आध्यात्मिकता ३२

‘आध्यात्मिकता’ या मालिकेमध्ये आजपर्यंत आपण श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या साहित्याच्या आधारे, आध्यात्मिकता म्हणजे काय नाही आणि खरी आध्यात्मिकता म्हणजे काय हे समजावून घेतले. आध्यात्मिकतेविषयीची पारंपरिक समजूत आणि त्याची ‘पूर्णयोगा’वर आधारित संकल्पना यामधील फरकही समजावून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या आध्यात्मिक पुरूषाचा (spiritual being) शोध घेणे हे मनुष्याचे केवळ कर्तव्यकर्म आहे असे नव्हे तर, ते त्याचे जीवितकार्य आहे, हेही आपण समजावून घेतले. खऱ्या आध्यात्मिकतेची कसोटी म्हणजे चेतनेचे प्रतिक्रमण (Reversal of consciousness) हेही आपण जाणून घेतले.

आता प्रश्न निर्माण होतो की, आध्यात्मिक पुरुषाचा शोध कसा घ्यायचा? त्यासाठी ध्यानधारणा करायची? की अन्य काही करायचे? का मन एकाग्र करायचे? दैनंदिन व्यावहारिक जीवनाच्या धकाधकीमध्ये, त्यातील भेडसावणाऱ्या प्रश्नांमुळे सामान्य माणसाच्या जिवाला स्वस्थता नसते, मग अशा धकाधकीच्या जीवनात अध्यात्म करायचे तरी कसे? दैनंदिन व्यवहार न सोडता, भौतिक जीवनापासून पलायन न करता, आहे त्याच जीवनाला ‘दिव्यत्वा’चे वळण कसे द्यायचे? त्यासाठी नेमके काय करायला हवे ? यासारखे अनेकानेक प्रश्न वाचकांच्या मनात निर्माण झाले असतील. हे व अशाच प्रकारचे प्रश्न त्यावेळच्या साधकांच्या मनातही निर्माण झाले होते; त्यांनी ते प्रश्न श्रीअरविंद व श्रीमाताजी यांना विचारले होते, आणि त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे दिली होती. त्यातील काही निवडक प्रश्नोत्तरे, काही पत्रे, काही लिखाण, संवाद यांच्या माध्यमातून आपण उद्यापासून त्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

‘पूर्णयोगा’च्या साधनेचे – अंतरंग साधना आणि बहिरंग साधना असे दोन प्रकार आहेत. चेतना अंतर्मुख करून चैत्य पुरुषाचा (Psychic being) शोध आणि चेतना ऊर्ध्वमुख करून आत्मतत्त्वाचा (Soul) शोध घेणे; चेतना विशाल करत करत, ती विश्वात्मक करत नेणे या सर्व गोष्टींचा समावेश अंतरंग साधनेमध्ये होतो; तर अंतरंग साधनेमधून प्राप्त झालेल्या शांती, स्थिरता, प्रकाश, प्रेम, समता यांसारख्या गोष्टी दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्यक्षात आचरणात आणणे यांचा समावेश बहिरंग साधनेमध्ये होतो. या दोन्ही साधनापद्धतींसंबंधी काही मार्गदर्शन येथे मिळेल आणि अध्यात्म मार्गावर पहिलीवहिली पावले टाकण्यासाठी ही शिदोरी आपणा सर्वांना उपयोगी पडेल असा विश्वास वाटतो.

– संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

आध्यात्मिकता ३१

(भाग ०३)

व्यक्ती जोपर्यंत मानसिक चेतनेमध्ये जीवन जगत असते, – भलेही ते जीवन कितीही उच्च स्तरावरील असले तरी, जेव्हा ती बाहेरून आध्यात्मिक जीवनाकडे पाहते तेव्हा व्यक्ती स्वतःच्या मानसिक क्षमतांनुसार त्या जीवनाचे परीक्षण करते, शोधार्थ धडपडायचे, चुका करायच्या, त्या दुरूस्त करायच्या, थोडेसे प्रगत व्हायचे आणि पुन्हा शोधासाठी धडपडायचे या सवयीनुसार ती त्या जीवनाचे परीक्षण करू पाहते. ती व्यक्ती असा विचार करते की आध्यात्मिक जीवन जगणाऱ्या व्यक्तींनाही अशाच अक्षमतांचा त्रास सहन करावा लागतो पण असा विचार करणे ही एक घोडचूक आहे, असे म्हणावे लागेल.

