आजारपणाची भावना ही सुरुवातीला फक्त एक सूचना या स्वरूपाची असते; तुमच्या शारीर जाणिवेने तिचा स्वीकार केल्यामुळे ती वास्तविकता बनते. मनात उठणाऱ्या चुकीच्या सूचनेसारखीच ही गोष्ट असते. जर मनाने तिचा स्वीकार केला तर, मनावर मळभ येते आणि ते गोंधळून जाते आणि प्रसन्नता व सुसंवाद परत लाभावा म्हणून त्याला झगडावे लागते. तीच गोष्ट शारीरिक जाणीव आणि आजारपणालाही लागू पडते.

तुम्ही आजारपणाची सूचना स्वीकारता कामा नये; एवढेच नव्हे तर, तिला तुमच्या शारीरिक मनामधून नकार दिला पाहिजे आणि ती सूचना धुडकावून देण्यास शारीरिक जाणिवेला मदत केली पाहिजे. आवश्यकता असेल तर, ”मी पूर्णपणे निरोगी राहीन, मी स्वस्थ, सुरक्षितच आहे आणि सुरक्षितच राहीन,” अशी प्रति-सूचना करा. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आजारपणाची सूचना आणि त्या सूचनेमुळे येणारे आजारपण, फेकून देण्यासाठी श्रीमाताजींच्या शक्तीचा धावा करा.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 555)

“आजारपणाची सूचना’ या शब्दांमधून मला केवळ विचार वा शब्दच अभिप्रेत नाहीत. जेव्हा संमोहनकार, “झोपा” असे म्हणतो, तेव्हा ती सूचना असते; परंतु जेव्हा तो काहीही बोलत नाही तर, तुम्ही झोपावे म्हणून तो त्याची मौन इच्छा संक्रमित करतो, तेव्हा तीदेखील एक प्रकारची सूचनाच असते किंवा तुमच्या चेहऱ्यावर हातांच्या तो ज्या काही हालचाली करतो, तीदेखील एक प्रकारची सूचनाच असते.

जेव्हा एखादी शक्ती तुमच्यावर आघात करते किंवा आजारपणाचे एखादे स्पंदन उमटते तेव्हा त्यातून शरीराला एक प्रकारची सूचना मिळते. एक प्रकारचे स्पंदन, जणू एक लाटच शरीरात घुसते आणि शरीराला तापाची आठवण होते किंवा मग त्याला तापाची जाणीव होऊ लागते अणि मग ते खोकायला लगते, शिंकायला लागते किंवा त्याला थंडी वाजू लागते तेव्हा ”मला बरे वाटत नाहीये, मला अशक्त वाटतंय, मला ताप येणार आहे,” अशा तऱ्हेच्या सूचना मनाला मिळतात.
*

डेंग्यू किंवा एन्फ्लुएंझा होणार अशी वातावरणात एक सर्वसाधारण सूचना असते. या सूचनांमुळे विरोधी शक्तींना तशा प्रकारची लक्षणे घडवून आणणे शक्य होते आणि त्यातून आजाराच्या तक्रारी पसरतात. व्यक्तीने जर अशा सूचना आणि ती लक्षणे या दोन्हींना धुडकावून लावले तर, या गोष्टी प्रत्यक्षात उतरणार नाहीत.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 556-557)

आजारपणातून एकतर, एकप्रकारची अपूर्णता येते किंवा अशक्तपणा येतो नाहीतर मग, शारीरिक प्रकृती विरोधी स्पर्शांसाठी खुली होते. तसेच आजारपण हे बरेचदा कनिष्ठ प्राण किंवा शारीरिक मन किंवा इतरत्र कोठेतरी कोणत्यातरी अंधकाराशी किंवा विसंवादाशीसुद्धा संबंधित असते.

एखादी व्यक्ती जर श्रद्धेच्या जोरावर किंवा योग-सामर्थ्याच्या आधारे किंवा दिव्य शक्तीच्या प्रवाहाद्वारे, आजारापासून पूर्णपणे सुटका करून घेऊ शकत असेल, तर ते खूपच चांगले. पण बरेचदा व्यक्तीची समग्र प्रकृती खुली नसल्यामुळे किंवा ती त्या शक्तीला पूर्णपणे प्रतिसाद देऊ शकत नसल्यामुळे, अशा रीतीने आजाराचा पूर्णतः नायनाट करणे, बरेचदा शक्य होत नाही.

