साधनेची मुळाक्षरे – २१

आध्यात्मिक गोष्टींचे आकलन करण्यासाठी मन अक्षम असते. आणि तरीसुद्धा, या पूर्णयोगाच्या मार्गावर प्रगत व्हायचे असेल तर, सर्व मानसिक मतमतांतरे आणि प्रतिक्रिया यांपासून स्वत:ला दूर राखणे, अगदी अनिवार्य असते.

सुखसोयी, समाधान, मौजमजा, आनंद यासाठीची सर्व धडपड सोडून द्या. केवळ प्रगतीचा एक धगधगता अग्नी बनून राहा. जे काही तुमच्यापाशी येईल ते तुमच्या प्रगतीसाठी साहाय्यकारी आहे असे समजून त्याचा स्वीकार करा आणि जी काही प्रगती करणे आवश्यक आहे, ती ताबडतोब करून मोकळे व्हा.

तुम्ही जे काही करता, त्यामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करा; परंतु, आनंद मिळवायचा म्हणून कधीच काही करू नका.

कधीही उत्तेजित होऊ नका, उदास होऊ नका किंवा क्षुब्ध, अस्वस्थ होऊ नका. कोणत्याही परिस्थितीत पूर्णत: शांत राहून तिला सामोरे जा. आणि तरीदेखील आपण अजून काय प्रगती केली पाहिजे ह्याचा शोध घेण्यासाठी नेहमी सतर्क राहा आणि हे करण्यास विलंब करू नका.

वरवर दिसणाऱ्या भौतिक घटनांकडे पाहून त्यांचे अर्थ लावू नका कारण त्या घटना म्हणजे निराळेच काही अभिव्यक्त करण्याचा एक ओबडधोबड असा प्रयत्न असतो, खरी गोष्ट आपल्या वरवरच्या आकलनामधून निसटून जाते.

एखादी व्यक्ती तिच्या प्रकृतीमधील अमुक एका गोष्टीमुळे, तमुक एका प्रकारे वागत असते, तिच्या प्रकृतीमधील ती गोष्ट बदलवून टाकण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये असल्याशिवाय, त्या व्यक्तीच्या वर्तणुकीविषयी कधीही तक्रार करू नका, आणि तुमच्याकडे जर तसे सामर्थ्य असेलच, तर तक्रार करण्याऐवजी ती गोष्ट बदलून टाका.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 33-34)

साधनेची मुळाक्षरे – २०

(श्रीमाताजी येथे भक्तिभावातून होणाऱ्या प्रगतीविषयी सांगत आहेत.)

भक्तीची भावना अंतःकरणात असेल तर अशा व्यक्तीला अडथळे, अडचणी यांच्या धक्क्यांची देखील तमा वाटत नाही. ते तुमचे काय वाईट करू शकणार? …व्यक्ती त्याची गणतीच करत नाही. इतकेच नव्हे, कधीकधी तर ती त्यावर हसतेसुद्धा. अधिक वेळ लागला तर त्याने तुम्हाला काय फरक पडणार आहे? अधिक वेळ लागला तर तेवढाच अधिक वेळ तुम्हाला अभीप्सेचा, आत्म-निवेदनाचा, आत्म-दानाचा आनंद मिळेल.

कारण तोच एकमेव खराखुरा आनंद असतो. आणि जेव्हा त्यामध्ये काहीतरी अहंभावात्मक आड येते तेव्हा तो आनंद मावळतो कारण तेथे एक प्रकारची मागणी असते – व्यक्ती त्याला गरज असे संबोधते – ती मागणी या आत्म-निवेदनात मिसळते. अन्यथा हा आनंद कधीच मावळत नसतो.

हा आनंद ही अशी गोष्ट असते की, जी व्यक्तीला सर्वप्रथम प्राप्त होते आणि सर्वात शेवटी उमगते. आणि हा आनंद हीच विजयाची खूण असते.

जोपर्यंत तुम्ही स्थिर, शांत, प्रकाशमान, अविचल अशा आनंदामध्ये सदासर्वकाळ नसता, तोवर तुम्हाला स्वतःचे शुद्धीकरण करण्यासाठी परिश्रम करावे लागणार, असा याचा अर्थ आहे, कधीकधी पुष्कळच परिश्रम करावे लागतात. पण ही त्याचीच खूण असते.