जेव्हा व्यक्तीमध्ये चेतनेचे प्रतिक्रमण घडून येते तेव्हा या साऱ्या गोष्टी संपुष्टात आलेल्या असतात. आता व्यक्ती शोधासाठी धडपडत नाही, तिला गोष्टी ‘दिसतात’. आता व्यक्ती तर्क करत नाही, अनुमाने काढत नाही, तर तिला गोष्टी ‘ज्ञात’ असतात. आता व्यक्ती चाचपडत बसत नाही, तर ती ‘ध्येयाच्या दिशेने सरळ चालत’ जाते. आणि व्यक्ती जेव्हा अशी पुढे जाते अगदी थोडीशी जरी पुढे गेली तरी व्यक्तीला परम सत्य उमगते, जाणवते, व्यक्ती ते ‘परम सत्य’ जगते; ते परम सत्य हे असते की, एकमेव ‘परमोच्च सत्य’च कार्यरत असते, ‘परम ईश्वर’च मानवी जिवांच्या माध्यमातून संकल्प करतो, तोच जाणतो आणि तोच कार्य करतो. अशावेळी मग त्रुटी राहण्याची शक्यताच कशी असू शकेल? तो जे करतो, ते तो करतो कारण तसे करण्याची ‘त्याची’ इच्छा असते.

आपल्या सदोष दृष्टीला या कृती कदाचित अनाकलनीय असतात पण त्यांना काही अर्थ असतो, त्यांचे काही उद्दिष्ट असते आणि त्या ज्या दिशेने जाणे आवश्यक असते तेथेच त्या नेल्या जातात. व्यक्तीला जर इतरांना आणि या जगाला मदत करण्याची खरी प्रामाणिक इच्छा असेल तर, व्यक्ती त्यातल्या त्यात एक गोष्ट अशी करू शकते की, इतरांनी जसे असावे असे व्यक्तीला वाटते तसे तिने स्वतः बनले पाहिजे – केवळ उदाहरण म्हणून नाही, परंतु, असे केल्याने, व्यक्ती तेजस्वी शक्तीचे एक केंद्र बनू शकते, आणि तिच्या तशा रितीने अस्तित्वात असण्यामुळेच, उर्वरित जगाला ती रूपांतर घडविण्यासाठी भाग पाडू शकते.

( ….समाप्त)

– श्रीमाताजी [CWM 09 : 415-416]

आध्यात्मिकता ३०

(भाग ०२)

व्यक्ती ज्या क्षणी आध्यात्मिक जीवनाकडे आणि सत्यतेकडे वळते, त्याच क्षणी ती ‘अनंता’ला, त्या ‘शाश्वता’ला स्पर्श करते आणि त्यामुळे त्या व्यक्तीकडे कमीअधिक क्षमता आहेत किंवा शक्यता आहेत असा प्रश्नच शिल्लक राहत नाही. आध्यात्मिक जीवन जगण्याची एखाद्याकडे जास्त क्षमता आहे किंवा दुसऱ्या एखाद्याकडे कमी क्षमता आहे असे म्हणणे ही आध्यात्मिक जीवनासंबंधीची मानसिक संकल्पना आहे, मात्र हे विधान अजिबात उचित नाही. एखादी व्यक्ती निर्णायक आणि (चेतनेच्या) संपूर्ण प्रतिक्रमणासाठी (reversal of consciousness) कमी-अधिक सज्ज आहे, असे फार फार तर म्हणता येईल. वस्तुत: सामान्य गतीविधींपासून मागे वळून, आध्यात्मिक जीवनाच्या शोधात निघायचे ही जी मानसिक क्षमता असते, तिचे मोजमाप करता येऊ शकते.

