Tag Archive for: साधना

कर्म आराधना – ५२

साधकासाठी बाह्य संघर्ष, अडचणी, संकटे या गोष्टी म्हणजे अहंकार आणि रजोगुणात्मक इच्छा यांच्यावर मात करण्याची आणि नि:शेष समर्पण साध्य करून घेण्याची केवळ साधने असतात. व्यक्ती जोपर्यंत यशावर भर देत असते तोपर्यंत ती व्यक्ती अंशतः का होईना पण अहंकारासाठी कर्म करत असते; आणि ते दाखवून देण्यासाठी तसेच पूर्ण समता यावी म्हणून अडीअडचणी आणि बाह्य अपयश या गोष्टी येत राहतात. विजय-शक्ती प्राप्त करून घेऊच नये, असा याचा अर्थ नाही; परंतु केवळ नजीकच्या कार्यातील यश हीच काही सर्वस्वी महत्त्वाची गोष्ट नाही; ग्रहण करण्याची क्षमता आणि एक महत्तर, अधिक महत्तर सुयोग्य दृष्टी प्रक्षेपित करण्याची क्षमता आणि आंतरिक ‘शक्ती’चे विकसन याच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. आणि हे सारे अतिशय शांतपणे आणि धीराने, नजीकच्या विजयामुळे उत्तेजित न होता किंवा अपयशाने खचून न जाता केले पाहिजे.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 241-242]

कर्म आराधना – ४६

तुम्हाला न आवडणारे काम तुम्हाला करावे लागेलच असे नाही, तर तुम्ही आवड-निवडच सोडून दिली पाहिजे. तुम्हाला आवडते तेवढेच काम करणे म्हणजे प्राणाचे (vital) चोचले पुरवण्यासारखे आणि त्याचे प्रकृतीवर वर्चस्व चालवू देण्यासारखे आहे. कारण जीवन प्राणिक आवडी-निवडीच्या अधीन असणे, हेच तर अरूपांतरित प्रकृतीचे तत्त्व आहे. कोणतीही गोष्ट समत्वाने करता येणे हे कर्मयोगाचे तत्त्व आहे आणि ते कर्म श्रीमाताजींसाठी करायचे असल्याने, ते आनंदाने करणे ही पूर्णयोगामधील खरी आंतरात्मिक आणि प्राणिक अवस्था असते.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 248]

कर्म आराधना – ४५

अडीअडचणींचा नाईलाजास्तव स्वीकार करणे हा कर्मयोगाचा भाग असू शकत नाही – तर घटना साहाय्यकारी असोत वा विरोधी असोत, त्या सद्भाग्यपूर्ण असोत वा दुर्भाग्यपूर्ण असोत; सौभाग्य असो अथवा दुर्भाग्य असो, प्रयत्नांना यश मिळो वा अपयश, या साऱ्या गोष्टींना स्थिर समतेने सामोरे जाणे आवश्यक असते. आवश्यक ते ते सारे करत असताना, गडबडून न जाता, न डगमगता, राजसिक आनंदाविना किंवा दुःखाविना, व्यक्तीने सर्व गोष्टी सहन करण्यास शिकले पाहिजे; आणि अडचणी वा अपयश आले तरीही खचून जाता कामा नये. एखादी व्यक्ती जीवनाच्या ओझ्याखाली दबून न जाता, जे जे करता येणे शक्य आहे ते ते सारे करत राहू शकते.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 243]

कर्म आराधना – ४४

कर्म ज्या वृत्तीने आणि ज्या चेतनेनिशी केले जाते त्यानुसार ते कर्म ‘योगिक’ बनते, स्वयमेव कर्मामुळे ते कर्म योगिक किंवा अ-योगिक ठरत नाही.
*
फलाच्या आशेने एखादी गोष्ट करणे हे ‘योगा’च्या नियमांशी विसंगत आहे. एखादी गोष्ट योग्य आहे म्हणूनच ती केली पाहिजे किंवा ती ‘ईश्वरा’साठीच केली गेली पाहिजे, कोणत्याही फलासाठी नव्हे.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 232-233]

