ये, व्यक्ती जे जे काही करत असते त्याचे श्रेय तिचा अहंकार घेत असला तरी, (वास्तविक) व्यक्ती ही ‘वैश्विक ऊर्जे’च्या हातातील केवळ एक साधन असते.

योगामध्ये अशी संकल्पना आहे की, योग्य रीतीने (ग्रहणशील, उन्मुख स्थितीत) अक्रिय (passive) राहिल्यामुळे, व्यक्ती स्वतःच्या सीमित ‘स्व’पेक्षा अधिक महान अशा एखाद्या गोष्टीप्रत खुली होते आणि ती अवस्था साध्य करण्यासाठीच प्रयत्न उपयुक्त ठरतात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 108)

साधना, योग आणि रूपांतरण – १३६

‘ईश्वरी शक्ती’ ग्रहण करण्याची क्षमता येण्यासाठी आणि त्या शक्तीला तुमच्या माध्यमाद्वारे बाह्य जीवनव्यवहारामध्ये कार्य करता यावे यासाठी तुमच्यामध्ये खालील तीन गोष्टी असणे आवश्यक असते.

०१) ‘अविचलता, समता’ – म्हणजे घडणाऱ्या कोणत्याही घटनेने विचलित न होणे, मन स्थिरचित्त व दृढ ठेवणे, घडणाऱ्या घटनांकडे हा विविध शक्तींचा खेळ आहे या दृष्टिकोनातून पाहूनसुद्धा स्वतः समचित्त राहणे.

०२) ‘निरतिशय श्रद्धा’ – म्हणजे जे घडेल ते चांगल्यासाठीच घडेल अशी श्रद्धा बाळगणे, पण त्याचबरोबर, व्यक्ती जर स्वतःला (ईश्वराचे) खरेखुरे साधन बनवू शकली तर, ‘कर्तव्यम् कर्म’ हे त्याचे आपल्याला मिळालेले फळ असेल अशी श्रद्धा त्या व्यक्तीने बाळगणे. ‘ईश्वरी प्रकाशा’चे मार्गदर्शन प्राप्त झालेल्या त्या व्यक्तीच्या इच्छेला, जे कर्म केले पाहिजे असे जाणवते ते कर्म म्हणजे ‘कर्तव्यम् कर्म.’

०३) ‘ग्रहणशीलता’ – ‘ईश्वरी शक्ती’चा स्वीकार करण्याची आणि त्यामध्ये त्या शक्तीची व श्रीमाताजींची उपस्थिती अनुभवण्याची ताकद व्यक्तीमध्ये असणे तसेच, व्यक्तीने स्वत:च्या दृष्टीला, इच्छेला व कृतीला मार्गदर्शन करण्याचे कार्य ‘ईश्वरी शक्ती’ला करू देणे म्हणजे ग्रहणशीलता.

व्यक्तीला जर या ‘शक्ती’ची आणि तिच्या उपस्थितीची जाणीव होऊ शकली आणि व्यक्तीने कर्मातील चेतनेला घडणसुलभतेचे (plasticity) वळण लावले तर, अंतिम परिणामाची खात्री असते. अर्थात ही घडणसुलभता केवळ ‘ईश्वरी शक्ती’बाबत असली पाहिजे, त्यामध्ये कोणत्याही परक्या तत्त्वाची भेसळ होऊ देता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 266)

साधना, योग आणि रूपांतरण – १३५

एखादी कृती योग्य आहे की अयोग्य याविषयी तुम्ही सजग होऊ इच्छित असाल आणि तशी आस बाळगत असाल तर, ती गोष्ट खालील मार्गांपैकी कोणत्या तरी एका मार्गाने घडून येते –

१) तुमच्या हालचालींकडे साक्षित्वाने पाहण्याची एक क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होते किंवा तशी सवय तुम्हाला लागते, ज्यामुळे तुम्ही, तुम्हाला कृती करण्यास उद्युक्त करणाऱ्या आवेगाकडे आणि त्याच्या स्वरूपाकडेसुद्धा पाहू शकता.

२) तुमच्यामध्ये एखादा चुकीचा विचार किंवा तुम्हाला कृती करण्यास उद्युक्त करणारा एखादा चुकीचा आवेग किंवा भावना निर्माण झाली की, लगेचच, जिला बेचैनी, अस्वस्थता जाणवते अशा प्रकारची एक चेतना तुमच्यामध्ये उदयास येऊ शकते.

