Tag Archive for: हृदय-केंद्र

साधना, योग आणि रूपांतरण – १४६

पूर्णयोगांतर्गत भक्ती

‘ईश्वरा’चे नामस्मरण हे सहसा संरक्षणासाठी, आराधनेसाठी, भक्तीमध्ये वृद्धी व्हावी यासाठी, आंतरिक चेतना खुली व्हावी यासाठी आणि भक्तिमार्गाद्वारे ‘ईश्वरा’चा साक्षात्कार व्हावा यासाठी केले जाते.

*

पूर्णयोगाच्या साधनेचे सूत्र म्हणून केवळ एकच मंत्र उपयोगात आणला जातो, तो म्हणजे ‘श्रीमाताजीं’चे नाम किंवा ‘श्रीअरविंदां’चे व ‘श्रीमाताजीं’चे नाम!

हृदयकेंद्रामध्ये एकाग्रता आणि मस्तकामध्ये एकाग्रता या दोन्ही पद्धती या योगामध्ये अवलंबल्या जातात; त्या प्रत्येक पद्धतीचे स्वतःचे असे परिणाम असतात.

हृदयकेंद्रावर एकाग्रता साधली असता चैत्य पुरुष (psychic being) खुला होतो आणि तो भक्ती, प्रेम आणि श्रीमाताजींशी एकत्व घडवून आणतो; हृदयकेंद्रावर एकाग्रता साधली असता हृदयामध्ये श्रीमाताजींची उपस्थिती जाणवू लागते आणि प्रकृतीमध्ये, स्वभावामध्ये त्यांच्या शक्तीचे कार्य घडू लागते.

मस्तककेंद्रावर एकाग्रता साधली असता, मन हे आत्मसाक्षात्काराप्रत खुले होते; मनाच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या चेतनेप्रत, देहाच्या बाहेर असणाऱ्या चेतनेच्या आरोहणाप्रत आणि उच्चतर चेतनेच्या देहामधील अवतरणाप्रत मन खुले होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 326 & 327)

“पूर्ण योगामध्ये, शक्यतो हृदयामध्ये लक्ष केंद्रित करून, श्रीमाताजींच्या शक्तीने आपल्या अस्तित्वाला हाती घ्यावे म्हणून त्यांना आवाहन करणे आणि त्यांच्या शक्तिकार्याच्या योगे जाणिवेमध्ये पालट होणे याखेरीज इतर कोणतीही पद्धत नाही. एखादी व्यक्ती मस्तकामध्ये किंवा भ्रूमध्यामध्ये देखील चित्त एकाग्र करू शकते परंतु पुष्कळ जणांना अशा प्रकारे उन्मुख होणे फारच कठीण जाते.” – श्रीअरविंद (CWSA 29 : 107),

प्रश्न : हृदयामध्ये चित्त एकाग्र करणे हे अधिक चांगले, असे का म्हटले आहे?

श्रीमाताजी : श्रीअरविंद येथे सांगत आहेत की, ते अधिक सोपे आहे. पण काही लोकांसाठी मात्र ते जरा कठीण असते, ते ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून असते. परंतु असे करणे अधिक चांगले असते कारण, जर तुम्ही पुरेशा खोलवर, तेथे चित्त एकाग्र केलेत तर, तुम्ही प्रथम चैत्याच्या संपर्कातच प्रवेश करता. परंतु जर का तुम्ही डोक्यामध्ये चित्त एकाग्र कराल तर तुम्हाला नंतर, चैत्य पुरुषाशी एकत्व पावणे शक्य व्हावे यासाठी, डोक्याकडून हृदयाकडे जावे लागते. आणि तुम्ही तुमच्या शक्ती एकत्र करून चित्ताची एकाग्रता करणार असाल तर, त्या शक्तींचे एकत्रीकरण हृदयामध्येच करणे अधिक बरे; कारण या केंद्रापाशीच, तुमच्या अस्तित्वाच्या या क्षेत्रामध्येच, तुम्हाला प्रगतीची इच्छा, शुद्धीकरणाची शक्ती आणि अगदी उत्कट, परिणामकारी अभीप्सा असल्याचे आढळून येते. डोक्याकडून येणाऱ्या अभीप्सेपेक्षा हृदयातून उदित होणारी अभीप्सा ही कितीतरी अधिक परिणामकारक असते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 389)