साधनेची मुळाक्षरे – २०

शारीरिक किंवा भौतिक स्तरावर ‘ईश्वर’ स्वतःला सौंदर्याद्वारे अभिव्यक्त करतो; मानसिक स्तरावर ज्ञानाद्वारे, प्राणिक स्तरावर शक्तिद्वारे, आणि आंतरात्मिक स्तरावर प्रेमाद्वारे तो स्वतःला अभिव्यक्त करतो.

आपण जेव्हा पुरेसे उन्नत होतो तेव्हा हे चारही पैलू एकाच चेतनेमध्ये, प्रेम, तेजस्विता, शक्तिमानता, सौंदर्य या साऱ्यांनी परिपूर्ण, सर्वांना सामावून घेत, सर्वांमध्ये व्याप्त अशा रीतीने, परस्परांशी संयुक्त होतात, असा शोध आपल्याला लागतो.

वैश्विक लीलेला समाधानी करण्यासाठीच ही चेतना स्वतःला आविष्करणाच्या विविध स्तरांवर वा पैलूंमध्ये विभाजित करते.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 06)

साधनेची मुळाक्षरे – १९

कुटुंब, समाज, देश हे अधिक विस्तारित अहंकार आहेत – ते म्हणजे ‘ईश्वर’ नव्हेत. व्यक्ती जर ‘ईश्वरी आदेशा’बाबत जागरूक असेल आणि त्यानुसार कार्य करत असेल किंवा स्वतःमध्ये ‘ईश्वरी शक्ती’च कार्यरत आहे अशी जर व्यक्तीला जाणीव असेल तर, कुटुंब, समाज, देश यांच्यासाठी कार्य करत असूनही, मी ‘ईश्वरा’ साठी कार्य करत आहे, असे ती व्यक्ती म्हणू शकते; अन्यथा, देश वगैरे म्हणजे जणू देवच, ही मनाची कल्पना असते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 438)

साधनेची मुळाक्षरे – १८

कोणत्याही वैयक्तिक प्रेरणांशिवाय, प्रसिद्धी किंवा लोकमान्यता किंवा लौकिक मोठेपणा यांच्या इच्छेविना जे कर्म केले जाते; ज्यामध्ये स्वतःच्या मानसिक प्रेरणा किंवा प्राणिक लालसा व मागण्या किंवा शारीरिक पसंती-नापसंती यांचा आग्रह नसतो; जे कर्म कोणत्याही बढाईविना किंवा असंस्कृत स्व-मताग्रहाविना किंवा पद वा प्रतिष्ठेसाठी कोणताही दावा न करता केले जाते; जे केवळ आणि केवळ ‘ईश्वरा’ साठीच आणि ‘ईश्वरी आदेशा’ने केले जाते, केवळ असेच कर्म आध्यात्मिकदृष्ट्या शुद्धिकरण करणारे असते. सर्व कर्मं जी अहंभावात्मक वृत्तीने केली जातात ती, या अज्ञानमय जगातील लोकांच्या दृष्टीने भलेही चांगली असू देत, पण ‘योगसाधना’ करणाऱ्या साधकाच्या दृष्टीने त्यांचा काहीच उपयोग नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 232)