३) जेव्हा तुम्ही एखादी चुकीची कृती करण्यास उद्युक्त होणार असता तेव्हा, तत्क्षणी तुमच्या अंतरंगातील कोणीतरी तुम्हाला सावध करते आणि ती कृती करण्यापासून तुम्हाला परावृत्त करते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 260-261)

साधना, योग आणि रूपांतरण – १३४

(कर्म करत असताना कधी एकदम उल्हसित, उत्साही वाटते तर कधी शांत वाटते, हे असे का होत असावे असे एका साधकाने विचारले आहे, असे दिसते. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

कर्म करत असताना, तुमच्या ज्या मनोवस्था असतात त्या दोन मनोवस्थांच्या (moods) परिणामांमध्ये फरक दिसून येतो; याचे कारण असे की, पहिली मनोवस्था ही प्राणिक हर्षोल्हासाची (vital joy) आहे, तर दुसरी मनोवस्था ही आंतरात्मिक शांतीची (psychic quiet) आहे. प्राणिक हर्षोल्हास हा सामान्य मानवी जीवनात जरी अतिशय साहाय्यकारी असला तरी तो काहीसा उत्तेजित, अधीर असतो आणि अस्थिर पायावर उभा असल्यामुळे चंचल असतो. आणि म्हणूनच तो लवकर थकून जातो आणि पुढे टिकून राहू शकत नाही.

प्राणिक हर्षोल्हासाची जागा निश्चल, स्थिर अशा आंतरात्मिक आनंदाने घेतली गेली पाहिजे आणि त्याचवेळी मन व प्राण हे अतिशय निर्मळ आणि अत्यंत शांतिपूर्ण असले पाहिजेत. जेव्हा व्यक्ती या आधारावर कर्म करते तेव्हा ती, श्रीमाताजींच्या शक्तीच्या संपर्कात येते आणि त्यामुळे सर्वकाही आनंदमय आणि सुकर होते; आणि मग थकवा येत नाही किंवा नैराश्यही येत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 252)

साधना, योग आणि रूपांतरण – १३३

तुम्ही कर्म करत असतानाच फक्त तुमच्या कर्माचा विचार करा, त्याचा विचार आधीही करू नका किंवा ते कर्म पूर्ण झाल्यानंतरही करू नका. जे कर्म पूर्ण झाले आहे त्याकडे तुमच्या मनाला परत फिरू देऊ नका. कारण ते कर्म भूतकाळाचा भाग झालेले असते आणि त्याचा पुनःपुन्हा विचार करणे हा शक्तीचा अपव्यय असतो. जे कर्म करायचे आहे त्यासंबंधी अटकळ बांधण्यामध्ये तुमच्या मनाला उगाच आधीपासूनच शीणवू नका. मनाच्या या दोन सवयी त्याच्या गतकालीन कार्यप्रणालीचा भाग असतात, या सवयी टाकण्यासाठी रूपांतरकारी ‘शक्ती’ दबाव टाकत असते; परंतु शारीर-मनाने त्या सवयींना चिकटून राहणे हे तुमच्या ताणतणावाचे आणि थकव्याचे कारण असते. तुमच्यामध्ये कार्यरत असणारी ‘शक्ती’ त्या कर्माच्या वेळी त्याकडे लक्ष पुरवेल. मनाच्या कार्याची आवश्यकता असेल तेव्हाच तुमच्या मनाला त्याची कृती करू द्यायची हे जर तुम्ही लक्षात ठेवू शकलात तर तुमचा ताण हलका होईल आणि (कालांतराने) निघून जाईल. खरंतर, अतिमानसिक क्रियेने (तुमच्या) शारीर-मनाचा ताबा घेऊन, त्यामध्ये दिव्य ‘प्रकाशा’ची उत्स्फूर्त कृती करण्यापूर्वीची ही संक्रमणशील अवस्था असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 287)

साधना, योग आणि रूपांतरण – १३२

तुम्हाला न आवडणारे काम तुम्ही केलेच पाहिजे असे नाही, मात्र तुम्ही आवड-निवडच सोडून दिली पाहिजे. तुम्हाला आवडते तेवढेच काम करणे म्हणजे प्राणाचे चोचले पुरविण्यासारखे आणि त्याचे तुमच्या प्रकृतीवर वर्चस्व चालवू देण्यासारखे आहे. कारण जीवनव्यवहारांवर आवडी-निवडीचे प्राबल्य असणे हेच तर अरूपांतरित प्रकृतीचे लक्षण असते.

