जगाच्या डोळ्यांसमोर भारतामध्ये ‘राष्ट्र’उभारणीचे कार्य अत्यंत वेगाने, अगदी स्पष्टपणे, घडू लागले आहे त्यामुळे सर्वांनाच ही प्रक्रिया दिसू शकत आहे आणि ज्यांच्यापाशी थोडी सहानुभूती आहे, अंतर्दृष्टी आहे ते या दैवी रचनेची दिशा, त्यामध्ये कार्यकारी असणाऱ्या शक्ती, आणि त्यामध्ये उपयोगात आणली गेलेली सामग्री यांमधील वेगळेपण पाहू शकत आहेत. हे राष्ट्र म्हणजे ‘प्रकृती’च्या कार्यशाळेतील कच्च्या मालापासून तयार झालेला नवीन वंश नाही किंवा हे राष्ट्र आधुनिक परिस्थितीमुळे निर्माण झाले आहे, असेही नव्हे. तर येथील संस्कृती ही, या पृथ्वीवरील महान संस्कृतींपैकी, प्राचीन वंशांपैकी एक आहे; दुर्दम्य प्राणशक्ती, महानतेची, सखोलतेची जणू खाणच, अद्भुत क्षमता असणारी, अशी ही संस्कृती; मानवी संस्कृतीच्या इतर प्रकारांपासून तसेच परकीय वंशप्रकारांपासून सामर्थ्याचे अगणित उगमस्त्रोत स्वत:मध्ये सामावून घेत, आता ती कायमसाठी एका सुसंघटित अशा राष्ट्रीय एकात्मतेमध्ये स्वत:चे उन्नयन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. …आमच्या पुरातन कालापासून जो प्रयत्न आजवर आमचा वंश करत होता, तो प्रयत्न आता संपूर्णत: नवीन परिस्थितीमध्ये तो करेल. एखादा जाणकार निरीक्षक त्याच्या यशस्वितेचे भाकीत करू शकेल; कारण जे काही महत्त्वाचे अडथळे होते ते दूर करण्यात आले आहेत किंवा ते दूर होण्याच्या प्रक्रियेत आहेत. परंतु आम्ही याही पुढे जातो आणि असा विश्वास बाळगतो की, यश मिळण्याची खात्री आहेच कारण भारताची महानता, भारताची एकात्मता, आणि भारताचे स्वातंत्र्य ही आता संपूर्ण जगाचीच आवश्यकता बनली आहे. ….कितीही प्रचंड आणि वरवर पाहता कितीही दुस्तर संकटे का येईनात, आम्ही त्यामुळे नाउमेद होणार नाही आणि त्या कार्यामध्ये चिकाटीने प्रयत्नशील राहू. ईश्वर आमच्या सोबत आहे आणि या श्रद्धेमुळेच आमचा विजय होईल असा आमचा विश्वास आहे.. आमचा असा विश्वास आहे की, ‘ईश्वर’ आमच्या सोबत आहे आणि त्या श्रद्धेमुळे आम्ही जिंकू. आमचा असा विश्वास आहे की, मानवतेला आमची गरज आहे आणि मानवतेविषयीचे, आपल्या देशाविषयीचे, वंशाविषयीचे, आमच्या धर्माविषयीचे आमचे प्रेम आणि तिची सेवा, आमची अंत:करणे शुद्ध करेल आणि या लढ्यातील कृतीसाठी ती आम्हाला प्रेरित करेल.

