साधना, योग आणि रूपांतरण – ९७

मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करणारी शक्ती ही अतिमानसिक ‘शक्ती’ असते. ‘सच्चिदानंद’ चेतना – (विशुद्ध सत्-चित्-आनंद) जी सर्वच गोष्टींना निःपक्षपातीपणे आधार पुरवीत असते ती शक्ती रूपांतरण घडवीत नाही. परंतु ‘सच्चिदानंदा’ची अनुभूती आल्यानंतरच (बऱ्याच नंतरच्या टप्प्यावर) अतिमानसाप्रत आरोहण (ascent) आणि अतिमानसाचे अवरोहण (descent) शक्य होते. त्यासाठी प्रथम तुम्ही मानसिक, प्राणिक आणि शारीरिक रचनांच्या सर्वसामान्य मर्यादांपासून मुक्त झाले पाहिजे आणि मग ‘सच्चिदानंद’ शांती, स्थिरता, विशुद्धता आणि व्यापकता यांच्या अनुभूतीमुळे तुम्हाला ही मुक्ती लाभते.

शून्यावस्थेत (blank) निघून जाणे याच्याशी अतिमानसाचा काहीही संबंध नसतो. ‘मन’ आपल्या स्वतःच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जात असताना आणि ते करण्यासाठी नकारात्मक व अचंचलतेचा मार्ग अनुसरत असताना, ते महाशून्यापर्यंत जाऊन पोहोचते. ‘मन’ हे अज्ञानी असल्यामुळे, परम’सत्या’मध्ये प्रवेश करण्यासाठी त्याला स्वतःचा निरास करावा लागतो, अथवा किमानपक्षी, तसे त्याला वाटते. मात्र अतिमानस हेच ‘सत्य-चेतना’ आणि ‘दिव्य-ज्ञान’ असल्यामुळे, परम ‘सत्या’मध्ये प्रवेश करण्यासाठी अतिमानसाला स्वतःचा निरास करावा लागत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 136)

श्रीअरविंद