विभक्ततेच्या भावनेतूनच वेदना, दुःख, यातना, अज्ञान आणि सर्व प्रकारच्या अक्षमता येतात. निःशेष आत्म-दान, ‘स्व’ला विसरून केलेल्या आत्म-निवेदनानेच दुःखभोग नाहीसे होतात आणि त्यांची जागा असा आनंद घेतो की जो कशानेच झाकला जाऊ शकत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 396)

साधनेची मुळाक्षरे – १९

(श्रीमाताजींनी अगोदर शारीरिक आरोग्य, शरीराची स्वास्थ्यकारक वृत्ती, शरीराची जडणघडण याविषयी विवेचन केले आहे आणि त्यानंतर आरोग्य आणि ईश्वरी कृपा यासंबंधी त्या विवेचन करत आहेत.)

व्यक्तीच्या अंतरंगात जर ‘ईश्वरी कृपे’विषयी अशी श्रद्धा असेल की, ईश्वरी कृपा माझ्याकडे पाहत आहे आणि काहीही झाले तरी ईश्वरी कृपा आहेच, आणि ती माझ्यावर लक्ष ठेवून आहे तर, (व्यक्ती अशी श्रद्धा नेहमीच, आयुष्यभर बाळगू शकते) तिच्या साहाय्याने व्यक्ती कोणत्याही संकटामधून पार होऊ शकते, या श्रद्धेच्या साहाय्याने सर्व अडचणींना सामोरे जाऊ शकते, अशा व्यक्तीला काहीच विचलित करू शकत नाही कारण तिच्यापाशी श्रद्धा असते आणि ईश्वरी कृपादेखील तिच्यासोबत असते. ती अनंतपटीने शक्तिशाली, अधिक सचेत, अधिक चिरकाळ टिकणारी अशी शक्ती आहे; तुमची शारीरिक ठेवण कशी आहे, तिची अवस्था काय आहे यावर ती शक्ती अवलंबून नसते; ती ईश्वरी कृपेखेरीज अन्य कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसते आणि म्हणून ती ‘सत्या’वरच विसंबून असते आणि मग तिला कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 297)

साधनेची मुळाक्षरे – १८

सर्वसाधारण एक तत्त्व म्हणून आणि नित्य विशिष्ट उपयोगामध्येदेखील, आपल्याकडून ज्या श्रद्धेची अपेक्षा आहे ती श्रद्धा सरते शेवटी समग्र अस्तित्वाने स्वतःच्या सर्व घटकांनिशी, ‘देवा’च्या उपस्थितीस आणि देवाच्या मार्गदर्शनास व त्याच्या ‘शक्ती’स दिलेल्या एका विशाल, उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या व नित्य शुद्धतर, पूर्णतर आणि अधिक शक्तिशाली होत जाणाऱ्या सहमतीमध्ये परिणत होते. मनुष्याला स्वतःबद्दल, त्याच्या स्वतःच्या कल्पनांबद्दल, त्याच्या शक्तींबद्दल एक श्रद्धा प्रदान करण्यात आली आहे; जेणेकरून तो स्वतः कार्य करेल, निर्मिती करेल, आणि उच्चतर गोष्टींप्रत उन्नत होईल आणि अंततः त्याचे सारे सामर्थ्य हे जणू आत्मवेदीमधील सुयोग्य समिधा बनेल. आपल्यामध्ये असलेल्या स्वतःच्या आध्यात्मिक इच्छेवर आणि ऊर्जेवर तसेच ऐक्य, स्वातंत्र्य आणि पूर्णत्वाच्या दिशेने आपण ज्या शक्तीच्या आधारे यशस्वीरित्या मार्गक्रमण करू शकतो त्या आपल्या शक्तीवर आपली दृढ व बळकट श्रद्धा असली पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ‘दिव्य शक्ती’च्या उपस्थितीची जाणीव होत नाही आणि आपण तिच्या उपस्थितीने भारले जात नाही तोपर्यंत म्हणजे, दिव्य शक्तीवरील श्रद्धेच्या उदयापूर्वी तरी अनिवार्यपणे आपण आपल्यामध्ये असलेल्या आध्यात्मिक इच्छेवर, ऊर्जेवर व शक्तीवर दृढ व बळकट श्रद्धा बाळगली पाहिजे किंवा किमान तिची जोड तरी त्या दिव्य शक्तीला दिली पाहिजे.