कोणतीही गोष्ट समत्वाने करता येणे हे कर्मयोगाचे तत्त्व आहे आणि ते कर्म श्रीमाताजींसाठी करायचे असल्याने, ते आनंदाने करणे ही पूर्णयोगाची खरी प्राणिक आणि आंतरात्मिक अवस्था असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 248)

साधना, योग आणि रूपांतरण – १३१

कर्म हे ‘पूर्णयोगा’चे एक आवश्यक अंग आहे. तुम्ही जर कर्म केले नाहीत आणि सगळा वेळ जर ‘ध्याना’मध्येच व्यतीत केलात तर तुमची साधना व तुम्ही तुमची वास्तवावरील पकड गमावून बसाल; (तुमची जीवनव्यवहाराशी फारकत होईल.) आणि तुम्ही स्वतःच्याच, व्यक्तिनिष्ठ अशा कोणत्यातरी अनियंत्रित कल्पनांमध्ये वाहवत जाऊन, स्वतःला हरवून बसाल…

भौतिक वास्तवाच्या (जीवनव्यवहारातील) सर्व संबंधांना दूर लोटून आणि (तुमच्या वस्तुनिष्ठ अस्तित्वाकडे लक्ष न पुरवता) केवळ एकाच म्हणजे व्यक्तिनिष्ठ अस्तित्वामध्येच (आंतरिक जीवनामध्ये) निवृत्त होऊन, तुम्ही चुकीच्या मार्गाला जात आहात आणि तुमची साधना तुम्ही धोक्यात आणत आहात, हे मी तुम्हाला निक्षून सांगतो…

सर्व प्रकारची आसक्ती आणि आत्म-रती या गोष्टी घातक असतात. वस्तुनिष्ठ जीवनातील ‘सत्य’ बाजूला ठेवणे आणि आसक्ती बाळगणे तसेच व्यक्तिनिष्ठ अनुभव व दूरस्थ ‘ध्यानादी’ गोष्टींमध्ये आत्म-रत होणे, या गोष्टी इतर कोणत्याही गोष्टींइतक्याच धोकादायक असतात. अशा चुका करू नका आणि साधनेचा खरा समतोल पुन्हा संपादन करून घ्या. तुम्हाला भौतिक जीवनामध्ये जर अंतरात्मा प्राप्त व्हावा असे वाटत असेल तर, केवळ ध्यानाला बसून आणि अमूर्त अनुभव घेऊन तो प्राप्त होणार नाही. भौतिक जीवन व त्यातील कर्मं यामध्ये त्याचा शोध घेतल्यानेच आणि प्रत्यक्षात इथे उपस्थित असलेल्या श्रीमाताजींचे आज्ञापालन केल्याने व कर्म-समर्पण केल्याने, तसेच श्रीमाताजींचे कार्य केल्याने तो तुम्हाला प्राप्त होईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 248-250)

साधना, योग आणि रूपांतरण – १३०

तुम्ही जेव्हा ‘दिव्य माते’शी पूर्णतः एकात्म व्हाल; तुम्हाला आपण कर्ते आहोत, सेवक आहोत, किंवा साधन आहोत, अशी स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव न राहता, आपण त्या दिव्य मातेच्या चेतनेचा आणि तिच्या शक्तीचा एक शाश्वत अंशभाग आहोत आणि तिचे खरेखुरे बालक आहोत अशी जाणीव होईल, तेव्हा परिपूर्णत्वाची अंतिम अवस्था येईल. (त्यानंतर) ती दिव्य माता नेहमीच तुमच्या अंतरंगामध्ये असेल आणि तुम्ही तिच्यामध्ये (निवास करत) असाल. तुमचे सारे विचार, तुमची दृष्टी, तुमच्या कृती, तुमचा अगदी श्वासोच्छ्वास आणि तुमचे सारे जीवनव्यवहार तिच्यापासून निर्माण होत आहेत आणि ते तिचेच आहेत असा तुमचा सततचा, सहज-स्वाभाविक अनुभव असेल. तुम्ही म्हणजे तिने तिच्यामधूनच घडविलेली एक व्यक्ती आणि एक शक्ती आहात, लीलेसाठी तिने स्वतःमधून तुम्हाला वेगळे केले आहे आणि तरीही तुम्ही तिच्यामध्ये नेहमीच सुरक्षित आहात, तुम्ही तिच्या अस्तित्वाचेच एक अंग आहात, तिच्या चेतनेचीच एक चेतना आहात, तिच्या शक्तीचीच एक शक्ती आहात आणि तिच्या ‘आनंदा’चाच एक आनंद आहात, असे तुम्हाला जाणवेल, दिसेल आणि तसा अनुभव देखील तुम्हाला येईल. जेव्हा अशी नि:शेष स्थिती असेल आणि दिव्य मातेच्या अतिमानसिक ऊर्जा तुम्हाला मुक्तपणे संचालित करतील तेव्हा तुम्ही ईश्वरी कार्यामध्ये परिपूर्ण झालेले असाल. तेव्हा ज्ञान, इच्छा, कृती या गोष्टी खात्रीशीर, सहजसाध्या, तेजोमय, उत्स्फूर्त, निर्दोष झालेल्या असतील; त्या सर्व गोष्टी ‘परमेश्वरा’पासून प्रवाहित झालेल्या असतील; आणि अशी परिस्थिती म्हणजे ‘शाश्वता’चा दिव्य संचार असेल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 13)