मनामध्ये श्रद्धा असू शकते आणि मन प्रतिसादही देते; मात्र कनिष्ठ प्राण किंवा शरीर त्याचे अनुसरण करत नाहीत. किंवा मन आणि प्राण तयार असतील तर, शरीरच प्रतिसाद देत नाही किंवा ते अंशतःच प्रतिसाद देते, असेही होऊ शकते. कारण एखादा विशिष्ट आजार निर्माण करणाऱ्या शक्तींना प्रतिसाद देण्याची त्याला सवय जडलेली असते अणि सवय ही प्रकृतीच्या जडभौतिक भागामधील सर्वाधिक दुराग्रही शक्ती असते. अशा परिस्थितीमध्ये, भौतिक उपायांवर विसंबणे चालू शकते – अर्थात मुख्य उपाय म्हणून नाही, तर त्या शक्तीच्या कार्यासाठी एक प्रकारचे भौतिक साहाय्य किंवा मदत म्हणून! खूप कडक आणि जालीम उपायांची मदत घेऊ नये तर, जे शरीराला हानीकारक न होता, उपायकारक होतील अशाच उपायांची मदत घ्यावी.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 580)

(श्रीअरविंद यांच्या पत्रामधून)

शरीर हे काही वस्त्रासारखे नाही; किंवा आजारी शरीर हे देखील फाटक्या वस्त्राप्रमाणे नाही. शरीर जरी दुर्बल किंवा आजारी पडले तरी ते स्वतःला परत पुनरुज्जीवित करू शकते, त्याची प्राणिक शक्ती ते परत मिळवू शकते, हे असे हजारो लोकांच्या बाबतीत घडत असते. पण कापडामध्ये मात्र पुनरुज्जीवन करणारी जीवनशक्ती नसते. व्यक्ती जेव्हा पंचावन्न किंवा साठ वर्षे वयाच्या पलीकडे जाते तेव्हा हे पुनरुज्जीवन अवघड होऊन बसते; परंतु अगदी तेव्हासुद्धा आरोग्य आणि शक्ती कायम राखता येते किंवा शरीर सुस्थितीत राखण्यासाठी ते पुन्हा होते तसे होऊ शकते.

तुम्हाला आंतरिक अस्तित्व या शब्दांनी नेमके काय म्हणावयाचे आहे ते मला उमगले नाही. जर तुम्हाला ‘विकास’ या शब्दांनी साधनेचा विकास अभिप्रेत असेल तर, त्यासाठी आरोग्याची पुन्हा प्राप्ती आणि सामर्थ्य आवश्यक आहे. मन आणि प्राणाप्रमाणेच शरीर हे पण साधनेसाठी आवश्यक असे साधन आहे आणि होता होईल तितके ते सुस्थितीत राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आंतरिक अवस्थेच्या तुलनेत त्याला काही फारसे महत्त्व नाही असे समजून, त्याची हेळसांड करणे, हा काही या (पूर्ण)योगाचा नियम नाही.

(CWSA 31 : 558)

शिष्य : एका विधानाची सध्या इथे चर्चा आहे. त्यात असे म्हटले आहे की, “नुकतेच ह्या विजयाच्या बरोबरीने जे काही घडले आहे, ते केवळ अवतरण नव्हते तर ते आविष्करण होते. आणि एखाद्या व्यक्तिगत घटनेपेक्षा त्याचे मोल अधिक आहे : कारण अतिमनाचा वैश्विक लीलेमध्ये उदय झालेला आहे.”

श्रीमाताजी : हो, हो. खरंतर मीच हे सारे म्हटले होते.

शिष्य : ते म्हणतात की, अतिमानस तत्त्व आता कार्यरत झाले आहे…

श्रीमाताजी : ….प्रथम जाणिवेचे आरोहण होते, नंतर जाणीव तेथील ‘सद्वस्तु’ ग्रहण करते आणि तिला घेऊन खाली येते. ही ‘व्यक्तिगत’ घटना असते. मी ह्याला ‘अवतरण’ म्हणते.

परंतु, हीच व्यक्तिगत घटना जेव्हा अशा रीतीने घडून येते की, ज्यामुळे सार्वत्रिक स्तरावरील शक्यता निर्माण होण्यास ती पुरेशी आहे असे सिद्ध होते, तेव्हा ते केवळ ‘अवतरण’ नसते तर ते ‘आविष्करण’ असते.

ज्याला मी अवतरण म्हणते ती व्यक्तीच्या जाणिवेमध्ये घडून आलेली, व्यक्तिगत क्रिया असते. पण जर उदाहरणच द्यावयाचे झाले तर, जेव्हा मन या पृथ्वीतलावर प्रसृत झाले होते त्याप्रमाणे, या जुन्या विश्वामध्ये, एखादे नवीनच विश्व आविष्कृत होते, तेव्हा त्याला मी ‘आविष्करण’ म्हणते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 133)

…एका नूतन विश्वाचे आगमन, अतिमानस विश्वाचे आगमन साजरे करणे हे एक अद्भुत आणि अपवादात्मक भाग्य आहे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 98)

पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये श्रीमाताजी पाँँडिचेरी येथे राहात होत्या, तेव्हाची गोष्ट त्या कथन करत आहेत.. “मी तेव्हा ड्युप्लेक्स स्ट्रीटवर राहत असे आणि समोरच्या बाजूला गेस्ट हाऊसमध्ये श्रीअरविंदांची खोली होती. श्रीअरविंदांच्या खोलीकडे तोंड करून, सकाळच्या वेळी, मी ध्यानाला बसत असे. अशीच एकदा मी माझ्या खोलीत बसून ध्यान करत होते, पण माझे डोळे मिटलेले नव्हते.