‘शास्त्र’ असे सांगते की, निर्बल व्यक्तींना आत्मविजय संपादन करता येत नाही. ”नायमात्मा बलहीनेन लभ्यः।” पांगळा करणारा स्वतःमधील सर्व अविश्वास, सिद्धीच्या सामर्थ्याविषयीच्या सर्व शंका म्हणजे षंढत्वाला दिलेली संमतीच असते, ती दौर्बल्याची कल्पना असते आणि आत्म्याच्या सर्वशक्तिमत्तेला दिलेला तो नकार असतो, अशा अविश्वासाला हतोत्साहित (discouraged) केलेच पाहिजे. आत्ताची सद्यकालीन अक्षमता, अगदी तिचा दबाव कितीही जास्त भासला तरी, ती श्रद्धेची केवळ एक कसोटी आहे; एखादी तात्पुरती अडचण आणि त्यावर मात करण्यासाठी असलेली अक्षमतेची भावना या गोष्टी पूर्णयोगाच्या साधकाच्या दृष्टीने निरर्थक असतात; कारण आपल्या अस्तित्वामध्ये आधीपासूनच सुप्त रूपाने असलेल्या पूर्णत्वाचे विकसन हे त्याचे उद्दिष्ट असते; कारण मनुष्य स्वतःमध्ये, स्वतःच्या आत्म्यामध्ये, दिव्य जीवनाचे बीज बाळगून असतो; त्याच्या प्रयत्नामध्येच यशाची शक्यता अंतर्भूत असते, गृहीत असते आणि त्याचा विजयही एक प्रकारे निश्चित असतो कारण त्या पाठीमागे सर्वसामर्थ्यशाली शक्तीची हाक आणि तिचे मार्गदर्शन असते. परंतु त्याचवेळी स्वतःवर असलेल्या या श्रद्धेला राजसिक अहंकाराच्या सर्व स्पर्धांपासून आणि आध्यात्मिक गर्वापासून विशुद्ध केलेच पाहिजे.

साधकाने ही संकल्पना शक्य तेवढी मनात बाळगली पाहिजे की, व्यक्तीचे सामर्थ्य हे तिचे स्वतःचे (अहंभावात्मक) सामर्थ्य नसते तर, ते वैश्विक दिव्य ‘शक्ती’चे सामर्थ्य असते आणि त्या शक्तीचा कोणताही अहंभावात्मक वापर हा मर्यादेचे कारण ठरतो आणि अंततः तो अडथळा बनतो. आपल्या अभीप्सेच्या पाठीमागे असणाऱ्या वैश्विक दिव्य ‘शक्ती’चे सामर्थ्य अमर्याद असते आणि जेव्हा तिला योग्य रितीने आवाहन केले जाते तेव्हा तिचे ते सामर्थ्य आपल्यामध्ये ओतण्यात आणि आपल्यामध्ये सद्यस्थितीत असलेले किंवा भविष्यात येऊ शकतील असे अडथळे आणि अक्षमता दूर करण्यामध्ये, ती अपयशी ठरू शकत नाही. कारण आपल्या संघर्षाचा कालावधी आणि वेळा या प्रथमतः साधनरूपाने आणि अंशतः आपल्या श्रद्धासामर्थ्यावर आणि आपल्या प्रयत्नांवर अवलंबून असल्या तरीसुद्धा अंततः ‘ईश्वरा’च्या, एकमेवाद्वितीय अशा त्या ‘योगस्वामी’च्या, म्हणजे सारे काही चातुर्याने निर्धारित करणाऱ्या गुप्त ‘आत्म्या’च्या हाती असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 779-780)

