Tag Archive for: साधना

मानसिक परिपूर्णत्व – ०७

 

ईश्वराप्रत केलेले आत्मदान म्हणजे समर्पण. व्यक्ती जे काही आहे आणि तिच्यापाशी जे काही आहे ते सारे ईश्वराला देऊ करणे; काहीही स्वत:चे नाही असे समजणे; इतर कोणतीही आज्ञा न पाळता, केवळ ईश्वरी संकल्पाच्या आज्ञेचे पालन करणे; अहंकारासाठी नाही तर, ईश्वरासाठी जीवन व्यतीत करणे म्हणजे समर्पण.
*
जे हातचे काहीही राखून न ठेवता, स्वतःच्या सर्व अंगांनिशी ईश्वराप्रत स्वतःला देऊ करतात, त्यांना ईश्वर स्वतःलाच देऊन बसतो. आणि मग त्यांना स्थिरता, प्रकाश, शक्तिसामर्थ्य, आनंद, स्वातंत्र्य, विशालता, ज्ञानाची उत्तुंगता, आनंदसागर या गोष्टी प्राप्त होतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67)

मानसिक परिपूर्णत्व – ०६

 

इतर कोणा व्यक्तीला, कोणत्याही कल्पनेला, कोणत्याही गोष्टीला, तुम्ही तुमच्या आणि ईश्वराच्यामध्ये का येऊ देता? जेव्हा तुम्ही पूर्ण अभीप्सायुक्त असता, आनंदात असता तेव्हा इतर कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही; ईश्वर आणि तुमची अभीप्सा याव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीला महत्त्व देता कामा नये. जर एखाद्या व्यक्तीला ईश्वर त्वरेने, संपूर्णतः, समग्रतेने मिळावा असे वाटत असेल, तर त्या व्यक्तीचा दृष्टिकोन तसाच संपूर्ण, सर्वसमावेशक असावयास हवा. तोच त्याचा एकमेव उद्दिष्टबिंदू असावयास हवा आणि त्यामध्ये इतर कशाचीही, अगदी कशाचीही लुडबूड असता कामा नये.

ईश्वर कसा असावा, त्याने कसे वागावे, त्याने कसे वागता कामा नये, यासंबंधीच्या मानसिक कल्पनांना काहीही किंमत नाही, उलट त्या मानसिक कल्पना म्हणजे मार्गातील धोंडच ठरतात. एक ईश्वरच केवळ महत्त्वाचा आहे. जेव्हा तुमची चेतना ईश्वराला कवळून घेते, तेव्हाच खऱ्या अर्थाने ईश्वर काय आहे हे तुम्हाला समजते, त्या आधी नाही. कृष्ण हा कृष्ण आहे, त्यामुळे त्याने काय केले, काय केले नाही याला मग अशी व्यक्ती महत्त्व देत नाही तर ती व्यक्ती त्याला पाहाते, त्याला भेटते; त्याचा प्रकाश, त्याची उपस्थिती, त्याचे प्रेम, त्याचा आनंद हाच काय तो त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आध्यात्मिक अभीप्सेबाबतीत नेहमी हे असेच असते – हा आध्यात्मिक जीवनाचा कायदा आहे.

कोणत्याही मानसिक कल्पना किंवा प्राणिक चढउतार यांच्यावर वेळ वाया घालवू नका – ते ढग पळवून लावा. जी एकमेव आवश्यक गोष्ट आहे त्यावरच तुमचे लक्ष केंद्रित करा.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 55-56)

मानसिक परिपूर्णत्व – ०५

 

