विचार शलाका – ०१
विचारांना आकार, रूप (form) असते आणि त्यांचे स्वतःचे असे एक व्यक्तिगत जीवन असते. ते त्यांच्या रचयित्यापासून स्वतंत्र असते. ते विचार त्या रचयित्याकडूनच या विश्वामध्ये प्रवाहित करण्यात आलेले असतात आणि त्यांच्या अस्तित्वाच्या प्रयोजनाची परिपूर्ती करण्यासाठी म्हणून ते विचार या विश्वामध्ये फिरत राहतात. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार करत असता, तेव्हा तुमचा तो विचार आकाररूप धारण करतो आणि त्या व्यक्तीला शोधण्यासाठी बाहेर पडतो आणि जेव्हा तुमच्या विचारासोबत एखादी इच्छा जोडलेली असते तेव्हा, तो विचाररूपी आकार (thought-form) तुमच्यामधून बाहेर पडून, ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहतो.
उदाहरणार्थ, समजा तुम्हाला एखादी व्यक्ती तुमच्याकडे यावी असे वाटत असते, तशी तुमची तीव्र इच्छा असते आणि त्यासोबत, म्हणजे तुम्ही हे जे काही मानसिक रूप तयार केलेले असते त्याच्या सोबत एक प्राणिक आवेगयुक्त अशी इच्छा असते; मग तुम्ही अशी कल्पना करता की, “जर ती व्यक्ती आली तर असे असे घडेल किंवा तसे घडेल.” मात्र कालांतराने तुम्ही ती कल्पना करणे सोडून देता. परंतु तुम्हाला हे माहीत नसते की, तुम्ही जरी विसरून गेलात तरीही त्या विचाराचे अस्तित्व तसेच कायम शिल्लक राहिलेले असते. कारण तो विचार-आकार अजूनही तसाच कायम असतो, तो तसाच कार्यरत असतो, तुमच्यापासून तो स्वतंत्र झालेला असतो आणि त्याला त्याच्या कार्यापासून परावृत्त करण्यासाठी फार मोठी शक्ती असावी लागते. आता तो त्या व्यक्तीच्या वातावरणात त्या व्यक्तीला स्पर्श करतो आणि त्या व्यक्तीमध्ये तुमच्याकडे येण्याची इच्छा निर्माण करतो. आणि जर का तुमच्या विचार-आकारामध्ये पुरेशी इच्छाशक्ती असेल, जर तुम्ही त्याची सुव्यवस्थित रचना केलेली असेल तर, तो विचार स्वतः प्रत्यक्षीभूत होतोच होतो. परंतु रचनेचा काळ आणि ती प्रत्यक्षात येण्याचा काळ यामध्ये काही विशिष्ट अंतर असते. आणि जर दरम्यानच्या काळात तुमचे मन इतर गोष्टींनी व्याप्त झाले तर, असे घडते की तुमच्या या विस्मृत विचारांची परिपूर्ती झालेली असते, तुम्हाला स्वतःलाच आता त्याची आठवण नसते की एकेकाळी तुम्हीच त्या विचाराला खतपाणी दिले होते आणि तुम्हालाच आता जाण नसते की तुम्हीच या कृतीला उद्युक्त केले होते आणि तीच कृती आता तुमच्या समोर उभी ठाकली आहे. आणि असे बरेचदा घडते की, जेव्हा प्रत्यक्ष परिणाम दिसून येतो तेव्हा तुमची ती इच्छा नाहीशी झालेली असते किंवा तुम्हाला त्याची पर्वा नसते.
अशी बरीच माणसं असतात की ज्यांच्याकडे अशी रचना करण्याची खूप प्रबळ शक्ती असते आणि नेहमीच त्यांच्या रचना वास्तवात आलेल्या त्यांना पाहावयास मिळतात. पण त्यांच्याकडे एक शिस्तबद्ध असे मानसिक आणि प्राणिक अस्तित्व नसल्याने, आत्ता त्यांना एक गोष्ट हवीशी वाटते तर नंतर दुसरीच एखादी गोष्ट हवीशी वाटते आणि मग अशा या विविध किंवा विरोधी रचना आणि त्यांचे परिणाम एकमेकांवर आदळतात, त्यांचा परस्परांशी झगडा होतो. आणि मग अशा लोकांना आश्चर्य वाटू लागते की ते एवढे गोंधळाने आणि विसंवादाने भरलेले जीवन का जगत आहेत! परंतु त्यांना हे समजत नसते की, ते त्यांचे स्वतःचेच विचार होते. त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या इच्छांनीच त्यांच्याभोवती तशी परिस्थिती घडवली आहे आणि ती परिस्थिती आता त्यांना विसंगत, परस्परविरोधी वाटत आहे आणि त्यामुळे त्यांचे जीवन हे असह्य कोटीचे झालेले आहे.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 50-51)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…