साधनेची मुळाक्षरे – १७

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

तुम्ही ज्या सर्व अडचणींचे वर्णन करत आहात त्या गोष्टी बहुतेक सर्वच माणसांच्या बाबतीत अगदी स्वाभाविकपणे येत असतात. एखादी व्यक्ती शांतपणे ध्यानाला बसलेली असते तेव्हा तिला ईश्वराचे स्मरण राखणे आणि ईश्वरी उपस्थितीची जाणीव ठेवणे तुलनेने सोपे असते; पण व्यक्तीला कामामध्ये व्यग्र राहावे लागत असेल तर तसे करणे तिला अधिक कठीण असते. कर्मामधील चेतना आणि स्मरण हे क्रमाक्रमानेच यायला हवे, ते एकदमच एकावेळी होईल अशी अपेक्षा तुम्ही बाळगता कामा नये, कोणालाच ते तसे एकदम साध्य होत नाही. ते दोन मार्गांनी घडते – पहिला मार्ग म्हणजे, व्यक्तीने ‘श्रीमाताजीं’चे स्मरण राखण्याचा सराव केला तर आणि व्यक्ती जेव्हा काहीतरी करते तेव्हा त्या प्रत्येक वेळी ती कृती ‘श्रीमाताजीं’ना अर्पण करण्याचा व्यक्तीने सराव केला तर (कर्म करत असताना सर्वकाळ नाही, तर कर्मारंभी किंवा व्यक्तीला जेव्हा जेव्हा स्मरण होईल तेव्हा) मग ती गोष्ट हळूहळू सोपी आणि प्रकृतीच्या दृष्टीने सवयीची होऊन जाते. दुसरा मार्ग म्हणजे – ध्यानामुळे आंतरिक चेतना विकसित होऊ लागते, जी चेतना एकाएकी किंवा अचानकपणे नाही तर, कालांतराने, आपोआप अधिकाधिक चिरस्थायी बनत जाते. कार्यकारी असणाऱ्या बाह्यवर्ती चेतनेहून विभिन्न असणाऱ्या या चेतनेची व्यक्तीला जाणीव होऊ लागते. कर्म करत असताना व्यक्तीला सुरुवातीला या विभिन्न चेतनेची जाणीव होत नाही, पण जेव्हा कर्म थांबते तेव्हा लगेचच व्यक्तीला असे जाणवते की, ती चेतना पूर्ण वेळ मागून आपल्याकडे लक्ष ठेवून होती; नंतर मग कर्म चालू असतानादेखील तिची जाणीव होऊ लागते, जणू काही आपल्या अस्तित्वाचे दोन भाग आहेत, अशी व्यक्तीला जाणीव होते. एक अस्तित्व निरीक्षण करत आहे आणि मागे राहून आधार पुरवीत आहे तसेच ‘श्रीमाताजीं’चे स्मरण करत आहे आणि दुसरे अस्तित्व कर्म करत आहे, अशी व्यक्तीला जाणीव होते. असे जेव्हा घडते तेव्हा सत्य-चेतनेनिशी कर्म करणे अधिकाधिक सोपे होते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 259)

साधनेची मुळाक्षरे – १५

प्रश्न : मनामध्ये चालणाऱ्या चर्चा कशा थांबवाव्यात?

श्रीमाताजी : पहिली अट म्हणजे शक्य तितके कमी बोला.

दुसरी अट अशी की, तुम्ही आधी काय केले आहे किंवा काय करायचे आहे याचा विचार न करता, तुम्ही ज्या क्षणाला जे करत आहात केवळ त्याच गोष्टीचा विचार करा. भूतकाळाबद्दल खेद करत बसू नका किंवा भविष्य काय असेल याची कल्पना करत बसू नका.

तुम्ही तुमच्या विचारांमधील निराशावादाला आळा घालण्याचा शक्य होईल तेवढा प्रयत्न करा आणि स्वेच्छापूर्वक आशावादी बना.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 141)

साधनेची मुळाक्षरे – १३

काम करत असताना ‘ईश्वरी उपस्थिती’ चे स्मरण ठेवणे हे सुरुवातीला सोपे नसते; परंतु काम संपल्यासंपल्या लगेचच जरी त्या उपस्थितीची जाणीव व्यक्तीला पुनरुज्जीवित करता आली तरी ठीक आहे. कालांतराने काम करत असतानाच त्या उपस्थितीची जाणीव आपोआपपणे होऊ लागेल.