हृदयापासून केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा आणि अभीप्सा हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट क्षमतांपेक्षाही अधिक आवश्यक आणि अधिक प्रभावी असते.
*
व्यक्तीने जितके शक्य आहे तितके स्वतःला श्रीमाताजींच्या शक्तीप्रत खुले राखणे आणि प्रामाणिकपणे अभीप्सा बाळगणे आवश्यक आहे. मग कितीही अडचणी आल्या तरीही त्यावर मात करता येते – कदाचित त्याला काही वेळ लागेल पण परिणामाची खात्री असते.
*
श्रीमाताजींची शक्ती आपल्या अवतीभोवती सर्वत्र आहे असे समजून, ती आत प्रविष्ट व्हावी म्हणून व्यक्तीने तिचा धावा करावयास हवा. जर व्यक्तीला तशी खरीच जाणीव झाली तर उत्तमच, पण जरी तसे झाले नाही तरीही व्यक्तीची श्रद्धा असेल आणि त्या धाव्यामध्ये शक्ती असेल तरीही, श्रीमाताजींची शक्ती आत प्रवाहित होऊ शकते.
*
व्यक्तीने ईश्वरावर विसंबून असावे आणि त्यासोबतच काही सक्षम साधनासुद्धा करावी. साधनेच्या प्रमाणात नव्हे तर, जीवाच्या आणि त्याच्या अभीप्सेच्या प्रमाणात, ईश्वर त्याचे फल प्रदान करतो. चिंता करत बसणे देखील उपयोगाचे नाही. ”मी असा होईन, मी तसा होईन, मी कसे असावे बरे?” याऐवजी, ”मला मी काय व्हावेसे वाटते यासाठी नाही तर, ईश्वराला मी कोण बनणे अपेक्षित आहे, तसे व्हावयास मी तयार आहे” असे म्हणणे आवश्यक आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी त्याच आधारावर झाल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 55-56)

मानसिक परिपूर्णत्व – ०४

 

एकमेव अनिवार्य आवश्यक अट आहे आणि ती म्हणजे प्रामाणिकपणा.
*
प्रामाणिकपणा म्हणजे काय ? प्रामाणिकपणा म्हणजे कोणत्याही कनिष्ठ शक्तींचे प्रभाव न स्वीकारता, केवळ ईश्वरी प्रभावच स्वीकारणे.
*
सर्वथा ईश्वराकडेच वळणे आणि केवळ ईश्वरी आवेगच तेवढे स्वीकारणे म्हणजे प्रामाणिकपणा. तसे बनण्याची खरीखुरी, सततची इच्छा आणि त्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे प्रामाणिकपणा होय.
*
प्रामाणिकपणा म्हणजे तुमची इच्छा ही खरीखुरी इच्छा असली पाहिजे. “मी अभीप्सा बाळगतो’ असा जर का तुम्ही नुसताच विचार कराल आणि त्या अभीप्सेशी विसंगत अशा गोष्टी करत राहाल किंवा तुमच्या स्वतःच्या इच्छावासनांचीच पूर्ती करत राहाल किंवा विरोधी असणाऱ्या प्रभावांप्रत स्वतःला खुले कराल, तर ती इच्छा प्रामाणिक नाही, असे समजावे.
*
प्रामाणिकपणा म्हणजे ईश्वराभिमुख असलेल्या सर्वोच्च अभीप्सेला, विरोध करण्यास आपल्यामधील कोणत्याच भागाला संमती न देणे.
*
सर्व प्रामाणिक अभीप्सेचा परिणाम नक्कीच होतो; जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही ईश्वरी जीवनामध्ये उन्नत होता. पूर्णपणे प्रामाणिक असणे म्हणजे – फक्त आणि फक्त ईश्वरी सत्याचीच अभीप्सा बाळगणे; दिव्य मातेप्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे; या अभीप्सेव्यतिरिक्त असणाऱ्या वैयक्तिक सर्व मागण्या व वासना यांचा परित्याग करणे; जीवनातील प्रत्येक कृती ही ईश्वरालाच समर्पण करणे आणि कोणताही अहंकार आड येऊ न देता, ते कार्य ईश्वराने दिलेले आहे असे मानून कार्य करणे. हाच दिव्य जीवनाचा पाया आहे. व्यक्ती एकाएकी एकदम अशी होऊ शकत नाही. पण जर ती सातत्याने तशी अभीप्सा बाळगेल आणि ईश्वरी शक्तीने साहाय्य करावे म्हणून तिचा अगदी अंतःकरणपूर्वक आणि साध्यासरळ इच्छेने, नेहमी धावा करत राहील; तर व्यक्ती या चेतनेप्रत अधिकाधिक उन्नत होत राहते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 50-51)

मानसिक परिपूर्णत्व – ०३

 

