Tag Archive for: साधना

संपूर्ण समता प्रस्थापित व्हायला वेळ लागतो. आणि ही समता पुढील तीन गोष्टींवर आधारित असते. – आंतरिक समर्पणाच्या द्वारे जीवाने ‘ईश्वरा’प्रत केलेले आत्म-दान, वरून अवतरित होणारी आध्यात्मिक स्थिरता व शांती, आणि समतेला विरोध करणाऱ्या, अहंकारी आणि राजसिक अशा साऱ्या भावनांना दृढ, दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण नकार.

यासाठी पहिली आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे, हृदयामध्ये संपूर्ण समर्पण व अर्पण भाव. रजोगुणाचा, अहंकाराचा त्याग इ. गोष्टी प्रभावी होण्यासाठी आध्यात्मिक स्थिरतेमध्ये वृद्धी आणि समर्पण या अटी आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 131)

समत्व म्हणजे केवळ शांती नव्हे आणि तटस्थताही नव्हे किंवा अनुभवांपासून मागे हटणेही नव्हे, तर आपल्या मनाच्या व प्राणाच्या ज्या वर्तमान प्रतिक्रिया असतात, त्या प्रतिक्रियांच्या पलीकडे, अतीत जाणे म्हणजे समत्व. समत्व म्हणजे जीवनाला आध्यात्मिक रीतीने सामोरे जाणे, प्रतिसाद देणे. किंबहुना आध्यात्मिक रीतीने जीवनाला कवळणे आणि आपल्या जीवनाला स्वतःच्या व आपल्या आत्म्याच्या कृतीचे परिपूर्ण रूप बनण्यास प्रवृत्त करणे म्हणजे समत्व. आत्म्याची आपल्या अस्तित्वावर सत्ता प्रस्थापित झाल्याचे हे पहिले मर्म आहे. हे समत्व आपल्याला पूर्णतेने साध्य झाले की मग, दिव्य आध्यात्मिक प्रकृतीच्या मूळ भूमिमध्येच आपला प्रवेश होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 24 : 721)

प्रश्न : कोणत्या गोष्टीला तुम्ही, ‘बाह्य अस्तित्वातील समतेचा पाया’ असे म्हणत आहात?

श्रीमाताजी : उत्तम आरोग्य, सुदृढ आणि संतुलित देह हा ‘बाह्य अस्तित्वातील समतेचा पाया’ असतो; एवढेसे काही झाले की एखादी लहानगी मुलगी जशी घाबरून जाते तशी व्यक्तीची मनोवस्था नसेल; एखादी व्यक्ती जेव्हा व्यवस्थित झोप घेते, व्यवस्थित अन्नसेवन करते… जेव्हा व्यक्ती शांत असते, संतुलित असते, अगदी शांत असते, तेव्हा व्यक्तीचा पाया मजबूत असतो आणि मग अशी व्यक्ती मोठ्या संख्येने शक्तींचा स्वीकार करू शकते.

तुमच्यापैकी कोणी आजवर जर आध्यात्मिक शक्ती प्राप्त केली असेल तर, उदाहरणार्थ दिव्य आनंदाची शक्ती ग्रहण केली असेल तर, त्याच्या हे अनुभवास आले असेल की, त्याचे आरोग्य जर उत्तम नसेल तर तो ते अनुभव साठवून ठेवू शकत नाही, टिकवून ठेवू शकत नाही. तो रडू लागतो, ओरडू लागतो, जे काही त्याला प्राप्त झाले आहे ते खर्च करण्यासाठी तो अगदी उतावीळ होऊन जातो. ते करण्यासाठी त्याला हसावे लागते, बोलावे लागते, त्याला हावभाव, हातवारे करावे लागतात अन्यथा तो ती शक्ती राखू शकत नाही, त्याचा कोंडमारा झाल्यासारखे त्याला वाटते. आणि अशा रीतीने हसत राहिल्यामुळे, रडत राहिल्यामुळे, इकडे तिकडे हिंडत राहिल्यामुळे त्याने जे काही प्राप्त केले असते ते, त्या साऱ्या गोष्टी तो गमावून बसतो.

उत्तम संतुलित स्थितीत राहण्यासाठी, जे प्राप्त होत आहे ते आत्मसात करता येण्यासाठी, व्यक्तीने अगदी शांत, अचंचल आणि स्थिर असले पाहिजे. व्यक्तीचा पाया मजबूत असला पाहिजे, आरोग्य उत्तम असले पाहिजे. पाया अत्यंत मजबूत असणे आवश्यक आहे. ती गोष्ट खूप खूप महत्त्वाची आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 22-23)

प्रश्न : बाह्य समत्व आणि आत्म्याचे समत्व यामध्ये काय फरक आहे ?

श्रीमाताजी : आत्म्याचे समत्व ही मनोवैज्ञानिक गोष्ट आहे. सर्व घटना मग त्या चांगल्या असोत की वाईट, दुःखीकष्टी न होता, नाउमेद न होता, उतावीळ आणि अस्वस्थ न होता, सहन करण्याची शक्ती म्हणजे आत्म्याचे समत्व. समत्व असले की, काहीही घडले तरी तुम्ही प्रसन्न, शांत राहता.

