अमर्त्यत्वासंबंधी वैदिक शिकवण
मनुष्य भौतिक विश्वात राहतो, तो मरणाधीन असतो आणि मर्त्य अस्तित्वाच्या ‘पुष्कळशा असत्या’च्या तो अधीन असतो. या मरणाच्या अतीत होण्यासाठी, अमर्त्यांपैकी एक होण्यासाठी, त्याने असत्याकडून सत्याकडे वळले पाहिजे; त्याने प्रकाशाकडे वळले पाहिजे आणि अंधकाराच्या शक्तींशी लढून त्यावर विजय मिळविला पाहिजे. ईश्वरी शक्तींच्या सख्यत्वाने आणि त्यांचे साहाय्य घेऊन मनुष्य या गोष्टी करतो; ईश्वरी शक्तींच्या साहाय्यासाठी आवाहन करण्याचा हा मार्ग म्हणजे वैदिक गूढवाद्यांचे गुप्त रहस्य होते. या हेतूसाठी जगभरात, बाह्य यज्ञाच्या प्रतीकांना, गुह्य पद्धतीने आंतरिक अर्थ प्रदान करण्यात आला आहे; ती प्रतीके मानवामध्ये देवदेवतांना आवाहन करण्याचे प्रतिनिधित्व करत असतात; ती यज्ञाची प्रतीके मानव व देव यांना जोडणारी असतात, ती त्या दोहोंमध्ये घनिष्ठ विनिमय घडवत असतात, ती अन्योन्य साहाय्यक ठरतात आणि त्यांच्यामध्ये सख्य घडवून आणतात. त्यांद्वारे माणसामध्ये देवदेवतांच्या शक्ती निवास करू लागतात; तसेच त्याच्यामध्ये दिव्य प्रकृतीची विश्वव्यापकतादेखील आकाराला येते. कारण देव हे सत्याचे रक्षक आणि संवर्धक आहेत, ते अमर्त्यत्वाच्या शक्ती आहेत, ते अनंत मातेचे पुत्र आहेत; अमर्त्यत्वाकडे जाणारा मार्ग हा देवांचा ऊर्ध्वगामी मार्ग आहे, तो सत्याचा मार्ग आहे, तो एक प्रवास आहे, “ऋतस्य पंथः” असे ज्याला म्हटले जाते त्या सत्याच्या धर्मामध्ये मनुष्याचे उन्नत होणे आहे, विकसित होणे आहे. मनुष्य स्वतःच्या केवळ शारीरिक ‘स्व’ च्या मर्यादा तोडून अमर्त्यत्वाकडे जाऊन पोहोचतो असे नाही, तर तो जेव्हा त्याच्या मानसिक आणि सामान्य आत्मिक प्रकृतीच्या मर्यादा तोडून, उच्चतर स्तरावर आणि सत्याच्या सर्वश्रेष्ठ अवकाशात जातो, तेव्हाच तो अमर्त्यत्वाप्रत पोहोचतो. कारण तेथेच अमर्त्यत्वाचा पाया असतो आणि तेथे त्रिविध अनंताचे स्वाभाविक निवासस्थान आहे. या संकल्पनांवरच वैदिक ऋषींनी मनोवैज्ञानिक आणि आत्मिक साधनेची उभारणी केली; नंतर हीच साधना स्वतःच्या पलीकडे जात सर्वोच्च आध्यात्मिकतेकडे गेली आणि त्यातच उत्तरकालीन भारतीय योगाचा गाभा सामावला गेला.
*
आपल्यामध्ये असणाऱ्या ईश्वराप्रत उन्नत झाल्याने, आपण स्वतंत्र होतो, या विश्वाच्या बंधनामधून आणि मृत्युपाशापासून मुक्त होतो. कारण ईश्वर म्हणजे स्वातंत्र्य, ईश्वर म्हणजे अमर्त्यत्व. “मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्र्नुते” अर्थात मृत्युच्या अतीत होऊन आपण अमर्त्यत्व अनुभवतो.
– श्रीअरविंद
(CWSA 20 : 202-203), (CWSA 17 : 304)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…