….आध्यात्मिक प्रयत्नांसाठी प्रामाणिकपणा ही अगदी अत्यावश्यक गोष्ट आहे आणि कुटिलता हा कायमस्वरूपी अडथळा आहे. सात्विक प्रवृत्ती ही आध्यात्मिक जीवनासाठी नेहमीच योग्य आणि तयार अशी मानण्यात आली आहे, तर राजसिक प्रवृत्ती ही मात्र इच्छाआकांक्षाच्या भाराने दबून जाते. त्याच वेळी हेही खरे आहे की, आध्यात्मिकता ही गोष्ट द्वंद्वातीत असते आणि त्यासाठी जर का कशाची आवश्यकता असेलच तर ती, ऊर्ध्वमुख अभीप्सेची असते.

आणि ही अभीप्सा (Aspiration) सात्विक प्रवृत्तीच्या व्यक्तीइतकीच राजसिक प्रवृत्तीच्या व्यक्तीमध्येही उदित होऊ शकते. जशी एखादी सात्विक प्रवृत्तीची व्यक्ती तिच्या गुणांच्या अतीत होऊ शकते तशीच, राजसिक प्रवृत्तीची व्यक्तीही तिच्या अवगुणांच्या, इच्छाआकांक्षांच्या अतीत होऊन, ईश्वरी शुद्धता, प्रकाश आणि प्रेमाप्रत वळू शकते. अर्थात, जेव्हा व्यक्ती स्वतःच्या कनिष्ठ प्रकृतीवर विजय प्राप्त करून घेईल आणि स्वतःमधून ती फेकून देईल तेव्हाच ही गोष्ट घडून येईल. कारण ती जर पुन्हा कनिष्ठ प्रकृतीमध्ये जाऊन पडली, तर ती व्यक्ती मार्गभ्रष्ट होण्याची पण शक्यता असते किंवा अगदीच काही नाही तर, जोपर्यंत ती त्यामध्ये रमलेली असते तोपर्यंत तिची आंतरिक प्रगती खुंटते.

परंतु धार्मिक आणि आध्यात्मिक इतिहासामध्ये, मोठमोठ्या गुन्हेगारांचे महान संतांमध्ये किंवा अवगुणी वा कमी गुणवान व्यक्तींचे आध्यात्मिक साधकांमध्ये आणि भक्तांमध्ये रुपांतर होताना वारंवार आढळून आले आहे. उदाहरणार्थ युरोपमध्ये सेंट ऑगस्टिन, भारतामध्ये चैतन्याचे जगाई आणि मधाई, बिल्वमंगल आणि त्यासारखी अनेक उदाहरणे आहेत. जो कोणी ईश्वराच्या घराचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावतो, त्याच्यासाठी ते कधीच बंद नसतात मग त्या माणसाच्या भूतकाळातील ठोकरा किंवा चुका किती का असेनात. मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतरंगात असणाऱ्या ईश्वरी तत्त्वावर अनुक्रमे असणारी तेजस्वी व काळोखी आवरणे होत. पण जेव्हा ही आवरणे भेदली जातात तेव्हा, आत्म्याच्या उंचीप्रत जाताना, ती दोन्ही आवरणे चांगली भाजून निघतात.

