(श्रीअरविंदांना त्यांच्या पूर्वजीवनाविषयी एका शिष्याने प्रश्न विचारला होता, त्याला उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रातील हा मजकूर.)

जर कोणाला लौकिकतेचा त्याग करून, फक्त पारलौकिकतेची निवड करावयाची असेल, आणि त्यात त्याला शांती लाभत असेल तर त्याने तसे खुशाल करावे. शांती लाभावी म्हणून, लौकिकतेचा त्याग करणे मला स्वत:ला आवश्यक वाटले नाही. माझ्या परिघामध्ये मी भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही विश्वांचा समावेश करावा आणि केवळ स्वत:च्या मुक्तीसाठी नव्हे तर, येथील दिव्य जीवनासाठी, दिव्य चेतना आणि दिव्य शक्ती लोकांच्या अंत:करणात व या पार्थिव जीवनात स्थापित करण्याचा प्रयत्न करावा, या दिशेने मी माझ्या योगाकडे वळलो असे मला आढळून आले.

हे ध्येय, इतर ध्येयांसारखेच एक आध्यात्मिक ध्येय आहे असे मला वाटते आणि या जीवनात लौकिक, पार्थिव गोष्टींचा मागोवा घेणे, त्यांचा जीवनात समावेश करणे यामुळे, आध्यात्मिकतेला काळिमा फासला जाईल किंवा त्याच्या भारतीयत्वाला काही बाधा येईल असे मला वाटत नाही. माझा तरी वास्तवाचा आणि या विश्वाचे, वस्तुंचे, ईश्वराचे स्वरूप, याविषयीचा हा अनुभव व दृष्टिकोन राहिलेला आहे. हे त्यांबाबतचे जवळजवळ संपूर्ण सत्य असल्यासारखे मला वाटते आणि म्हणूनच त्याचे अनुचरण करणे ह्याला मी पूर्णयोग म्हणतो.

अर्थातच, एखाद्याला पूर्णतेची ही संकल्पना मान्य नसेल आणि ती तो नाकारत असेल किंवा या लौकिक जीवनाचा संपूर्णतया परित्याग करून, पारलौकिक जीवनावर भर देणाऱ्या आध्यात्मिकतेवर तो विश्वास ठेवत असेल तर तसे करण्यास तो मोकळा आहे, पण तसे असेल तर माझा योग करणे त्याला अशक्य होईल.

माझ्या योगामध्ये, परमात्मलोकाचा, आपल्या भूलोकाचा आणि या दरम्यानच्या सर्व जगतांचा आणि त्यांच्या आपल्या जीवनावरील व भौतिक जगतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा आणि त्यांच्या पूर्ण अनुभवांचा समावेश होतो.

पण हेही शक्य आहे की, आधी केवळ परमपुरुषाच्या साक्षात्कारावर भर द्यायचा किंवा त्याच्या एखाद्या अंगावर भर द्यायचा, जसे की, आपला आणि आपल्या कर्मांचा स्वामी असलेल्या विश्वाधिपती कृष्ण, शिव यांच्या साक्षात्कारावर भर द्यायचा आणि या योगासाठी आवश्यक असे परिणाम साध्य करून घ्यावयाचे आणि नंतर (दिव्य जीवनाकडे वाटचाल आणि आत्म्याचा भौतिक जीवनावर विजय हे ध्येय जर एखाद्याने स्वीकारलेले असेल तर) त्याच्या पूर्ण परिणामांकडे वळणे शक्य आहे. वस्तुविषयक हा अनुभव, अस्तित्वविषयक हे सत्य आणि हा दृष्टिकोन यामुळेच ‘दिव्य जीवन’ आणि ‘सावित्री’ लिहिणे मला शक्य झाले.

ईश्वराचा, पुरुषोत्तमाचा साक्षात्कार ही निश्चितच आवश्यक गोष्ट आहे. पण प्रेम, श्रद्धा, भक्ती यांतून त्या ईश्वराकडे वळणे, स्वत:च्या कर्मांच्या द्वारे त्याची सेवा करणे आणि केवळ बौद्धिक जाणिवेने नव्हे तर, आध्यात्मिक अनुभूतीच्या माध्यमातून त्याला जाणणे ह्यादेखील पूर्णयोगाच्या मार्गावरील आवश्यक गोष्टी आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 35 : 234-235)

श्री अरविंद घोष यांना क्रांतिकार्यासाठी अटक करण्यात आली. तेव्हा ते काहीसे विचलित झाले. पुढील तीन दिवस तसेच निघून गेले; तेव्हा त्यांच्या अंतरंगातून आवाज आला, “थांब आणि काय होते ते पाहा.” मग ते काहीसे शांत, स्थिरचित्त झाले.