माझ्या खोलीत काली प्रवेश करत असलेली मला दिसली, तेव्हा मी तिला विचारले, “तुला काय हवे आहे?”

ती अगदी रौद्ररूपात नृत्य करत होती. ती मला म्हणाली, “मी पॅरिस घेतले आहे; आणि आता लवकरच पॅरिसचा विनाश होईल.”

तेव्हा आमच्यापर्यंत युद्धाच्या बातम्या पोहोचत नसत. मी तेव्हा ध्यानातच, अगदी शांतपणे, पण खंबीरपणे तिला म्हटले, ”नाही, पॅरिस घेता येणार नाही, पॅरिस वाचेल.” तेव्हा तिने वेडीवाकडी तोंडं केली पण ती निघून गेली.

आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला तार मिळाली; त्यात लिहिले होते, जर्मन सैन्य पॅरिसच्या दिशेने कूच करत होते, पण पॅरिसचे रक्षण करण्यास तेथे कोणीच नव्हते, काही किलोमीटर ते पुढे गेले असते तर, आख्खे पॅरिस त्यांना हस्तगत करता आले असते. परंतु रस्ते मोकळे आहेत हे पाहिल्यावर तसेच, सैन्याला विरोध करण्यासाठी कोणीच नाही हे लक्षात आल्यावर, त्यांची अशी खात्रीच पटली की, काहीतरी घातपात दिसतो आहे, काहीतरी व्यूहरचनेचा हा भाग दिसतोय…असे वाटून त्यांनी पाठ फिरवली आणि आल्या पावली जर्मन सैन्य चालू पडले. आणि जेव्हा फ्रेंच सैन्याच्या हे लक्षात आले तेव्हा त्यांनी त्या सैन्याचा पाठलाग केला आणि मग निर्णायक लढाई झाली. त्यांना रोखण्यात आले होते.

हो, निश्चितच, हा त्याचाच परिणाम होता….कारण, जर त्यांना ह्याप्रकारे रोखले गेले नसते तर, भलतेच काहीतरी विपरित घडले असते..”

– श्रीमाताजी

(CWM 06 : 68-69)

श्रीमाताजी म्हणतात : दि. ०१ जानेवारी १९६९ रोजी मध्यरात्री दोन वाजताचा प्रहर होता… अतिमानवी चेतना पृथ्वी चेतनेमध्ये अवतरली आणि प्रस्थापित झाली. चेतना, ऊर्जा, शक्ती, प्रकाश, आनंद आणि शांती यांनी परिपूर्ण भरलेले असे ते अद्भुत अवतरण होते आणि त्याने संपूर्ण पृथ्वीचे वातावरण भरून गेले. सद्यकालीन मनोमय चेतना आणि अतिमानसिक चेतना यांच्या मधील हा एक दुवा आहे असे मला जाणवले. ही अतिमानवाची चेतना अवतरित होत होती. जी अजूनही मानवाची चेतनाच आहे परंतु अधिक विस्तृत श्रेणीतील, अधिक सामर्थ्यशाली, पण अतिमानसिक जीवामध्ये रुपांतरित झालेली नाही, अशी ही चेतना आहे. आता ही अतिमानवी चेतना पृथ्वी-चेतनेमध्ये फक्त अवतरित झालेली आहे असे नाही, तर ती तेथे प्रस्थापित झाली आहे आणि पूर्णपणे कार्यकारी झाली आहे.

(The Spirit of Auroville by Huta : 82)

*

ह्या अनुभवानंतर भौतिकदृष्ट्या व आध्यात्मिक दृष्ट्या कोणते बदल घडून आले, यासंबंधी श्रीमाताजींनी एका निकटवर्ती शिष्याकडे केलेले हे भाष्य –

‘ऊर्ध्वस्थित असणाऱ्या गोष्टी सर्वोत्तम आहेत, तिथे तुम्हाला चांगले चांगले अनुभव, तेजोमय, अद्भुत असे सगळे अनुभव येतील, पण इथे? इथे मात्र काहीच नाही,’ – ही मनाने पूर्वापार केलेली विभागणी होती. आणि मग एखादा जन्माला येतानाच ‘हे जग आशाहीन आहे’ ह्या धारणेनेच पुन्हा या जगतामध्ये जन्माला येतो.