परंतु जोपर्यंत व्यक्ती मानसिक क्षेत्रामध्ये वावरत असते, त्या अवस्थेत असते, चेतनेच्या त्या स्तरावर असते तेथून व्यक्ती इतरांसाठी फारसे काही करू शकत नाही, म्हणजे सर्वसाधारण जीवनाबाबत किंवा काही विशिष्ट व्यक्तींबाबत फारसे काही करू शकत नाही, कारण व्यक्तीला स्वतःविषयीच खात्री नसते, तिला स्वतःला निर्णायक असा अनुभव आलेला नसतो, तिची चेतना ही आध्यात्मिक विश्वामध्ये सुस्थापित झालेली नसते. आणि म्हणून त्या सर्व गोष्टींबाबत असे म्हणता येते की, त्या सर्व मानसिक कृती असतात आणि त्यांना बऱ्यावाईट बाजू असतात, परंतु त्यांच्यामध्ये फारशी शक्ती नसते, आध्यात्मिक संक्रमणाची शक्ती, जी वास्तविक एकमेव खरी परिणामकारक शक्ती असते, ती त्यांच्यामध्ये अजिबात नसते.

व्यक्ती स्वतः ज्या चेतनेमध्ये जीवन जगत असते ती चेतनेची अवस्था इतरांमध्ये संक्रमित करण्याची शक्यता ही एकमेव खरी परिणामकारक गोष्ट असते. पण अशी शक्ती कल्पनेने तयार करता येत नाही. व्यक्ती तिचे अनुकरण करू शकत नाही, स्वतःकडे ती शक्ती असल्याचे व्यक्ती दाखवू शकत नाही; व्यक्ती जेव्हा स्वतः त्या अवस्थेमध्ये सुस्थिर होते तेव्हाच ती क्षमता सहजस्वाभाविकपणे उदयाला येते, जेव्हा व्यक्ती अंतरंगामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा ती क्षमता तिच्या अंगी नसते, मात्र व्यक्ती जेव्हा अंतरंगामध्ये जीवन जगत असते, जेव्हा ती तेथे असते तेव्हा ही क्षमता त्या व्यक्तीच्या अंगी येते. आणि म्हणूनच जे खऱ्या अर्थाने आध्यात्मिक जीवन जगत असतात त्यांची फसवणूक केली जाऊ शकत नाही.

जे अजूनही मानसिक स्तरावरच जीवन जगत आहेत ते, आध्यात्मिक जीवनाची नक्कल पाहून, भुलू शकतात, फसू शकतात, परंतु ज्यांना स्वतःलाच चेतनेच्या प्रतिक्रमणाचा अनुभव आलेला आहे, ज्यांचे बाह्य अस्तित्वाशी असलेले नाते हे पूर्णपणे वेगळे आहे, ते अशा रितीने फशी पडत नाहीत किंवा ते (बेगडी, बाह्य रूपाला भुलण्याची) चूक करू शकत नाहीत.

अशा लोकांना, म्हणजे मानसिक स्तरावरील जीवन जगणाऱ्या लोकांना हे कळू शकणार नाही.

(क्रमश:…)

– श्रीमाताजी [CWM 09 : 414-415]

आध्यात्मिकता २९

(पूर्वसूत्र : स्वतःमधील आध्यात्मिक पुरुषाचा (spiritual being) शोध लावणे हे आध्यात्मिक मनुष्याचे मुख्य कर्तव्यकर्म असते आणि त्याच उत्क्रांतीच्या दिशेने जाण्यासाठी इतरांना साहाय्य करणे ही मानववंशासाठी त्याने केलेली खरी सेवा असते, या श्रीअरविंद लिखित वचनावर आधारित पुढील प्रश्न…)

(भाग – ०१)

साधक : माताजी, ज्याच्याकडे फारशी आध्यात्मिक क्षमता नाही अशी व्यक्ती या कार्यामध्ये चांगल्या रीतीने साहाय्य कसे करू शकते ?

