(ओढवलेल्या परिस्थितीमध्ये जे काही घडत आहे, त्याने नाउमेद न होता, उलट त्या परिस्थितीचा साधनेसाठी कसा लाभ करून घेता येईल, ह्याचा विचार करण्यास येथे श्रीअरविंद सांगत आहेत.)

…असे म्हणता येईल की, वैश्विक शक्तींचा खेळ, विश्वामधील संकल्प हा नेहमीच, कार्याच्या व साधनेच्या थेट दिशेशी सुसंवादी आणि कार्य व साधना सुरळीत घडण्यासाठी अनुकूल कार्य करत असल्याचे दृश्य स्वरूपात दिसत नाही. चढउतार भासतील अशा गोष्टी घडून येतात, किंवा अचानक अशी काही वळणे येतात की ज्यामुळे, जी दिशा पकडलेली आहे त्या मार्गापासून विचलित होणे, किंवा त्यामध्ये खंड पडणे, विरोधी किंवा प्रतिकूल परिस्थिती येणे, असे बरेचदा घडू शकते. किंवा जे तात्पुरते का होईना पण सुस्थिर, प्रस्थापित झालेले होते त्यापासून मूढपणे दूर जाणे या गोष्टी घडू शकतात.

परंतु अशा वेळी एक गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे, समत्व राखले पाहिजे. आणि साधनेमध्ये किंवा जीवनामध्ये जे काही घडते, तिला प्रगतीची संधी, प्रगतीचे साधन बनविले पाहिजे. वैश्विक शक्तींचा संकल्प आणि वैश्विक शक्तींचा हा जो खेळ सुरू असतो, त्या खेळामध्ये अनुकूल आणि प्रतिकूल गोष्टींचे नेहमीच एक मिश्रण आढळून येते; त्यापाठीमागे त्याच्या अतीत असणारी एक अधिक उच्चतर, गुप्त अशी ईश्वरी ‘संकल्पशक्ती’ कार्यरत असते. आणि व्यक्तीने या ईश्वरी ‘संकल्पशक्ती’ची वाट पाहिली पाहिजे आणि तिच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे; पण त्याचबरोबर ती कार्यपद्धती तुम्हाला नेहमी समजलीच पाहिजे, अशी अपेक्षाही तुम्ही बाळगता कामा नये.

मनाला हे किंवा ते व्हायला हवे असे वाटत असते; त्याने पकडलेली दिशा तशीच कायम राहावी असे त्याला वाटत असते; पण मनाला जे हवेहवेसे वाटत असते ते सर्व नेहमीच, व्यापक हेतूने जे योजण्यात आलेले असते तेच असते असे नाही. व्यक्तीने नेहमीच साधनेच्या निश्चित अशा मध्यवर्ती ध्येयाचे अनुसरण केले पाहिजे, आणि त्यापासून कधीही विचलित होता कामा नये. तथापि व्यक्तीने बाह्य परिस्थिती, स्थिती इ. गोष्टी म्हणजे जणू काही अगदी पायाभूत महत्त्वाच्या गोष्टी आहेत असे समजून, त्या पायावर (साधनेची इमारत) उभारता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 564-565)

‘ईश्वर’ सर्वांमध्ये समानतेने आहे; आपण आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये, ज्ञानी व अज्ञानी यांच्यामध्ये, मित्र आणि शत्रू यांच्यामध्ये, मानव आणि पशु यांच्यामध्ये, संत आणि पापी यांच्यामध्ये सारभूत भेद करता कामा नये. आपण कोणाचाही द्वेष करता कामा नये, कोणालाही तुच्छ लेखता कामा नये, कोणाचीही घृणा करता कामा नये; कारण सगळ्यांमध्येच, प्रछन्न स्वरूपात (concealed) असो वा प्रकट स्वरूपात असो, तो एकच ईश्वर त्याच्या आनंदासाठी अभिव्यक्त झाला आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. व्यक्तींमध्ये तो कोणते रूप धारण करू इच्छितो आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये तो कोणते कार्य करू इच्छितो, यासाठी जे सर्वोत्तम असेल त्यानुसार, ईश्वर स्वतःच्या इच्छेने व स्वतःच्या ज्ञानानुसार, एखाद्यामध्ये थोड्या प्रमाणात तर दुसऱ्या एखाद्यामध्ये काहीसा अधिक प्रकट झालेला असतो किंवा एखाद्यामध्ये तो झाकलेला असतो, तर अन्य कोणामध्ये तो अगदी विपरित रूपातही व्यक्त झालेला असतो. सर्व काही म्हणजे आपण स्वतःच आहोत, एकाच आत्म्याने विविध आकार धारण केले आहेत. आपल्यामधील द्वेष आणि नापसंती, तिरस्कार आणि घृणा, अनुरक्ती आणि आसक्ती आणि पसंती या गोष्टी स्वाभाविक असतात, आवश्यक असतात, एका विशिष्ट अवस्थेत अनिवार्यदेखील असतात. ‘प्रकृती’ने आपल्यामध्ये जे निवडलेले असते ते तयार करण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी त्या अस्तित्वात असतात आणि त्या गोष्टी प्रकृतीला साहाय्यकारीदेखील होतात.

परंतु कर्मयोग्याच्या दृष्टीने या गोष्टी अवशेषांसारख्या असतात, एखाद्या अडथळ्यासारख्या असतात, त्याच्या दृष्टीने या गोष्टी म्हणजे अज्ञानाची प्रक्रिया असते आणि जसजसा तो प्रगत होत जातो तसतशा या गोष्टी त्याच्या प्रकृतीमधून गळून पडतात. बाल्यावस्थेतील आत्म्याला त्याच्या वाढीसाठी या गोष्टींची आवश्यकता असते; परंतु दिव्य संस्कृतीमधील प्रौढ आत्म्यामधून या गोष्टी गळून पडतात. ज्या ‘ईश्वरी’ प्रकृतीप्रत आपल्याला उन्नती करावयाची आहे त्या प्रकृतीमध्ये वज्रकठोरता असू शकेल, त्यामध्ये अगदी विध्वंसक कठोरतादेखील असू शकेल पण द्वेष असणार नाही; त्या व्यक्तीमध्ये दिव्य उपरोध असेल पण तिरस्कार असणार नाही; एक शांत, सुस्पष्ट आणि जोरदार नकार असू शकतो पण घृणा किंवा नावड असू शकणार नाही. अगदी आपल्याला ज्याचा विनाश करावयाचा आहे, त्याचा सुद्धा आपण तिरस्कार करता कामा नये किंवा त्या ‘शाश्वत ईश्वरा’ने तात्पुरता धारण केलेला हा गुप्तवेष आहे, हे ओळखण्यामध्ये आपण चूक करता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 223-225)

सर्व वस्तुमात्रांमध्ये तो एकमेव आत्माच आविष्कृत झालेला असल्याने, कोणी कुरुप असो किंवा सुंदर, अपंग असो वा धडधाकट, कोणी थोर असो वा अशिष्ट, कोणी सुखद असो वा असुखद, कोणी चांगला असो वा वाईट, आपण या सर्वांबाबत आत्म्याचे समत्व बाळगले पाहिजे. येथेसुद्धा द्वेष, तिरस्कार किंवा घृणा असणार नाही, तर प्रत्येक वस्तू ही तिच्या खऱ्या वृत्तीनुसार आणि तिच्या नियोजित स्थानी आहे, हे पाहण्याची समत्व दृष्टी असली पाहिजे.

आपण हे जाणले पाहिजे की, सर्व गोष्टी अभिव्यक्त झालेल्या असो किंवा गुप्त, प्रछन्न (disguise) असोत, विकसित असोत किंवा विपर्यस्त, त्या त्यांच्यासाठी योजलेल्या परिस्थितीमध्ये त्यांच्यामध्ये तसे दोष असणेच आवश्यक आहे किंवा त्या त्या परिस्थितीत त्यांच्या त्यांच्या परीने सर्वोत्तमरीतीने अभिव्यक्त करत आहेत. त्यांच्या नजीकच्या स्थितीमध्ये किंवा कार्यामध्ये किंवा त्यांच्या प्रकृतीच्या उत्क्रांतीमध्ये जे शक्य आहे त्या मार्गाने त्या त्यांचे कार्य करत आहेत.

‘ईश्वरा’च्या क्रमवार आविष्करणामध्ये, आजच्या वस्तुसमूहाच्या समग्रतेच्या दृष्टीने आणि अंतिम परिणामाच्या पूर्णत्वाच्या दृष्टीने देखील, ईश्वरविषयक विशिष्ट सत्याची किंवा घटनेची किंवा काही ऊर्जेची किंवा क्षमतेची उपस्थिती आवश्यक असते. तात्कालिक अभिव्यक्तीच्या पाठीमागे असणाऱ्या ‘त्या’ सत्याचा शोध लावण्यासाठी आपण धडपडले पाहिजे. तसे केले असता, त्यांच्या बाह्य देखाव्याला न भुलता, त्याच्या अभिव्यक्तीचे कितीही विरूपीकरण झालेले असो वा त्यामध्ये कितीही अपूर्णता असो, तरीदेखील त्यांच्या मुखवट्यांच्या पलीकडे जात, त्या निष्कलंक, शुद्ध, सुंदर आणि परिपूर्ण अशा ‘ईश्वरा’ची आपण पूजा करू शकू. अर्थात, कुरूपता स्वीकारायची असा त्याचा अर्थ नाही, तर ईश्वरी सौंदर्यच स्वीकारायचे आहे; अपूर्णता पाहून स्वस्थ न बसता, आपण पूर्णतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत; आपले विश्वव्यापक उद्दिष्ट सर्वश्रेष्ठ कल्याण हेच असले पाहिजे, दुर्जनता नव्हे.

