साधनेची मुळाक्षरे – ०७

शुद्ध आत्मा (The pure self) हा अजन्मा असतो, तो जन्म वा मृत्युमधून प्रवास करीत नाही, तो जनननिरपेक्ष असतो किंवा तो देह, प्राण वा मन यांपासून वा या आविष्कृत झालेल्या प्रकृतीपासूनदेखील स्वतंत्र असतो. त्या सर्व गोष्टींचा तो अंगीकार करीत असला आणि त्यांना आधार देत असला तरीसुद्धा तो त्या गोष्टींनी बांधला गेलेला नसतो, सीमित झालेला नसतो, प्रभावित झालेला नसतो. याउलट, चैत्य पुरुष (Psychic being) मात्र, जन्माबरोबर खाली अवतरतो आणि मृत्युद्वारे निघून जातो – (तो स्वत: मृत्यू पावत नाही कारण तो अमर्त्य असतो.) तो एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत, भूलोकावरून इतर लोकांमध्ये आणि परत पुन्हा या पृथ्वीवरील जीवनात प्रवास करत असतो. जन्मजन्मांतरी उत्क्रांतीच्या माध्यमातून त्याची मनुष्यदशेकडे वाटचाल होत राहते… हा चैत्य पुरुष उत्क्रांतीला आधार देतो आणि विश्वानुभव घेण्यासाठीची साधने म्हणून शारीरिक, प्राणिक व मानसिक अशी मानवी चेतना विकसित करतो. ही साधने प्रच्छन्न (disguised), अपूर्ण पण चढतीवाढती आत्मअभिव्यक्ती करणारी असतात. हे सारे तो पडद्यामागे राहून करत असतो, आणि साधनभूत अस्तित्वाच्या अपूर्णतेमुळे जितपत शक्य आहे तेवढेच स्वत:मधील दिव्यत्व दाखवून देतो. पण एक वेळ अशी येते, जेव्हा तो चैत्य पुरुष या पडद्यामागून बाहेर येण्यास, साधनभूत प्रकृतीचा ताबा घेऊन तिला दिव्य पूर्णत्वाकडे वळविण्यासाठी सिद्ध होतो; खऱ्या अध्यात्मजीवनाची ही सुरुवात असते. असा चैत्य पुरुष मग आता मानसिक मानवी पातळीवरून आविष्कृत तयार होतो; तो आता मानसिक चेतनेकडून आध्यात्मिक चेतनेकडे आणि आध्यात्मिकतेच्या विविध पातळ्यांमधून हळूहळू अतिमानसिक अवस्थेकडे वाटचाल करू लागतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 536-537)

साधनेची मुळाक्षरे – ०६

सारे काही शांतपणे अंतरंगातूनच केले पाहिजे – कर्म करणे, बोलणे, वाचणे, लिहिणे या साऱ्या गोष्टी वास्तव (real) चेतनेचा एक भाग म्हणूनच केल्या पाहिजेत – सामान्य चेतनेच्या विखुरलेल्या आणि अशांत हालचालींनिशी त्या करता कामा नयेत.

*

‘ईश्वरा’च्या संपर्कात असणाऱ्या तुमच्या आंतरिक अस्तित्वातून, अंतरंगातूनच कृती करायला तुम्ही नेहमी शिकले पाहिजे. बाह्य अस्तित्व हे केवळ एक साधन असले पाहिजे आणि त्याला तुमच्या वाणीवर, विचारावर वा कृतीवर हुकमत गाजविण्यास किंवा सक्ती करण्यास तुम्ही अजिबात मुभा देता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 254)

साधनेची मुळाक्षरे – ०५

मन स्थिर करण्यासाठी व आध्यात्मिक अनुभूती मिळविण्यासाठी, प्रकृतीचे शुद्धिकरण होणे आणि तिची तयारी होणे आवश्यक असते. यासाठी कधीकधी अनेक वर्षेसुद्धा लागतात. योग्य वृत्तीने केलेले कर्म हा यासाठी सर्वांत सोपा मार्ग आहे – म्हणजेच इच्छा किंवा अहंकारविरहित असलेले कर्म; इच्छा, मागणी किंवा अहंकाराची कोणतीही स्पंदने निर्माण झाली की त्याला लगेच नकार देत केलेले कर्म; ‘दिव्य माते’ प्रत अर्पण म्हणून केलेले कर्म; ‘दिव्य माते’चे स्मरण करत आणि तिच्या शक्तीने आविष्कृत व्हावे आणि कार्य हाती घ्यावे म्हणून केलेली तिची प्रार्थना, की ज्यामुळे केवळ आंतरिक शांततेतच तुम्हाला तिची (दिव्य मातेची) उपस्थिती आणि तिचे कार्यकारकत्व जाणवू शकेल असे नव्हे तर, कर्मामध्येदेखील ते तुम्हाला जाणवू शकेल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 226)