त्यांना तेथून अलीपूरच्या तुरुंंगात नेण्यात आले. त्यांना आठवले की, सुमारे महिन्याभरापूर्वीच त्यांना हातातील सर्व कामे बाजूला ठेवून एकांतवासात जाण्याचा आदेश मिळाला होता. पण प्राणप्रिय असलेल्या देशकार्यापासून ते स्वत:ला दूर करू शकले नव्हते. तेव्हा देवाने त्यांना सांगितले, “जी बंधने तोडण्याचे तुझ्यामध्ये सामर्थ्य नव्हते, ती बंधने मी तुझ्यासाठी तोडली आहेत. मला तू काही अन्य कार्य करणे अपेक्षित आहे.” श्रीअरविंदांच्या हाती भगवद्गीता देण्यात आली.

पुढे तुरुंगात फिरण्यासाठी म्हणून त्यांना सकाळी व संध्याकाळी अर्धा तास कोठडीबाहेर सोडण्यात येऊ लागले. ते जेव्हा त्या तुरुंगाच्या उंच भिंतीकडे पाहू लागले तेव्हा, तिच्या जागी त्यांना वासुदेवाचे दर्शन झाले, कोठडीच्या बाहेर ते ज्या झाडाखाली फिरत असत तेथेही त्यांना जाणीव झाली की, ते झाड नसून वासुदेवच आहे. ते झोपत असत त्या कांबळ्यामध्ये तसेच तुरुंगाच्या गजांमध्येदेखील त्यांना वासुदेवाचे दर्शन झाले. तुरुंग, त्यातील चोर, दरोडेखोर, खुनी या साऱ्यासाऱ्यांंमध्येही त्यांना त्याच एकमेवाद्वितीय वासुदेवाचे दर्शन घडले. त्यांच्या खटल्याची सुनावणी करण्यासाठी त्यांना मॅजिस्ट्रेटपुढे उभे करण्यात आले तेव्हा, तेथेही त्यांची तीच जाणीव टिकून होती. त्या मॅजिस्ट्रेटमध्येही त्यांना वासुदेवाचे दर्शन झाले.

भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणत होते, “सर्व माणसांमध्ये माझा निवास असतो आणि त्यांच्या कृतीचे नियमन मी करतो. माझे संरक्षण अजूनही तुझ्यासोबत आहे, या खटल्याची सारी जबाबदारी माझ्यावर सोपव.”

…… श्री.अरविंद घोष यांना आलेला ‘वासुदेवः सर्वम् इति’ हा अनुभव त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला.

आधार : (CWSA-08:05)

मानसिक अस्तित्वाच्या आणि चैत्य प्राणाच्या शुद्धिकरणाच्या द्वारे, आध्यात्मिक मुक्तीसाठी लागणारी भूमी तयार करण्याचे काम केले जात असते – खरे तर शरीर आणि शारीरिक प्राण यांची शुद्धी देखील संपूर्ण सिद्धीसाठी आवश्यक असते पण तूर्तास शारीरिक शुद्धीचा प्रश्न आपण बाजूला ठेवू.

मुक्तीसाठी आवश्यक पूर्वअट आहे ती म्हणजे शुद्धी. सकल शुद्धी ही एक प्रकारची सुटका असते, मुक्ती असते; कारण शुद्धी म्हणजे बंधनात टाकणाऱ्या, बांधून ठेवणाऱ्या, अपूर्णता आणि गोंधळ यांनी अंधकार निर्माण करणाऱ्या गोष्टी फेकून देणे असते.

इच्छा-वासनांच्या शुद्धिमुळे चैत्य प्राणाची मुक्ती साध्य होते, चुकीच्या भावभावना आणि त्रासदायक प्रतिक्रिया यांच्या शुद्धीकरणातून हृदयाची मुक्ती साधली जाते. इंद्रिय-मनाच्या मळभ आणणाऱ्या संकुचित विचारांच्या शुद्धिकरणातून बुद्धीची मुक्ती साधली जाते आणि केवळ बौद्धिकतेच्या शुद्धीतून विज्ञानाची (Gnosis) मुक्ती साधली जाते. पण ह्या साऱ्या साधनभूत मुक्ती आहेत.

आत्म्याची मुक्ती ही अधिक व्यापक आणि अधिक मूलभूत स्वरुपाची असते; ही मुक्ती म्हणजे मर्त्यतेच्या मर्यादांमधून बाहेर पडून, चैतन्याच्या अमर्याद अशा अमर्त्यतेत खुले होणे असते.