श्रीमाताजी : एखाद्याकडे जास्त आध्यात्मिक क्षमता आहे, दुसऱ्या एखाद्याकडे कमी क्षमता आहे, असे म्हणता येईल का नाही, याबाबत सांगता येणार नाही. कारण ते तसे नसते.

आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी चेतनेचे प्रतिक्रमण (reversal of consciousness) होणे आवश्यक असते. त्याची तुलना मानसिक क्षेत्रामध्ये व्यक्तीच्या अंगी असलेल्या क्षमतांशी, शक्यतांशी करणे अजिबात शक्य नाही. म्हणजे अमुक एका व्यक्तीकडे फारशी मानसिक, प्राणिक किंवा शारीरिक क्षमता नाही, किंवा त्याच्या शक्यता अगदी मर्यादित आहेत असे म्हणता येते. या क्षमता कशा विकसित करायच्या, नवीन क्षमता कशा संपादन करायच्या, (अर्थात हे तसे अवघड आहे पण तरीही) हे सगळे सांगता येऊ शकते. परंतु आध्यात्मिक जीवन जगणे म्हणजे व्यक्तीने आपल्याच अंतरंगातील एका वेगळ्याच विश्वाप्रत खुले व्हायचे असते. म्हणजे चेतनेचे प्रतिक्रमण घडवायचे असते, चेतनेला तिच्या मूळ स्थितीत न्यायचे असते.

सामान्य मानवी चेतनेची हालचाल ही बहिर्मुख असते. माणसं कितीही विकसित असली, अगदी अतिबुद्धिमान असली किंवा खूप यशस्वी असली तरी त्यांचीदेखील चेतना बहिर्मुख असते, साऱ्या ऊर्जा या बहिर्मुख असतात, संपूर्ण चेतना ही बाह्य दिशेनेच पसरलेली असते आणि चेतना थोडीफार अंतर्मुख झालेली असेल तरी ती अंतर्मुखता अगदीच अल्प असते, ती अतिशय दुर्मिळ असते, किंवा अगदीच त्रुटित असते. आणि ती अंतर्मुखतासुद्धा काही विशेष परिस्थितीच्या दडपणाखाली घडून येते, जोरदार धक्का बसला तर घडून येते. चेतनेच्या बहिर्मुखतेचे हे जे स्पंदन असते ते किंचित का होईना पालटावे आणि अंतर्मुख व्हावे नेमक्या याच हेतुने जीवन धक्केचपेटे देत असते.

ज्या ज्या व्यक्ती आध्यात्मिक जीवन जगल्या आहेत त्यांना एकसमानच अनुभव आलेला असतो : त्यांच्या अस्तित्वामधील काहीतरी अगदी अचानक प्रतिक्रमित झाले आहे, म्हणजे, अचानक काहीतरी बदल झाला आहे, काहीजण कधीकधी अचानक पूर्णपणे अंतर्मुख झाले आहेत, तसेच, त्याचवेळी अचानकपणे ऊर्ध्वमुख झाले आहेत, ते अंतरंगातून ऊर्ध्वमुख झाले आहेत. (अर्थात हे ऊर्ध्वमुख होणे म्हणजे बाहेर वर बघणे नसते, ते आंतरिक, सखोल असते, शारीरिकदृष्ट्या उंचीचा जो बोध होतो त्याच्यापेक्षा ही गोष्ट निराळी असते.) अंतरंगामध्ये काहीतरी अक्षरशः उलटेपालटे झालेले असते. हा एक निर्णायक अनुभव असतो – व्यक्तीची जीवनातील जी एक भूमिका असते, जीवनाकडे पाहण्याची जी एक विचारसरणी असते, त्यानुसार व्यक्ती जो एक दृष्टिकोन बाळगत असते, त्यामध्ये अचानकपणे परिवर्तन होते आणि कधीकधी तर हा बदल अतिशय निर्णायक असतो, तो अपरिवर्तनीय असतो.

(क्रमश:…)

– श्रीमाताजी [CWM 09 : 413-414]

आध्यात्मिकता २८

“राजकीय, सामाजिक किंवा यांत्रिक पद्धतीने झालेले अत्यंत आमूलाग्र बदलसुद्धा कोणतेही परिवर्तन घडवून आणू शकलेले नाहीत कारण जुनीच दुखणी नव्या रूपात पुन्हा तशीच टिकून राहतात: बाह्य वातावरणाच्या एखाद्या अंगाबाबत काहीसा फरक होतो पण मनुष्य जसा होता तसाच कायम राहतो. तो अजूनही तसाच अज्ञानी मानसिक जीव आहे जो त्याच्या ज्ञानाचा दुरूपयोग करत आहे किंवा ते ज्ञान परिणामकारक रीतीने तो वापरत नाहीये. तो अजूनही अहंकारानेच संचालित होत आहे आणि अजूनही त्याच्यावर प्राणिक इच्छावासनांची, आवेगांची, शरीराच्या गरजांची सत्ता चालते, त्याचा दृष्टिकोन अजूनही तसाच वरवरचा आहे आणि आध्यात्मिक नसलेला (unspiritual) असाच आहे, तो त्याच्या स्वतःच्या आत्मतत्त्वाविषयी आणि त्याला संचालित करणाऱ्या आणि त्याचा उपयोग करून घेणाऱ्या शक्तींविषयी अजूनही अनभिज्ञच आहे…

केवळ आध्यात्मिक परिवर्तनामुळेच म्हणजे, मनुष्याच्या (सद्यकालीन) उथळ मानसिक अस्तित्वाकडून सखोल आध्यात्मिक चेतनेकडे होणाऱ्या उत्क्रांतीमुळेच खरा आणि परिणामकारक फरक घडून येऊ शकेल. स्वतःमधील आध्यात्मिक पुरुषाचा (spiritual being) शोध लावणे हे आध्यात्मिक मनुष्याचे मुख्य कर्तव्यकर्म असते आणि त्याच उत्क्रांतीच्या दिशेने जाण्यासाठी इतरांना साहाय्य करणे ही मानववंशासाठी त्याने केलेली खरी सेवा असते; जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत एखादी बाह्य मदत ही थोडीफार साहाय्य करू शकते किंवा दिलासा देऊ शकते पण त्यातून फारसे काही निष्पन्न होत नाही. किंवा काही निष्पन्न झालेच तर ते अगदीच अल्प असते.”

– श्रीअरविंद [CWSA 21-22 : 917-918]

श्रीअरविंदलिखित ‘दिव्य जीवन’ ग्रंथामधील वरील उतारा श्रीमाताजींनी वाचून दाखविला आणि त्यावर एका साधकाने प्रश्न विचारला. त्याला श्रीमाताजी उत्तर देत आहेत. ते आपण उद्यापासून पाहू. (क्रमश:…)

आध्यात्मिकता २७

साधक : श्रीअरविंद यांनी असे लिहिले आहे की, “बाह्य परिस्थितीपेक्षा आध्यात्मिक वातावरण अधिक महत्त्वाचे असते; एखाद्या व्यक्तीला जर का ते मिळाले आणि व्यक्ती श्वासोच्छ्वास करण्यासाठी आणि त्यामध्ये जगण्यासाठी जर स्वतःचे आध्यात्मिक वातावरण तयार करू शकली तर, ती प्रगतीसाठी खरी सुयोग्य परिस्थिती असते.” व्यक्तीला असे आध्यात्मिक वातावरण कसे मिळू शकेल आणि व्यक्ती खरे आध्यात्मिक वातावरण कशा रीतीने निर्माण करू शकेल?

