आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०४)

उत्तरार्ध

आपल्या अंतरंगातील आध्यात्मिक ‘सत्य’ जसजसे वृद्धिंगत होत जाते तसतसे ‘ईश्वरी प्रकाश’ व ‘सत्य’, ‘ईश्वरी शक्ती’ आणि ‘ऊर्जा’, ईश्वरी ‘विशुद्धता’ व ‘शांती’ आपल्यामध्ये कार्य करत आहेत; आपल्या कर्मांवर तसेच आपल्या चेतनेवर त्या कार्य करत आहेत; आपल्यामधील हीणकसपणा काढून, त्या जागी ‘आत्म’रूपी विशुद्ध सोन्याची प्रस्थापना करून, ‘ईश्वरी’ प्रतिमेमध्ये आपली पुनर्रचना घडविण्यासाठी आपल्या कर्मांचा व चेतनेचा उपयोग केला जात आहे – हे आपल्याला जाणवेल. आपल्यामध्ये जेव्हा ‘ईश्वरी उपस्थिती’ सातत्याने असेल आणि आपली चेतना रूपांतरित झालेली असेल तेव्हाच, या भौतिक स्तरावर ‘ईश्वरा’चे आविष्करण करण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत, असे म्हणण्याचा आपल्याला अधिकार पोहोचतो.

एखादा मानसिक आदर्श किंवा तत्त्व मनाशी दृढ बाळगणे आणि ते आपल्या आंतरिक कार्यावर लादणे यामधून आपण आपल्या स्वतःला मानसिक अनुभूतीमध्येच मर्यादाबद्ध करण्याचा धोका संभवतो; किंवा ‘ईश्वरा’शी सायुज्य व एकत्व यांची खरी पूर्ण वाढ होण्याऐवजी, तसेच ‘ईश्वराच्या इच्छे’चा आपल्या आयुष्यात जीवलग व मुक्त बहर येण्याऐवजी, अर्ध्या-कच्च्या घडणीद्वारे त्याचा आभास निर्माण होण्याचा किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण होण्याचा धोका संभवतो. मनाला लागलेल्या वळणाची ही चूक आहे आणि त्या बाजूलाच आजच्या मनाचा विशेष कल आहे. एकमेव आवश्यक असणाऱ्या गोष्टीवरून (म्हणजे ‘ईश्वराचा शोध’ घेणे या गोष्टीवरून) आपले चित्त विचलित करणाऱ्या अशा किरकोळ गोष्टी जवळ करण्यापेक्षा, ‘ईश्वरा’च्या साक्षात्कारामधून प्राप्त होऊ शकतात अशा ‘शांती’ किंवा ‘प्रकाश’ किंवा ‘आनंद’ या गोष्टी मिळविण्यासाठी ‘ईश्वरा’कडे वळणे हे अधिक बरे!

आंतरिक जीवनाप्रमाणे भौतिक जीवनाचेदेखील दिव्यत्वात रूपांतर (divinisation) करणे हा, आम्ही जी ‘दिव्य योजना’ पाहत आहोत तिचाच एक भाग आहे, पण आंतरिक साक्षात्काराच्या बहरातूनच तो पूर्णत्वास जाऊ शकतो; (भौतिक जीवनाचे दिव्यत्वात रूपांतर) ही अशी एक गोष्ट आहे की जी मानसिक तत्त्वाच्या कार्यामधून होऊ शकत नाही; तर ती अंतरंगातून बाह्य दिशेने विकसित होत जाते.

श्रीअरविंद (CWSA 29 : 05-06)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०३)

पूर्वार्ध

वास्तविक, आध्यात्मिक ‘सत्या’साठी आणि आध्यात्मिक जीवनासाठी केल्या जाणाऱ्या धडपडीचे, उपासनेचे आद्य कारण ‘ईश्वरा’चा शोध हेच आहे; हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे आणि त्या व्यतिरिक्त बाकी सारे शून्यवत् आहे.