साधनेची मुळाक्षरे – १७

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्राचा हा अंशभाग…)
‘ईश्वर’ अस्तित्वात आहे आणि ‘ईश्वर’ हीच एक अशी गोष्ट आहे की, जिचे अनुसरण केले पाहिजे, तिच्या तुलनेत जीवनातील अन्य कोणतीच गोष्ट प्राप्त करून घेण्याजोगी नाही, ही जिवामध्ये उपजत असणारी श्रद्धाच, ‘योगमार्गा’मधील मूलभूत श्रद्धा आहे. ह्या चढत्यावाढत्या श्रद्धेमुळेच तुम्ही या ‘योगा’कडे वळला आहात आणि तुमच्यामधील ही श्रद्धा अजूनही मृत झालेली नाही किंवा मंदावलेली नाही. तुमच्या पत्रावरून असे दिसून येते की, ती अधिक आग्रही आणि स्थायी झाली आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये ती टिकून आहे तोपर्यंत ती व्यक्ती आध्यात्मिक जीवनासाठी निवडली गेली आहे, असे म्हणता येईल. मी तर असे म्हणेन की, त्याची प्रकृती ही कितीही अडथळ्यांनी भरलेली असली, अडीअडचणी आणि नकारांनी ठासून भरलेली असली आणि अगदी अनेक वर्षे संघर्ष करत राहावा लागलेला असला तरीसुद्धा, त्या व्यक्तीला आध्यात्मिक जीवनात यश मिळणार हे निश्चित.

…तर्क आणि सामान्य जाणीव यांच्याशी सुसंगत असणारी श्रद्धा तुम्ही विकसित करणे आवश्यक आहे – ती अशी की, जर ‘ईश्वर’ अस्तित्वात आहे आणि त्याने जर तुम्हाला या ‘मार्गा’ची हाक दिली आहे आणि ती आलेली आहे हे निश्चित, तर मग या सगळ्या पाठीमागे ईश्वरी मार्गदर्शन असेल आणि सर्व प्रकारच्या अडीअडचणींमधून पार होऊन सुद्धा, किंवा त्या अडीअडचणी असतानासुद्धा तुम्ही या मार्गावर येऊन पोहोचालच. अपयशाची आशंका व्यक्त करणाऱ्या विरोधी आवाजांकडे लक्ष देऊ नका किंवा त्यांना प्रतिसाद देणाऱ्या उतावळ्या, घाईगडबड करणाऱ्या प्राणिक आवाजांकडेदेखील लक्ष देऊ नका. मोठमोठ्या अडचणी आहेत आणि त्यामुळे यश मिळण्याची काही शक्यता नाही किंवा ‘ईश्वरा’ने आजवर स्वतःला कधीही प्रकट केले नाही, त्यामुळे तो पुढेही स्वतःला कधीच प्रकट करणार नाही, अशा म्हणण्यावर मुळीच विश्वास ठेवू नका. उलट, ज्यांनी ज्यांनी आपले मन हे एका अतिशय महान आणि अवघड ध्येयावर केंद्रित केलेले असते, अशा लोकांप्रमाणे तुम्हीसुद्धा अशी भूमिका घ्या की, “मला यश मिळेपर्यंत मी वाटचाल करतच राहीन आणि मग भले कितीही अडचणी येवोत, मी यशस्वी होईनच होईन.” यामध्ये ईश्वरनिष्ठ मनुष्य अजून एक भर घालतो, ती अशी की, ”ईश्वर अस्तित्वात आहे, तो आहेच आणि जर का तो अस्तित्वात आहेच तर, मग मी त्याचे जे अनुसरण करत आहे, त्यामध्ये कधीही अपयश येऊ शकणार नाही. मला जोवर तो गवसत नाही, तोवर कितीही दुःखसंकटे आली तरी, त्यांवर मात करून, मी वाटचाल करतच राहीन.”

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 93-94)

साधनेची मुळाक्षरे – १६

जे कोणी दुःखकष्ट सहन करत आहेत, त्यांना हीच गोष्ट सांगायला हवी की, सारे दुःखकष्ट याच गोष्टीचे निदर्शक आहेत की, तुमचे समर्पण परिपूर्ण नाही. आणि मग, जेव्हा तुम्हाला कधीतरी एकदम धक्का बसतो, तेव्हा, “अरेरे, हे खूपच वाईट आहे” किंवा ‘’ही परिस्थिती खूपच कठीण आहे,’’ असे म्हणण्याऐवजी जर तुम्ही असे म्हणालात की, ”माझे समर्पण परिपूर्ण झालेले नाही;” तर ते योग्य आहे.

