विचारशलाका ०९
साधक : आम्हाला ‘योगा’संबंधी काही सांगाल का?
श्रीमाताजी : ‘योग’ तुम्हाला कशासाठी हवा आहे? शक्ती प्राप्त व्हावी म्हणून? मन:शांती, शांतचित्तता लाभावी म्हणून? का मानवतेची सेवा करायची आहे म्हणून? तुम्ही योगमार्ग स्वीकारण्यास पात्र आहात हे दर्शविण्यासाठी वरीलपैकी कोणतेही उद्दिष्ट पुरेसे नाही.
त्याकरता तुम्हाला पुढील काही प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत :
तुम्हाला ‘ईश्वरा’साठी ‘योगमार्गा’चे आचरण करावेसे वाटते का?
‘ईश्वर’ हाच तुमच्या जीविताचे परमोच्च सत्य आहे का?
म्हणजे ‘ईश्वरा’वाचून जगणेच आता अगदी अशक्य झाले आहे, अशी तुमची अवस्था आहे का?
तुम्हाला असे वाटते का की, ‘ईश्वर’ हेच तुमच्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे आणि ‘ईश्वरा’विना तुमच्या जीवनास काहीच अर्थ नाही?
तसे असेल तरच तुम्हाला ‘योगमार्ग’ स्वीकारण्याविषयी आंतरिक हाक आली आहे असे म्हणता येईल.
‘ईश्वरा’विषयीची तळमळ, अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या अभीप्सेचे संगोपन करायचे; ती सतत जागृत, सावध व जिवंत ठेवायची. आणि त्यासाठी जर कशाची गरज असेल तर ती असते एकाग्रतेची! ‘ईश्वरा’वरील एकाग्रतेची – ईश्वरी संकल्प व उद्दिष्ट यांच्याप्रत समग्रपणे व नि:शेषतया वाहून घेता यावे या दृष्टिकोनातून ‘ईश्वरा’वर एकाग्रता करणे आवश्यक असते.
स्वत:च्या हृदयामध्ये एकाग्रता करा. त्यात प्रवेश करा, जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे आत खोल खोल, अगदी आत जा. तुमच्या चेतनेचे बाहेर दूरवर पसरलेले सारे धागे एकत्रित करून, ते सारे गुंडाळून घ्या आणि आत बुडी मारा, आत खोल खोल जा. तुम्हाला आढळेल की, हृदयाच्या त्या निवांत प्रशांत गाभाऱ्यांत एक ज्योत तेवत आहे. तेच तुमच्या अंतरीचे ‘ईश्वरत्व’, तेच तुमचे खरेखुरे अस्तित्व. त्याचा आदेश ऐका, त्याच्या आज्ञेचे अनुसरण करा.
एकाग्रता करण्याची इतरही केंद्र आहेत – एक असते मस्तकाच्या वर (सह्स्त्रार), दुसरे असते दोन भुवयांच्या मध्यभागी (भ्रूमध्यामध्ये, आज्ञाचक्र)! प्रत्येक केंद्राची स्वतंत्र अशी उपयुक्तता असते आणि त्यातून तुम्हाला वेगवेगळे विशिष्ट असे परिणामही अनुभवास येतात. पण मध्यवर्ती अस्तित्व (central being) हे हृदयामध्येच असते आणि सर्व मुख्य प्रवृत्ती हृदयामध्येच उत्पन्न होतात – रूपांतरणास आवश्यक असलेली प्रेरणा व उत्कटता आणि साक्षात्कार करून घेण्याची शक्ती या सुद्धा तेथूनच निर्माण होतात.
– श्रीमाताजी [CWM 03 : 01]
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…