खरोखरच, हे सारे बदलायलाच हवे. परंतु हे सारे जे आपल्याला करावयाचे आहे ते आध्यात्मिक समज आणि ज्ञान यांच्या साहाय्याने केले पाहिजे. आपण दिव्य कल्याण, सौंदर्य, परिपूर्णता, आनंद यांच्या मानवी प्रमाणकांच्या पाठीमागे न जाता, त्याचे अनुसरण केले पाहिजे; आपल्यापाशी समत्व नसेल तर अज्ञान अजूनही आपला पिच्छा पुरवीत आहे, याची ती खूण आहे; आपल्यापाशी समत्व नसेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने काहीही समजणार नाही; आपल्यापाशी समत्व नसेल तर मग आपण जी जुनी अपूर्णता नष्ट करू, ती जणु दुसरी एक अपूर्णता निर्माण करण्यासाठीच असेल, कारण आपण दिव्य मूल्यांच्या जागी पर्याय म्हणून, आपल्या मानवी मनाच्या आणि आपल्या वासनात्म्याच्या (desire-soul) पसंतीच्या गोष्टी ठेवण्याचीच शक्यता अधिक आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 223-225)

आपण सर्व घटनांच्या बाबतीत मनाचे आणि आत्म्याचे समत्व राखले पाहिजे; मग त्या घटना दुःखद असोत वा सुखद, आपला पराभव होवो वा जय, आपल्याला मानसन्मान मिळो वा आपला अवमान होवो, आपली सत्कीर्ती होवो किंवा अपकीर्ती, आपल्याला सद्भाग्य लाभो वा दुर्भाग्य. कारण या सर्व घटनांमध्ये, सर्व कर्मांच्या आणि कर्मफलांच्या ‘स्वामी’ची म्हणजे ईश्वराची इच्छा कार्यरत आहे, तसेच प्रत्येक घटना ही त्या ईश्वराच्या विकसनशील आविष्कारातील एक पाऊल आहे, हे आपल्याला पाहता आले पाहिजे.

सर्व शक्तींमध्ये, त्यांच्या लीलेमध्ये, त्यांच्या परिणामांमध्येही तसेच सर्व वस्तुमात्रांमध्ये आणि प्राणिमात्रांमध्येही त्या ईश्वराचे दर्शन घेण्याची अंतर्दृष्टी ज्यांच्याकडे आहे, त्यांच्यासमोर तो ईश्वर स्वतःला आविष्कृत करतो. प्रत्येक अनुभव, दुःखभोग, आदी सर्व गोष्टी एका दिव्य घटनेकडे वाटचाल करत असतात; आणि आनंद व समाधान यांपेक्षा त्यांना काहीही उणे नको असते; वैश्विक वाटचाल चालू राहाण्यामधील हा एक आवश्यक दुवा आहे; ही वाटचाल समजावून घेणे आणि त्याला साहाय्य करणे, हे आपले काम आहे.

त्यांच्या विरोधात बंड करणे, त्यांचा धिक्कार करणे, त्यांच्या विरोधात ओरडणे या सर्व गोष्टी म्हणजे आपल्या अप्रशिक्षित आणि अज्ञानी प्रेरणांचे आवेग असतात. अगदी इतर सर्व गोष्टींप्रमाणेच या बंडाचेही ईश्वरी लीलेमध्ये काही उपयोग असतात आणि एवढेच काय पण अशी बंडे आवश्यकही असतात, साहाय्यभूतही ठरतात, दिव्य विकासाला त्या त्या योग्य वेळी व योग्य दशेमध्ये त्यांची आवश्यकताही असते आणि तशीच त्यांची योजनाही केलेली असते; परंतु अज्ञानी बंडखोरीचे आंदोलन हे आत्म्याच्या बाल्यावस्थेशी किंवा त्याच्या अर्ध्या-कच्च्या पौगंडावस्थेशी निगडित असते.