काही विचारप्रणालींनुसार, मुक्ती म्हणजे सर्व प्रकृतीला नाकारणे, शुद्ध केवल अस्तित्वाची एक शांत स्थिती, निर्वाण किंवा विलोपन, आपल्या प्राकृतिक अस्तित्वाचे कोणत्यातरी अव्याख्येय अशा केवलामध्ये विलयन करणे हे होय. परंतु परमानन्दामध्ये निमग्न होऊन त्यातच राहणे, निष्क्रिय शांतीची विशालता, आत्म-विलोपनाद्वारे होणारी सुटका किंवा त्या ‘केवला’मध्ये स्वत:ला बुडवून टाकणे हे काही आमचे ध्येय नाही. फार फार तर, मुक्तीचा गर्भितार्थ आम्ही असा घेऊ शकतो की, आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी अपरिहार्य आणि सिद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या ह्या प्रकारच्या सर्व अनुभवांमध्ये सामायिक असणारा आंतरिक बदल यातून दर्शविला जातो.

तेव्हा आपल्याला असे दिसून येईल की, मुक्तीमध्ये नेहमीच दोन गोष्टी अध्याहृत असतात – तिला नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन बाजू असतात – पहिली म्हणजे अस्वीकार करणे आणि दुसरी म्हणजे ग्रहण करणे. मुक्तीची नकारात्मक बाजू म्हणजे महत्त्वाच्या बंधांपासून सुटका, कनिष्ठ आत्म-प्रकृतीच्या प्रधान-गाठींपासून सुटका; तर सकारात्मक बाजू म्हणजे अधिक उच्चतर अशा अध्यात्मिक अस्तित्वाकडे उन्मीलित होणे किंवा त्या उच्चतर अस्तित्वामध्ये विकसित होणे.

पण ह्या प्रधान-गाठी आहेत तरी कोणत्या – मन, हृदय, चैत्य जीवनशक्ती ह्यांच्या साधनभूत गाठींच्या अधिक सखोल अशा वळणा-वाकणापेक्षा भिन्न अशा कोणत्या गाठी आहेत त्या? भगवद्गीतेमध्ये आपल्यासाठी त्यांचा निर्देश करण्यात आला आहे आणि इतकेच नव्हे तर, गीतेमध्ये त्यांचा वारंवार, जोरकसपणे उल्लेख केलेला आहे; त्या चार गोष्टी म्हणजे इच्छा-वासना, अहंकार, द्वैत, आणि प्रकृतीचे त्रिगुण; कारण गीतेनुसार, वासनारहितता, अहंकार-विरहितता, मन, आत्मा व चैतन्य यांचा समतोल आणि निस्त्रैगुण्य (त्रिगुणातीत) ह्या चार गोष्टी असणे म्हणजे स्वतंत्र असणे, मुक्त असणे होय. गीतेमधील हे वर्णन आपण स्वीकारायला हरकत नाही कारण ह्या विस्तृत वर्णनामध्ये सर्व महत्त्वाच्या बाबींचा समावेश झालेला आहे.

मुक्तीची सकारात्मक बाजू म्हणजे, आत्म्यामध्ये वैश्विकता असणे, ईश्वराच्या चैतन्याशी विश्वातीत ऐक्य साधणे, सर्वोच्च दिव्य प्रकृतीने संपन्न असणे – म्हणजे असे म्हणता येईल की, ईश्वरासारखे होणे किंवा आपल्या अस्तित्वाच्या कायद्याने त्याच्याशी एकत्व पावणे. मुक्तीचा संपूर्ण व सर्वांगीण अर्थ हा असा आहे आणि चैतन्याची परिपूर्ण मुक्ती देखील ह्यातच आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 674-675)

पूर्णयोगाच्या साधकाची ईश्वरप्राप्तीसाठीची जी धडपड चालू असते त्या कक्षेतून, स्वत:च्या जीवनामध्ये तसेच स्वत:च्या अस्तित्वाच्या व विश्वात्मक पुरुषाच्या सर्व गतीविधींद्वारे ईश्वराला भेटणे हेही समाविष्ट असेल. निसर्ग व जीवन हे त्याच्यासाठी ईश्वराला भेटण्याचे संकेतस्थळही असेल आणि त्याचबरोबर ते त्याच्यासाठी त्या ईश्वराचे प्रकटीकरणदेखील असेल.