आणि एकदा का ‘ईश्वरा’चा शोध लागला की मग ‘त्या’चे आविष्करण करणे – म्हणजे, सर्वप्रथम आपल्या मर्यादित चेतनेचे रूपांतर ‘दिव्य चेतने’मध्ये करणे; अनंत ‘शांती’, ‘प्रकाश’, ‘प्रेम’, ‘सामर्थ्य’, ‘परमानंद’ यांमध्ये जीवन जगणे; आपल्या मूलभूत प्रकृतीमध्ये आपण तो ‘ईश्वर’च होणे आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या क्रियाशील प्रकृतीने, त्याचे वाहन, त्याचे माध्यम, त्याचे साधन बनणे होय. (हे उद्दिष्ट असू शकते.) पण, ‘मानवतेसाठी कार्य’ करणे किंवा भौतिक स्तरावर ‘एकतेचे तत्त्व’ प्रत्यक्ष कृतीत आणणे या गोष्टी म्हणजे ‘दिव्य सत्या’चा मनाने चुकीच्या पद्धतीने केलेला अनुवाद आहे – या गोष्टी आध्यात्मिक उपासनेचे पहिले खरे उद्दिष्ट असू शकत नाहीत.

आधी आपण आपला ‘आत्मा’ शोधला पाहिजे, ‘ईश्वर’ शोधला पाहिजे, तेव्हाच आपल्याला, आपला ‘आत्मा’ किंवा ‘ईश्वर’ आपल्याकडून ज्या कार्याची अपेक्षा करत आहे, ते कार्य काय आहे ते समजून येईल. तोपर्यंत आपले जीवन आणि आपल्या कृती या, ‘ईश्वरा’चा शोध घेण्याची साधने ठरू शकतात किंवा त्या शोधासाठी साहाय्यक ठरू शकतात पण त्यांचे अन्य कोणतेही उद्दिष्ट असता कामा नये.

जसजसे आपण आंतरिक चेतनेमध्ये विकसित होऊ लागतो, किंवा आपल्यामध्ये ‘ईश्वरा’चे आध्यात्मिक ‘सत्य’ जसजसे वृद्धिंगत होऊ लागते, तसतसे आपले जीवन आणि आपल्या कृती, आपली कर्मं ही खरेतर, त्यामधूनच प्रवाहित झाली पाहिजेत, त्याच्याशीच समरस झालेली असली पाहिजेत. पण त्याआधीच (आत्म्याचा किंवा ईश्वराचा शोध लागण्यापूर्वीच), आपले जीवन कसे असले पाहिजे, आपले कार्य काय असले पाहिजे हे आपल्या मर्यादित मानसिक संकल्पनांच्या आधारे ठरविणे म्हणजे आपल्या आंतरिक आध्यात्मिक ‘सत्या’च्या विकसनामध्येच खोडा घालण्यासारखे आहे. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 05)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०२)

जगातील प्रत्येक गोष्टीकडून माणसाचा नेहमीच अपेक्षाभंग होतो, हा जीवनाकडून मिळणारा धडा आहे – पण मनुष्य जर पूर्णतया ‘ईश्वरा’कडे वळला तर ‘ईश्वर’च एक असा आहे की, ज्याच्याकडून त्याचा कधीच अपेक्षाभंग होत नाही. तुमच्यामध्ये काहीतरी वाईट आहे म्हणून तुमच्यावर संकटे येऊन कोसळतात असे नाही तर, सगळ्याच माणसांना अपेक्षाभंगाचा धक्का बसत असतो कारण ज्या गोष्टी चिरस्थायी नसतात (अशाश्वत असतात) त्यांच्याविषयीच्या कामना (desires) ते बाळगून असतात. आणि मग ते त्या गोष्टी गमावून तरी बसतात किंवा अगदी जरी त्या गोष्टी त्यांना मिळाल्या तरी त्या गोष्टींपासून त्यांच्या पदरी निराशाच पडते, त्या गोष्टी त्यांचे समाधान करू शकत नाहीत.

‘ईश्वराभिमुख होणे’ हेच जीवनातील एकमेव सत्य आहे.