कर्म आराधना – ४३

आध्यात्मिक सत्याच्या दृष्टीने, श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची कल्पना खचितच परकी आहे. आध्यात्मिकदृष्ट्या पाहिले असता, कोणतीच गोष्ट छोटी वा मोठी नसते. साहित्यिक लोकांच्या अशा कल्पना असतात की, काव्य लिहिणे हे श्रेष्ठ दर्जाचे कर्म आहे आणि चपलाबूट तयार करणे, स्वयंपाकपाणी करणे हे हलक्या दर्जाचे, किरकोळ कर्म आहे. परंतु आत्म्याच्या दृष्टीने ही सारी कर्मं समानच असतात – आणि कर्म ज्या वृत्तीने केले जाते ती आंतरिक वृत्तीच महत्त्वाची असते.
*
सर्व काही शांतपणे अंतरंगातूनच केले पाहिजे – एखादे काम करणे, बोलणे, वाचणे, लिहिणे या साऱ्या गोष्टी, सामान्य चेतनेच्या विखुरलेल्या आणि अशांत हालचालींनिशी करता कामा नयेत; तर त्या खऱ्या चेतनेचा एक भाग म्हणूनच केल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 247, 254]

कर्म आराधना – ४२

त्या सर्व गोष्टी तुम्ही स्वीकारल्या पाहिजेत, ज्या ‘ईश्वरा’कडून आलेल्या असतात, फक्त त्यांचाच स्वीकार तुम्ही केला पाहिजे. कारण छुप्या इच्छावासनांकडून देखील काही गोष्टी समोर येऊ शकतात. या इच्छावासना तुमच्या अवचेतन मनामध्ये कार्यरत असतात आणि जरी तुम्हाला त्या तुमच्या इच्छा म्हणून ओळखता आल्या नाहीत तरीसुद्धा, त्या इच्छावासना तुमच्या समोर अशा गोष्टी आणतात की, ज्या ‘ईश्वरा’कडून आलेल्या नसतात तर छुप्या इच्छांकडून आलेल्या असतात.

एखादी गोष्ट ‘ईश्वरा’कडून आलेली आहे हे तुम्हाला सहजपणे कळू शकते. तुम्हाला मोकळे वाटते, तुम्ही स्वस्थचित्त असता, तुम्ही शांत असता. पण जेव्हा असे होते की, काहीतरी तुमच्यासमोर येते आणि तुम्ही त्यावर झडप घालता आणि ओरडता, “हां, शेवटी मला हवे ते मला मिळालेच,” तेव्हा तुम्ही हे नक्कीच ओळखले पाहिजे की, ती गोष्ट ‘ईश्वरा’कडून आलेली नाही.

– श्रीमाताजी
[CWM 03 : 09-10]

कर्म आराधना – ४१

ईश्वरी आज्ञेचे अनुसरण करण्यास जर तुम्ही तयार असाल तर, तुम्हाला देण्यात आलेले कोणतेही कर्म, मग ते कर्म कितीही विलक्षण असले तरी, ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सक्षम असले पाहिजे, आणि ज्या शांतचित्ताने तुम्ही ते कर्म स्वीकारले होते त्याच शांतचित्ताने तुम्हाला अगदी दुसऱ्याच दिवशी ते सोडूनही देता आले पाहिजे. (ते कार्य) ही फक्त तुमचीच जबाबदारी आहे, असे तुम्हाला वाटता कामा नये.