*

समर्पणाचा नुसता दृष्टिकोन असून चालणार नाही तर, प्रत्येक कर्मच ‘श्रीमाताजीं’ना अर्पण केले पाहिजे म्हणजे मग तो दृष्टिकोन सदासर्वदा जीवित राहील. काम करत असताना त्या वेळामध्ये ध्यान करता कामा नये, कारण त्यामुळे कर्मामधून लक्ष निघून जाईल, परंतु ज्याच्याप्रत तुम्ही ते कर्म अर्पण करणार आहात त्या ‘एकमेवाद्वितीया’चे स्मरण तुमच्यामध्ये कायम असले पाहिजे. ही केवळ एक पहिली प्रक्रिया आहे; कारण, पृष्ठवर्ती मन कर्म करत असताना, ‘ईश्वरी उपस्थिती’च्या संवेदनेवर तुमच्या अंतरंगातील शांत अस्तित्व एकाग्र असल्याची सातत्यपूर्ण जाणीव जर तुम्हाला असू शकेल, किंवा ‘श्रीमाताजीं’ची शक्तीच कार्य करत आहे आणि तुम्ही केवळ एक माध्यम आहात किंवा एक साधन आहात अशी जाणीव जर तुम्हाला नेहमीच होऊ लागली तर मग, ईश-स्मरणाच्या जागी, ‘योगसाक्षात्कार’ स्वतःहूनच नित्य घडू लागेल तसेच कर्म करत असताना ईश्वराशी ऐक्य होण्यास सुरुवात होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 258-259), (CWSA 32 : 247)

साधनेची मुळाक्षरे – ११

श्रीअरविंद आपल्याला हे सांगण्यासाठी आले आहेत की, ‘सत्या’चा शोध घेण्यासाठी ही पृथ्वी सोडून जाण्याची आवश्यकता नाही; आपला आत्मा शोधण्यासाठी व्यक्तीने जीवनाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही; ‘ईश्वरा’शी संबंध प्रस्थापित करण्यासाठी व्यक्तीने हे जग सोडून जाण्याची किंवा तेवढ्यापुरताच मर्यादित विश्वास बाळगण्याची आवश्यकता नाही. ‘ईश्वर’ सर्वत्र आहे, सर्व वस्तुमात्रांमध्ये विद्यमान आहे, आणि तो जर गुप्त असेलच तर… त्याचे कारण आपण ‘त्या’ ला शोधण्याचे कष्टच घेत नाही.

आपण केवळ एका प्रामाणिक अभीप्सेद्वारे, आपल्या आतमध्ये असलेला कुलूपबंद दरवाजा उघडू शकतो… ती अशी एक गोष्ट असेल की जी जीवनाचा संपूर्ण अर्थच बदलून टाकेल; आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर ती असेल; ती गोष्ट आपल्या सर्व समस्या सोडवेल आणि आपल्याही नकळतपणे आपण ज्याची अभीप्सा बाळगतो त्या परिपूर्णत्वाप्रत ती आपल्याला घेऊन जाईल; ती गोष्ट आपल्याला अशा एका ‘सत्यत्वा’प्रत घेऊन जाईल की जे सत्यत्वच केवळ आपले समाधान करू शकते आणि आपल्याला चिरस्थायी असा आनंद, संतुलन, सामर्थ्य आणि जीवन प्रदान करते.

…..याचा आरंभबिंदू कोणता? तर त्यासाठी, आपल्याला ती गोष्ट मिळावी अशी इच्छा निर्माण झाली पाहिजे, ती आपल्याला खरोखर हवी असली पाहिजे, आपल्याला तिची निकड भासली पाहिजे. दुसरी पायरी म्हणजे अन्य कोणत्याही गोष्टीचा नाही तर, केवळ त्याच गोष्टीचा विचार केला पाहिजे. एक दिवस असा येतो, अगदी जलदगतीने येतो, जेव्हा व्यक्ती अन्य कोणताच विचार करू शकत नाही.

ही एकच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग नंतर…

मग व्यक्ती तिच्या अभीप्सेची स्पष्ट शब्दांत मांडणी करते, तिच्या अंतःकरणातून, ज्यामधून त्या निकडीची प्रामाणिकता अभिव्यक्त होईल अशी खरीखुरी प्रार्थना उदयाला येते, आणि मग… मग काय घडून येते ते व्यक्तीला दिसेलच.

काहीतरी घडून येईल. नक्कीच काहीतरी घडेल. प्रत्येक व्यक्तीसाठी ती वेगळेच रूप धारण करेल.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 374-375)

साधनेची मुळाक्षरे – १०

चैत्य रूपांतरणामध्ये तीन मुख्य घटक असतात.

१) निगूढ अशा आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीराच्या खुलेपणामुळे, पृष्ठवर्ती मन, प्राण आणि शरीर यांच्या पाठीमागे असलेल्या साऱ्याची व्यक्तीला जाणीव होते.