साधनेची मुळाक्षरे – ०४

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्हाला तुमच्या कर्मव्यवहारामध्ये सदा सर्वकाळ जरी अजून ‘ईश्वरा’चे स्मरण ठेवता आले नाही, तरी फार काळजी करू नका, त्याने फारसा फरक पडत नाही. कोणतेही कर्म करताना सुरूवातीस ‘ईश्वरा’चे स्मरण करणे व ते कर्म त्याला अर्पण करणे आणि कर्म संपल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करणे हे सद्यस्थितीत पुरेसे आहे. किंवा जर कामाच्या मध्ये थोडा वेळ मिळाला तर तेव्हाही त्याचे स्मरण ठेवणे पुरेसे आहे. तुमची पद्धत मात्र मला काहीशी वेदनादायी आणि अवघड असल्याचे दिसते, – कारण तुम्ही मनाच्या ज्या भागाने कर्म करता, त्याच भागाने, त्याचवेळी स्मरण ठेवण्याचा प्रयत्न करता असे दिसते. तसे करणे शक्य आहे किंवा नाही, याची मला कल्पना नाही. जेव्हा लोक कर्म करताना सदोदित स्मरण राखतात (असे करता येणे शक्य असते) तेव्हा, सहसा ते त्यांच्या मनाच्या पार्श्वभागी असते किंवा त्यांच्यामध्ये हळूहळू दुहेरी विचारांची किंवा दुहेरी चेतनेची एक क्षमता निर्माण झालेली असते – एक चेतना पृष्ठभागी कार्यरत असते आणि दुसरी चेतना ही साक्षी असते आणि स्मरण राखत असते.

आणखीही एक मार्ग असतो, दीर्घकाळपर्यंत तो माझा मार्ग होता – अशी एक अवस्था असते की, ज्यामध्ये कर्म हे वैयक्तिक विचार किंवा मानसिक कृतीच्या हस्तक्षेपाविना, आपोआपपणे घडत राहते आणि त्याचवेळी चेतना ही ‘ईश्वरा’मध्ये शांतपणे स्थित असते. खरेतर, ही गोष्ट जेवढी साध्या सातत्यपूर्ण अभीप्सेने आणि आत्मनिवेदनाच्या संकल्पाने घडून येते किंवा साधनभूत अस्तित्वापासून आंतरिक अस्तित्वाला अलग करणाऱ्या चेतनेच्या प्रक्रियेमुळे घडून येते, तेवढी ती अनेकदा प्रयत्न करूनदेखील घडून येत नाही. अभीप्सा आणि कर्म करण्यासाठी महत्तर शक्तीला आवाहन करत, आत्मनिवेदनाचा संकल्प करणे ही एक अशी पद्धती आहे की ज्यामुळे महान परिणाम घडून येतात. काही जणांना या गोष्टीसाठी जरी बराच वेळ लागत असला तरीदेखील होणारे परिणाम महान असतात. सर्व गोष्टी मनाच्या प्रयासांनीच करण्यापेक्षा, पाठीशी असणाऱ्या किंवा ऊर्ध्वस्थित असणाऱ्या शक्तीद्वारे कर्म कशी घडवून घ्यायची हे जाणणे, हे साधनेचे महान रहस्य आहे.