– श्रीअरविंद [CWSA 08 : 23-24]

बालकसदृश विश्वास ही सर्वात महत्त्वाची अट असते. बालकाला असा प्रांजळ विश्वास असतो की, त्याला हवी असलेली गोष्ट त्याला मिळेलच, ते बालक त्या गोष्टीची स्वतःहून मागणीसुद्धा करत नाही; त्याला खात्री असते की, जेव्हा त्याला एखाद्या गोष्टीची आवश्यकता असेल तेव्हा ती त्याला मिळेलच. असा अगदी बालकसदृश विश्वास, हीच खरोखर सर्वात महत्त्वाची अट असते. मात्र त्यासाठी आस बाळगणे अत्यंत आवश्यक असते. पण काही माणसांच्या अंतरंगातच श्रद्धा आणि अश्रद्धा, विश्वास आणि अविश्वास यांच्यामध्ये एक प्रकारचा संघर्ष चालू असतो; विजयाची खात्री असलेला आशावाद आणि मोठी आपत्ती आली तर काय होईल असा विचार करणारा निराशावाद यांच्यामध्ये संघर्ष चालू असतो….

मुले स्वाभाविकपणे जशी असतात तशीच असतील म्हणजे मोठ्या माणसांनी मुलांना बिघडवले नसेल तर, त्यांना ‘सारे काही चांगलेच घडेल’ असा दुर्दम्य विश्वास असतो. उदाहरणार्थ, जेव्हा जेव्हा त्यांच्याबाबतीत एखादी छोटीशी दुर्घटना घडते तेव्हा याचे पुढे जाऊन काही गंभीर परिणाम होतील का, असला विचार त्यांच्या मनाला कधी शिवतही नाही. सारे काही लवकरच सुरळीत होईल अशी त्यांना अगदी स्वाभाविकपणे खात्री असते आणि ही खात्री इतकी जबरदस्त असते की त्यामुळे तो दुष्परिणामच नाहीसा झालेला असतो.

कोणी एखादा जेव्हा ‘शक्ती’ची आस बाळगतो, ‘ईश्वरा’कडे मदतीची याचना करतो, आणि ती मिळेलच असा ज्याचा अढळ विश्वास असतो तेव्हा, ती मदत मिळणार नाही असे शक्यच नाही, ती खात्रीने मिळणारच. हा विश्वास, हेच खरेखुरे ‘आंतरिक खुलेपण’ (inner opening) असते. काही माणसं सतत याच स्थितीमध्ये असतात. स्वीकारण्याजोगे असे जेव्हा काहीतरी असते तेव्हा, ते स्वीकारण्यास अशी माणसं नेहमी तत्पर असतात. पण असेही काही जण असतात की, जेव्हा काही मिळण्याची वेळ येते, जेव्हा शक्ती अवतरते तेव्हा, ते नेहमीच अनुपस्थित असतात, ते त्या घडीला मिटलेले असतात (ग्रहणशील नसतात.) त्याउलट ज्यांच्यापाशी बालकसदृश विश्वास असतो ते मात्र योग्य वेळी तेथे उपस्थित असतात. आणि आश्चर्य म्हणजे, बाह्यत: दोघांमध्ये कोणताही फरक नसतो. त्या दोघांकडेही समान सदिच्छा असते, समान अभीप्सा असते, काहीतरी कल्याणकारी करण्याची समान इच्छा असते, परंतु ज्यांच्या अंत:करणात सुहास्य विश्वास असतो, ते प्रश्न उपस्थित करत बसत नाहीत, ते आपल्याला काही प्राप्त होईल किंवा नाही, ‘ईश्वर’ आपल्याला प्रतिसाद देईल की नाही अशा शंकाकुशंका मनात आणत नाहीत; त्यांच्या मनात तसा प्रश्नच निर्माण होत नाही… “जे माझ्यासाठी गरजेचे आहे ते मला दिले जाईल; मी जर प्रार्थना केली तर मला प्रतिसाद मिळेल; जेव्हा मी अडचणीत असेन आणि मदतीची याचना करेन तेव्हा मला मदत मिळेल आणि केवळ मदत मिळेल इतकेच नाही तर सर्व गोष्टींची योग्य ती व्यवस्था लावली जाईल.” असा त्यांना विश्वास असतो. असा जर हा उत्स्फूर्त, विनम्र, निःशंक विश्वास असेल तर, त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा कार्य अधिक चांगल्या रीतीने घडून येते आणि त्याचे परिणामदेखील अद्भुत असतात. मनाच्या शंका आणि विरोधाभास यामुळेच व्यक्ती सर्व गोष्टी बिघडवून टाकते. अशी व्यक्ती जेव्हा संकटामध्ये असते तेव्हा तिची, एक प्रकारे अशी धारणा तयार होते की, “हे अशक्य आहे! मला हे जमणार नाही. मी आत्ता ज्या परिस्थितीमध्ये आहे, जी मला नको आहे, ती जर का अजून खालावली, आणि जर तसेच घडले तर, सारे काही अधिकच बिघडून जाईल. मी अशा रीतीने अधिकाधिकच खालावत गेलो तर…” अशा विचारांमुळे, व्यक्ती स्वतःमध्ये आणि जी शक्ती तिने स्वीकारायला हवी त्या शक्तीमध्ये एक प्रकारची भिंत निर्माण करते.

