आंतरिक आधार शोधण्यासाठी व्यक्तीने, आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या अत्यंत सखोल गुहेमध्ये बुडी मारली पाहिजे; व्यक्तीने आत अधिक आत, खोल, अधिक खोल उतरले पाहिजे. मनावर उमटलेले सारे ठसे बाजूला सारून, अक्षुब्ध, अविचल शांतीच्या शोधात, एका स्तरानंतर दुसऱ्या स्तरावर, एका चेतनेनंतर दुसऱ्या चेतनेकडे, असे अगदी खोल गाभ्यातच प्रविष्ट झाले पाहिजे. अस्तित्वाच्या या अतीव अचंचलतेमध्ये (quietude), साऱ्या बाह्य गोंगाटापासून दूर, साऱ्या दुःखयातनांपासून दूर, विचार, कल्पनांपासून दूर, साऱ्या संवेदनांपासून अगदी दूर जात, जिथे अहंकार अस्तित्वातच नसतो अशा स्थानी, ईश्वराचे ‘अस्तित्व’ अनुभवण्यासाठी व्यक्तीने अगदी काळजीपूर्वकपणे अंतरंगामध्ये प्रविष्ट झालेच पाहिजे.

तेथूनही अजून पुढे जावे लागते, शोध घेण्यासारखे बरेच काही शिल्लक असते, जेथे सर्व-शक्तिमान, सर्व-सिद्धिदायिनी ईश्वरी ‘शक्ती’ स्पंदित होत असते, त्या शक्तीकडे चेतना अभिमुख करणे आवश्यक असते. जिथे कोणतीही कृती शिल्लक राहात नाही, कोणताही ठसा उमटलेला नाही, अहंकार नाही, स्वतंत्र अस्तित्व शिल्लक नाही, अन्य काहीही नाही तर फक्त आनंदलहरी आहेत, आणि ज्या ठायी एक परिपूर्ण समत्व असते असे एक स्पंदन; असे एक स्पंदन की जे साऱ्याचे उगमस्थान असते, तिथपर्यंत व्यक्तीने खोल खोल गेले पाहिजे. या परिपूर्ण आणि अक्षर, अविकारी शांतीमध्ये एकात्म पावले पाहिजे, ते ऐक्य अनुभवले पाहिजे…

-श्रीमाताजी [The Supreme by Mona Sarkar]

श्रीअरविंद : निर्भरतेची वृत्ती हे परिपूर्ण साधनेचे महान रहस्य आहे. कोणतीही परिस्थिती असली तरी किंवा कोणतीही अडचण आली तरी, ईश्वरावर विसंबून राहणे म्हणजे ‘निर्भर’ असणे. जेव्हा सारे काही सुरळीत चालू असते तेव्हा ‘निर्भर’ असणे याला विशेष काही अर्थ नाही.

साधक : जेव्हा प्राणाचा क्षोभ होतो तेव्हा हे निर्भर असणे मी कायम कसे टिकवून ठेवू ? नकार देऊन ? की अलिप्त राहून ?

श्रीअरविंद : प्रथम अलिप्तता, नंतर अलिप्ततेसहित नकार.

साधक : पण जेव्हा आतूनच एक प्रकारचा असमाधानाचा सूक्ष्मसा ताण जाणवत असतो तेव्हा मी स्वतःला अलिप्त कसे ठेवू?

श्रीअरविंद : त्या असमाधानापासून अलिप्त होऊन. …स्वतःमधील जो ‘साक्षी’ आहे त्याने मागे उभे राहणे आणि येणाऱ्या स्पंदनांकडे ती स्वतःची (आपल्या आत्म्याची स्पंदने) आहेत असे समजण्यास नकार देणे, ती स्पंदने म्हणजे आपल्या गतकालीन प्रकृतीची सवय आहे किंवा सार्वत्रिक प्रकृतीचे आपल्यावर झालेले आक्रमण आहे, अशा रीतीने त्यांच्याकडे पाहाणे. असे समजून त्यांना हाताळणे म्हणजे अलिप्त होणे. हे अवघड आहे असे वाटू शकते पण व्यक्ती चिकाटीने प्रयत्न करत राहिली तर तिला ते चांगल्या रीतीने साध्य होते.

