ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

मानसिक परिपूर्णत्व – १६

 

(येथे श्रीअरविंद एका साधकाला पत्राच्या माध्यमातून उत्त्तर देत आहेत.)

मी बलवान अशा केंद्रवर्ती आणि शक्यतो परिपूर्ण श्रद्धेविषयी तुमच्याशी बोललो; कारण तुम्ही फक्त परिपूर्ण अशा प्रतिसादाचीच तमा बाळगता असे दिसते. म्हणजे इतर साऱ्या गोष्टी तुम्हाला समाधान देणाऱ्या नाहीत; साक्षात्कार, ईश्वरी अस्तित्व यांचेच तुम्हाला मोल आहे. मात्र ते तुम्हाला तुमच्या प्रार्थनेमधून गवसत नव्हते. परंतु निव्वळ प्रार्थनेद्वारे या गोष्टी लगेचच प्राप्त होतील, असे सहसा घडत नाही. जर का केंद्रामध्ये ज्वलंत श्रद्धा असेल किंवा अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये परिपूर्ण श्रद्धा असेल तरच तसे घडून येते. परंतु ह्याचा अर्थ असा मुळीच होत नाही की, ज्यांची श्रद्धा तितकी खंबीर नाही, किंवा ज्यांचे समर्पण परिपूर्ण नाही ते तिथवर पोहोचूच शकत नाहीत. परंतु मग बहुतेक वेळा, त्यांना आधी छोट्या छोट्या पायऱ्या पार कराव्या लागतात; आणि जोवर प्रयत्नसातत्याद्वारे किंवा तपस्येद्वारे पुरेसे खुलेपण प्राप्त होत नाही तोवर, त्यांच्या प्रकृतीच्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. अगदी डळमळणारी श्रद्धा आणि संथ, आंशिक समर्पण ह्यांचीसुद्धा स्वत:ची म्हणून काहीएक शक्ती असते, त्यांचे स्वत:चे असे काही परिणाम असतात. तसे नसते तर, अगदी मोजक्याच लोकांना साधना करणे शक्य झाले असते. केंद्रवर्ती श्रद्धा म्हणजे वर किंवा मागे असलेल्या आत्म्याच्या केंद्रवर्ती अस्तित्वावर श्रद्धा असे मला म्हणावयाचे आहे. ही अशी श्रद्धा असते की, जेव्हा मन शंका घेते, प्राण खचून जातो, आणि शरीर ढासळू पाहते तेव्हाही ही श्रद्धा टिकून असते. आणि जेव्हा हा हल्ला संपतो, तेव्हा ही श्रद्धा पुन्हा उसळून येते आणि पुन्हा एकदा मार्गावर वाटचाल करण्यास व्यक्तीला प्रवृत्त करते. ती बळकट आणि तेजस्वी असू शकते, ती फिकी, दिसायला दुबळी अशी असू शकते; पण तरीदेखील ती प्रत्येक वेळी सतत टिकून राहिली तर, मग ती खरीखुरी श्रद्धा होय. निराशा आणि अंधकाराचे झटके ही साधनामार्गावरील एक परंपराच आहे. पौर्वात्य आणि पाश्चात्त्य योगमार्गांमध्ये तो जणू काही एक नियमच असल्यासारखे दिसते. मला ते स्वतःलादेखील ज्ञात आहे. पण माझ्या अनुभवातून मला असे उमगले की, ह्या अनावश्यक परंपरा आहेत आणि व्यक्तीने जर ठरविले तर, व्यक्तीची त्यापासून सुटका होऊ शकते. म्हणूनच जेव्हा केव्हा या गोष्टी तुमच्यामध्ये किंवा इतरांमध्ये आलेल्या मला आढळतात, तेव्हा मी त्यांना श्रद्धेच्या शिकवणीपुढे उचलून घेऊ पाहतो. आणि तरीसुद्धा जर निराशा आणि अंधकाराचे झटके आलेच तर, व्यक्तीने शक्य तितक्या त्वरेने त्यातून बाहेर पडावे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात पुन्हा यावे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 95-96)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

स्वत:ला न फसविणे अवघड

  व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…

6 hours ago

प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन

  आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…

1 day ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४

  (भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…

2 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०३

  (भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…

3 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०२

  भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…

4 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०१

  साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…

5 days ago