बौद्धिक, कलात्मक व गतियुक्त व्यवहार, विज्ञान, तत्त्वज्ञान, जीवन, विचार, कला आणि कर्म या गोष्टी ईश्वराच्या अनुमतीने चालतात आणि त्यामध्ये अधिक खोल गर्भितार्थ दडला असल्याचे त्याच्या लक्षात येते. ह्या साऱ्या माध्यमांमधून अभिव्यक्त होणाऱ्या ईश्वराचे तो स्पष्ट दर्शन घेऊ शकतो आणि त्या साऱ्यामध्ये असणाऱ्या ईश्वराचा आनंद त्याला लाभतो म्हणूनच तो त्यांच्या प्राप्तीसाठी धडपड करतो. हा साधक या गोष्टींच्या बाह्य रूपांविषयी आसक्ती धरणार नाही; कारण आसक्ती ही आनंदाच्या मार्गातील धोंड असते. त्याला असा एक शुद्ध, समर्थ आणि परिपूर्ण आनंद मिळत असतो, की ज्या आनंदामध्ये सर्वकाही समाविष्ट असते परंतु तो आनंद दुसऱ्या कशावरच अवलंबून नसतो. आणि त्याला त्या सर्वांमध्ये त्याच्या प्रियकराच्या म्हणजे ईश्वराच्या प्रतिमा, त्याची प्रतीके, त्याचे अस्तित्व, त्याच्या खुणा, त्याच्या कृती सापडतात. केवळ कलेसाठीच कलेची साधना करू पाहणाऱ्या सामान्य मनाला कदापिही मिळणार नाही वा त्याची कल्पनादेखील ते करू शकणार नाही असा व एवढा आनंद या भक्ताला त्या गोष्टींमधून होतो. ते सर्व काही आणि त्याहूनही अधिकचे असे सर्व काही हे त्याच्यासाठी पूर्णयोगाचा आणि समावेशनाचा मार्ग ठरतो.

प्रेम ही ह्या आनंदाची सर्वत्रगत शक्ती असते. आणि त्या प्रेमाचा आनंद जे विशिष्ट रूप धारण करतो ती असते, सौंदर्याची दृष्टी !

ईश्वराचा प्रेमिक हा विश्वाचा प्रेमी असतो आणि तो ‘सर्व-आनंदमया’ला आणि ‘सर्व-सौन्दर्यमया’ला प्रेमाने कवळतो. जेव्हा वैश्विक प्रेम हे साधकाच्या हृदयाचा ताबा घेते तेव्हा, ईश्वराने त्याला कवेत घेतले आहे ह्याची ती निर्णायक खूण असते. आणि जेव्हा साधकाला सर्वत्र सर्व-सौंदर्य पाहण्याची दृष्टी येते आणि सदा सर्वकाळ आनंदाने त्याला कवळून घेतले आहे असा त्याला अनुभव येत राहतो, तेव्हा साधकाने ईश्वराला कवेत घेतले आहे ह्याची ती निर्णायक खूण असते. प्रेमाची परिपूर्ती ऐक्यामध्ये होणे आणि परस्परांनी परस्परांना कवळून घेणे ही एकाच वेळी सर्वोच्च अशी अवस्था पण असते आणि तेव्हाच त्या प्रेमाची तीव्रताही अत्युच्च पातळीवर जाऊन पोहोचलेली असते. आणि हेच ऐक्यातील परमानंदाचे अधिष्ठान असते.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 591-592)

ईश्वर किंवा पुरुषोत्तम हा विश्वपुरुष देखील आहे; आणि ह्या विश्वाशी असलेली आपली सर्व नाती ही साधने असून, या साधनांद्वारे आपण या विश्वपुरुषाशी आपले नाते प्रस्थापित करण्याची तयारी करत असतो. विश्वाच्या आपल्यावर होणाऱ्या क्रियांना आपण ज्या भावनांनी प्रतिक्रिया देतो, त्या सर्व भावना वस्तुत: या विश्वपुरुषाला, ईश्वराला उद्देशूनच असतात.

आरंभी या गोष्टीचे आपल्याला ज्ञान नसते; मात्र आपले ज्ञान जसजसे वाढते तसतसे आपण जाणीवपुर:सर ईश्वरालाच आपल्या भावनांचा विषय करतो आणि अशा रीतीने ईश्वराशी आपले जिव्हाळ्याचे नाते प्रस्थापित होते. आपण ईश्वराशी एकता साधण्याच्या उद्देशाने जसजसे ईश्वराच्या अधिकाधिक निकट जातो तसतसे आपल्या भावनांतील मिथ्यत्वाचे व अज्ञानाचे दोष गळून पडतात.

आणि मग आपल्याला उमगते की, आपल्या सर्व भावनांना ईश्वरच प्रतिसाद देत असतो; आपण प्रगतीच्या ज्या टप्प्यावर जसे असू त्या त्या टप्प्यानुसार तो आपल्याला स्वीकारतो, जवळ घेतो आणि आपल्या भावनांनुसार प्रतिसाद देतो. जर ते तसे नसते, जर तो आपल्याला मदत करत नसता तर, आपल्याला त्याच्याशी अधिकाधिक निर्दोष संबंध प्रस्थापित करता आले नसते; हेही आपल्याला उमगते.

मानव ईश्वराकडे कोणत्याही भावनेने जावो, ईश्वर त्याचे स्वागत करतो व त्याच्या भक्तीला ईश्वरी प्रेमाने प्रतिसाद देतो. अस्तित्वाचे जे कोणते घटक, जे कोणते गुण व्यक्ती ईश्वराला समर्पित करतात, त्या त्या घटकांच्या आणि त्या त्या गुणांच्या माध्यामातून ईश्वर त्या व्यक्तींना विकसित करतो, त्यांना प्रोत्साहित करतो, त्यांच्या प्रगतीचे नियमन करतो. त्यांचा मार्ग सरळ असो वा वळणावळणाचा, तो ईश्वर त्यांना स्वत:कडेच घेऊन जातो.

