प्रश्न : चैत्य पुरुष जागृत करण्याची प्रभावी साधना कोणती?

श्रीमाताजी : तो जागृतच आहे; तो टक्क जागा आहे. आणि तो जागा आहे, एवढेच नाही तर, तो सक्रिय आहे, एवढेच की, तुम्हाला त्याची जाणीव नाही. तुम्हाला तो संवेदित होत नसल्यामुळे तुम्हाला तो झोपला आहे असे वाटते.

मूलत: ह्या चैत्य पुरुषाची आंतरिक इच्छा जर मानवामध्ये नसती तर, मला वाटते मनुष्यमात्र हा अगदीच निराश, मंद झाला असता, तो जवळजवळ प्राण्यासारखेच जीवन जगला असता. अभीप्सेची प्रत्येक चमक ही त्या चैत्य प्रभावाची अभिव्यक्ती असते. जर चैत्याचे अस्तित्वच नसते, चैत्याचा प्रभाव नसता तर, माणसामध्ये प्रगतीची जाणीव किंवा प्रगतीची इच्छाच कधी निर्माण झाली नसती.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 165)

सामान्यत: म्हणजे सर्वसामान्य जीवनामध्ये, व्यक्तीचा चैत्य पुरुषाशी संबंध हा जवळपास नसल्यासारखाच असतो. सर्वसामान्य जीवनामध्ये ज्याचा चैत्य पुरुषाशी जागृत संपर्क आहे, अगदी क्षणभरापुरता का असेना, पण ज्याचा असा संपर्क आहे अशी व्यक्ती लाखांमध्ये एकसुद्धा सापडत नाही.

चैत्य पुरुष हा आतून कार्य करू शकतो, पण बाह्य व्यक्तित्वाच्या दृष्टीने, ते कार्य तो इतका अदृश्यपणे आणि इतक्या नकळतपणे करतो की, जणू चैत्य पुरुष त्यांच्या दृष्टीने अस्तित्वातच नसतो. बहुतांशी उदाहरणांमध्ये, अगदी खूप मोठ्या प्रमाणावर, जवळपास सर्वच उदाहरणांमध्ये तो जणू सुप्त असतो, अजिबात सक्रिय नसतो.

स्वत:च्या चैत्य पुरुषाशी जागृत संपर्क प्रस्थापित करणे, हे एखाद्या व्यक्तीला पुष्कळ साधनेमधून आणि खूपशा चिवट प्रयत्नांमधूनच शक्य होते. स्वाभाविकपणेच, अशीही काही अपवादात्मक उदाहरणे असतात – परंतु ती खरोखरच अगदी अपवादात्मक असतात आणि ती इतकी कमी असतात की, ती हाताच्या बोटांवर मोजता येण्याजोगी असतात – जिथे चैत्य पुरुषाची पूर्णत: घडण झालेली आहे, जो मुक्त आहे, जो स्वत:चा स्वामी आहे, आणि ज्याने स्वतःचे कार्य पूर्ण करण्यासाठी मानवी देहामध्ये या पृथ्वीवर परतून यायचा निर्णय घेतलेला आहे, अशी उदाहरणे अगदीच अपवादात्मक असतात. आणि अशा उदाहरणांच्या बाबतीत, जरी त्या व्यक्तीने जाणिवपूर्वकपणे साधना केली नाही तरीही, चैत्य पुरुष इतका शक्तिशाली असू शकतो की, तो कमीअधिक जाणिवयुक्त नाते प्रस्थापित करू शकतो.

परंतु अशी उदाहरणे इतकी अद्वितीय असतात, इतकी दुर्मिळ असतात की, त्या अपवादात्मक उदाहरणांनी नियमच सिद्ध होतो. बाकी सर्वच बाबतीत, सर्वच उदाहरणांमध्ये, चैत्य पुरुषाची जाणीव होण्यासाठी खूप खूप सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते.

सहसा असे मानण्यात येते की, व्यक्तीला जर ते तीस वर्षात साध्य करता आले, तीस वर्ष सातत्यपूर्ण प्रयत्नांनी हं, जर ते करता आले तर ती व्यक्ती अत्यंत भाग्यवान गणली जाते. आणि जर असे घडले तर तेही लवकरच घडले, असे म्हणावे लागेल. पण हे सुद्धा इतके दुर्मिळ आहे की, एखादा लगेचच म्हणतो की, “तो कोणीतरी असामान्य माणूस दिसतोय.” जे फार मोठे योगी असतात, ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे, जे कमी अधिक दिव्य जीव मानले जातात, त्यांच्याबाबतीत हे असे घडते.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 269)

(श्रीमाताजींनी शारीरिक, प्राणिक आणि मानसिक निरीक्षणाविषयी विवेचन केले आहे. त्यानंतर एकाने पुढील प्रश्न विचारला आहे.)