चैत्य पुरुषाकडे मात्र कोणताही विरोधाभास नसलेला, कोणताही तर्कवितर्क नसलेला, कोणतीही छाया नसलेला अद्भुत विश्वास असतो. आणि जेव्हा हा विश्वास असतो तेव्हा, जिला प्रतिसाद मिळणार नाही अशी कोणतीच प्रार्थना असत नाही, आणि प्रत्यक्षात साकार होणार नाही अशी कोणतीच ‘अभीप्सा’ असत नाही.

– श्रीमाताजी [CWM 06 : 403-404]

श्रीमाताजी : बालकाचे आंतरात्मिक जीवन (psychic life) हे त्याच्या मानसिक जीवनाने झाकलेले नसते. बालकाची घडण पक्की झालेली नसल्याने, त्याच्यामध्ये विकासाची मोठी क्षमता असते आणि ते पुरेशा लवचीकतेने प्रगती करू शकते.

साधक : पूर्णयोगामध्ये बालकसदृश मार्गाचा अंगीकार करता येतो, त्याविषयी मला अधिक जाणून घ्यायचे आहे.

श्रीमाताजी : बालकसदृश मार्ग म्हणजे मनामध्ये कोणतीही शंका येऊ न देता ठेवलेला निःसंशय विश्वास, संपूर्ण अवलंबित्व आणि हातचे काहीही राखून न ठेवता केलेले समर्पण.

साधक : हा बालकसदृश मार्ग माझ्यासाठी योग्य राहील असे तुम्हाला वाटते का?

श्रीमाताजी : बालकसदृश मार्ग हा नेहमीच चांगला असतो परंतु तो सोपा नाही, कारण तो अतीव प्रामाणिकपणे आणि उत्स्फूर्तपणे स्वीकारला गेला पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 17 : 121]

विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ‘ईश्वर’च स्वत:च्या ‘शक्ति’द्वारे विद्यमान असतो पण तो त्याच्या ‘योगमाये’द्वारे झाकलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जे कार्य करतो ते ‘जिवा’च्या अहंकाराद्वारे करत असतो. ‘योगा’मध्येही ‘ईश्वर’ हाच ‘साधक’ आणि ‘साधना’ही असतो; त्याचीच ‘शक्ती’ तिच्या प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान, चेतना आणि ‘आनंद’ यांच्या साहाय्याने आधारावर (मन, प्राण, शरीर यांवर) कार्य करते आणि जेव्हा आधार त्या शक्तिप्रत उन्मुख होतो, तेव्हा या सर्व दिव्य शक्ती त्या आधारामध्ये ओतल्या जातात आणि त्यामुळे ‘साधना’ शक्य होते. परंतु जोपर्यंत कनिष्ठ प्रकृती सक्रिय असते, तोपर्यंत ‘साधका’च्या वैयक्तिक प्रयत्नांची आवश्यकता असतेच. हा आवश्यक असलेला वैयक्तिक प्रयत्न म्हणजे अभीप्सा, नकार आणि समर्पण अशी त्रिविध तपस्या होय.

