ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

ईश्वरी आदेशानुसार श्री. अरविंद घोष चंद्रनगर येथे पोहोचले होते. एक-दीड महिन्याच्या वास्तव्यानंतर, तशाच आणखी एका ‘आदेशा’नुसार, त्यांनी चंद्रनगर सोडले आणि S.S. Dupleix नावाच्या जहाजाने दि. ०१ एप्रिल रोजी ते द्वितीय श्रेणीमधून प्रवासास निघाले. ब्रिटिशांना त्यांच्या प्रयाणाचा सुगावा लागू नये, म्हणून त्यांचे वेगळ्याच नावाने तिकीट काढण्यात आले होते. प्रवासासाठी खासगी कक्षाची तिकिटे काढण्यात आली. गंतव्य ठिकाणही पाँडिचेरी न सांगता कोलोम्बो सांगितले, ते दिशाभूल करण्याच्या हेतूनेच! अशा रीतीने दि. ४ एप्रिल १९१० रोजी श्री. अरविंद घोष पाँडिचेरीला येऊन पोहोचले. या आदेशांविषयी खुलासा करताना ते एके ठिकाणी म्हणतात – ”….मी केवळ माझ्या आंतरिक मार्गदर्शकाचेच आदेश मानत आलो आणि ईश्वराच्या मार्गदर्शनानेच वाटचाल करत आलो. कारावासात असताना माझी जी आध्यात्मिक प्रगती झाली होती त्यानंतर तर तो माझ्या अस्तित्वाचा एक निरपवाद नियमच बनून गेला. मला जो आदेश प्राप्त झाला त्यानुसार आज्ञापालन करून, त्वरित कृती करणे मला आवश्यकच होते.”

पाँडिचेरीला आल्यानंतरही, ‘कर्मयोगिन्’मधील To my countrymen या त्यांच्या लेखाबद्दल त्यांना अटक करण्याचे वॉरंट निघाले पण ते लिखाण राष्ट्रद्रोही नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आणि वॉरंट मागे घेण्यात आले. ब्रिटिशव्याप्त इंडियाच्या हद्दीतून त्यांच्या निघून जाण्याने बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते. आणि म्हणून, आपण कोठे आहोत, कोणत्या कारणासाठी पाँडिचेरीला आलो आहोत आणि आता राजकारणाशी आपला संबंध कसा नाही याचे कथन करणारे जाहीर निवेदन त्यांनी सुप्रसिद्ध ‘द हिंदू’ (मद्रास) या वृत्तपत्रातून दि. ०८ नोव्हेंबर १९१० रोजी प्रकाशित केले.

पुढे अनेक वर्षानंतर अरविंद घोष यांनी आपल्या पाँडिचेरीला येण्याचे कारण स्वत: एका पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. त्यात ते लिहितात – “एका निश्चित उद्दिष्टासाठी मला मोकळीक आणि स्थिरचित्तता हवी होती म्हणून मी पाँडिचेरीला आलो, त्या उद्दिष्टाचा वर्तमान राजकारणाशी काही संबंध नाही – माझ्या येथे येण्यानंतर मी राजकारणामध्ये थेट सहभागी झालेलो नाही, आणि असे असूनसुद्धा मला माझ्या पद्धतीने या देशासाठी जे करता येणे शक्य होते ते मी कायमच करत आलो आहे – माझे ते उद्दिष्ट (योगसाधना) पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत कोणत्याही सार्वजनिक कृतिकार्यक्रमात पुन्हा सहभागी होणे मला शक्य होणार नाही. पाँडिचेरी ही माझ्या तपस्येची गुहा आहे; हे माझ्या आश्रमाचे स्थान आहे, हा आश्रम संन्यासमार्गी प्रकारचा नाही तर, माझ्या स्वतःच्या शोधामुळे त्याचा स्वतःचाच असा एक वेगळा ठसा निर्माण झाला आहे. मी (पाँडिचेरी सोडून) परत निघण्यापूर्वी मला माझे ते कार्य पूर्ण केलेच पाहिजे, आणि त्या दृष्टीने मी स्वत:ला आंतरिकरित्या सक्षम आणि सुसज्ज केलेच पाहिजे.” (क्रमश:)

अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

5 hours ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago