(श्रीअरविंद यांनी एका साधकाला त्याच्या पत्नीच्या निधनानंतर जे पत्र लिहिले आहे त्यातील हा अंश…)
तुझ्या पत्नीच्या भयंकर मृत्युमुळे तुला केवढा मोठा धक्का बसला असेल हे मी समजू शकतो. पण आता तू सत्याकांक्षी आहेस, सत्याचा साधक आहेस. त्यामुळे तू तुझे मन सामान्य मानवी प्रतिक्रियांच्या वर स्थिर केले पाहिजेस आणि सर्व गोष्टींकडे तू एका व्यापक, महत्तर प्रकाशातून पाहिले पाहिजेस.
अज्ञानमय जीवनाच्या उतारचढावांमधून, वाटचाल करणारा एक जीव या दृष्टीकडे तुझ्या मृत पत्नीकडे पाहा. या प्रवासात अशा काही घटना घडतात की ज्या मानवी मनाला दुर्दैवी भासतात. आयुष्यावर अकाली घाला घालणारा, असा हा आकस्मिक अपघाती किंवा विदारक मृत्यू नेहमीच, आपण ज्याला जीवन म्हणतो त्या, पार्थिव जीवनाची क्षणभंगुरता दर्शविणारा असतो. आणि मानवी मनाला हा विशेषच यातनामय व दुर्दैवी भासतो.
पण एखादा (साधक) ह्या वरपांगी दृश्यामागील संगती पाहू शकतो, तो हे जाणतो की, जीवात्म्याच्या प्रवासात जे जे काही घडते त्याला काही अर्थ असतो; त्याचे काही प्रयोजन असते. जीवाच्या अनुभव-मालिकेतील अशा घटनेचे स्थानही तो साधक ओळखून असतो; हा अनुभव त्या जीवाला अशा एका वळणबिंदूपाशी घेऊन जात असतो की जेथून तो अज्ञानाकडून प्रकाशाकडे मार्गस्थ होतो. ईश्वरी प्रारब्धानुसार जे जे काही घडते ते चांगल्यासाठीच हे तो साधक जाणतो – मनाला जरी ते तसे भासले नाही तरी!
अस्तित्वाच्या दोन अवस्थांच्या मधील सीमारेषा ओलांडून गेलेला जीव या दृष्टीने तू तुझ्या पत्नीकडे पाहा. विश्रांतिस्थळाकडे चाललेल्या तिच्या प्रवासाला, तुझ्या शांत विचारांद्वारे साहाय्य कर आणि ‘ईश्वरी साहाय्या’ने तिला त्या मार्गावर साथ द्यावी म्हणून प्रार्थना करून, तिला मदत कर. दीर्घकाळ चाललेल्या शोकामुळे मृतात्म्याला मदत तर होणार नाहीच उलट त्याच्या प्रवासाला विलंब होईल. तुझी जी हानी झाली त्याबद्दल कुढत बसू नकोस तर तिच्या आध्यात्मिक कल्याणाचा विचार कर.
– श्रीअरविंद
(CWSA 28 : 528)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…