२) चैत्य पुरुषाचे किंवा आत्म्याचे खुलेपण, ज्यामुळे ते पुढे येऊन मन, प्राण आणि शरीर यांचे अनुशासन करतात आणि त्या सर्वांना ‘ईश्वरा’कडे वळवितात.

३) समग्र कनिष्ठ अस्तित्वाचे आध्यात्मिक सत्याप्रत खुले होणे – या अंतिम गोष्टीला परिवर्तनाचा आंतर-आध्यात्मिक भाग (the psycho-spiritual part) असे म्हणता येईल.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 332)

साधनेची मुळाक्षरे – ०९

‘चैत्यीकरण’ (Psychisation) म्हणजे कनिष्ठ प्रकृतीचे परिवर्तन, मनामध्ये योग्य दृष्टी आणणे, प्राणामध्ये योग्य आवेग आणि भावना आणणे, शरीरामध्ये योग्य हालचाली व सवयी आणणे. तसेच या साऱ्या गोष्टी एका ‘ईश्वरा’कडेच वळविणे; या साऱ्या गोष्टी प्रेम, भक्ती यांवर आधारित असणे आणि अंतिमतः ‘श्रीमाताजीं’ची जाणीव व दृष्टी सर्वांमध्ये, सर्वत्र तसेच हृदयामध्ये अनुभवास येणे, त्यांचीच शक्ती आपल्या अस्तित्वामध्ये कार्यकारी आहे इ. जाणवणे, तसेच भक्ती, आत्मनिवेदन आणि समर्पण असणे म्हणजे ‘चैत्यीकरण’

शांती, प्रकाश, ज्ञान, शक्ती आणि आनंद यांचे वरून अवतरण होणे, आत्म्याची आणि ‘ईश्वरा’ची जाणीव होणे आणि उच्चतर वैश्विक चेतना आणि तिच्याप्रत समग्र चेतनेचे परिवर्तन होणे म्हणजे ‘आध्यात्मिक परिवर्तन’ (The spiritual change) होय.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 380)

साधनेची मुळाक्षरे – ०८

आपल्यामधील चैत्य घटक (psychic part) हा असा भाग असतो की, जो थेट ‘ईश्वरा’कडून आलेला असतो आणि ‘ईश्वरा’च्या संपर्कामध्ये असतो. मूलत: चैत्य घटक म्हणजे दिव्य शक्यतांनी गर्भित असलेले असे एक केंद्र असते की जे, मन, प्राण व शरीर या कनिष्ठ आविष्कारत्रयीला आधार पुरविते. हे ईश्वरी वा दिव्य तत्त्व सर्व सजीवांमध्ये असते पण ते सामान्य चेतनेच्या मागे लपलेले असते; ते प्रथमत: विकसित झालेले नसते… मन, प्राण व शरीर या साधनांच्या अपूर्णतांकडून जेवढी मुभा मिळेल तेवढ्यामध्येच आणि, त्यांच्या माध्यमातूनच व त्यांच्या मर्यादांमध्ये राहूनच, हे तत्त्व स्वत:ला अभिव्यक्त करते. ‘ईश्वरानुगामी’ अनुभूतींच्या योगे, या तत्त्वाची चेतनेमध्ये वृद्धी होत असते; आपल्यामध्ये जेव्हा उच्चतर अशी क्रिया घडते त्या प्रत्येक वेळी या तत्त्वाला सामर्थ्य प्राप्त होत जाते आणि सरतेशेवटी, या सखोल आणि उच्चतर अशा गतिविधींच्या संचयामधून चैत्य व्यक्तित्वाची घडण होते आणि त्यालाच आपण सर्वसाधारणत: ‘चैत्य पुरुष’ (Psychic being) असे संबोधतो. माणूस आध्यात्मिक जीवनाकडे वळण्याचे निमित्त-कारण खरंतर हाच चैत्य पुरुष असतो; ह्या चैत्यपुरुषाचीच त्याला सर्वात अधिक मदत होत असते पण बरेचदा हे निमित्त-कारण अनभिज्ञच राहते. आणि म्हणूनच आपल्याला ‘पूर्णयोगा’मध्ये त्या चैत्यपुरुषाला अग्रभागी आणावे लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 103)