– श्रीअरविंद
(CWSA

भक्ती आणि ज्ञान यांचे परस्परांविषयीचे गैरसमज हे अज्ञानमूलक आहेत; त्याचप्रमाणे कर्ममार्ग कमी दर्जाचा आहे ही या दोन्ही मार्गांची असणारी समजूतही तितकीच अज्ञानमूलक आहे. ज्ञानमार्गी व भक्तिमार्गी म्हणतात की, आध्यात्मिक संपत्ती ही कर्ममार्गापेक्षा श्रेष्ठ दर्जाची आहे; परंतु त्यांचे हे म्हणणेही अज्ञानमूलकच आहे.

अशी एक तीव्र भक्ती, असे एक तीव्र ज्ञान असते की ज्यांना ‘कर्म’ हे बहिर्मुख व विक्षेप उत्पन्न करणारे वाटते परंतु जोवर ईश्वराच्या जाणिवेशी आमची जाणीव एकत्व पावत नाही, ईश्वराच्या कर्मसंकल्प-शक्तीशी आमची कर्मसंकल्प-शक्ती एकत्व पावत नाही; तोवरच ‘कर्म’ हे बहिर्मुख व विक्षेप करणारे आहे असे वाटते. परंतु एकदा का हे एकत्व साधले की, कर्म हीच ज्ञानाची शक्ती बनते आणि कर्म हाच प्रेमाच्या अभिव्यक्तीचा मार्ग बनतो.

ईश्वराशी एकत्वाची अवस्था म्हणजे ज्ञान असेल आणि या एकत्वाचा आनंद म्हणजे भक्ती असेल तर, त्या एकत्वाचा प्रकाश व माधुर्य यांचे जिवंत सामर्थ्य म्हणजे दिव्य कर्म असे म्हणता येईल. कोणत्याही मानवी प्रेमामध्ये जी एक आस असते, ती तशीच आस व प्रेमाची तीच स्पंदने ईश्वराबद्दलच्या प्रेमातही असतात. प्रियकर आणि प्रेयसी दोघेही जगापासून आणि इतर सर्वांपासून दूर कोठेतरी, हृदयाच्या गुह्यतम कोपऱ्यामध्ये दडून, ऐक्याच्या निरपवाद आनंदामध्ये निमग्न राहू इच्छितात. तीच कदाचित भक्तिमार्गावरीलही एक अपरिहार्य अशी मनोवस्था असू शकते.

पण ज्या विशाल अशा प्रेमाची परिपूर्ती ज्ञानामध्ये झालेली असते ते प्रेम हे, हृदयाच्या अंतरगृहातील आनंद आणि बाह्य जग यांच्यात कोणताही भेद किंवा विरोध आहे असे मानत नाही. तर उलट, बाह्य जग हे त्या प्रियकराचे, ईश्वराचे धाम आहे, सर्व प्राणिमात्र हे ईश्वराचेच अस्तित्व आहे असे ही व्यापक भक्ती मानते; आणि व्यापक भक्तीची ही जी दिव्य दृष्टी आहे त्या दिव्य दृष्टीत दिव्य कर्माचा आनंद आहे आणि दिव्य कर्माचे समर्थन आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 24 : 551)

परिपूर्ण झालेले प्रेम ज्ञानाला वगळत नाही तर, उलट तेच प्रेम स्वत: ज्ञान मिळवून देते आणि ज्ञान जेवढ्या प्रमाणात पूर्ण असते तेवढ्या प्रमाणात प्रेमाची शक्यता अधिकाधिक समृद्ध होते…

भगवद्गीतेमध्ये भगवंत असे सांगतात की, ”भक्तीमुळे एखादा भक्त ‘मला’ माझ्या सर्व प्रमाणात आणि माझ्या महानतेनिशी जाणू शकतो आणि तो जर याप्रमाणे ‘मला’ माझ्या अस्तित्वाच्या तत्त्वानिशी जाणेल तर, तेव्हा तो माझ्यामध्ये सामावू शकेल.”

प्रेम हे जर ज्ञानविरहीत असेल तर, ते तीव्र व जोरदारही असू शकेल; पण ते आंधळे, ग्राम्य, आणि बव्हंशी वेळा भयंकरही असू शकेल. हे ज्ञानविरहीत प्रेम ही मोठी ताकद असू शकते, परंतु ते खूप मोठी धोंडसुद्धा ठरू शकते; प्रेम ज्ञानदृष्ट्या सीमित असेल तर उत्साहाच्या भरात, संकुचितपणाच्या जोशात ते स्वत:चीच अवहेलना करते, परंतु, पूर्ण ज्ञानाभिमुख झालेले प्रेम हे ईश्वराशी अमर्याद आणि संपूर्ण ऐक्य घडवून आणते.