– [Nirodbaran’s Correspondence with Sri Aurobindo, Vol. II : 650-657]

श्रीमाताजी : मी तुम्हाला काय सांगितले ते लक्षात असू दे. ‘मी’चा शोध घेण्यासाठी कष्ट घ्या. तुमच्यासमोर जो मार्ग मी आखून दिला आहे त्यावर मार्गक्रमण करा. या कार्याइतके अन्य कोणतेच कार्य महत्त्वाचे नाही. याच्याशी तुलना करता इतर कोणतेच कार्य इतके महत्त्वाचे नाही. ‘ईश्वरा’चा शोध घ्यायचा. हेच जीवन आहे, हेच ध्येय आहे, हाच आनंदठेवा आहे. ‘ईश्वरा’वर निस्सीम ‘प्रेम’ करा जेणेकरून ‘तो’ नेहमीच तुमच्यासोबत राहील. सर्व कार्याचा कर्ता-करविता ‘तो’च असू द्यावा. ‘तो’ तुमच्यासोबत कर्म करतो. ‘तो’ तुमच्याबरोबर धडपड करतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. ‘तो’ प्रत्येक पावलागणिक तुम्हाला मार्गदर्शन करतो. फक्त ‘ईश्वर’च.

– [The Supreme by Mona Sarkar : 97]

तुम्ही जितके दुःखीकष्टी असाल आणि जितके शोक-विलाप करत राहाल तितके तुम्ही माझ्यापासून दूर होत जाता. ‘ईश्वर’ हा दुःखी नाही आणि ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर सर्व प्रकारच्या भावनिक कमकुवतपणाला आणि सर्व दुःखांना तुम्ही तुमच्यापासून दूर केले पाहिजे.

*

शोक करू नका. एकच लढाई पुन्हापुन्हा अनेक वेळा जिंकावी लागते, विशेषतः ती लढाई जेव्हा विरोधी शक्तींच्या विरोधात लढली जात असते तेव्हा ती पुन्हापुन्हा जिंकावी लागते. आणि म्हणूनच व्यक्तीने संयम बाळगत स्वतःला सुसज्ज ठेवलेच पाहिजे आणि अंतिम विजयाबद्दल श्रद्धा बाळगली पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 16 : 171], [CWM 16 : 184]

श्रीमाताजी : मी सतत तुमच्या सोबत असते आणि या आंतरिक ‘उपस्थिती’विषयी जागृत होणे हा साधनेमधील सर्वांत महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही ‘क्ष’ला विचारा, तो तुम्हाला सांगेल की ही ‘उपस्थिती’ हा काही केवळ श्रद्धेचा विषय किंवा केवळ मानसिक कल्पनेचा खेळ नाही, तर ती अतिशय सघन अशी वस्तुस्थिती आहे, आणि चेतनेसाठी ती अगदी एखाद्या जडभौतिक गोष्टीप्रमाणे खरीखुरी आणि इंद्रियगम्य असते.

*

साधक : ज्याच्यामुळे मला ईश्वरी ‘उपस्थिती’ची जाणीव सदासर्वदा आणि सर्वत्र होईल अशा प्रकारच्या ईश्वरी ‘प्रेमा’चा उगम मी कोठे व कसा शोधू?

श्रीमाताजी : त्यासाठी तुम्ही आधी ‘ईश्वरा’चा शोध घेतला पाहिजे, एकतर तो शोध तुम्ही आंतरिकीकरणाच्या (interiorisation) आणि एकाग्रतेच्या साहाय्याने तुमच्या स्वतःमध्ये घेतला पाहिजे, किंवा तो शोध तुम्ही प्रेमाच्या आणि आत्म-त्यागाच्या माध्यमातून माझ्यामध्ये किंवा श्रीअरविंदांमध्ये घेतला पाहिजे. एकदा का तुम्हाला ‘ईश्वरा’चा शोध लागला की मग अगदी स्वाभाविकपणे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये, सर्वत्र त्याचेच दर्शन घडू लागेल.