श्रीमाताजी : नेमकेपणाने सांगायचे झाले तर, आंतरिक साधनेद्वारे हे वातावरण तयार करणे शक्य असते. तुमचे विचार नियंत्रित करून, त्यांना पूर्णपणे साधनेकडे वळवून; तुमच्या कृती नियंत्रित करून, त्यांना पूर्णपणे साधनेकडे वळवून; सर्व वासना आणि निरूपयोगी, बाह्य, सामान्य गतिविधी संपुष्टात आणून; अधिक उत्कट आंतरिक जीवन जगून आणि सामान्य गोष्टी, सामान्य विचार, सामान्य प्रतिक्रिया, सामान्य कृती यांपासून स्वतःला अलग करून, तुम्ही असे वातावरण निर्माण करू शकता. तुम्ही असे केलेत तर तुम्ही स्वतःभोवती अशा प्रकारचे आध्यात्मिक वातावरण तयार करता.

उदाहरणार्थ, कोणतेतरी सवंग साहित्य वाचणे आणि वायफळ गप्पा मारत बसणे आणि काहीबाही करत बसणे यापेक्षा योगमार्गाचे अनुसरण करण्यासाठी साहाय्यकारी साहित्य तुम्ही वाचलेत, ईश्वरी साक्षात्काराकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टींशी साजेशा कृती तुम्ही केल्यात, सर्व वासना आणि बाह्य गोष्टींकडे वळलेले सर्व भावनावेग तुम्ही तुमच्यामधून नष्ट केलेत, तुम्ही तुमचे मानसिक अस्तित्व शांत केलेत, तुमच्या प्राणिक अस्तित्वाचे शमन केलेत, बाहेरून येणाऱ्या सूचनांपासून तुम्ही स्वत:ला संरक्षित केलेत आणि तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांच्या कृतीपासून स्वतःला संरक्षित केलेत, तर ज्याला काहीही स्पर्श करू शकणार नाही असे आध्यात्मिक वातावरण तुम्ही तयार करता. आणि मग ते वातावरण कोणत्याही बाह्य परिस्थितीवर यत्किंचितही अवलंबून नसते किंवा ते वातावरण तुम्ही ज्यांच्यासोबत राहता किंवा ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही राहता त्या परिस्थितीवर यत्किंचितही अवलंबून नसते. कारण तुम्ही आता तुमच्या आध्यात्मिक वातावरणामध्ये सुरक्षित असता.

पण हे स्पष्ट आहे की, जर तुम्ही सर्व दारे उघडलीत, लोक काय सांगतात हे ऐकत राहिलात, अमुक एकाचा सल्ला, आणि तमुक कोणाच्या अंतःसूचनांचे तुम्ही अनुसरण करत राहिलात, आणि बाह्यवर्ती गोष्टींसाठीच्या वासनांनी वखवखलेले राहिलात, तर तुम्ही स्वत:साठी आध्यात्मिक वातावरण निर्माण करू शकणार नाही. तसे वागलात तर, इतर सर्वसामान्यांसारखेच तुमचे वातावरणही सर्वसामान्यच असेल.

– श्रीमाताजी [CWM 06 : 356-357]

आध्यात्मिकता २६

जीवनाचा त्याग करणे ही खरी आध्यात्मिकता नव्हे, तर ‘ईश्वरी पूर्णत्वा’च्या साहाय्याने जीवन परिपूर्ण बनविणे ही खरी आध्यात्मिकता असते. भारताने आता जगाला ही खरी आध्यात्मिकताच दाखविली पाहिजे.

*

आध्यात्मिकतेच्या दृष्टीने पहिले असता भारत हा जगातील अग्रगण्य देश आहे. आध्यात्मिकतेचे आदर्श उदाहरण घालून देणे हे त्याचे जीवितकार्य आहे. आणि जगाला ही शिकवण देण्यासाठी श्रीअरविंदांनी या भूतलावर देह धारण केला.