ईश्वरासमोरील विनम्रता ही देखील आध्यात्मिक जीवनाची एक अनिवार्य अट आहे आणि आध्यात्मिक गर्व, उद्धटपणा किंवा घमेंड आणि स्वतःवरील फाजील विश्वास या गोष्टी नेहमीच खाली खेचणाऱ्या असतात. या मार्गावरील अडचणी लक्षात घेता, ईश्वरावरील विश्वास आणि स्वतःच्या आध्यात्मिक नियतीवरील श्रद्धा (म्हणजे, मी अंतःकरणपूर्वक, जीवाच्या निकराने ईश्वराचा शोध घेत आहे; त्यामुळे एक ना एक दिवस मी त्याच्यापर्यंत पोहोचेनच हा विश्वास) या गोष्टी खूपच आवश्यक असतात. ईश्वर सगळ्यांमध्येच असल्यामुळे, इतरांचा तिरस्कार करणे या गोष्टीला येथे थाराच नाही. अंतिमतः, माणसाच्या कृती आणि आकांक्षा या कधीच क्षुल्लक आणि निरुपयोगी असत नाहीत कारण, सगळे जीवन म्हणजेच अंधकारातून प्रकाशाकडे चाललेली जीवाची वाटचाल असते. आमचा दृष्टिकोन असा आहे की, राजकारण, सामाजिक सुधारणा, परोपकार यांसारख्या मानवाने स्वीकारलेल्या कोणत्याही सामान्य मार्गाने, मानवता स्वतःच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊ शकणार नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तात्पुरती केलेली मलमपट्टी असते. यातून खरी सुटका ही जाणिवेमध्ये परिवर्तन झाल्यावरच घडून येते; व्यक्ती आपल्या जीवाच्या अधिक महान, अधिक व्यापक आणि अधिक विशुद्ध अशा पद्धतीत परिवर्तित होईल आणि त्यावर आधारित कृती करू लागेल, जीवन जगू लागेल तेव्हाच यामधून सुटका घडून येते. एकदा का आध्यात्मिक दिशा निश्चित झाली की मग, व्यक्तीने आपली सारी ऊर्जा त्या दिशेनेच वळविली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 42-43)

मानसिक परिपूर्णत्व – ०२

 

जर व्यक्ती विश्वासाने आणि खात्रीपूर्वक ईश्वराप्रत आत्मदान करेल तर ईश्वराकडून तिच्यासाठी सारे काही केले जाईल; पडदे हटवले जातील, आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल. हे व्यक्तीला अगदी एकदम पूर्णत्वाने जरी करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य आणि मार्गदर्शन लाभत राहील आणि अंतरंगामध्ये ईश्वराचा संपर्क आणि त्याची अनुभूती चढती-वाढती राहील. तुमच्यामधील शंका घेणारे मन कमी सक्रिय बनले आणि तुमच्या मध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. त्यासाठी या व्यतिरिक्त, इतर कोणत्याच तपस्येची आणि सामर्थ्याची आवश्यकता नाही.

*

व्यक्तीला जर ईश्वर हवा असेल तर, व्यक्तीच्या हृदयाची शुद्धीकरण प्रक्रिया पण ईश्वरानेच हाती घ्यावी आणि त्यानेच साधना विकसित करावी आणि त्याला आवश्यक असे अनुभवही ईश्वरानेच त्याला देऊ करावेत, ही जी तुमची योगाविषयीची आधीची कल्पना होती, त्याला अनुलक्षून उत्तर देताना, मी तसे लिहिले होते. मला असे म्हणावयाचे होते की, असे होणे शक्य आहे आणि असे घडूनही येते.

पण त्यासाठी त्या व्यक्तीचा ईश्वरावर विश्वास असावयास हवा, भरवसा असावायास हवा आणि समर्पणाची इच्छा असावयास हवी. कारण, ईश्वराने सारे काही हाती घेण्यामध्ये, व्यक्तीने केवळ स्वतःच्या प्रयत्नांवर न विसंबता, स्वतःला ईश्वराच्या हाती सोपविणे अंतर्भूत आहे. यामध्ये व्यक्तीची सारी श्रद्धा आणि विश्वास ईश्वरावरच असणे आणि त्याने उत्तरोत्तर आत्मसमर्पण प्रगत करत राहणे अभिप्रेत आहे. खरंतर, हेच साधनेचे तत्त्व आहे आणि तेच मी स्वतःही अनुसरलेले आहे. माझ्या दृष्टीने तरी, योगसाधनेचा हा गाभा आहे. मला वाटते, रामकृष्णांनी मांजराच्या पिल्लाची जी प्रतिमा वापरली आहे, ती पद्धत हीच आहे. पण सगळ्यांना हा मार्ग एकदमच अनुसरता येत नाही. इथपर्यंत येऊन पोहोचण्यासाठी त्यांना वेळ लागतो. जेव्हा मन आणि प्राण शांत होतात तेव्हा मग हा मार्ग अधिक विकसित होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 69 – 70)