ह्यावरूनच असे स्पष्ट होते की, यापेक्षा काही निराळे असू शकते ह्याची कल्पनादेखील ज्यांच्या मनाला शिवली नसेल अशी माणसे म्हणतात, “या जगामधून निघून जाणेच योग्य आहे….”

मला सारे काही स्पष्ट झाले ! परंतु आता ह्या घटनेमुळे, येथून सुटका करून घ्यायलाच हवी, असे ते जग अजिबात राहिले नाही. आणि हा मोठाच विजय आहे : सुटका करून घेणे यापुढे आवश्यक नाही. तुम्हाला ते जाणवते, दिसते आणि ते या देहाने स्वत:च अनुभवले आहे – ती शक्यता लवकरच, अगदी इथे देखील प्रत्यक्षात येईल, गोष्टी अधिक सत्यतर होत जातील.

असे काही आहे…. असे काही आहे की, ज्यामुळे ह्या विश्वामध्ये निश्चितपणे काहीतरी बदलले आहे.

अर्थातच, गोष्टी खऱ्या अर्थाने प्रस्थापित होण्यासाठी, काही कालावधी निश्चितच लागणार. तीच तर लढाई चालू आहे. ‘बाह्यत: काहीच बदललेले नाही’, असे सांगण्यासाठीच जणू काही प्रत्येक बाजूने, प्रत्येक पातळीवर, सर्व बाजूंनी गोष्टींचा मारा होत आहे, पण ते खरे नाही. ते खरे नाही, या शरीराला माहीत आहे की, हे खरे नाहीये.

श्रीअरविंदांनी Aphorisms मध्ये जे लिहिले आहे, तसे ते आत्ता मला दिसते आहे, ती केवढी भविष्यवाणी होती…. त्या सत्यवस्तूचे त्यांना झालेले ते दर्शन होते, ते केवढे भविष्यसूचक होते !

मला आता समजते आहे, त्यांचे महानिर्वाण आणि त्यांचे कार्य…. इतके अफाट, आणि तेही सूक्ष्म भौतिकातील कार्य, त्याची इतकी, इतकी मदत झाली आहे ना ! त्यांनी केवढी… (जणू एखादे जडद्रव्य मळत आहेत, याप्रमाणे श्रीमाताजी हाताने दर्शवितात) …गोष्टी घडविण्यासाठी केवढी मदत केली आहे, या भौतिकाची रचनाच बदलण्यासाठी केवढी तरी मदत केली आहे.

उच्चतर जगतांशी संपर्क साधण्याचा आजवर ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतला, त्या सर्वांनी या ‘भौतिका’ला मात्र ते जसे आहे तसेच सोडून दिले…. म्हणूनच ही सगळी वर्षे तयारी करण्यामध्ये आणि तयारीमध्येच खर्ची पडली – स्वत:ला खुले करावयाचे आणि तयारी करावयाची – आणि हे अलीकडचे काही दिवस तर… देहाने ‘भौतिक’ दृष्ट्यासुद्धा ही नोंद घेतली आहे की, गोष्टी बदलल्या आहेत. त्यावर अजून काम व्हावे लागेल, प्रत्येक तपशीलानिशी गोष्टी प्रत्यक्षात आणाव्या लागतील, पण बदल घडून आला आहे, बदल झाला आहे.

भौतिक परिस्थितीतून सुटकाच नाही; (श्रीमाताजी मूठ घट्ट आवळून दाखवितात) ती मनुष्याला अगदी घट्ट बांधून ठेवते अशी, समजूत मन तिच्याविषयी करून घेते. ही समजूत इतकी दृढ असते की, ज्यांनी ज्यांनी उच्चतर जगतांचा जिवंत अनुभव घेतला होता, त्यांना असे वाटत होते की, जर एखाद्याला खरोखरच सत्यामध्ये जीवन जगावयाचे असेल, तर त्याने या जगापासून पळून जायला हवे, ह्या जडभौतिक जगाचा त्यागच करावयास हवा : (अशा प्रकारच्या सर्व सिद्धान्तांचा, श्रद्धांचा आधार हाच तर आहे), पण आता गोष्टी तशा उरलेल्या नाहीत. आता गोष्टी तशाच राहिलेल्या नाहीत.

जडभौतिक हे आता उच्चतर प्रकाश, सत्य, सत्यचेतना ग्रहण करण्यासाठी आणि त्याचे ‘आविष्करण’ करण्यासाठी सक्षम झाले आहे.

हे सोपे नाही, त्याला चिकाटी, इच्छाशक्तीची आवश्यकता आहे; पण एक दिवस असा येईल की, हे सारे सहज स्वाभाविक होईल. केवळ एक दरवाजा उघडायचा अवकाश – बस, इतकेच; आता आपल्याला फक्त पुढे चालून जायचे आहे.

(Conversation with a Disciple, March 14, 1970)