कोणत्याच गोष्टीविषयी वा जीवनशैलीविषयी, कोणतीही ‘आसक्ती’ असता कामा नये. तुम्ही पूर्णपणे मुक्त असले पाहिजे. तुम्हाला खराखुरा योगिक दृष्टिकोन हवा असेल तर, ‘ईश्वरा’कडून येणाऱ्या सर्व गोष्टींचा स्वीकार तुम्हाला करता आला पाहिजे आणि तेवढ्याच सहजतेने आणि कोणत्याही पश्चात्तापाविना त्या गोष्टी सोडूनही देता आल्या पाहिजेत. ”मला काहीही नको,” असे म्हणणाऱ्या एखाद्या संन्याशाचा दृष्टिकोन आणि ”मला अमुक एक गोष्ट हवी आहे,’ असे म्हणणाऱ्या प्रापंचिक माणसाचा दृष्टिकोन, हे दोन्ही दृष्टिकोन एकसारखेच असतात. प्रापंचिक जीवन जगणारा माणूस जेवढा त्याच्या मालकीच्या गोष्टींबाबत आसक्त असतो, तेवढाच एखादा संन्यासीसुद्धा त्याच्या परित्यागाविषयी आसक्त असू शकतो.

– श्रीमाताजी
[CWM 03 : 09]

कर्म आराधना – ३९

कर्माची आध्यात्मिक परिणामकारकता ही अर्थातच आंतरिक दृष्टिकोनावर अवलंबून असते. कर्मामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला अर्पणाचा भाव हा महत्त्वाचा असतो. याच्या जोडीला एखादी व्यक्ती जर कर्म करत असताना त्यामध्ये श्रीमाताजींचे स्मरण करू शकत असेल किंवा एका विशिष्ट एकाग्रतेद्वारे श्रीमाताजींच्या उपस्थितीची त्या व्यक्तीला जाणीव होत असेल किंवा एक शक्ती ते कार्य करत आहे, ते कार्य सांभाळत आहे, याची जर व्यक्तीला जाण असेल तर त्यामुळे आध्यात्मिक परिणामकारकता अधिकच वाढीला लागते. पण मनावर मळभ आलेले असताना, नैराश्य आलेले असताना किंवा संघर्षाच्या प्रसंगी व्यक्ती जरी या गोष्टी करू शकली नाही तरी, कृती करत असताना पार्श्वभूमीवर एक प्रकारची प्रेमाची किंवा भक्तीची भावना असू शकते, जे प्रेम वा जी भक्ती ही त्या कर्माची मुळातील प्रेरक शक्ती होती. ही शक्ती त्या मळभाच्या मागे उपस्थित राहू शकते आणि काळोख्या कालावधींनंतर पुन्हा सूर्यासारखी पूर्ववत उगवू शकते. सर्व साधना अशीच असते आणि म्हणूनच या काळोख्या क्षणांमुळे व्यक्तीने नाउमेद होता कामा नये, तर मूळ आच (urge) तेथे आहे आणि हे काळोखे क्षण हा प्रवासामधील केवळ एक टप्पा आहे, तो टप्पा ओलांडल्यानंतर तो स्वतःच त्या व्यक्तीला एका महत्तर प्रगतीकडे घेऊन जाणार आहे, याची व्यक्तीला जाणीव असली पाहिजे.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 242]

कर्म आराधना – ३८

कर्म करत असताना सुरुवातीला ‘ईश्वरी उपस्थिती’चे स्मरण ठेवणे हे सोपे नसते; परंतु कर्म संपल्यासंपल्या लगेचच जरी त्या उपस्थितीची जाणीव व्यक्तीला पुनरुज्जीवित करता आली तरी ठीक आहे. कालांतराने कर्म करत असतानाच त्या उपस्थितीची जाणीव आपोआप होऊ लागेल.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 258-259]

कर्म आराधना – ३७

आळस आणि अक्रियता (inaction) यांचा शेवट तामसिकतेमध्ये होतो; अचेतनेच्या गर्तेत पडण्यासारखे ते असते, या गोष्टी प्रगती आणि प्रकाश यांच्या विरोधी असतात.

स्वतःच्या अहंकारावर मात करणे आणि केवळ ‘ईश्वरा’च्या सेवेमध्ये जीवन व्यतीत करणे – हा आपला आदर्श असला पाहिजे. तोच सत्य चेतना प्राप्त करून घेण्याच्या दिशेने जाणारा सर्वात जवळचा मार्ग आहे.
*
योग्य वृत्तीने केलेले कर्म हे ध्यानच असते.

– श्रीमाताजी
[CWM 14 : 297, 298]