असे प्रेम कर्माशी फारकत घेत नाही, उलट ते दिव्य कर्मामध्ये स्वत:ला आनंदाने झोकून देते. कारण ते ईश्वरावर प्रेम करीत असते आणि त्याच्या सर्व अस्तित्वाशी व त्यामुळे, सर्व जीवामात्रांमधील ईश्वराशी ते एकरूप झालेले असते; आणि त्यामुळे अशा प्रेमाला, जगाकरता काम करणे हा, विविधतेने नटलेल्या ईश्वरावर प्रेम करण्याचा आणि त्याची परिपूर्तता करण्याचा मार्ग वाटतो.

अशाप्रकारे भक्तीच्या, प्रेमाच्या मार्गाने आपण प्रवासाला आरंभ केला की, आपल्या त्रिविध शक्ती (प्रेमशक्ती, ज्ञानशक्ती व कर्म-संकल्पशक्ती) ईश्वराच्या ठिकाणी ऐक्य पावतात; ह्या मार्गाच्या देवदूताला, (All-Lover’s being) ‘सर्व-प्रेममया’च्या अस्तित्वाच्या दिव्य आनंदाचा परमानंद लाभणे ही आपली परिपूर्ती वाटते; त्याला ते त्याचे सुरक्षित धाम वाटते; त्याला ते शाश्वत स्थान वाटते आणि तेच वैश्विक किरणोत्सर्गाचे केंद्रस्थान वाटते.

– श्रीअरविंद
(CWSA 24 : 547)

मनोमय पुरुषाने, वासनात्मक मनाशी असलेले त्याचे सहसंबंध आणि त्याच्याबरोबर झालेले त्याचे तादात्म्य (self-identification) ह्यापासून स्वत:ला विलग करावेच लागते. त्याला असे म्हणावे लागते की, ”हे झगडणारे व यातना भोगणारे, कधी दुःखी तर कधी आनंदी असणारे; कधी प्रेम तर कधी द्वेष करणारे मन म्हणजे मी नव्हे; ते कधी आशावादी असते तर कधी गोंधळलेले असते; कधी रागावते व भिते तर कधी ते खुशीत असते; कधी निराश, नाउमेद असते; अशा प्राणिक वृत्तीप्रवृतीच्या हेलकाव्यांचे व भावनात्मक आवेगांचे बनलेले हे मन म्हणजे मी नव्हे. ह्या सर्व गोष्टी म्हणजे संवेदनात्मक आणि भावनात्मक मनामध्ये प्रकृतीचे जे कार्य चालते ते कार्य आहे, त्या सर्व तिच्या सवयी आहेत, अन्य काही नाही.” या प्रकारे मनोमय पुरुषाने संवेदनात्मक व भावनात्मक मनाशी असलेले आपले ऐक्याचे नाते तोडले, म्हणजे मनोमय पुरुष किंवा मन आपल्या भावनांपासून दूर होते आणि ज्याप्रमाणे ते शरीराच्या क्रिया व अनुभूती दूरून पाहते, त्याचप्रमाणे मनाच्या भावनांकडेही ते दूरून पाहते, ते या भावनांचे निरीक्षक किंवा साक्षी बनते. याप्रमाणे मनात दोन तट पडतात; एक मन भावनात्मक व दुसरे निरीक्षक बनते.

भावनात्मक मनात नानाविध वृत्ती व विकार येत राहतात, प्रकृतीच्या गुणांच्या सवयीनुसार हे घडत राहते; दुसरे निरीक्षक मन हे वृत्तीविकार पाहात राहते; त्यांचा तटस्थपणे अभ्यास करते आणि त्यांना जाणून घेते, परंतु त्यापासून ते अलिप्त असते. निरीक्षक मन भावनात्मक मनाच्या वृत्तीविकारांकडे पाहताना जणू काही मनाच्या रंगमंचावर, स्वत:पेक्षा वेगळ्या व्यक्ती खेळत आहेत अशा दृष्टीने त्यांजकडे पाहते.

प्रथम या वृत्तीविकारांत त्याला रस वाटतो आणि ते तादात्म्याकडे झुकते, जुन्या सवयींमुळे मधूनमधून ते त्यांच्याशी एकरूप होते; नंतर पूर्ण शांती राखून व अनासक्तपणे ते त्यांजकडे पाहू शकते; आणि शेवटी शांतीबरोबर आपल्या शांत अस्तित्वाचा शुद्ध आनंद त्याला लाभतो; आणि ते समोरच्या गोष्टी पाहून स्मित करू लागते. एखादे लहान मूल खेळत असावे आणि त्यात ते स्वत:च हारावे त्याप्रमाणे, भावनात्मक मनाची सुखदुःखे व इतर विकारवृत्ती मिथ्या आहेत हे त्याला पटते.

