अतिमानवतेविषयीचे गैरसमज : अतिमानवाच्या ध्येयाविषयी अलीकडेच लोकांचे विशेष लक्ष वेधले जाऊ लागले आहे. त्यामध्ये निष्फळ चर्चेचाच भाग अधिक आहे आणि मोठ्या प्रमाणात कुचेष्टेचा सूर आहे. सर्वसामान्य माणसांमध्ये त्याबद्दल एक प्रकारची अढी असणे स्वाभाविकच आहे, कारण त्यांना असे सांगण्यात आले आहे किंवा त्यापाठीमागे अशी एक छुपी जाणीव आहे की, जेथवर बहुसंख्य लोक जाऊन पोहोचण्यासाठी सक्षम नाहीत, अशा उंचीवर आम्ही काही थोडे जणच चढू शकतो; नैतिक आणि आध्यात्मिक विशेषाधिकार आमच्याकडे एकवटलेले आहेत; प्रसंगी मानवजातीच्या स्वातंत्र्यावर गदा आणू शकतील आणि मानवाच्या विस्मृत सन्मानाला हानिकारक ठरू शकेल असे वर्चस्व भोगण्याचा आम्हाला अधिकार आहे; इतकी सत्ता आमच्या हाती एकवटली आहे आणि त्यांचा उपभोग घेण्याचा आम्हाला विशेषाधिकार आहे, असा काही जण दावा करीत असतात. तसे पाहिले तर मग, सामान्यत: मानवी गुणांच्या आधारावर, जो अहंकार फुलतो, त्यालाही मागे टाकणारा, अतिमानवपणा हा एक प्रकारचा एक विरळा किवा एकमेवाद्वितीय असा अहंकारच आहे, त्यापेक्षा अधिक काही महत्त्वाची गोष्ट नाही, असा समज होईल. परंतु ही मांडणी खूप संकुचित आहे; किंबहुना ते एक प्रकारचे विडंबन आहे असे म्हणावे लागेल.
अतिमानवतेचे सत्य : वास्तविक, खऱ्याखुऱ्या अतिमानवतेचे पूर्णसत्य आपल्या प्रागतिक मानववंशाला एक उदार ध्येय पुरविते; पण त्याचे पर्यवसान एखाद्या वर्गाच्या किंवा काही व्यक्तींच्या उद्दाम दाव्यामध्ये होता कामा नये.
निसर्गाच्या विचारमग्नतेचा परिणाम म्हणून विश्व-संकल्पनेचा जो सातत्यपूर्ण चक्राकार विकास चालू आहे त्यामध्ये, मानवाच्या पुढची जी अधिक श्रेष्ठ अशी श्रेणी उत्क्रांत होणार आहे, तिचे अर्धेमुर्धे दर्शन आधीच झालेले आहे.
आपल्याहून अधिक श्रेष्ठ अशी जी प्रजाती उत्क्रांत व्हावयाची आहे त्यामध्ये स्वत:हून जाणिवपूर्वकतेने सहभागी व्हायची हाक आजवर या पार्थिव जीवनाच्या इतिहासात कोणत्याही प्रजातींना आलेली नाही, किंवा तसे करण्याची आकांक्षाही कोणी आजवर बाळगली नाही. मानवाला मात्र ही हाक आलेली आहे.
ह्या (अतिमानवाच्या) संकल्पनेचा आपण जेव्हा विचार करू लागतो, तेव्हा लक्षात येते की, आपल्या मानववृद्धीच्या भूमीमध्ये, विचाराच्या माध्यमातून, जेवढे सकस बियाणे पेरणे शक्य होते, त्यापैकी सर्वात जास्त सकस बियाणे ते हेच; ही संकल्पना हेच ते सकस बियाणे आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 13 : 151)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…