प्रश्न : चैत्यामध्ये निरीक्षण शक्ती असते का?

श्रीमाताजी : त्यामध्ये निरीक्षण क्षमतेपेक्षाही अधिक काही असते. वस्तुंबाबतची थेट दृष्टी तेथे असते. ज्यामध्ये वस्तु प्रतिबिंबित होतात अशा आरशासारखी ती असते, मग त्या वस्तु कोणत्याही का असेनात. आणि सर्वसाधारणत: जी मुले, जी अजूनही निष्पाप असतात, त्यांच्यामध्ये एक प्रकारची संवेदनशीलता स्पष्टपणे आढळून येते.

उदाहरणार्थ, त्यांच्याजवळ जी माणसं येतात त्यांच्या वातावरणाबद्दल अशी मुलं खूप संवेदनशील असतात. काही मुलं कोणतेही कारण नसताना देखील एखाद्या व्यक्तीकडे झेपावतात आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीपासून दूर पळतात. तुमच्या दृष्टीने ती दोन्ही माणसं सारखीच चांगली किंवा सारखीच वाईट असतात, तुम्हाला त्यात कोणताही फरक जाणवत नाही.

पण ही मुलं मात्र त्यातल्या एखाद्या व्यक्तीकडे ताबडतोब आकर्षित होतात आणि दुसऱ्या व्यक्तीबाबत मात्र, तुम्ही कितीही प्रयत्न करा, ती भोकाड पसरतील, रडतील, किंवा त्या व्यक्तीपासून पळून जातील, पण ती मुलं त्या व्यक्तीकडे जाणार नाहीत. हे आकर्षण किंवा प्रतिकर्षण म्हणजे अज्ञानाच्या जाणिवेमध्ये, चैत्य लक्षणाचा झालेला एक प्रकारचा अनुवाद असतो. त्या व्यक्तींच्या चैत्य लक्षणाचे थेट दर्शन त्या बालकाला झालेले असते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 08-09)

तुम्ही लहान मुलांच्या डोळ्यांत लक्षपूर्वक पाहा, तेथे तुम्हाला एक प्रकारचा प्रकाश दिसेल – काहीजण त्याचे वर्णन निष्पाप असे करतात – परंतु तो प्रकाश खूप खरा असतो, खूपच सत्य असतो, जो या जगाकडे आश्चर्याने टुकूटुकू पाहत असतो.

ही आश्चर्याची भावना, ही चैत्याची (Psychic) आश्चर्यभावना असते, की जी सत्य पाहू शकते पण तिला या जगाविषयी फारसे काही अवगत नसते, कारण ती त्या पासून खूप खूप दूर असते.

लहान मुलांमध्ये ती आश्चर्यभावना असते; परंतु जसजशी मुले शिकू लागतात, अधिकाधिक बुद्धिमान, अधिकाधिक शिक्षित होतात, तसतशी ही आश्चर्यभावना मागे पडत जाते आणि मग त्यांच्या डोळ्यांमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टी म्हणजे विचार, इच्छा-वासना, आवेग, दुष्टपणा अशा साऱ्या गोष्टी दिसू लागतात. तेव्हा मात्र, अत्यंत शुद्ध असणारी ही छोटीशी ज्योत, तेथे असत नाही. अशावेळी तुम्ही निश्चितपणे समजा की, तेथे ‘मना’चा प्रवेश झालेला आहे आणि ‘चैत्य’ हा खूप दूरवर मागे लोटला गेला आहे.

– श्रीअरविंद
(CWM 04 : 26-27)

श्रीअरविंद त्यांच्या आजीआजोबांविषयीची एक गोष्ट सांगत असत.

त्यांची आजी एकदा म्हणाली, “देवाने हे इतके वाईट जग का बनविले आहे? मी जर त्याला भेटू शकले तर तो भेटल्यावर त्याच्याविषयी मला काय वाटते ते मी त्याला सांगणार आहे.”