श्रीअरविंद (CWSA 31 : 625)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०१)

सामान्य माणसाचे बहुतांशी जीवन हे बाह्यवर्ती जाणिवेमध्येच व्यतीत होत असते. पण कधीतरी जीवनात असेही क्षण येतात की जेव्हा तो अंतर्मुख होतो. तो ज्याला देव, ईश्वर, परमेश्वर इत्यादी नावांनी संबोधतो त्याचा अतीव उत्कटतेने, तळमळीने, आर्ततेने धावा करतो. ज्या प्रसंगाच्या कात्रीत सापडल्यामुळे त्याने त्याचा धावा केलेला असतो, ईश्वराशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला असतो, तो प्रसंग पार पडतो आणि तो माणूस पुन्हा पहिल्याप्रमाणेच संसाराच्या रहाटगाडग्यामध्ये गरागरा फिरत राहतो. त्याच्या जीवनातून ईश्वर पुन्हा दूरस्थ होतो.

असेच वारंवार, कदाचित जन्मानुजन्मे होत राहते. आणि या संसारी जीवनाचा, आजूबाजूच्या मंडळींचा, जीवनव्यवहाराचा अनुभव घेऊन पूर्ण होताहोताच त्याला या जीवनाचे अधिक काही महान, अधिक काही गहन प्रयोजन असले पाहिजे, असे आतून जाणवू लागते. त्याचा शोध घेतला पाहिजे असे त्याला वाटू लागते. माणूस म्हणून जन्माला आलेलो आपण, आपणही किड्यामुंगीसारखे जीवन जगून एक दिवस निघून जायचे का? आपण माणूस म्हणून जन्माला आलो तर आपले काही कर्तव्य आहे का ? लाभलेल्या जीवनाचा आपण कशा प्रकारे विनियोग करायचा आहे, आपल्याकडून माणूस म्हणून नेमके काय अपेक्षित आहे? हे व यासारखे प्रश्न मनात डोकावू लागतात.

आणि मग कधीतरी ‘ईश्वरीकृपे’ने त्या जिवाची ‘आत्मशोधा’ला सुरुवात होते. त्या शोध – प्रवासामध्ये विविध तीर्थस्थाने, मठ, मंदिर, आश्रम इत्यादी ठिकाणांना भेटी दिल्या जातात. संत-सत्पुरुष, बुवा, बाबा, महाराज म्हणून ज्यांना समाजात मान्यता मिळालेली असते, त्यांच्याकडे जाऊन, त्यांच्याशी चर्चा करून, आपले प्रश्न विचारून त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. पण आपल्या आत्मशोधाची तहान कशानेच भागत नाही.

आणि मग त्या वाटचालीने श्रांतक्लांत झालेला तो जीव थकूनभागून एका झाडाखाली विसाव्याला बसावा आणि जवळून झुळूझुळू वाहणाऱ्या पाण्याचा नाद त्याच्या कानी पडावा तसे काहीसे होते. जवळच असलेल्या पाण्याच्या नादाच्या दिशेने तो जातो, त्या प्रवाहामधून ओंजळभर पाणी घेतो आणि त्या शीतल पाण्याने त्याची तहान भागते. तसेच काहीसे आत्मशोधाच्या या प्रवासात होत असावे.

श्रीअरविंदरूपी महासागर त्या शीतल पाण्याच्या प्रवाहासारखाच पत्ररूपाने अखंडपणे प्रवाहित होत राहिला होता. प्रत्येकाची तहान वेगळी, प्रत्येकाचा प्रश्न वेगळा, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, प्रत्येकाची मानसिक ठेवण वेगळी, प्रत्येकाच्या जीवनाची धाटणी वेगळी. पण येणाऱ्या प्रत्येक पांथस्थाची तहान शमविण्याचे सामर्थ्य श्रीअरविंद यांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये आहे. त्यातील काही निवडक पत्रे उद्यापासून सुरु होणाऱ्या ‘आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर…’ या मालिकेमध्ये आपण विचारात घेणार आहोत.