मानसिक प्रयत्न हे अनावश्यक आहेत किंवा त्याचे काहीच परिणाम दिसत नाहीत, असे मला म्हणायचे नाही – एवढेच की साऱ्या गोष्टी एखाद्याने स्वतःहून करण्याचा प्रयत्न केला तर अध्यात्मात पारंगत असणाऱ्या व्यक्तींखेरीज (spiritual athletes) इतरांसाठी मात्र त्या गोष्टी कष्टदायक प्रयत्न ठरतात. अन्य पद्धत ही जवळच्या मार्गाचा हव्यास बाळगणारी आहे, असेही मला म्हणायचे नाही. एवढेच की, मी म्हणालो त्याप्रमाणे, त्या पद्धतीचे परिणाम दिसण्यास अधिक वेळ लागतो. धीर आणि दृढ निश्चय या गोष्टी साधनेच्या प्रत्येक पद्धतीमध्ये आवश्यक असतात. बालावानांसाठी सामर्थ्य असणे ठीक आहे पण – अभीप्सा आणि तिला ईश्वरी ‘कृपे’कडून मिळणारा प्रतिसाद या गोष्टी म्हणजे काही सर्वस्वी आख्यायिका आहेत, असे नाही; या गोष्टी म्हणजे आध्यात्मिक जीवनाची महान तथ्यं आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 214-215)

साधनेची मुळाक्षरे – ०३

दोन गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत : हृदय-चक्राने (heart centre) त्याच्या मागे असलेल्या आणि मनाच्या चक्रांनी (mind centres) त्यांच्यापेक्षा वर असणाऱ्या सर्वांप्रत खुले होणे, उन्मुख होणे. हृदय हे चैत्य-पुरुषाप्रत खुले होते आणि मनाची चक्रं ही उच्चतर चेतनेप्रत खुली होतात आणि चैत्य पुरुष व उच्चतर चेतना यांच्यामधील परस्परसंबंध हेच तर ‘सिद्धी’चे मुख्य साधन असते. ईश्वराने आपल्यामध्ये आविष्कृत व्हावे म्हणून तसेच, त्याने चैत्यपुरुषाद्वारे आपल्या सर्व प्रकृतीचा ताबा घेऊन, तिचे नेतृत्व करावे म्हणून त्यास हृदयामध्ये एकाग्रतापूर्वक आवाहन केल्याने पहिलीवहिली उन्मुखता (opening) घडून येते. ‘साधने’च्या या भागाचा मुख्य आधार म्हणजे ‘अभीप्सा’, प्रार्थना, भक्ती, प्रेम व समर्पण ह्या गोष्टी असतात. आणि आपण ज्याची अभीप्सा बाळगत असतो त्याच्या वाटेत अडसर बनू पाहणाऱ्या सर्व गोष्टींना नकार देणे ही बाब देखील यामध्ये समाविष्ट असते. सुरुवातीला मस्तकामध्ये आणि नंतर मस्तकाच्या वर, जाणिवेचे एककेंद्रीकरण केल्याने दुसरी उन्मुखता घडून येते. ईश्वरी शांती, (आधी केवळ ‘शांती’, किंवा ‘शांती व सामर्थ्य’ एकत्रितपणे) ‘सामर्थ्य’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’, ‘आनंद’ यांचे अस्तित्वामध्ये अवतरण घडून यावे म्हणून आवाहन केल्याने, आणि आस व सातत्यपूर्ण इच्छा बाळगल्याने ही दुसरी उन्मुखता घडून येते.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 204-205)

साधनेची मुळाक्षरे – ०२

मनुष्य हा बहुतांशी त्याच्या पृष्ठवर्ती (surface) मनाच्या, प्राणाच्या आणि शरीराच्या पातळीवर जीवन जगत असतो पण त्याच्या अंतरंगामध्ये महत्तर शक्यता सामावलेला एक आंतरिक पुरुष असतो, त्या पुरुषाविषयी मनुष्याने जागे झाले पाहिजे; कारण आज त्याला या पुरुषाकडून अगदी मर्यादित, थोडासाच प्रभाव प्राप्त होत असतो आणि तो प्रभावच त्याला महान सौंदर्य, सुसंवाद, शक्ती आणि ज्ञान यांच्या नित्य शोधासाठी प्रवृत्त करत असतो. त्यामुळे, या आंतरिक पुरुषाच्या श्रेणींप्रत खुले होणे आणि तेथून बाह्य जीवन जगणे, तसेच या आंतरिक प्रकाशाने आणि शक्तीने बाह्यवर्ती जीवनाचे शासन करणे, ही योगाची पहिली प्रक्रिया असते. हे करत असताना त्याला स्वतःमध्येच त्याच्या खऱ्या आत्म्याचा शोध लागतो; तो आत्मा म्हणजे त्याच्या मन, प्राण आणि शारीरिक घटकांचे बाह्यवर्ती मिश्रण नसते तर, त्या सर्वांच्या पाठीशी असणारी ती सद्वस्तू (Reality) असते, ‘दिव्य अग्नी’ची ती ठिणगी असते. मनुष्याने स्वतःच्या आत्म्यामध्ये जगण्यास, शुद्धिकरण करण्यास तसेच उर्वरित प्रकृती ‘सत्या’भिमुख करण्यास शिकले पाहिजे. त्यानंतर, त्यापाठोपाठ ऊर्ध्वमुखी खुलेपण (opening) येईल आणि अस्तित्वामध्ये उच्चतर तत्त्वाचे अवतरण घडून येईल.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 548)