त्यावर आजोबा म्हणाले, “हो बरोबर आहे. पण देवाने अशी नामी व्यवस्था करून ठेवली आहे की, जोवर तुमच्यामध्ये अशा व इतर प्रकारच्या कोणत्याही इच्छा शिल्लक आहेत तोवर तुम्ही त्याच्याजवळ जाऊच शकत नाही.”

– श्रीअरविंद
(Evening talks with Sri Aurobindo)

जे अस्तित्व आपल्यामधील इतर सर्व बाबींना आधार पुरविते आणि जन्म आणि मृत्युच्या फेऱ्यांमधूनही जे टिकून राहते अशा आपल्यातील ईश्वरांशाला, सहसा आपल्या योगामध्ये ‘केंद्रवर्ती अस्तित्व’ अशी संज्ञा वापरण्यात येते.

केंद्रवर्ती अस्तित्वाची दोन रूपे असतात – वरच्या भागात असणारे अस्तित्व म्हणजे जीवात्मा, आपले सत् अस्तित्व. आपल्याला जेव्हा उच्चतर असे आत्म-ज्ञान प्राप्त होते तेव्हा, आपल्याला ह्या अस्तित्वाची जाण येते. खालील भागात, मन, प्राण व शरीर यांच्या पाठीशी उभा असतो तो चैत्य पुरुष.

जीवात्मा हा जीवनामध्ये होणाऱ्या आविष्करणाच्या वर असतो आणि तेथून तो जीवनाचे संचालन करत असतो. तर चैत्य पुरुष हा मागे उभा राहून जीवनाच्या आविष्करणाला आधार पुरवीत असतो.

आपण बालक आहोत, ईश्वराचे मूल आहोत, भक्त आहोत असे वाटणे हा, चैत्य पुरुषाचा स्वाभाविक दृष्टिकोन असतो. चैत्य पुरुष हा ईश्वराचाच एक अंश असतो, तत्त्वत: तो एकच असतो परंतु या आविष्करणाच्या गतिविधींमध्ये या एकत्वामध्येही नेहमीच भिन्नता आढळून येते. या उलट, जीवात्मा, हा साररूपामध्येच जगत असतो आणि तो ईश्वराच्या एकत्वामध्ये स्वत:चा विलय करू शकतो. पण तो सुद्धा ज्या क्षणी जीवनामधील आविष्करणाच्या गतिविधींचे अध्यक्षपद स्वीकारतो, संचालन करू लागतो, त्या क्षणी तो स्वत:ला विविधरूपी ईश्वराच्या अनेक केंद्रांपैकी आपण केवळ एक केंद्र आहोत असे मानू लागतो, तेव्हा तो स्वत:ला परमेश्वर मानत नाही.

हा भेद लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. नाहीतर, जर का कोठेही थोडा जरी प्राणिक अहंकार असेल तर, व्यक्ती स्वत:ला अवतार समजायला लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 61)

*

आत्मा हा त्याच्या प्रकृतीनुसार एकतर विश्वातीत (परमात्मा) (Transcendent) असतो किंवा वैश्विक (आत्मा) (Universal) असतो. जेव्हा तो व्यक्तिरूप धारण करतो आणि केंद्रवर्ती अस्तित्व बनतो, तेव्हा तो जीवात्मा असतो. जीवात्म्याला विश्वाशी एकत्व जाणवत असते पण त्याचवेळी, ईश्वराचा एक भाग या नात्याने त्याला केंद्रीय पृथगात्मकतेची (central separateness) देखील जाणीव असते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 55)

जर आपली प्रगती समग्रपणे व्हावी अशी आपली इच्छा असेल तर आपल्या चेतनायुक्त अस्तित्वामध्ये आपण एक बलवान आणि शुद्ध मानसिक समन्वय (Mental Synthesis) घडविले पाहिजे की, जे सर्व बाह्य प्रलोभनांपासून आपले संरक्षण करू शकेल, जे आपल्याला इतस्तत: भटकण्यापासून रोखणाऱ्या मैलाच्या दगडाप्रमाणे असेल, जीवनाच्या या हालत्याडुलत्या सागरामधून जे आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवेल.