आणि मग ‘ईश्वरी दिव्यकृपा’ तुम्हाला साहाय्य करत आहे, मार्गदर्शन करत आहे असे तुम्हाला जाणवते आणि तुम्ही वाटचाल करू लागता. आणि मग एके दिवशी तुम्ही अशा शांतीमध्ये उदय पावता की ज्या शांतीचा भंग कोणतीच गोष्ट करू शकत नाही. ‘दिव्य कृपे’बद्दलच्या पूर्ण विश्वासामधून जे हास्य उमलते, तशाच हसतमुखाने तुम्ही साऱ्या विरोधी शक्तींना, विरोधी गतिविधींना, आघातांना, गैरसमजांना, दुरिच्छांना सामोरे जाता. आणि या साऱ्यातून बाहेर पडण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. दुसरा कोणता मार्गच नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 398-399)

साधनेची मुळाक्षरे – १५

तुमच्या बाजूने कोणतेही प्रयत्न नसतानादेखील दिव्य ‘शक्ती’ प्रभावीरित्या कार्य करू शकते, हे खरे आहे. तिच्या कार्यासाठी तिला तुमच्या प्रयत्नांची नव्हे तर, तुमच्या अस्तित्वाने दिलेल्या सहमतीची आवश्यकता असते.

*

‘श्रीमाताजीं’प्रत स्वत:ला उन्मुख ठेवा, त्यांचे नित्य स्मरण ठेवा आणि अन्य सर्व प्रभावांना नकार देत, श्रीमाताजींच्या ‘शक्ती’ला तुमच्यामध्ये कार्य करू द्या – हा या (पूर्ण)योगाचा नियम आहे.

*

‘श्रीमाताजीं’समोर आंतरात्मिकरित्या उन्मुख राहिल्याने, कार्यासाठी वा साधनेसाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व क्रमश: विकसित होत जाते, महत्त्वाच्या रहस्यांपैकी हे एक रहस्य आहे, साधनेचे ते केंद्रवर्ती रहस्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 721), (CWSA 29 : 109), (CWSA 32 : 154)

साधनेची मुळाक्षरे – १४

संकल्प आणि अभीप्सेच्या प्रामाणिकपणामुळे स्वतःहून घडून येणारी गोष्ट म्हणजे उन्मुखता. ‘श्रीमाताजीं’कडून येणाऱ्या दिव्य शक्तींचे ग्रहण करण्यास सक्षम होणे असा त्याचा अर्थ आहे.

*

‘श्रीमाताजीं’प्रत उन्मुख असणे म्हणजे सदोदित शांत, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण असणे; अस्वस्थ नसणे, तक्रार न करणे, निराश न होणे, त्यांना त्यांचे कार्य तुमच्यामध्ये करू देणे, त्यांना तुम्हाला मार्गदर्शन करू देणे, तुम्हाला ज्ञान, शांती आणि ‘आनंद’ प्रदान करू देणे. तुम्ही जर स्वतःला उन्मुख, खुले राखू शकत नसाल तर, उन्मुख होण्यासाठी तुम्ही सातत्याने पण शांतपणे अभीप्सा बाळगा.

*

उन्मुखतेचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे समर्पण; पण जोपर्यंत समर्पण झालेले नाही तोवर, अभीप्सा आणि स्थिरता यांद्वारे एका विशिष्ट टप्प्यापर्यंत उन्मुखता येऊ शकते.

*

तुमच्या चेतनेची जेव्हा तयारी होईल तेव्हा ‘श्रीमाताजीं’प्रति असलेल्या विश्वासामुळे, आवश्यक असणारे खुलेपण येईल. ध्यान करण्यासाठी पुरेसा वेळ आणि ऊर्जा मिळावी यासाठी तुम्ही तुमच्या सध्याच्या कामाचे नियोजन करण्यास काहीच हरकत नाही, पण जे आवश्यक आहे ते प्राप्त होण्यासाठी केवळ ध्यान पुरेसे नाही. तर तेथे ‘श्रीमाताजीं’प्रति असणारी उन्मुखता आणि श्रद्धा आवश्यक आहे; त्यामुळेच ती गोष्ट प्राप्त होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 105), (CWSA 32 : 151), (CWSA 29 : 106), (CWSA 29 : 109)