समर्पण – ०४

तुमच्या आत्म्याचे जे जे काही आहे ते ते सारे ईश्वराला, ज्याचे तुम्ही एक भाग आहात अशा महत्तर चेतनेला देऊ करणे, हे समर्पणामध्ये अभिप्रेत आहे. समर्पण तुम्हाला क्षीण करणार नाही तर त्यामुळे वृद्धी होईल; ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाची कोणतीही घट करणार नाही, काहीही दुर्बल करणार नाही किंवा तुमचे व्यक्तित्व नष्टही करणार नाही; तर समर्पण तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावी बनवेल, वृद्धिंगत करेल. दानाच्या सगळ्या आनंदासहित असलेले मुक्त समस्त दान हे समर्पणामध्ये अभिप्रेत असते; त्यामध्ये त्यागाची भावना नसते. आपण काही त्याग करत आहोत अशी थोडीशीही भावना तुमच्या मनात असेल तर मग ते काही समर्पण नव्हे. त्याचा अर्थ असा की तुम्ही काहीतरी हातचे राखून ठेवू पाहत आहात किंवा तुम्ही काहीतरी कुरकूर करत, कष्टाने आणि सायासाने देण्याचा प्रयत्न करत आहात; त्यामध्ये भेट देण्याचा कोणताच आनंद नाही; एव्हढेच काय पण तुम्ही काहीतरी देत आहात ही भावनादेखील त्यामध्ये असत नाही.

तुम्ही जेव्हा कोणतीही गोष्ट तुमच्या अस्तित्वाने संकोचून, दबून, अवघडून अशी करत असता तेव्हा ती तुम्ही चुकीच्या पद्धतीने करत आहात, हे निश्चित जाणा. खरे समर्पण तुम्हाला व्यापक करते, ते तुमची क्षमता वाढविते; तुम्हाला स्व-प्रयत्नाद्वारे कधीच प्राप्त करून घेता आले नसते एवढ्या मोठ्या प्रमाणात समर्पण तुमच्या गुणवत्तेमध्ये आणि संख्यात्मकतेमध्ये भर घालत असते. गुणात्मकतेतील आणि संख्यात्मकतेतील हे मोठे प्रमाण, तुम्ही समर्पणापूर्वी जे काही मिळवू शकला असता त्याच्यापेक्षा अगदी भिन्न असते. तुमचा एका नवीन जगामध्येच प्रवेश होतो, अशा एका व्यापकतेमध्ये प्रवेश होतो की, जर तुम्ही समर्पण केले नसते तर त्या व्यापकतेमध्ये तुमचा कधीच प्रवेश होऊ शकला नसता.

एखादा पाण्याचा थेंब सागरामध्ये पडला आणि तेथेसुद्धा जर त्याने स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले, तर तो केवळ पाण्याचा एक लहानसा थेंब म्हणूनच शिल्लक राहील, अधिक काहीच बनणार नाही आणि परिणामत: त्या लहानशा थेंबाचा सभोवताली असलेल्या प्रचंडतेपुढे टिकाव लागणार नाही, कारण त्याने समर्पण केलेले नव्हते. परंतु, तेच समर्पणामुळे, तो त्या सागराशी एकजीव होतो आणि मग तो त्या संपूर्ण सागराच्या अथांगतेशी, त्याच्या शक्तीशी, त्याच्या प्रकृतीशी जोडला जातो आणि त्यात सहभागी होतो.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 114-115)

समर्पण – ०३

ईश्वराप्रत केलेले आत्मदान म्हणजे समर्पण. व्यक्ती जे काही आहे आणि तिच्यापाशी जे काही आहे ते सारे ईश्वराला देऊ करणे; काहीही स्वत:चे नाही असे समजणे; इतर कोणतीही आज्ञा न पाळता, केवळ ईश्वरी संकल्पाच्या आज्ञेचे पालन करणे; अहंकारासाठी नाही तर, ईश्वरासाठी जीवन व्यतीत करणे म्हणजे समर्पण.
*
स्वतःच्या कल्पना, इच्छा, सवयी यांचा कोणताही आग्रह न धरता, त्या साऱ्यांची जागा ‘ईश्वरी सत्या’ला त्याच्या ज्ञानाद्वारे, त्याच्या इच्छेद्वारे आणि त्याच्या कार्याद्वारे सर्वत्र घेता यावी म्हणून, त्याला सहमती देणे म्हणजे समर्पण. स्वतःमध्ये जे काही आहे ते ईश्वराप्रत निवेदित करणे, व्यक्तीने ती स्वतः जे आहे ते आणि तिच्यापाशी जे काही आहे ते ईश्वराप्रत अर्पण करणे, म्हणजे समर्पण!