प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या वृत्तीप्रवृत्तीनुसार, आवडीनिवडीनुसार आणि आकांक्षांनुसार स्वत:ची मानसिक संरचना घडविली पाहिजे. पण जर आपल्याला ती संरचना खरोखरच जिवंत आणि प्रकाशमान अशी हवी असेल तर तिची घडण आपल्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या ईश्वराचे बौद्धिक प्रतिनिधित्व करणाऱ्या संकल्पनेभोवती झाली पाहिजे. तो ईश्वरच आपले जीवन आणि तो ईश्वरच आपला प्रकाश. ही संकल्पना अनेकविध प्रांतांमध्ये, अनेकानेक युगे सर्व महान गुरुंकडून विविध प्रकारे शिकविण्यात आलेली आहे, ती अतिशय उत्कृष्टपणे शब्दबद्ध झालेली आहे.

प्रत्येकाचा आत्मा आणि या विश्वाचा महान आत्मा हे एकच आहेत; (ही ती संकल्पना होय.) आपल्या पूर्वसुरींनी योग्य असेच सांगितले आहे की, आपले मूळ आणि आपण, आपला देव आणि आपण हे एकच आहोत. आणि हे एकत्व म्हणजे एकत्वाचे केवळ कमीअधिक जवळचे, घनिष्ठ नाते आहे असे समजता कामा नये, कारण ते खरोखरच एक आहेत.

जेव्हा माणूस त्या दिव्यत्वाला गवसणी घालू पाहतो तेव्हा तो अप्राप्याच्या दिशेने कलेकलेने उन्नत होत जाण्याची धडपड करू इच्छितो, तेव्हा तो हे विसरून जातो की, त्याच्याकडे असलेला सर्व ज्ञानसाठा आणि त्याच्याकडील अगदी अंतर्ज्ञानसुद्धा त्या अनंताच्या दिशेने जाण्याच्या वाटेवरील एक पाऊलसुद्धा नव्हे. तसेच त्याला ही जाणीवसुद्धा नसते की, जे प्राप्त करण्याची इच्छा तो बाळगत आहे, जे त्याच्यापासून कित्येक योजने दूर आहे असे त्याला वाटत असते, ते त्याच्या स्वत:च्याच अंतरंगामध्ये असते.

जोपर्यंत त्याच्यामध्ये असलेल्या ह्या ‘आद्या’ विषयी तो जागृत होत नाही तोवर त्याला उत्पत्तीविषयी ज्ञान कसे बरे होईल?

स्वत:ला समजून घेतल्यानेच आणि स्वत:ला कसे जाणून घ्यायचे हे शिकल्यानेच तो परमशोध लावू शकतो आणि तो आश्चर्यचकित होऊन बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे त्या कुल-प्रमुखाप्रमाणे म्हणू शकतो, “देवाचे घर हे इथेच तर होते आणि मला ते माहीतही नव्हते.” म्हणून, ज्या शब्दांमुळे स्वर्ग आणि पृथ्वी भरून जातात असा तो, भौतिक जगताच्या निर्मिकाचा ”मी सर्व वस्तुमात्रांमध्ये आणि सर्व जीवांमध्ये आहे;” हा जो परमबोध आहे तो आपण अभिव्यक्त केला पाहिजे; ते शब्द सर्वांना माहीत करून दिले पाहिजेत.

जेव्हा सर्वांना हे सारे ज्ञात होईल तेव्हा, ज्या दिवसाचे आश्वासन आपल्याला देण्यात आले आहे तो रूपांतरणाचा दिवस आपल्या अगदी नजीक आलेला असेल.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 40-41)

जेव्हा भौतिकाच्या प्रत्येक कणाकणामध्ये माणसाला ईश्वराच्या अधिवासाची जाणीव होईल, प्रत्येक प्राणिमात्रामध्ये त्याला ईश्वराच्या अस्तित्वाची काही झलक मिळू शकेल, जेव्हा प्रत्येक माणूस त्याच्या बांधवांमध्ये देवाला पाहू शकेल तेव्हा अरुणोदय होईल, तेव्हा या प्रकृतीला भारभूत झालेले अज्ञान, मिथ्यत्व, दोष, दुःखभोग, अंधकार भेदले जातील. कारण ”सर्व प्रकृती सहन करत आहे आणि शोक करत आहे कारण ती देवाच्या पुत्रांना (मानवांना) साक्षात्कार होण्याची वाट पाहत थांबली आहे.” हा एक असा मध्यवर्ती विचार आहे की जो इतर सर्व विचारांचे प्रतिनिधित्व करतो; सूर्य ज्याप्रमाणे सर्व जीवन उजळवून टाकतो तसा हा विचार कायम आमच्या स्मरणात असला पाहिजे.