– श्रीअरविंद [CWSA 32 : 06]

तुम्ही झटून प्रयत्न केले पाहिजेत, तुम्ही तुमच्या सर्व दुर्बलता आणि मर्यादा यांवर मात करण्यासाठी धडपडले पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे “आता तुझी सद्दी संपली आहे,” असे तुम्ही तुमच्या अहंकाराला सांगितले पाहिजे.

आपल्याला आता एक असा वंश हवा आहे की ज्या वंशातील लोकांना अहंकार नसेल, आणि अहंकाराची जागा ‘दिव्य चेतने’ने घेतलेली असेल. आपल्याला अशी ‘दिव्य चेतना’ हवी आहे की, जिच्यामुळे तो वंश स्वतःहूनच विकसित होईल आणि त्यामधून अतिमानसिक जीव जन्माला येईल.

– श्रीमाताजी [CWM 11 : 307]

जेव्हा मानववंश प्रथमत: निर्माण करण्यात आला तेव्हा अहम् हा एकीकरण करणारा घटक होता. या अहंभोवतीच अस्तित्वाच्या विविध अवस्थांचे वर्गीकरण करण्यात आले होते; परंतु आता जेव्हा ‘अतिमानवा’च्या जन्माची तयारी चालू आहे, तेव्हा अहंला नाहीसे व्हावेच लागेल, त्याने चैत्य पुरुषाला (psychic being) वाट मोकळी करून देणे आवश्यक आहे; मानवामध्ये ‘दिव्यत्वा’चे आविष्करण व्हावे म्हणून हळूहळू ईश्वराच्या मध्यस्थीने त्याची घडण व्हायला सुरुवात झाली आहे.

‘दिव्यत्वा’चे मनुष्यामध्ये आविष्करण होते ते चैत्य प्रभावाखालीच होते आणि त्याद्वारे अतिमानवतेच्या आगमनाची तयारी होते. चैत्य पुरुष हा अमर्त्य असतो आणि त्याच्याद्वारेच पृथ्वीवर अमर्त्यत्वाचे (immortality) आविष्करण होऊ शकते. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट अशी की, व्यक्तीने स्वतःच्या चैत्य पुरुषाचा शोध घेतला पाहिजे, त्याच्याशी एकत्व पावले पाहिजे. आणि अहंची जागा त्या चैत्य पुरुषाला घेऊ दिली पाहिजे; ज्यामुळे अहंला एकतर रूपांतरित व्हावे लागेल अन्यथा नाहीसे होणे भाग पडेल.

– श्रीमाताजी [CWM 16 : 434]

 

साधक : माताजी, तुम्ही या छायाचित्रामध्ये प्रणाम का करत आहात ? का ? आणि कोणाला ?

श्रीमाताजी : मी ‘सत्या’चे स्वागत करत आहे. त्यासाठी ही आवश्यक अशी मुद्रा आहे. हा भक्तीचा आणि विनम्रतेचा भाव आहे. जेव्हा ‘सत्य’ हेच एकमेव मार्गदर्शक असेल अशा दिवसाची मी अगदी धीराने वाट पाहत आहे. हा भाव महत्त्वाचा आहे. येथे ‘दिव्य सत्य’ समग्रपणे स्थापित व्हावे अशी जर पृथ्वीची इच्छा असेल तर, हा भाव तिने बाळगला पाहिजे. ही एकच गोष्ट आहे की जी या पृथ्वीला वाचवू शकेल. या भूमिकेमध्ये राहायचे आणि ऊर्ध्वगामी अभीप्सा बाळगायची. या वृत्तीने ‘सत्या’समोर नतमस्तक व्हायला या पृथ्वीने शिकलेच पाहिजे. हीच आराधनाही आहे आणि तोच प्रणामही आहे. पृथ्वीने हे शिकलेच पाहिजे, या (प्रणामाच्या) मुद्रेमधून अजूनही अधिक काही, म्हणजे गहनगभीर आणि उदात्त असे काही अभिव्यक्त होते.

[Sweet Mother – Harmonises of Light, Part 01 : 15]