*

खरी आध्यात्मिकता जीवनाचे रूपांतर घडविते.

*

मनुष्यामध्ये अभीप्सेच्या बिजाला जर खऱ्या आध्यात्मिकतेचे खतपाणी दिले तर तो ‘दिव्यत्वा’मध्ये विकसित होईल.

*

आध्यात्मिकता म्हणजे परम साधेपणा. खरी आध्यात्मिकता ही अतिशय साधी सरळ असते.

*

कर्मामध्ये ‘पूर्णत्वा’साठी असलेली ओढ ही खरी आध्यात्मिकता असते.

*

तुम्ही आध्यात्मिकतेच्या त्या स्तराशी संबंधित आहात ज्या स्तरावर जडभौतिकाला नकार देण्याची आवश्यकता असते आणि जी आध्यात्मिकता जडभौतिकापासून सुटका करून घेऊ इच्छित असते. परंतु ‘उद्याची आध्यात्मिकता’ ही जडभौतिकाला हाती घेईल आणि तिचे रूपांतर घडवून आणेल.

– श्रीमाताजी [CWM 13 : 357, 13 : 244, 14 : 32, 14 : 75, 14 : 151, 14 : 306, 15 : 85]

आध्यात्मिकता २५

आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक चेतना तुम्हाला सखोल आंतरिक साक्षात्कार प्रदान करते, ती तुमचा ‘ईश्वरा’शी संपर्क करून देते, बाह्य बंधनांपासून मुक्ती देते; परंतु ही मुक्ती परिणामकारक व्हायची असेल तर, आणि या मुक्तीचा जिवाच्या इतर घटकांवरदेखील परिणाम व्हायला हवा असेल तर, ‘ज्ञाना’चा आध्यात्मिक प्रकाश धारण करण्याइतपत मन पुरेसे खुले झाले पाहिजे; दृश्य रूपांच्या पाठीमागे असणाऱ्या शक्तींना हाताळण्याइतपत आणि त्यांच्यावर वर्चस्व गाजविण्याइतपत प्राण सशक्त झाला पाहिजे; हा सखोल अनुभव दैनंदिन जीवन-व्यवहारांमध्ये आणि प्रत्येक क्षणी अभिव्यक्त करणे शक्य व्हावे आणि समग्रतया तो अनुभव जगता यावा यासाठी शरीराला शिस्त लावली पाहिजे, त्याची नीट व्यवस्था लावली पाहिजे.

…आपल्याला जीव म्हणून जर समग्र, पूर्ण बनायचे असेल, पूर्ण साक्षात्कार व्हावा असे जर आपल्याला वाटत असेल तर, आलेला आध्यात्मिक अनुभव आपल्याला मनाद्वारे, प्राणाद्वारे आणि शरीराद्वारे अभिव्यक्त करता आला पाहिजे. आणि आपली अभिव्यक्ती जितकी जास्त निर्दोष असेल, आणि ती एका समग्र आणि परिपूर्ण जिवाकडून कार्यवाहीत झाली असेल, तर आपला साक्षात्कार हा अधिक समग्र आणि परिपूर्ण असेल.

– श्रीमाताजी [CWM 09 : 345-346]

आध्यात्मिकता २४

ज्यांना आध्यात्मिक जीवन जगण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आत्म-नियंत्रण, आत्म-प्रभुत्व, परीमितता, इच्छाविरहितता, जिवाच्या आंतरिक सत्याचा आणि त्याच्या आत्माविष्करणाच्या नियमाचा शोध या गोष्टी अगदी आवश्यक आहेत असे आपण म्हणू शकतो. स्वतःशी, स्वतःच्या ध्येयाशी प्रामाणिक असणे, स्वतःला अस्ताव्यस्त भावावेगांबरोबर वाहवत जाऊ न देणे, बदलणाऱ्या रूपांना ‘वास्तविकता’ अथवा ‘सत्य’ न मानणे, या गोष्टी अध्यात्म-मार्गावर प्रगत होण्यासाठी व्यक्तीकडे असणेच आवश्यक असते.