म्हणून मी आज तुम्हाला ह्या गोष्टींची आठवण करून दिली. एखाद्या दुर्मिळ हिऱ्याप्रमाणे, खूप मौल्यवान खजिना असल्याप्रमाणे आपण आपल्या हृदयात ह्या विचाराची जपणूक करून मार्गक्रमण केले आणि त्याला त्याचे ज्योतिर्मय करण्याचे व रूपांतरण करण्याचे काम आपल्यामध्ये करू देण्यास मुभा दिली तर आपल्याला हे कळू शकेल की, सर्व वस्तुमात्रांच्या आणि प्राणिमात्रांच्या अंतर्यामी ‘तो’च राहतो आणि ‘त्या’च्या मध्येच या विश्वाचे एकत्व आपण अनुभवू शकतो.

तेव्हा आपल्याला आपली मूर्ख भांडणे, आपल्या छोट्याछोट्या इच्छावासना, आपले अंध रोष, किरकोळ समाधानांमधील बालीशपणा आणि फोलपणा लक्षात येईल; आपल्यातील छोटेछोटे दोष विरघळून जाताना, आपला मंद अहंकार, आपल्या संकुचित व्यक्तिमत्त्वाची तटबंदी कोसळून पडताना आपल्याला दिसेल. आपल्या संकुचित मर्यादा आणि बंधांनी बांधलेल्या अस्तित्वापासून आपली सुटका करत, खऱ्याखुऱ्या आध्यात्मिकतेच्या या उदात्त प्रवाहामध्ये आपले अस्तित्व वाहून जात असल्याचे आपल्याला जाणवेल.

व्यक्तिमधील आत्मा आणि वैश्विक आत्मा हे एकच आहेत; प्रत्येक विश्वामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक वस्तुमध्ये, प्रत्येक कणामध्ये दिव्य अस्तित्व आहे आणि त्याचे आविष्करण करणे हे माणसाचे जीवितकार्य आहे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 40-41)

जो कोणी सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो; सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे ह्या हेतूने, म्हणजेच हे समग्र विश्व अनंतकाळ प्रगत होत आहे ह्याचे उत्तरोत्तर वाढते ज्ञान प्राप्त व्हावे ह्या हेतूने, आजवर त्याला सत्य वाटत होते अशा विचारांचा (जर तशीच आवश्यकता असेल तर,) परित्याग करण्यासाठी जो तयार झाला आहे; तो हळूहळू अधिक गहन, अधिक परिपूर्ण आणि अधिक तेजोमय अशा प्रचंड विचार-पुंजांच्या संपर्कात येतो.

मग पुष्कळशा ध्यानानंतर, मननानंतर, तो शुद्ध बौद्धिक शक्तीच्या महान वैश्विक प्रवाहाच्या थेट संपर्कात येतो आणि त्यानंतर मात्र त्याच्यापासून कोणतेही ज्ञान लपून राहू शकत नाही. त्या क्षणापासून धीरगंभीरपणा – मानसिक शांती – ही त्याचा एक भागच बनून जाते. सर्व प्रकारच्या समजुती, सर्व मानवी ज्ञान, सर्व धार्मिक शिकवण, जे सारे कधीकधी खूपच विरोधाभासात्मक वाटते, त्या साऱ्या पाठीमागील गहन सत्य त्याला जाणवते; त्याच्या दृष्टीपासून काहीच लपून राहू शकत नाही.

अगदी दोष, अज्ञान ह्या गोष्टी सुद्धा त्याला आता अस्वस्थ करत नाहीत, कारण असे कोणा एका अज्ञात अधिकारी व्यक्तीने सांगून ठेवले आहे : जो सत्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे त्याला कोणताही दोष त्रास देत नाही कारण तो हे जाणून असतो की, ”दोष हा सत्याच्या दिशेने चाललेला जीवनाचा पहिलावहिला प्रयत्न असतो.”

अशा परिपूर्ण धीरगंभीरतेच्या स्थितीप्रत पोहोचणे म्हणजे विचारांच्या शिखरावर जाऊन पोहोचणे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 28)

(मनामध्ये यंत्रवतपणे विचारांचा जो गदारोळ चालू असतो, त्याविषयीचे विवेचन केल्यानंतर श्रीमाताजी पुढे सांगत आहेत)

तुमच्यावर आक्रमकपणे चालून येणाऱ्या असंबद्ध विचारांच्या पूराला, त्यांत वस्तुनिष्ठता आणण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने, पद्धतशीरपणे जर का तुम्ही दूर अंतरावर ठेवू शकलात तर, एक नवीनच बाब तुमच्या लक्षात येईल.