संपादक,
अभीप्सा मराठी मासिक

अमृतवर्षा २८

(जगभरामध्ये युद्धाचे वारे वाहत आहेत. महायुद्धाची आशंकादेखील व्यक्त केली जात आहे. यत्रतत्र सर्वत्र कलियुगाच्या पाऊलखुणा दिसत आहेत. हे पाहून सामान्य माणसाचे मन काहीसे भयभीत होत आहे. परंतु या सगळ्या पाठीमागेसुद्धा एक ‘ईश्वरी योजना’ कार्यरत असते, याचे अचूक भान जागविण्याचे कार्य श्रीअरविंदलिखित पुढील विचाराद्वारे होत आहे, यामध्ये प्रतिपादित करण्यात आलेली कलियुगाची सकारात्मक बाजू वाचकांच्या मनात एक आश्वासकता जागवेल असा विश्वास वाटतो.)

सध्याचे युग म्हणजे पापाचा प्रेरक आणि मनुष्याच्या प्रगतीचा मुख्य शत्रू असणाऱ्या कलीच्या राजवटीचा कालखंड आहे. कलीच्या या कालखंडामध्ये मनुष्याची सर्वाधिक अधोगती होते आणि त्याचे सर्वाधिक पतनही याच कालखंडामध्ये होते. परंतु त्याचवेळी या कलियुगामध्येच अडथळ्यांशी लढा देत सामर्थ्यसंपादन देखील करता येते. तसेच जुन्या गोष्टी नष्ट करून नवनिर्मितीसुद्धा या कलियुगातच करता येते. ही प्रक्रिया कलियुगामध्ये घडताना दिसते.

जगाच्या उत्क्रांतीदरम्यान ज्या अनिष्ट, अमंगल घटकांचा विनाश केला जाणार आहे; हे नेमके तेच घटक असतील की जे त्यांच्या अतिरिक्त वाढीद्वारे वगळले जाणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला, नवसृष्टीची बीजे रुजवली जाणार आहेत, ती अंकुरित होणार आहेत. आणि येणाऱ्या सत्ययुगामध्ये, याच बीजांमधून वृक्ष निर्माण होणार आहेत.

तसेच, ज्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये एका ग्रहाच्या महादशेमध्ये इतर ग्रह त्यांच्या अन्तर्दशेचा आनंद घेतात, त्याचप्रमाणे कलियुगामध्ये, सत्य, त्रेता, द्वापार आणि कलि ही चारही युगं पुनःपुन्हा आपापल्या अन्तर्दशेचा आनंद घेतात. या चक्राकार घडामोडीच्या माध्यमातून, कलियुगामध्ये एक मोठे पतन घडून येते, त्याच्या पाठोपाठ ऊर्ध्वगामी विकास होतो, मग परत मोठे पतन, त्यानंतर पुन्हा ऊर्ध्वगामी वाटचाल होते; या सगळ्यामधून ‘ईश्वरा’ चे हेतू सिद्धीस जातात.

द्वापार आणि कलियुगाच्या या संधिकाळात, ‘ईश्वर’ आपल्या अवताराच्या माध्यमातून अनिष्टाची घटकांची अतिरिक्त वाढ होऊ देण्यास मुभा देतो. तो या अनिष्ट घटकांचा विनाश करतो, चांगल्या बीजांचे रोपण करतो आणि त्यांच्या अंकुरणासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतो, आणि त्यानंतर कलियुग सुरू होते.

सत्ययुग अवतरण्यासाठी उपयोगी पडेल असे गुप्त ज्ञान आणि अशी कार्यपद्धती श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितली आहे. कलियुगामध्ये जेव्हा सत्ययुगाची अन्तर्दशा येते तेव्हा जगभरात गीतोक्त धर्माचा प्रचार-प्रसार होणे अपरिहार्य असते.

तसा काळ आता आला आहे, आणि म्हणूनच, काही थोड्या प्रज्ञावंत आणि सुविद्य व्यक्तींपुरतीच मर्यादित न राहता, आता गीतेला परदेशामध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्येसुद्धा मान्यता मिळू लागली आहे.
(लेखनकाळ : १९०९-१०)

ही मालिका येथे समाप्त होत आहे.