– श्रीअरविंद
(CWSA 29: 67)

समर्पण – ०२

…प्रामाणिक अभीप्सेचा परिणाम नक्कीच होतो; जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही दिव्य जीवनामध्ये उन्नत होता.

पूर्णपणे प्रामाणिक असणे म्हणजे – फक्त आणि फक्त ईश्वरी सत्याचीच अभीप्सा बाळगणे; दिव्य मातेप्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे; या अभीप्सेव्यतिरिक्त असणाऱ्या वैयक्तिक सर्व मागण्या व वासना यांचा परित्याग करणे; जीवनातील प्रत्येक कृती ही ईश्वरालाच समर्पण करणे आणि कोणताही अहंकार आड येऊ न देता, हे कार्य ईश्वराने दिलेले आहे असे मानून कार्य करणे. हाच दिव्य जीवनाचा पाया आहे.

व्यक्ती एकाएकी एकदम अशी होऊ शकत नाही. पण जर ती सातत्याने तशी अभीप्सा बाळगेल आणि ईश्वरी शक्तीने साहाय्य करावे म्हणून तिचा अगदी अंतःकरणपूर्वक आणि साध्यासरळ इच्छेने, नेहमी धावा करत राहील; तर व्यक्ती या चेतनेप्रत अधिकाधिक उन्नत होत राहते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 50-51)

समर्पण – ०१

आपल्या जीवनाची सारी जबाबदारी ईश्वराच्या हाती सोपविण्याचा निर्णय म्हणजे समर्पण (Surrender). या निर्णयाव्यतिरिक्त कोणतीच गोष्ट शक्य नाही. जर तुम्ही समर्पण केले नाहीत तर योगाचा प्रश्नच उद्भवत नाही. समर्पणानंतर सारे काही स्वाभाविकपणेच येते कारण योगाची प्रक्रियाच मुळी समर्पणाबरोबर सुरू होते. तुम्ही ज्ञानाच्या माध्यमातून किंवा भक्तीच्या माध्यमातून समर्पित होऊ शकता. केवळ ईश्वरच सत्य आहे ही एक दृढ अंतःप्रेरणा तुमच्यामध्ये असू शकते आणि ईश्वराखेरीज माझे काहीच चालणार नाही, अशी एक प्रकाशमय धारणा तुमच्यामध्ये असू शकते. किंवा मग आनंदी होण्याचा केवळ हाच एक मार्ग आहे, हीच एक दिशा आहे अशी उत्स्फूर्त भावना असू शकते; किंवा मग आपण केवळ ईश्वराचेच असावे अशी दृढ आंतरात्मिक इच्छा असू शकते. ”मी माझा नाही,” असे तुम्ही म्हणता आणि आपल्या अस्तित्वाची जबाबदारी तुम्ही ‘सत्या’वर सोपविता.

मग येते आत्मार्पण (Self-offering) : तुम्ही म्हणता की, “मी एक चांगल्या आणि वाईट साऱ्या गुणांनी बनलेला, अंधाऱ्या आणि प्रकाशपूर्ण गुणांनी बनलेला असा प्राणी आहे; मी जसा आहे तसा मी स्वतःला समर्पित करत आहे; माझ्या चढउतारांसहित, माझ्या परस्परविरोधी प्रेरणा आणि प्रवृत्तींनिशी माझा स्वीकार कर आणि तुला जे करावेसे वाटते ते माझ्याबाबतीत कर.” आणि मग जो पहिल्या प्रथम निर्णय घेतला होता त्या केंद्रवर्ती आंतरात्मिक इच्छेभोवती तुमच्या साऱ्या अस्तित्वाचे एकीकरण व्हायला सुरुवात होते. तुम्ही तुमच्या प्रकृतीमधील अडथळा निर्माण करणारे सारे घटक एकेक करून हाती घ्यायला हवेत आणि त्यांचे केंद्रवर्ती अस्तित्वाभोवती एकीकरण करावयास हवे. तुम्ही एका उत्स्फूर्त प्रेरणेने स्वतःला ईश्वराप्रत समर्पित करू शकता; पण अशा प्रकारे एकीकरण घडून आल्याखेरीज तुम्ही प्रभावीरित्या समर्पण करू शकत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 126)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३७