(पौर्वात्य देशांचा पाश्चिमात्य आणि पाश्चिमात्य देशांचा पौर्वात्य देशांवर प्रभाव पडत आहे, आणि या साऱ्या घडामोडींच्या माध्यमातून नवीनच काही आकाराला येऊ घातले आहे, ‘प्रकृती’ हे सारे काही घडवून आणत आहे, या विषयी श्रीमाताजी पुढे सांगतात -)

‘प्रकृती’चे मार्ग संथ, अंधकारमय आणि जटिल असतात. आत्म्याच्या माध्यमातून जी गोष्ट अगदी त्वरेने, सुकरतेने आणि काहीही व्यर्थ जाऊ न देता झाली असती, तीच गोष्ट करण्यास ‘प्रकृती’ला मात्र खूप दीर्घ कालावधी लागतो. सध्या या जगामध्ये प्रचंड अपव्यय होताना दिसतो. परंतु या गोष्टी अशाच घडत आहेत. लोकांना परस्परांमध्ये मिसळविण्याचे ‘प्रकृती’चे तिचे तिचे स्वतःचे असे काही मार्ग आहेत.

साधक : हे सारे हेतुपूर्वक केले जात आहे का?

श्रीमाताजी : माणसं ज्याला ‘हेतुपूर्वक’ असे समजतात, तशा तऱ्हेने नाही. परंतु त्या पाठीमागे निश्चितपणे काही ‘प्रयोजन’ आहे, एक ‘उद्दिष्ट’ आहे की ज्या दिशेने ही वाटचाल चालू आहे. इतकेच, की सारे काही चेतनेच्या प्रमाणावर अवलंबून असते. एखाद्या माणसाला हे सारे काही गोंधळाचे वाटू शकते, कारण तो फक्त तपशीलाचा भाग पाहू शकतो, आणि मग त्याला तो काळाचा प्रचंड अपव्यय आहे असे वाटते, कारण त्याची काळाची संकल्पना ही त्याच्या स्वतःच्या व्यक्ती म्हणून असलेल्या कालावधीइतकीच मर्यादित असते.

परंतु ‘प्रकृती’ समोर मात्र शाश्वतता पसरलेली असते. आणि तिच्या दृष्टीने हे वाया घालविणे नसते, कारण ती म्हणजे जणू काही अशा एखाद्या व्यक्तीसारखी आहे की, जिच्यापाशी एक भली मोठी कढई आहे, त्यामध्ये ती साऱ्या गोष्टी ओतत असते, त्याचे मिश्रण बनवीत असते आणि जर ते मिश्रण यशस्वी झाले नाही तर ती ते सारे मिश्रण बाहेर काढून टाकते कारण तिला हे माहीत असते की, त्याच गोष्टींचा वापर करून ती पुन्हा एक नवीन मिश्रण तयार करणार आहे. असे असते हे सारे. येथे काहीही व्यर्थ जात नाही, कारण ते पुन्हा केव्हातरी उपयोगात येणार असते. आकार नष्ट होतात आणि त्यातील द्रव्य पुन्हा हाती घेतले जाते आणि हे सारे असेच सातत्याने चालू राहते. काही घडविले जाते, काही बिघडविले जाते, होत्याचे नव्हते केले जाते – ‘प्रकृती’ला वाटले तर ती हे सारे शेकडो, हजारो वेळा करू शकते, त्याचे तिला काहीच वाटत नाही. कारण यामध्ये काहीच वाया जात नाही, कारण ते सारे तिचेच कार्य असते. कार्य हेच तिचे सुख असते, कार्याशिवाय ती अस्तित्वातच राहू शकली नसती.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 342-343)