– श्रीअरविंद [CWSA 09 : 94-95]

अमृतवर्षा २७

जडद्रव्याच्या प्रत्येक कणाकणामध्ये माणसांना जेव्हा अंतर्यामी निवास करणाऱ्या ‘ईश्वरा’च्या विचाराची जाणीव होईल; प्रत्येक सजीवामध्ये जेव्हा त्यांना ‘ईश्वरा’च्या अस्तित्वाचा काही संकेत जाणवू लागेल; प्रत्येक माणसाला जेव्हा त्याच्या बांधवांमध्ये ‘ईश्वर’ दिसू लागेल तेव्हा या प्रकृतीला भारभूत झालेले अज्ञान, मिथ्यत्व, दोष, दुःखभोग, अंधकार भेदले जातील आणि अरुणोदय होईल. कारण ”सर्व प्रकृती सहन करत आहे आणि शोक करत आहे कारण ती ‘ईश्वर-पुत्रां’ना (मानवांना) साक्षात्कार होण्याची वाट पाहत थांबली आहे.”

हा एक असा मध्यवर्ती विचार आहे की, जो इतर सर्व विचारांचे प्रतिनिधित्व करतो. सूर्य ज्याप्रमाणे सर्व जीवन उजळवून टाकतो तसा हा विचार कायम आपल्या स्मरणात असला पाहिजे.

…एखाद्या दुर्मिळ हिऱ्याप्रमाणे, खूप मौल्यवान खजिना असल्याप्रमाणे आपण आपल्या हृदयात या विचाराची जपणूक करून मार्गक्रमण केले आणि त्याला त्याचे प्रकाशमान करण्याचे व रूपांतरणाचे कार्य आपल्यामध्ये करण्यास आपण वाव दिला तर आपल्याला हे कळू शकेल की, सर्व वस्तुमात्रांच्या आणि प्राणिमात्रांच्या अंतर्यामी ‘तो’च राहतो आणि ‘त्या’च्या मध्येच या विश्वाचे अद्भुत एकत्व आपण अनुभवू शकतो.

तेव्हा मग आपल्याला आपली मूर्ख भांडणे, आपल्या छोट्याछोट्या इच्छावासना, आपले अंध रोष, आपल्या किरकोळ समाधानांमधील बालीशपणा आणि फोलपणा लक्षात येईल. आपल्यातील छोटेछोटे दोष विरघळून जाताना, आपल्या निर्बुद्ध अहंकाराची, तसेच आपल्या संकुचित व्यक्तिमत्त्वाची उरलीसुरली तटबंदी ढासळून पडताना आपल्याला दिसेल. आपल्या संकुचित मर्यादा आणि बंधांनी बांधलेल्या अस्तित्वापासून आपली सुटका करत, खऱ्याखुऱ्या आध्यात्मिकतेच्या या उदात्त प्रवाहामध्ये आपले अस्तित्व प्रवाहित होत असल्याचे आपल्याला जाणवेल.

व्यक्तिगत ‘आत्मा’ आणि वैश्विक ‘आत्मा’ हे एकच आहेत; प्रत्येक विश्वामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कणामध्ये ‘ईश्वराची उपस्थिती’ असते आणि त्याचे आविष्करण करणे हे माणसाचे जीवितकार्य आहे.

– श्रीमाताजी [CWM 02 : 41]

अमृतवर्षा २६

(आपल्या व्यक्तित्वामधील विभिन्न घटकांमध्ये ऐक्य, एकजिनसीपणा कसा निर्माण करावा, हे श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

संकल्प दृढ ठेवा. आज्ञापालन न करणाऱ्या मुलांना ज्याप्रमाणे योग्य वळण लावले जाते त्याप्रमाणे, तुमच्यातील अडेलतट्टू, हट्टी भागांना वळण लावा. त्यांच्यावर सातत्यपूर्वक, सहनशीलतेने काम करा. त्यांच्या चुका त्यांना समजावून सांगा.

तुमच्या चेतनेच्या आत खोलवर चैत्य पुरुष (Psychic being) असतो. हा चैत्य पुरुष म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’चे मंदिर असते. या केंद्राभोवती तुमच्यातील विभिन्न असणाऱ्या सर्व भागांचे, तुमच्या अस्तित्वातील सगळ्या परस्परविरोधी हालचालींचे एकीकरण झाले पाहिजे. एकदा का तुम्हाला त्या चैत्य पुरुषाची चेतना व त्याची अभीप्सा प्राप्त झाली की, सगळ्या शंका, अडचणी नाहीशा होऊ शकतात. त्याला कमी-अधिक वेळ लागेल, परंतु अंतिमत: तुम्ही यशस्वी होणार हे निश्चित!

एकदा जरी तुम्ही ‘ईश्वरा’कडे वळला असाल आणि म्हणाला असाल की, “मला तुझे होऊन राहायचे आहे”, आणि तो जर “हो” म्हणाला असेल, तर हे अखिल जग सुद्धा तुम्हाला त्यापासून रोखू शकणार नाही. अंतरात्मा (Inner being) जेव्हा स्वत:चे समर्पण करतो तेव्हा मुख्य अडचणच नाहीशी होते.

बाह्य अस्तित्व हे केवळ एखाद्या कवचाप्रमाणे असते. सामान्य व्यक्तींमध्ये हे कवच इतके टणक आणि जाड असते की, त्यामुळे त्यांना त्यांच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’ची यत्किंचितही जाणीव नसते. (परंतु) एकदा, अगदी एका क्षणासाठी जरी, अंतरात्मा म्हणला असेल, “मी इथे आहे आणि मी तुझाच आहे” तर जणू एक प्रकारचा सेतू निर्माण होतो आणि मग ते बाह्य कवच हळूहळू पातळ होत जाते. जोपर्यंत अंतरंग व बहिरंग भाग पूर्णपणे जोडले जाऊन, एकत्व पावत नाहीत तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहते.

– श्रीमाताजी [CWM 03 : 07]

अमृतवर्षा २५

उद्दिष्ट जरी समान असले तरी, विविध साधकांच्या वृत्तीप्रवृत्ती विभिन्न असतात आणि त्यामुळे प्रत्येकाचे मार्गदेखील भिन्नभिन्न असतात. प्रार्थना आणि स्तोत्र या गोष्टी हा सुद्धा ‘ईश्वरा’च्या साक्षात्काराचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु तो मार्ग प्रत्येकालाच भावतो असे नाही. जो साधक ज्ञानमार्गाचा अवलंब करतो तो ध्यान व एकाग्रतेचा अभ्यास करतो. कर्ममार्गी व्यक्तीसाठी कार्याचे समर्पण हा उत्तम मार्ग असतो.

प्रार्थना आणि स्तोत्र हे भक्तीचे एक महत्त्वाचे अंग आहे. मात्र ते सर्वोच्च आहे असे नाही. शुद्ध प्रेम ही भक्तीची सर्वोच्च परिपूर्णता आहे. अशा प्रेमाला, प्रार्थना आणि स्तोत्र या माध्यमातून ईश्वरा’चा खरा आत्मा लाभू शकतो आणि त्यानंतर प्रार्थना आणि मंत्रादींच्या पलीकडे जात, हे शुद्ध प्रेम ‘ईश्वरा’च्या आत्म-भुक्तिमध्ये (self-enjoyment) विरघळून जाते. आणि असे असूनसुद्धा, प्रार्थना व स्तोत्राविना ज्याचे चालू शकते असा भक्तियोगी विरळाच आढळेल. जेव्हा कोणत्याही प्रक्रियांची आणि साधनेची आवश्यकता उरलेली नसते अशावेळीदेखील हृदयातून प्रार्थना आणि स्तोत्र स्फुटित होतात. फक्त एवढेच लक्षात ठेवले पाहिजे की, (योग) मार्ग हा व्यक्तीनिरपेक्ष मार्ग असत नाही; त्यामुळे एखाद्याचा मार्ग हाच दुसऱ्याचा मार्ग असेल असे नाही.

बऱ्याच भक्तिमार्गी लोकांची अशी समजूत असते की, जो प्रार्थना आणि स्तोत्र इत्यादी गोष्टी करत नाही, त्या गोष्टींमध्ये ज्याला आनंद लाभत नाही, तो माणूस आध्यात्मिक (सत्य धर्माचे पालन करणारा) नसतो. परंतु असे समजणे हे भ्रांतीचे आणि संकुचितपणाचे लक्षण आहे. (गौतम) बुद्ध हे कधीही प्रार्थना व स्तोत्र या गोष्टींमध्ये रममाण झाले नाहीत पण म्हणून ते आध्यात्मिक नव्हते असे कोण म्हणेल बरे? प्रार्थना आणि स्तोत्र इत्यादी गोष्टी भक्तिसाधनेसाठी विकसित झालेल्या आहेत.