वैयक्तिक आत्म्याने सर्व जगताच्या अतीत जाऊन, विश्वात्मक ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे एवढ्यापुरताच ‘पूर्णयोग’ मर्यादित नाही; तर ‘सर्व आत्म्यांची एकत्रित बेरीज’, म्हणजे विश्वात्मक साक्षात्कार देखील पूर्णयोग आपल्या कवेत घेतो; आणि त्यामुळे पूर्णयोग व्यक्तिगत मोक्ष किंवा व्यक्तिगत सुटका एवढ्यापुरताच मर्यादित राहू शकत नाही. पूर्णयोगाचा साधक विश्वात्मक मर्यादांच्या अतीत झालेला असूनही, तो सर्वात्मक ईश्वराशी देखील एकात्म असतो; त्यामुळे त्याचे या विश्वातील दिव्य कर्म अजूनही शिल्लक असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 270)

पूर्णयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३५

मर्यादित बहिर्मुख अहंभावाला हद्दपार करून, त्याच्या जागी प्रकृतीचा हृदयस्थ शासनकर्ता म्हणून ईश्वराला सिंहासनावर बसविणे, हे आमच्या योगाचे प्रयोजन आहे. प्रथमतः वासनेचा वारसा रद्द करणे, आणि त्यानंतर, वासनाभोगाला आपल्या जीवनाचे शासन करण्यास संमती न देणे; असा ह्याचा अर्थ आहे. वासनेमधून आध्यात्मिक जीवन पोषण मिळविणार नाही; तर सारभूत जीवनाचा एक नि:स्वार्थी शुद्ध आध्यात्मिक आनंद असतो, त्यामधून आध्यात्मिक जीवन पोषण मिळवेल. वासनेचा शिक्का असलेली आपली जी प्राणिक प्रकृती आहे, केवळ तिलाच नवा जन्म, नवे रूपांतर आवश्यक आहे असे नाही, तर आपल्या मनोमय अस्तित्वाचाही नवा जन्म, नवे रूपांतर होणे आवश्यक आहे. आपला भेदमय, अहंप्रधान, मर्यादित, अज्ञानव्याप्त विचार व तशाच प्रकारची बुद्धी नष्ट झाली पाहिजे. त्यांच्या जागी छायाविरहित दिव्य प्रकाश, सर्वगामी निर्दोष प्रकाश प्रवाहित झाला पाहिजे; या प्रकाशाची वाढ होऊन शेवटी त्याची परिणती, चाचपडणारे अर्धसत्य आणि ठेचाळणारा प्रमाद यापासून मुक्त अशा स्वाभाविक स्वयंभू सत्य-जाणिवेमध्ये झाली पाहिजे. आपली गोंधळलेली आणि खजिल झालेली अहंभावकेंद्रित क्षुद्र हेतूंची इच्छा व कृती थांबली पाहिजे; आणि त्यांची जागा द्रुतगतीच्या समर्थ, सुबोध स्वयंचलित, ईश्वरप्रेरित, ईश्वरी मार्गदर्शन लाभलेल्या शक्तीने घेतली पाहिजे; ईश्वराच्या इच्छेशी आपली इच्छा स्वखुशीने संपूर्णपणे एकरूप झाली पाहिजे आणि मग ही आपली श्रेष्ठ, निर्व्यक्तिक, न अडखळणारी, निश्चयात्मक इच्छा आपल्या सर्व कार्यात पायाभूत होऊन सक्रिय झाली पाहिजे. आपल्या अहंभावप्रधान, पृष्ठवर्ती, असंतुष्ट, दुर्बल भावनांचा खेळ बंद झाला पाहिजे; आणि त्याच्या जागी स्वतःच्या संधीची वाट पाहात असणाऱ्या, गुप्त, खोल, व्यापक आंतरात्मिक हृदयाचा व्यापार सुरू झाला पाहिजे. ईश्वराचे स्थान असलेल्या या आंतरिक हृदयाने प्रेरित झालेल्या आपल्या भावना तेव्हा मग, दिव्य प्रेम व बहुविध आनंद यांच्या शांत, जोरकस दुहेरी व्यापारांमध्ये रुपांतरित होतील. दिव्य मानवता किंवा अतिमानसिक मानवजात कशी असेल त्याची ही व्याख्या आहे. ज्याच्यामध्ये असामान्य कोटीची वा परिशुद्ध अशी मानवी बुद्धी आणि मानवी कृती आहे, अशा तऱ्हेचा अतिमानव नव्हे तर, उपरोक्त स्वरूपाचा, लक्षणाचा अतिमानव, आमच्या योगाच्या द्वारा आम्ही विकसित करावा, अशी हाक आम्हाला आली आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 90-91)

पूर्णयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३४

 