– श्रीमाताजी [CWM 03 : 191]

आध्यात्मिकता २३

स्वत:ला समजून घेतल्याने आणि स्वत:ला कसे जाणून घ्यायचे हे शिकल्यामुळेच माणूस परमशोध लावू शकतो. जेव्हा ‘जडभौतिका’च्या प्रत्येक अणुरेणुमध्ये माणसांना ‘ईश्वर’ आपल्या अंतर्यामी असल्याच्या विचाराची जाणीव होईल, प्रत्येक प्राणिमात्रामध्ये त्यांना ‘ईश्वरा’च्या अस्तित्वाची काही झलक जाणवेल, जेव्हा प्रत्येक मनुष्य त्याच्या बांधवांमध्ये ‘ईश्वरा’ला पाहू शकेल तेव्हा उष:काल होईल, तेव्हा या समग्र प्रकृतीला भारभूत झालेले अज्ञान, मिथ्यत्व, दोष, दुःखभोग, अंधकार भेदले जातील. कारण “सारी ‘प्रकृती’ त्रास सहन करत आहे आणि शोक करत आहे, कारण ती ‘ईश्वरपुत्रांना’ (मनुष्याला) साक्षात्कार कधी होणार याची प्रतीक्षा करत आहे.” हा एक असा मध्यवर्ती विचार आहे की ज्यामध्ये इतर सर्व विचारांचे सार येते; सूर्य ज्याप्रमाणे सर्व जीवन उजळवून टाकतो तसा हा विचार कायम आपल्या स्मरणात असला पाहिजे. एखाद्या दुर्मिळ रत्नाप्रमाणे, खूप मौल्यवान खजिना असल्याप्रमाणे आपण आपल्या हृदयात या विचाराची जपणूक करून, त्यानुसार मार्गक्रमण केले आणि त्या मध्यवर्ती विचाराला, त्याचे ज्योतिर्मय करण्याचे व रूपांतरण करण्याचे कार्य आपल्यामध्ये करू देण्याची मुभा दिली तर, आपल्याला हे कळू शकेल की, सर्व वस्तुमात्रांच्या आणि प्राणिमात्रांच्या अंतर्यामी तो विद्यमान असतो आणि त्यामध्येच या विश्वाचे अद्भुत एकत्व आपण अनुभवू शकतो.

तेव्हा मग आपल्याला आपली मूर्ख भांडणे, आपल्या छोट्याछोट्या इच्छावासना, आपले अंध रोष, किरकोळ समाधानांमधील बालीशपणा आणि फोलपणा लक्षात येईल. आपल्यातील छोटेछोटे दोष विरघळून जात आहेत, आपल्या संकुचित व्यक्तिमत्त्वाचे आणि आपल्या आडमुठ्या अहंकाराचे उरलेसुरले बुरूज ढासळून पडत आहेत असे आपल्याला दिसेल.

‘खऱ्याखुऱ्या आध्यात्मिकते’च्या या उदात्त प्रवाहामध्ये आपले अस्तित्व वाहून जात आहे; तो प्रवाह, संकुचित मर्यादा आणि बंध यांच्यापासून आपली सुटका करत आहे, असे आपल्याला जाणवेल. ‘व्यक्तिगत आत्मा’ आणि ‘विश्वात्मक आत्मा’ हे दोन (भिन्न नसून) एकच आहेत; प्रत्येक विश्वामध्ये, प्रत्येक जिवामध्ये, प्रत्येक वस्तुमध्ये, प्रत्येक अणुमध्ये ईश्वरी उपस्थिती आहे आणि त्याचे आविष्करण करणे हे मनुष्याचे जीवितकार्य आहे.

– श्रीमाताजी [CWM 02 : 40-41]