– श्रीअरविंद [Writings in bengali : 186]

अमृतवर्षा २४

(प्राणतत्त्वाच्या असहकारामुळे, कित्येक वर्षांची मेहनत मातीमोल कशी ठरू शकते यासंबंधी धोक्याचा इशारा दिल्यानंतर श्रीमाताजी आता एक दिलासा देत आहेत.)

भाग ०३

स्वत:मध्ये असलेली अभीप्सेची ज्योत आणि ध्येयप्राप्तीसाठी लागणारी चेतना जीवित ठेवण्याइतपत ज्यांनी आपल्या चैत्यपुरुषाशी (Psychic being) पुरेसा संपर्क प्रस्थापित केलेला असतो त्या लोकांच्या बाबतीत (प्राणाच्या हटवादीपणामुळे येणारा) असा कसोटीचा काळ फार टिकत नाही. आणि त्यापासून त्यांना फारसा धोकाही पोहोचत नाही.

(चैत्यपुरुषाशी संपर्क प्रस्थापित झालेल्या) अशा व्यक्ती, एखाद्या बंडखोर मुलाला एखादी व्यक्ती जशी हाताळते त्याप्रमाणे, या चेतनेच्या साहाय्याने, धीराने व चिकाटीने सत्य व प्रकाश दाखवून देऊन, पटवून देण्याचा प्रयत्न करत, आपल्या प्राणाला हाताळू शकतात आणि क्षणभरासाठी झाकोळला गेलेला सद्भाव परत मिळवू शकतात.

आणि आता हा अखेरचा दिलासा : जे कोणी खरोखर प्रामाणिक आहेत, जे खरोखर सद्प्रवृत्त आहेत, त्यांच्याबाबतीत मात्र प्राणाचे हे उद्रेक, हे क्षोभ प्रगतीसाठीचे उपयुक्त असे साधन बनू शकतात. ज्या ज्या वेळी तुमच्यावर असा आघात होईल, असे एखादे वादळ तुमच्यामध्ये निर्माण होईल, त्या प्रत्येक वेळी, तुम्ही त्याचे स्वरूप बदलून, त्याचा नव्या प्रगतीसाठी उपयोग करून घेऊ शकाल; ध्येयप्राप्ती साध्य करून देणारे एक पुढचे पाऊल असे रूप तुम्ही त्याला देऊ शकाल.

अगदी नेमकेपणाने सांगायचे तर, तुमच्यामध्ये, या आघाताच्या मूळ कारणाकडे म्हणजे तुम्ही जे चुकीचे वागलात, तुम्ही जे चुकीचे विचार केलेत, तुमच्या ज्या चुकीच्या भावना होत्या – त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून पाहण्यासाठी आवश्यक असणारी खरीखुरी प्रामाणिकता असेल; तुम्ही ती दुर्बलता, ती हिंसा, तुमचा तो पोकळ अभिमान जर तुम्ही पाहू शकाल; (मी एक गोष्ट तुम्हाला सांगायला विसरले की प्राणतत्त्वामध्ये मनापेक्षाही पुष्कळ अधिक मिथ्याभिमान असतो.) आणि या सर्व गोष्टींकडे जर तुम्ही अगदी रोखून बघितलेत, जणू डोळ्यात डोळे घालून रोखून पाहिलेत आणि अगदी प्रामाणिकपणे, मनापासून जर तुम्ही कबूल केलेत; आणि जर तुम्हाला पटले की, तुमच्या चुकीमुळे, तुमच्या दोषामुळे अमुक एक गोष्ट घडली आहे तर, त्या भागावर तुम्ही जणू जळजळीत निखारा ठेवू शकाल.