आमचा योग-समन्वय, मानव हा शरीरधारी आत्मा असण्यापेक्षा, मनोमय आत्मा आहे असे धरून चालतो; म्हणजेच मनाच्या पातळीवर मानव आपल्या साधनेला आरंभ करू शकतो, असे मानतो; आणि उच्चतर आध्यात्मिक शक्तीला आणि अस्तित्वाला स्वतः थेट खुला होत, मानव मनामधील आत्मशक्तीच्या योगे, आपले अस्तित्व अध्यात्मसंपन्न करू शकतो, असे मानतो; त्या उच्चतर शक्तीने परिव्याप्त (Possessed) झालेला तो, स्वतःला परिपूर्ण बनवू शकतो आणि आपल्या समग्र प्रकृतीमध्ये या गोष्टी तो कृतीत उतरवू शकतो, अशी क्षमता मानवाकडे असते, असे आमचा समन्वय-योग मानतो. याप्रमाणे आमची दृष्टी असल्याने, आमचा प्रारंभिक जोर मनामध्ये असणाऱ्या आत्मशक्तीच्या उपयोगावर आहे; आत्म्याच्या कुलुपांना ज्ञान, कर्म, भक्तीची त्रिविध किल्ली वापरून, ती कुलुपं उघडण्यावर आमचा भर आहे; तेव्हा आमच्या समन्वययोगात हठयोग-पद्धती उपयोगात आणावी लागत नाही; मात्र तिचा थोडासा उपयोग करण्यास हरकत नाही. राजयोगपद्धती आमच्या समन्वययोगात अनौपचारिक अंग म्हणून येऊ शकते. आध्यात्मिक शक्तीच्या आणि आध्यात्मिक अस्तित्वाच्या अधिकात अधिक विकसनाप्रत, सर्वांत जवळच्या मार्गाने जाऊन पोहोचावे आणि त्यायोगे दिव्य झालेली आणि मानवी जीवनाच्या सर्व प्रांतात जिचा अत्युच्च मुक्ताविष्कार असेल अशी प्रकृती असावी, अशी आमची स्फूर्तिदायक प्रेरणा आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 612-613)

पूर्णयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३३

आपल्याला जी पद्धती उपयोगात आणावी लागते ती अशी असते की, आपण आपल्या सर्व जाणीवयुक्त अस्तित्वाने ईश्वराशी संपर्क साधावा, त्याच्याशी नाते जुळवावे; आणि आपले समग्र अस्तित्व हे त्याने त्याच्या रूपामध्ये रूपांतरित करावे म्हणून, आपण त्याला आवाहन करावे. म्हणजेच एक प्रकारे, आपल्यातील खरा पुरुष जो ईश्वर तोच साधनेचा साधक बनतो आणि तोच योगाचा प्रभुही बनतो. आणि मग या ईश्वराद्वारे, आपले कनिष्ठ व्यक्तिमत्त्व हे त्याच्या स्वतःच्या पूर्णतेचे साधन म्हणून, तसेच दिव्य रूपांतराचे केंद्र म्हणून उपयोगात आणले जाते….

या पद्धतीचे मानसशास्त्रीय तथ्य सांगायचे तर असे म्हणता येईल की, ह्या पद्धतीमध्ये अहंभाव त्याच्या सर्व क्षेत्रांसह, सर्व साधनसंभारासह क्रमश: अहंभावातीत परमतत्त्वाप्रत समर्पित होतो. या परमतत्त्वाच्या क्रिया अफाट असतात, त्यांचे मोजमाप करणे अशक्य असते आणि त्या नेहमी अटळ, अपरिहार्य अशा असतात. खचितच, ही साधना सोपी साधना नाही, किंवा हा मार्ग जवळचादेखील नाही. येथे प्रचंड श्रद्धेची आवश्यकता असते, पराकोटीचे धैर्य येथे लागते आणि सर्वांहूनही अधिक, कशानेही विचलित न होणारी सबुरी आवश्यक असते. कारण या मार्गात तीन टप्पे असतात आणि त्यापैकी केवळ शेवटच्या टप्प्यांत वेगाने वाटचाल होते व ही वाटचाल आनंदमयी असते.

पहिला टप्पा : या टप्प्यात आपला अहंभाव हा ईश्वराशी व्यापकतेने आणि समग्रतेने संपर्क साधावयाचा प्रयत्न करीत असतो;

दुसरा टप्पा : खालच्या प्रकृतीची सर्व तयारी या टप्प्यात केली जात असते. ही तयारी ईश्वरी कार्याद्वारे होत असते, वरिष्ठ प्रकृतीला कनिष्ठ प्रकृतीने ग्रहण करावे व कालांतराने स्वत:च वरची प्रकृती व्हावे, ह्यासाठी कनिष्ठ प्रकृतीची तयारी केली जात असते.