*

‘ईश्वरा’शी ऐक्य पावण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे हृदयामध्ये चित्त एकाग्र करायचे आणि ‘त्या’च्या ‘अस्तित्वा’चा शोध लागेपर्यंत अंतरंगामध्ये, आत आत खोलवर जायचे. आणि दुसरा मार्ग म्हणजे ‘ईश्वरा’च्या हाती स्वतःला सोपवून द्यायचे, आणि आईच्या कुशीत जसे लहानगे मूल विसावते तसे त्याच्या कुशीमध्ये, संपूर्ण समर्पणाच्या भावनेने विसावायचे. आणि या दोन मार्गांपैकी दुसरा मार्ग मला स्वतःला अधिक सोपा वाटतो.

– श्रीमाताजी [CWM 16 : 160-161]

ज्या ‘ईश्वरा’च्या प्राप्तीची आपण इच्छा बाळगतो तो कोणी दूरस्थ आणि अप्राप्य नाही. ‘तो’ त्याच्या स्वनिर्मित सृष्टीच्या अंतस्थ गाभ्यात विद्यमान आहे आणि आपल्याकडून ज्या कृतीची त्याला अपेक्षा असते ती कृती म्हणजे ‘त्या’चा शोध. तसेच आपल्या व्यक्तिगत रूपांतरणाच्या साहाय्याने ‘त्या’ला जाणण्यास, ‘त्या’च्याशी एकत्व पावण्यास, आणि अखेरीस जाणीवपूर्वक ‘त्या’ला अभिव्यक्त करण्यास आपण समर्थ बनणे ही होय. याच गोष्टीसाठी आपण स्वतःला समर्पित केले पाहिजे, हेच आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन आहे. आणि या श्रेष्ठ साक्षात्काराच्या दिशेने पडणारे आपले पहिले पाऊल म्हणजे अतिमानसिक ‘चैतन्या’चे आविष्करण.

– श्रीमाताजी [CWM 13 : 347]

आपल्या अंतरंगातील ‘देवता’ कधीही सक्ती करत नाही. कोणतीही मागणी करत नाही किंवा भयदेखील दाखवीत नाही; ती स्वत:चेच आत्मदान करते, प्राणिमात्र आणि वस्तुजात यांच्या हृदयांमध्ये ती स्वत:ला झाकून घेते आणि ती त्यांच्यामध्ये स्वत:ला विसरून जाते. ती कोणाला दोष देत नाही, की गुणदोषांचे मापन करत बसत नाही. कोणास शाप देत नाही की कोणाची निंदाही करत नाही. तर ती देवता, निर्बंधरहित पूर्णत्व आणण्याचे, कानउघडणी न करता सुधारणा घडवून आणण्याचे, उतावीळपणा न करता प्रोत्साहित करत राहण्याचे कार्य अथकपणे करत राहते. व्यक्तीच्या ग्रहणशीलतेनुसार प्रत्येक व्यक्तीला वैभवसंपन्न करण्यासाठी ती अथकपणे झटत राहते. ती माऊली आहे. तिच्या प्रेमरूपी फळांकरवी ती भरणपोषण करते; सांभाळ करते आणि रक्षण करते; सल्ला देते व सांत्वन करते; कारण ती सर्वकाही जाणते, ती सर्वकाही सहन करू शकते, ती सर्वांच्या चुका पदरात घेते व क्षमा करते; सर्वांविषयी आशा बाळगते आणि सर्वांना सर्व गोष्टींसाठी सुसज्ज करते.

– श्रीमाताजी [CWM 02 : 42-43]

व्यक्तीमधील ‘आत्मा’ आणि वैश्विक ‘आत्मा’ हे एकच आहेत; प्रत्येक विश्वामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक वस्तुमध्ये, प्रत्येक कणामध्ये दिव्य अस्तित्व आहे आणि त्याचे आविष्करण करणे हे माणसाचे जीवितकार्य आहे. ते कार्य करण्यासाठी व्यक्तीला आधी त्याच्या अंतरंगात असणाऱ्या या ‘ईश्वरी अस्तित्वा’ची जाणीव झाली पाहिजे. …एकदा का ही सखोल चेतना प्राप्त करून घेतली की मग मात्र आपली भूमिकाच बदलून जाते. त्यामुळे आपले आकलन व्यापक होते, आपल्यामध्ये करूणेचा उदय होतो.