तुमच्या असे निदर्शनास येईल की, तुमच्यामधील काही विचार हे इतर विचारांपेक्षा अधिक प्रभावी आहेत, अधिक चिवट आहेत, ते विचार सामाजिक दृष्ट्या उपयुक्त, रीतीपरंपरांशी, नीतिनियमांशी आणि तसेच ह्या पृथ्वीचे आणि मनुष्यमात्राचे नियमन करणाऱ्या कायद्यांशीही संबंधित आहेत. ती तुमची त्या विषयांवरील मतं असतात किंवा तसा तुमचा दावा असतो आणि त्या नुसार वागण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता.

तुमच्या त्या संकल्पनांपैकी एखाद्या संकल्पनेकडे पाहा, तुम्हाला जी जास्त परिचयाची आहे तिच्याकडे पाहा, अगदी काळजीपूर्वक पाहा, एकाग्र व्हा, अगदी पूर्ण प्रामाणिकपणे चिंतन करा, सर्व प्रकारचे पूर्वग्रह शक्य तितके बाजूला ठेवा आणि स्वत:ला विचारा की, या विषयावर तुमचे अमुक एक मत का आहे आणि तमुक एक मत का नाही.

प्रत्येक वेळी उत्तर बहुधा एकच असेल किंवा त्यासारखेच असेल कारण तुमच्या भोवतालच्या परिघात ते मत बहुधा प्रचलित असते आणि ते मत असणे हे चांगले मानले जाते आणि त्यामुळे अनायसे अनेकविध मतभेद, संघर्ष, टिकाटिप्पणी यांपासून तुमची सुटका होते. किंवा मग ते तुमच्या आईचे किंवा वडिलांचे मत असते, त्या विचारांनी तुमचे बालपण घडविलेले असते. किंवा ते मत म्हणजे, तुमच्या तरुणपणी तुम्ही घेतलेल्या धार्मिक म्हणा किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाचा तो स्वाभाविक परिणाम असतो. तो विचार तुमचा स्वत:चा विचार नसतो.

कारण, एखादा विचार तुमचा ‘स्वत:चा’ आहे असे म्हणण्यासाठी, तुमच्या जीवनादरम्यान निरीक्षण, अनुभव वा अनुमानातून, किंवा, अगदी सखोल चिंतनमननातून तयार झालेल्या तुमच्या तर्कशुद्ध विचारविश्वाचा तो एक भाग बनावा लागतो.

मनामध्ये व्यवस्था आणणे

आपल्यामध्ये सदिच्छा आहे आणि पूर्णतया प्रामाणिक असण्याचा आपला प्रयत्न आहे, म्हणजे आपल्या विचारांनुसारच आपल्या कृती असाव्यात असा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे आपल्याला आता हे पटले आहे की, बाहेरून येणाऱ्या मनाच्या दंडकांनुसार आपण कृती करतो; ते दंडक आपण हेतुपुर:सर किंवा जाणीवपूर्वकतेने स्वीकारतो असेही नाही, तर आपल्या जडणघडणीमुळे, शिक्षणामुळे आपल्या नकळत पुन्हा पुन्हा आपण त्यांच्याकडे ओढले जातो, आणि त्या सगळ्यांपेक्षाही सामूहिक सूचनेचा आपल्यावर जबर पगडा असतो; ती सूचना इतकी शक्तिशाली, प्रभावी असते की, तिच्यापासून स्वत:चा बचाव करण्यामध्ये फारच कमी लोक यशस्वी होतात.

आपण प्राप्त करून घेऊ इच्छितो त्या मानसिक पृथगात्मतेपासून (Mental individuality) आपण किती दूर आहोत! आपल्या गतकाळातील इतिहासाने निश्चित केलेली, आणि आपल्या समकालीनांची अंध आणि अनिर्बंध इच्छा ज्यांवर लादली जाते अशी उत्पादने आपण आहोत. हे खूपच दयनीय असे दृश्य आहे… पण आपण खचून जायला नको ; जेवढा जास्त गंभीर आजार आणि उपाय शोधायची निकड जेवढी जास्त, तेवढ्या प्रमाणात आपण अधिक उत्साहाने त्याच्याशी संघर्ष केला पाहिजे.