तिसरा टप्पा : या टप्प्यात कनिष्ठ प्रकृतीचे वरिष्ठ प्रकृतीमध्ये अंतिम रूपांतर होत असते. तथापि, वास्तवात ईश्वरी शक्ती न कळत पडद्याआडून आपल्याकडे बघत असते व आपला दुबळेपणा पाहून, ती स्वत:च पुढे सरसावते आणि आपल्याला आधार देते. आपली श्रद्धा, धैर्य, सबुरी कमी पडेल त्या त्या वेळी ती आपल्याला आधार देऊन सावरते. ही ईश्वरी शक्ती “आंधळ्याला पाहाण्याची शक्ती देते, लंगड्याला डोंगर चढण्याची शक्ती देते.” आपल्या बुद्धीला ही जाणीव होते की, आपल्याला वर चढण्याचा प्रेमाने आग्रह करणारा असा दिव्य कायदा आपल्या मदतीला आहे; सर्व वस्तुजातांचा स्वामी असणाऱ्या, मानवांचा सखा असणाऱ्या ईश्वराबद्दल किंवा विश्वमातेबद्दल आपले हृदय आपल्याला सांगत असते की, आपण जेथे जेथे अडखळतो तेथे तेथे हा स्वामी व ही विश्वमाता आपल्याला हात देऊन सावरतात. तेव्हा असे म्हणणे भाग आहे की, हा मार्ग अतिशय अवघड, कल्पनातीत अवघड असला तरी, या मार्गाचे परिश्रम आणि या मार्गाचे उद्दिष्ट यांची तुलना केली असता, हा मार्ग अतिशय सोपा व अतिशय खात्रीचा आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 45-46)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३०

 

प्रकृती गुप्तपणे विकास पावत आहे. तिच्या ठिकाणी जे दिव्य ईश्वरी तत्त्व दडलेले आहे ते शोधून काढण्याच्या व त्याची परिपूर्ती करण्याच्या दिशेने प्रकृतीचा गुप्तपणे विकास घडून येत आहे; या विकासाच्या योगाने ते दिव्य तत्त्व अधिकाधिक स्पष्ट होत आहे… मन, प्राण, शरीर ही आपल्या प्रकृतीची सर्व रूपे या विकासाची साधने आहेत; परंतु मन, प्राण, शरीर यांच्या पलीकडले असे जे कोणते अस्तित्व आहे, त्याप्रत खुले होण्यानेच मन, प्राण, शरीर यांना त्यांचे अंतिम पूर्णत्व गवसते; याचे पहिले कारण असे की, केवळ मन, प्राण, शरीर म्हणजे काही पूर्ण मनुष्य नव्हे. आणि दुसरे कारण असे की, मनुष्याचे हे जे अन्य अस्तित्व आहे तीच त्याच्या संपूर्णतेची गुरुकिल्ली आहे आणि तेथून जो प्रकाश येतो त्या प्रकाशात मनुष्याला त्याच्या अस्तित्वाचे उच्च व विशाल सत्यरूप समग्रतेने दिसू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 617)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २९

कर्मयोग

 

जीवन आणि आध्यात्मिकता या दोन विभक्त गोष्टी आहेत, असा विचार करणे चुकीचे आहे, हे आम्ही पुन्हा एकदा सांगतो.
….श्रीकृष्ण अर्जुनाला पुनपुन्हा कंठशोष करून संघर्ष करण्यावर भर द्यायला सांगत आहे. “युद्ध कर आणि तुझ्या विरोधकांचा पाडाव कर”. “माझे स्मरण कर आणि लढ!”, “कोणत्याही अभिलाषेपासून मुक्त असलेले कर्म, कोणत्याही स्वार्थी दाव्यांपासून मुक्त असलेले असे कर्म आणि आध्यात्मिकतेने काठोकाठ भरलेल्या हृदयानिशी केलेले सर्व कर्म मला अर्पण कर आणि लढ!” ….कुरुक्षेत्राचा सारथी अर्जुनाच्या रथाला उध्वस्त झालेल्या क्षेत्रामधून घेऊन जात आहे असे कर्मयोगाचे वर्णन आहे, ते कर्मयोगाचे प्रतीक आहे. कारण शरीर हा रथ आहे, इंद्रियं ही त्या रथाला जोडलेले घोडे आहेत आणि या रक्तपात आणि चिखलाने माखलेल्या जगाच्या मार्गावरून, श्रीकृष्ण मानवी आत्म्याला वैकुंठाच्या दिशेने घेऊन जात आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 12)