– श्रीमाताजी [CWM 02 : 41-42]

स्वत:ला समजून घेतल्याने आणि स्वत:ला कसे जाणून घ्यायचे हे शिकल्यामुळे माणूस परमशोध लावू शकतो. जेव्हा भौतिकाच्या प्रत्येक कणाकणामध्ये माणसाला ‘ईश्वरा’च्या या अधिवासाची जाणीव होईल, प्रत्येक प्राणिमात्रामध्ये त्याला ‘ईश्वरा’च्या अस्तित्वाची काही झलक मिळू शकेल, जेव्हा प्रत्येक माणूस त्याच्या बांधवांमध्ये ‘ईश्वरा’ला पाहू शकेल तेव्हा अरुणोदय होईल, तेव्हा या समग्र प्रकृतीला भारभूत झालेले अज्ञान, मिथ्यत्व, दोष, दुःखभोग, अंधकार भेदले जातील. कारण “समग्र प्रकृती सहन करत आहे आणि शोक करत आहे, ती ‘ईश्वरपुत्रांना’ (मनुष्याला) साक्षात्कार कधी होणार याची वाट पाहत थांबली आहे.” हा एक असा मध्यवर्ती विचार आहे की जो इतर सर्व विचारांचे प्रतिनिधित्व करतो; सूर्य ज्याप्रमाणे सर्व जीवन उजळवून टाकतो तसा हा विचार कायम आपल्या स्मरणात असला पाहिजे. एखाद्या दुर्मिळ रत्नाप्रमाणे, खूप मौल्यवान खजिना असल्याप्रमाणे आपण आपल्या हृदयात या विचाराची जपणूक करून, त्यानुसार मार्गक्रमण केले आणि त्या मध्यवर्ती विचाराला त्याचे ज्योतिर्मय करण्याचे व रूपांतरण करण्याचे कार्य आपल्यामध्ये करू देण्याची मुभा दिली तर आपल्याला हे कळू शकेल की, सर्व वस्तुमात्रांच्या आणि प्राणिमात्रांच्या अंतर्यामी ‘तो’च राहतो आणि ‘त्या’च्या मध्येच या विश्वाचे अद्भुत एकत्व आपण अनुभवू शकतो. तेव्हा मग आपल्याला आपली मूर्ख भांडणे, आपल्या छोट्याछोट्या इच्छावासना, आपले अंध रोष, किरकोळ समाधानांमधील बालीशपणा आणि फोलपणा लक्षात येईल. आपल्यातील छोटेछोटे दोष विरघळून जात आहेत, आपल्या संकुचित व्यक्तिमत्त्वाची तटबंदी आणि आपला आडमुठा अहंकार कोसळून पडत आहे असे आपल्याला दिसेल. आपल्या संकुचित मर्यादा आणि बंध यांनी बांधलेल्या अस्तित्वापासून आपली सुटका करत, खऱ्याखुऱ्या आध्यात्मिकतेच्या या उदात्त प्रवाहामध्ये आपले अस्तित्व प्रवाहित होत आहे असे आपल्याला जाणवेल.

– श्रीमाताजी [CWM 02 : 40-41]

एखादा माणूस जेव्हा ‘दिव्यत्वा’ला गवसणी घालू पाहतो, तेव्हा तो अप्राप्याच्या (inaccessible) दिशेने कलेकलेने उन्नत होत जाण्याची धडपड करू लागतो, त्यावेळी तो हे विसरून जातो की, त्याच्याकडे असलेला सर्व ज्ञानसंचय आणि त्याच्याकडे असणारे अगदी अंतर्ज्ञानदेखील त्या अनंताच्या दिशेने जाण्याच्या वाटेवरील एक पाऊलसुद्धा नसते. तसेच जे प्राप्त करण्याची इच्छा तो बाळगत आहे, जे त्याच्यापासून कित्येक योजने दूर आहे असे त्याला वाटत असते, ते त्याच्या स्वत:च्याच अंतरंगामध्ये असते, हे सुद्धा त्याला माहीत नसते. जोपर्यंत स्वत:मध्ये असलेल्या या ‘आद्या’विषयी (origin) तो जागृत होत नाही तोवर माणसाला विश्वाच्या ‘आद्या’विषयी ज्ञान कसे बरे होईल?

– श्रीमाताजी [CWM 02 : 40]