प्रार्थना – ०३
हे ईश्वरा, जरी एखाद्याने नीरव एकांतवासामध्ये, पूर्ण समाधी अवस्था प्राप्त करून घेतली तरी ती अवस्था त्याने स्वत:च्या शरीरापासून स्वत:स विलग करून, शरीराची उपेक्षा करून मिळविलेली असते आणि त्यामुळे ज्या घटकांनी देह बनलेला असतो ते घटक तसेच अशुद्ध, आधीइतकेच अपूर्ण राहून जातात, कारण त्याने त्यांना तसेच सोडून दिलेले असते. आणि गूढवादाची शिकवण चुकीच्या रीतीने आकलन झाल्यामुळे, अतिभौतिकाच्या वैभवाने मोहित होऊन, स्वतःच्या वैयक्तिक समाधानासाठी जेव्हा तुझ्याशी एकत्व पावण्याची अहंभावी इच्छा तो बाळगतो, तेव्हा त्याने त्याच्या पार्थिव अस्तित्वाच्या मूळ कारणाकडेच पाठ फिरविलेली असण्याची शक्यता असते. ‘जडभौतिकाचे शुद्धीकरण आणि त्याचा उद्धार’ हे त्याचे खरे जीवितकार्य पूर्ण करण्यास, त्याने एखाद्या भित्र्या माणसाप्रमाणे नकार दिलेला असू शकतो. आपल्या अस्तित्वातील एखादा भाग हा संपूर्णत: शुद्ध झाला आहे हे जाणणे, त्या शुद्धतेशी संबंध प्रस्थापित करणे, त्याच्याशी एकत्व पावणे हे सारे तेव्हाच उपयुक्त ठरू शकते, जेव्हा हे ज्ञान या पृथ्वीचे रूपांतरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्वरा करण्यासाठी, म्हणजेच तुझे उदात्त कार्य पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणले जाते.
– श्रीमाताजी
(CWM 01 : 20)
- महाकालीचे प्रहार - May 25, 2026
- महाकालीचे प्रहार, प्रामाणिकपणा आणि प्रगती - May 24, 2026
- संकटे येण्याचे कारण - May 23, 2026