अंतिम विजयाविषयी कोणतीही शंका न बाळगता योगमार्गावरून वाटचाल करा – तुम्हाला अपयश येऊच शकणार नाही! शंकाकुशंका या क्षुल्लक गोष्टी आहेत; अभीप्सेचा अग्नी प्रज्ज्वलित ठेवा, हाच तो अग्नी असतो जो विजयी होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28: 347)

वाईट कालावधीचा अंत करण्यासाठी, अस्वस्थ होणे किंवा अधीर होणे हे खचितच उपयोगी पडणार नाही. उलट, तुम्ही थोडी जरी आंतरिक स्थिरता राखू शकलात तर, तुम्ही तुमच्या अडचणींमधून अधिक त्वरेने बाहेर पडाल. केवळ स्थिर अवस्थेमध्येच व्यक्ती स्वतःच्या आंतरात्मिक चेतनेच्या संपर्कात येऊ शकते.

श्रीमाताजी
(CWM 17 : 92)

आपले समग्र अस्तित्वच जेव्हा ‘ईश्वरा’च्या प्रकाशाकडे आणि प्रभावाकडे वळते तसेच ते अस्तित्व हातचे काहीही राखून न ठेवता, सर्व काही त्या ‘ईश्वरा’वर सोपविते, तेव्हा त्याला खरे समर्पण आणि प्रामाणिकपणा म्हणतात.

– श्रीमाताजी
(Mother You Said So: 02.03.1956)

एकत्व – ०४

 

जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीमधील एखादी गोष्ट अजिबात पटण्याजोगी नसते किंवा ती तुम्हाला अगदी हास्यास्पद वाटते – ‘तो तसा आहे, तो तसा वागतो, तो असे असे म्हणतो, तो अशा अशा गोष्टी करतो.’ – तेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाशी म्हटले पाहिजे, “बरं, ठीक आहे, पण कदाचित मी देखील माझ्या नकळतपणे तशाच गोष्टी करत असेन. टिका करण्यापूर्वी मी माझ्या स्वतःकडेच नीट लक्षपूर्वक पाहिले पाहिजे, की मी तीच गोष्ट किंचितशा वेगळ्या पद्धतीने तर करत नाहीये ना ? ह्याची खात्री करून घेतली पाहिजे.” प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीच्या वागण्याचा धक्का बसतो तेव्हा तेव्हा, असा विचार करण्यासाठी लागणारी चांगली जाणीव आणि बुद्धिमत्ता जर तुमच्यापाशी असेल; तर तुमच्या असे लक्षात येईल की, तुमच्यामध्ये ज्या ज्या अपूर्णता, दुर्बलता आहेत त्या तुम्हाला अगदी सहजतेने आणि अगदी स्पष्टपणे पाहता याव्यात यासाठी, जीवनामध्ये तुमचे इतरांशी असणारे संबंध हे जणू काही एखाद्या आरशाप्रमाणे तुमच्या समोर मांडण्यात येतात.

सर्वसाधारणपणे आणि अगदी निरपवादपणे सांगावयाचे झाले तर, तुम्हाला इतरांमधील जी गोष्ट खटकत असते, अगदी नेमकी तीच गोष्ट तुम्ही स्वतःमध्ये कमीअधिक झाकलेल्या स्वरूपात, कमीअधिक गुप्त स्वरूपात, कदाचित किंचितशा वेगळ्या वेषात बाळगत असता. ही तीच गोष्ट असते जिच्यामुळे तुमची फसगत होत असते. स्वतःमधील जी गोष्ट तुम्हाला फारशी त्रासदायक वाटत नसते तीच जेव्हा तुम्हाला दुसऱ्यामध्ये दिसते, तेव्हा ती एकदम भयंकर वाटू लागते.

ह्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी त्याची पुष्कळच मदत होईल. आणि त्यामुळे इतरांबरोबर असणाऱ्या तुमच्या नात्याबाबत तुमच्यामध्ये एक सूर्यवत् सहिष्णुता उदयाला येईल; समजूतदारपणातून येणारी सदिच्छा उदयाला येईल आणि त्यामधून मग बरेचदा, ह्या अगदी निरर्थक झगड्यांचा शेवट होईल.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 21-22)