त्यामुळे तुमची दुर्बलता शुद्ध होईल आणि एका नवीन चेतनेमध्ये तिचे परिवर्तन होईल. मग तुम्हाला कळून येईल, वादळानंतर तुमच्यात बदल झालेला आहे, तुमचा थोडातरी विकास झालेला आहे, तुम्ही खरोखरीच काही प्रगती साधली आहे.

– श्रीमाताजी [CWM 04 : 51-52]

अमृतवर्षा २३

(प्राणतत्त्वाचे सहकार्य लाभले नाही तर त्या व्यक्तीची कशी बिकट अवस्था होते हे श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

भाग ०२

…जर का हे प्रकरण फारच बळावले (म्हणजे प्राणतत्त्वाने असहकार पुकारला आणि त्याला मनाची जोड मिळाली तर) आणि तुम्ही वेळीच प्रतिकार केला नाहीत तर, तुम्ही निराशेला बळी पडता आणि म्हणू लागता, ”खरेतर हे जीवन माझ्यासारख्यांसाठी बनविलेलेच नाही. मी स्वर्गामध्ये खरा सुखी होईन. तेथे सर्वजण खूप चांगले असतात आणि व्यक्तीला जे काही पाहिजे ते ती तेथे करू शकते.” अशा रीतीने या स्वर्गकल्पना जन्म पावलेल्या असतात. मला खरोखरीच वाटते की, मन आणि प्राणतत्त्व या दोघांनी मिळून ही स्वर्गकल्पना शोधून काढलेली असावी!

कारण, जेव्हा तुमचे जीवन आणि तुमचे अस्तित्व तुमच्या इच्छावासनांशी मिळतेजुळते नसते तेव्हा, तुम्ही शोक करू लागता आणि म्हणता, ”पुरे झाले आता हे जीवन! हे जीवन दुःखमय आहे, फसवे आहे. मला मरण हवे आहे.” त्यानंतर असा क्षण येतो की, जेव्हा परिस्थिती अधिकच गंभीर, बिकट बनते. निराशा बंडखोरीमध्ये बदलते आणि विषण्णता ही असंतोषाचे रूप धारण करते.

(अर्थातच) मी वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींविषयी बोलत आहे. ….ही वाईट प्रवृत्तीची माणसे संतापतात, चिडतात, त्यांना सर्वकाही मोडून तोडून, खाली खेचून जमीनदोस्त करायचे असते. अशा वेळी ते म्हणू लागतात, “आता तुम्ही पाहाच, मला जसे पाहिजे तसे जे वागत नाहीत, ते त्याबद्दल शिक्षा भोगतील.” आणि तेव्हा मग परिस्थिती अधिकच गंभीर, बिकट बनते; कारण त्याला साथ द्यायला हे भौतिक मन तेथे तयारच असते. मग काय, हे मन सूड उगविण्याच्या नाना भन्नाट कल्पना सुचवू लागते. निराशेच्या भरात तुम्ही एक मूर्खपणा करता आणि या सूडभावनेतून तुम्ही अजून एक मूर्खपणा करता!

निराशेच्या भरात तुम्ही केलेल्या मूर्खपणाच्या कृतींचा व्यक्तिश: तुमच्याशी संबंध असतो, पण दुष्टपणाने केलेल्या दुष्ट कृतींचा इतरांशीही संबंध असतो. कधीकधी तर ही अविचारी कृत्ये फारच गंभीर स्वरूपाची हानी पोहोचविणारी असतात. तुमच्यापाशी थोडीशी जरी सदिच्छा असेल तर, जेव्हा अशा रीतीने तुम्ही तीव्र भावनांनी पछाडले जाता, तेव्हा काहीच कृती करायची नाही असे ठरवून तुम्ही स्वत:ला जर सांगितलेत की, “मी मुळीच हलणार नाही, हे वादळ शांत होईपर्यंत मी थांबीन.” तर फारच उत्तम; कारण (व्यक्तीने जर तसे केले नाहीत तर,) कित्येक महिन्यांचे नियमितपणे केलेले परिश्रम काही क्षणात मातीमोल होण्याची शक्यता असते. (क्रमशः…)

– श्रीमाताजी [CWM 04 : 51]