प्रौढ आत्मा मात्र त्यांचा धिक्कार करत नाही, तर त्या गोष्टी जाणून घेण्याचा आणि त्यांच्यावर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न करतो; तो आरडाओरडा करत नाही, तर त्या गोष्टी स्वीकारतो किंवा त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी, त्या परिपूर्ण करण्यासाठी अपार परिश्रम करतो; तो आतल्या आत बंड करत राहत नाही तर मिळालेला आदेश पाळण्याचा, त्याची परिपूर्ती करण्याचा आणि त्यात रूपांतरण घडविण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. त्यामुळे आपण आपल्या स्वामीकडून, त्याच्याकडून आलेल्या सर्वच गोष्टी समत्वबुद्धीने ग्रहण केल्या पाहिजेत.

दिव्य विजयाची घटिका जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत यशअपयश या दोन्ही गोष्टी त्या दिव्य विजयाच्या मार्गावरील आवश्यक टप्पे म्हणून सारख्याच शांतपणे स्वीकारले पाहिजेत. ईश्वरी संकेतानुसार जर वेदना, दुःखभोग, अगदी तीव्र दुःख आपल्या वाट्याला आले असेल तर त्यावेळी आणि अत्यानंद आणि सुख अनुभवाला आले तरी त्यानेही हुरळून न जाता, आपले आत्मे, आपली मने, आपली शरीरे तशीच अविचल राहतील; अशा रीतीने उत्तम समतोल राखत, आपण धिमेपणाने आपला मार्ग चालत राहू; जोपर्यंत परमोच्च आणि वैश्विक आनंदामध्ये प्रवेश करण्याची पात्रता आपल्यामध्ये येत नाही आणि त्या अतिशय उन्नत, श्रेष्ठ अवस्थेसाठी आपली तयारी होत नाही तोवर, मार्गावर भेटणाऱ्या सर्व गोष्टींना सारख्याच स्थिरपणाने सामोरे जाऊ.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 225)

तुमच्यातील कोणताही एखादा घटक जोवर या जगाशी निगडीत असतो तोवरच हे जग तुम्हाला त्रास देईल. मात्र तुम्ही जर सर्वथा ‘ईश्वरा’चे होऊन राहिलात तरच तुमची त्या त्रासापासून मुक्तता होऊ शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 76)

माणसांना स्वतःच्या क्षुद्र अशा वैयक्तिक अहंकारावर मात करण्यास भाग पाडावे आणि त्याकरता साहाय्य व प्रकाश मिळविण्यासाठी, माणसं पूर्णतः केवळ ईश्वराकडेच वळावीत म्हणून पृथ्वीवर ‘कठीण समय’ येतो. माणसांची दृष्टी ही अज्ञानी असते; केवळ ईश्वरच सर्वकाही जाणतो.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 425)

आसक्ती नाही, इच्छा नाहीत, आवेग नाहीत, पसंती-नापसंती नाही; संपूर्ण समता, अविचल शांती आणि ‘ईश्वरी’ संरक्षणाविषयी परिपूर्ण श्रद्धा : हे सारे असेल तर तुम्ही सुरक्षित असता; नसेल तर तुम्ही भयग्रस्त असता. आणि जोपर्यंत तुम्ही सुरक्षित नसता, तोपर्यंत कोंबडीची पिल्ले ज्याप्रमाणे आपल्या आईच्या पंखाखाली आसरा घेतात, तसे करणे अधिक चांगले !

– श्रीमाताजी (CWM 03 : 48)

आपण संपूर्णतया आणि प्रामाणिकपणे आपले सर्वस्व ‘ईश्वरा’ला समर्पित करू या आणि त्याच्या संरक्षणाचा आनंद घेऊ या.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 47)

बाह्य गोष्टी जेव्हा गोंधळाच्या होतात तेव्हा, त्यांच्या रूपांवरून त्यांच्याविषयीचे मत बनवायचे नाही, असा एक दंडक तुम्ही तुमच्या मनावर त्वरित घालून घेतला पाहिजे. सर्व काही सुस्पष्ट होईल या विश्वासाने, अंतरंगातील श्रीमाताजींच्या प्रकाशाकडे त्या साऱ्या गोष्टी सोपविल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 418)

शिक्षेच्या भीतीने नव्हे तर, आपण खोडसाळ आहोत हे समजल्यामुळे खजील होऊन, लहान मुलाचा खोडसाळपणा बंद झाला पाहिजे. त्यामुळे त्याची खरी प्रगती होते. भीतीमुळे जर त्याचा खोडसाळपणा बंद होणार असेल तर, त्यामुळे मानवी चेतनेमधून ते मूल एक पायरी खाली घसरते कारण भीती ही चेतनेची अधोगती आहे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 362)