दुसरी गोष्ट अशी की, आपणच त्या साऱ्याला अनुमती देणारे किंवा नाकारणारे स्वामी आहोत, अनुमंता आहोत ही गोष्ट, निरीक्षक मनाच्या लक्षात येते. अर्थात आपली संमती काढून घेऊन हा खेळ आपण बंद पाडू शकतो हेही त्याला उमगते.

निरीक्षक मनाने संमती काढून घेतली की, एक महत्त्वाची गोष्ट घडते. भावनात्मक मन शांत होते व सामान्यत: शांत राहते; ते सामान्यत: शुद्ध राहते, विकाररूप प्रतिक्रियांपासून सामान्यत: अलिप्त राहते. या प्रतिक्रिया त्याच्या ठिकाणी पुन्हा येतात तेव्हा त्या आतून येत नाहीत, तर बाहेरून येतात – बाहेरून आलेल्या क्रियांना प्रतिक्रिया म्हणून त्या उत्पन्न होतात. ही प्रतिक्रिया देण्याची सवयसुद्धा कालांतराने नष्ट होते आणि भावनात्मक मन पूर्वी टाकून दिलेल्या विकारांपासून पूर्ण मुक्त होते.

आशा व निराशा, सुख व दुःख, आवड आणि निवड, आकर्षण आणि तिटकारा, समाधान व असमाधान, हर्ष आणि विषाद, भय आणि कंप, क्रोध, उद्वेग आणि लाज आणि प्रेमवद्वेष इत्यादी सर्व विकार हे मुक्त झालेल्या चैत्यपुरुषापासून गळून पडतात. सर्वसाधारणपणे जीवाला या अवस्थेतून जावे लागते; परंतु आम्ही मात्र या अवस्थेला अंतिम साध्य मानलेले नाही.

….पूर्णत्वासाठी ही गोष्ट आवश्यक आहे की, मनोमय पुरुषाने ‘प्रकृतीचा स्वामी’ ही स्वत:ची बैठक पुनरपि प्राप्त करून घ्यावी; मनाचा आंतरिक प्रवाह व बुद्धीचा युक्तिवाद थांबवून या पुरुषाचे भागत नाही, त्यांची जागा वरून प्रकाश मिळवणारा सत्य-ज्ञानयुक्त (Truth-Conscious) विचार घेईल अशी व्यवस्था, स्वत:ची इच्छाशक्ती कामी लावून त्याला करावी लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 352-353)

आपल्याला असे आढळून येते की, जर आपण प्रयत्न केला तर, मनामध्ये शरीरापासून अलग होण्याची शक्ती आहे. मन शरीरापासून केवळ कल्पनेनेच नव्हे, तर कृतीनेही अलग होऊ शकते; शरीरापासून ते भौतिक दृष्टीने, किंबहुना प्राणिक दृष्टीनेही अलग होऊ शकते.

शरीरविषयक गोष्टींसंबंधी एक प्रकारची अलिप्त वृत्ती धारण करून, मनाच्या या अलगपणाला आपण ही बळकटी दिली पाहिजे. शरीराचे झोपणे किंवा जागे राहणे या गोष्टींना अनाठायी महत्त्व दिल्यामुळे, त्याच्याबद्दल निष्कारण वाटणारी काळजी आपण सोडून दिली पाहिजे; शरीराचे हालणे-चालणे किंवा विसावा घेणे, शरीराचे सुख किंवा दुःख, त्याचे आरोग्य किंवा अनारोग्य, त्याचा जोर किंवा थकवा, त्याचा आराम किंवा अस्वस्थता यासंबंधाने काळजी करण्याचे आपण सोडून दिले पाहिजे; शरीर काय खातेपिते यासंबंधानेही काळजी करण्याचे आपण सोडून दिले पाहिजे. आपण आपले शरीर सुस्थितीत ठेवू नये असा ह्याचा अर्थ नव्हे; परंतु अतिरेकी संन्यासी व्रते आपण टाळली पाहिजेत; शरीराची जाणूनबुजून हेळसांड करणे हेसुद्धा आपण टाळले पाहिजे.