पद्धत नेहमी एकच असणार : चिंतन, चिंतन आणि चिंतन.

आपण त्या साऱ्या संकल्पना, कल्पना एकापाठोपाठ एक विचारात घेतल्या पाहिजेत आणि आपल्या सर्वसाधारण जाणिवेला, आपल्या तर्कबुद्धीला, समतेच्या सर्वोच्च जाणिवेला स्मरून आपण त्यांचे विश्लेषण केले पाहिजे; आपण आजवर प्राप्त करून घेतलेले ज्ञान आणि अनुभवांचे संचित यांच्या तराजूमध्ये त्यांचे मूल्यमापन केले पाहिजे आणि मग त्यांची एकमेकांबरोबर संगती जुळविली पाहिजे, त्यांच्यामध्ये सुसंवाद प्रस्थापित केला पाहिजे. हे काम नेहमीच अवघड असते कारण अगदी परस्परविसंगत अशा कल्पना आपल्या मनामध्ये शेजारीशेजारी राहू देण्याची खेदजनक प्रवृत्ती आपल्यामध्ये असते.

त्या सर्व कल्पना आपण त्यांच्या योग्य जागी ठेवल्या पाहिजेत, आपल्या आंतरिक कक्षामध्ये सुव्यवस्था निर्माण केली पाहिजे. आणि ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातील खोल्या आवरतो, नीटनेटक्या राखतो त्याप्रमाणे हे काम आपण दररोज केले पाहिजे. कारण मला वाटते, जशी आपण घराची काळजी घेतो किमान तेवढीतरी काळजी आपण आपल्या मनाची घेतली पाहिजे. पण पुन्हा एकदा लक्षात घ्या की, हे कर्म खरेखुरे परिणामकारक होण्यासाठी, मनाची सर्वोच्च, अतीव शांत, अत्यंत प्राजंळ अशी स्थिती आपलीशी व्हावी यासाठी ती कायम टिकवून ठेवण्याची धडपड केली पाहिजे.

ज्या विचारांचे आपण निरीक्षण, विश्लेषण, वर्गीकरण करू इच्छितो ते विचार आपल्यातील आंतरिक प्रकाशाने उजळून निघावेत म्हणून आपण पारदर्शक बनूया. आपल्या स्वत:च्या अगदी क्षुल्लक आवडीनिवडी आणि क्षुद्र वैयक्तिक सोयीसुविधा यांच्या वर उठण्याइतपत आपण नि:पक्षपाती आणि धैर्यशाली बनूया. या विचारांकडे आपण केवळ विचार म्हणूनच, कोणत्याही पूर्वग्रहाविना बघूया.

थोडे थोडे करून, जर वर्गीकरणाच्या या कामात आपण चिकाटी बाळगली तर आपल्या मनांमध्ये प्रकाश आणि सुव्यवस्था घर करून राहतील. पण आपण हे विसरता कामा नये की, आपण भविष्यात प्रत्यक्षात आणू इच्छितो त्याच्या तुलनेत, ही व्यवस्था म्हणजे व्यवस्था नसून सावळा गोंधळच आहे. कालांतराने आपण जो प्रकाश ग्रहण करू शकू त्या प्रकाशाच्या तुलनेत, हा प्रकाश म्हणजे प्रकाश नसून काळोखच आहे.
जीवन हे सतत उत्क्रांत होत आहे; जर का आपण एक जिवंत मानसिकता इच्छित असू तर आपण अविरतपणे प्रगत होत राहिलेच पाहिजे.

हे फक्त प्राथमिक काम आहे. ज्ञानाच्या अनंत स्रोतांशी ज्यायोगे आपला संबंध प्रस्थापित होऊ शकेल अशा खऱ्या विचारांपासून आपण अनंत योजने दूर आहोत.

आपल्या विचारांवर व्यक्तिपर नियंत्रण ठेवता यावे म्हणून आपल्याला द्यावयाच्या क्रमशः प्रशिक्षणातील हे काही थोडेसे प्रयोग आहेत. कारण ज्या कोणाला ध्यान करावयाचे आहे त्याच्यासाठी मानसिक कृतीवर नियंत्रण हे अगदी अनिवार्य आहे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 25-26)