इत्यर्थ असा की, आपण भूक, तहान, अस्वस्थता, अनारोग्य या शरीराच्या अवस्थांमुळे आपल्या मनाचा क्षोभ होऊ देऊ नये; शारीरिक आणि प्राणिक प्रवृत्तीचा माणूस शरीरविषयक गोष्टींना जे महत्त्व देतो, ते आपण देऊ नये. द्यायचेच असेलच तर, त्याला दुय्यम स्थान द्यायला हरकत नाही आणि तेही, शरीराचा ‘साधन’ म्हणून उपयोग आहे हे लक्षात ठेऊनच ! शरीर एक साधन आहे म्हणून जे महत्त्व त्याला द्यावयाचे तेही मर्यादित ठेवावे, ते फुगवून त्याला निकडीच्या गोष्टींचे स्वरूप येईल असे करता कामा नये. उदाहरणार्थ, आपण काय खातोपितो यावर मनाची शुद्धता अवलंबून असते अशी वृथा कल्पना आपण करू नये. (एक मात्र खरे की, काही एका अवस्थेमध्ये खाण्यापिण्यासंबंधी नियंत्रणे आपल्या आंतरिक प्रगतीसाठी उपकारक ठरतात.) तसेच, आपले मन वा जीवन केवळ खाण्यापिण्यावरच अवलंबून असते, अशी वृथा कल्पनाही आपण बाळगता कामा नये.

खाणेपिणे ही फक्त एक सवय आहे, निसर्गाने लावलेली ती व्यवस्था आहे; प्रकृतीने मन किंवा प्राण व खाद्यपेय यांजमध्ये एक संबंध निर्माण करून, तो रूढ केला आहे इतकेच; त्यामुळे त्यापेक्षा त्याला अधिक काही मूल्य आहे असे समजण्याची गरज नाही.

वस्तुत: मानसिक व प्राणिक अस्तित्वाच्या उर्जेमध्ये, कोणत्याही प्रकारे घट न होऊ देता, नव्या पद्धतीने, सध्याच्या सवयीच्या उलट पद्धतीने, अन्नसेवनाचे प्रमाण आपण किमान पातळीवर आणू शकतो.

परंतु त्याहीपेक्षा, विवेकपूर्ण प्रशिक्षणाने, मन व प्राण यांना, शारीरिक पोषणाच्या किरकोळ मदतीवर विसंबून ठेवण्यापेक्षा, त्यांचा ज्यांच्याशी अधिक घनिष्ठ संबंध आहे अशा, मानसिक व प्राणिक शक्तीच्या गुप्त झऱ्यांवर विसंबून राहण्याचे प्रशिक्षण देऊन, त्यांना उर्जेच्या अधिक मोठ्या स्त्रोतांकडे वळविता येणे शक्य असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 343-344)

श्रीमती सविता हिंदोचा नावाच्या एक साधिका तेव्हा केनियामध्ये राहत असत. त्यांच्या घरी श्रीअरविंद आणि श्रीमाताजी ह्यांचे काही साधक एकत्र जमले होते. त्यांनी प्रार्थना, ध्यान आणि वाचन सुरु केले. तेव्हा ते श्रीअरविंदांच्या ‘सावित्री’ या महाकाव्यातील उताऱ्याचे वाचन करत होते.

सविता म्हणतात, “मी भारावून गेले होते आणि मला असे जाणवू लागले की, मला ते काव्य समजावे म्हणून खुद्द माताजीच मला ते वाचून दाखवत आहेत…” आणि ह्या अनुभवानंतर पुढे एके दिवशी हिंदोचा यांनी सर्वसामान्य जीवन मागे सोडून द्यावयाचे असा निश्चय केला. आणि मग सुरु झाली प्रार्थनांची मालिका!

श्रीमाताजींना भेटण्यासाठी त्या व्याकुळ झाल्या. त्यांची खात्री पटली की, संपत्ती, कुटुंब, भौतिक आनंद, समृद्धी ह्या कशाकशातूनच दिव्य शांती आणि समाधान त्यांना मिळू शकणार नाही, आणि मग एक दिवस त्या आश्रमात येऊन दाखल झाल्या. श्रीमाताजींनी त्यांना हुता (सर्वस्व-दान केलेली) असे नाव दिले.

आश्रमात राहू लागल्यावर त्यांनी एकदा श्रीमाताजींना विचारले, “मी कोणत्या वेळी प्रार्थना करू म्हणजे मी तुमच्या सोबत प्रार्थना करू शकेन?” तेव्हा श्रीमाताजींनी त्यांना उत्तर दिले,

“प्रार्थना किंवा ध्यानासाठी माझी ठरावीक अशी कोणती वेळ नाही. वरवर पाहता हा देह काहीतरी काम करताना दिसत असला तरी मी दिवसरात्र सातत्याने परमपुरुषाला आवाहन करत असते. या असत्यमय जगामध्ये ते परमसत्य आणि ह्या बेबनावाने भरलेल्या जगामध्ये परमप्रेम आविष्कृत व्हावे म्हणून प्रार्थना करत असते. तेव्हा तुला जेव्हा प्रार्थना करावीशी वाटेल तेव्हा तू कर; तुला आढळेल की, तुझी प्रार्थना माझ्यासमवेतच झालेली आहे.”

– आधार : (On The Mother by K.R.Srinivasa lyengar)