दुसरे म्हणजे शरीरातील समत्व. हे मानसिक समत्व नसते, तर ते काहीसे भौतिक, शारीरिक समत्व असते; म्हणजे ती अशी एक शारीरिक संतुलनाची स्थिती असते की, ज्यामुळे व्यक्ती कोणताही त्रास न होता, शक्तींचे ग्रहण करू शकते.

व्यक्तीला जर या मार्गावर प्रगत व्हावयाचे असेल तर या दोन्ही समत्वांची सारखीच आवश्यकता असते. आणि त्याशिवाय इतरही काही गोष्टी असतातच. उदाहरणार्थ, मनाची बैठक. सर्व प्रकारच्या कल्पना, अगदी परस्परविरोधी का असेनात, सर्व बाजूंनी येत राहतात आणि तरीदेखील व्यक्तीला त्याचा काही त्रास होत नाही अशी स्थिती म्हणजे मनाची बैठक. व्यक्ती त्या कल्पना पाहू शकते आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या योग्य स्थानी ठेवू शकते. ती असते मनाची बैठक.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 22-23)

उच्चतर चेतनेची शांती जेव्हा अवतरित होते तेव्हा ती नेहमीच तिच्यासोबत समतेची प्रवृत्ती देखील घेऊन येते. कारण कनिष्ठ प्रकृतीच्या लाटांकडून, समतेविना असलेल्या शांतीवर आघात होण्याचा नेहमीच धोका संभवतो.

*

मानसिक चेतनेप्रमाणेच तुम्ही प्राणिक आणि शारीरिक चेतनेमध्येही समत्व आणि स्थिरतेचा दृढ पाया निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. तुमच्यामध्ये ‘शक्ती’ आणि ‘आनंदा’चा पूर्ण प्रवाह अवतरित होऊ दे, परंतु तो प्रवाह धारण करता येईल अशा दृढ आधारामध्येच शक्ती आणि आनंद अवतरित व्हायला हवेत. आणि आधाराच्या (शरीर, प्राण, मन) ठायी ही क्षमता आणि दृढता परिपूर्ण समत्वामधूनच येते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 128, 127)

(ओढवलेल्या परिस्थितीमध्ये जे काही घडत आहे, त्याने नाउमेद न होता, उलट त्या परिस्थितीचा साधनेसाठी कसा लाभ करून घेता येईल, ह्याचा विचार करण्यास येथे श्रीअरविंद सांगत आहेत.)

…असे म्हणता येईल की, वैश्विक शक्तींचा खेळ, विश्वामधील संकल्प हा नेहमीच, कार्याच्या व साधनेच्या थेट दिशेशी सुसंवादी आणि कार्य व साधना सुरळीत घडण्यासाठी अनुकूल कार्य करत असल्याचे दृश्य स्वरूपात दिसत नाही. चढउतार भासतील अशा गोष्टी घडून येतात, किंवा अचानक अशी काही वळणे येतात की ज्यामुळे, जी दिशा पकडलेली आहे त्या मार्गापासून विचलित होणे, किंवा त्यामध्ये खंड पडणे, विरोधी किंवा प्रतिकूल परिस्थिती येणे, असे बरेचदा घडू शकते. किंवा जे तात्पुरते का होईना पण सुस्थिर, प्रस्थापित झालेले होते त्यापासून मूढपणे दूर जाणे या गोष्टी घडू शकतात.

परंतु अशा वेळी एक गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे, समत्व राखले पाहिजे. आणि साधनेमध्ये किंवा जीवनामध्ये जे काही घडते, तिला प्रगतीची संधी, प्रगतीचे साधन बनविले पाहिजे. वैश्विक शक्तींचा संकल्प आणि वैश्विक शक्तींचा हा जो खेळ सुरू असतो, त्या खेळामध्ये अनुकूल आणि प्रतिकूल गोष्टींचे नेहमीच एक मिश्रण आढळून येते; त्यापाठीमागे त्याच्या अतीत असणारी एक अधिक उच्चतर, गुप्त अशी ईश्वरी ‘संकल्पशक्ती’ कार्यरत असते. आणि व्यक्तीने या ईश्वरी ‘संकल्पशक्ती’ची वाट पाहिली पाहिजे आणि तिच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे; पण त्याचबरोबर ती कार्यपद्धती तुम्हाला नेहमी समजलीच पाहिजे, अशी अपेक्षाही तुम्ही बाळगता कामा नये.

मनाला हे किंवा ते व्हायला हवे असे वाटत असते; त्याने पकडलेली दिशा तशीच कायम राहावी असे त्याला वाटत असते; पण मनाला जे हवेहवेसे वाटत असते ते सर्व नेहमीच, व्यापक हेतूने जे योजण्यात आलेले असते तेच असते असे नाही. व्यक्तीने नेहमीच साधनेच्या निश्चित अशा मध्यवर्ती ध्येयाचे अनुसरण केले पाहिजे, आणि त्यापासून कधीही विचलित होता कामा नये. तथापि व्यक्तीने बाह्य परिस्थिती, स्थिती इ. गोष्टी म्हणजे जणू काही अगदी पायाभूत महत्त्वाच्या गोष्टी आहेत असे समजून, त्या पायावर (साधनेची इमारत) उभारता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 564-565)

आसक्ती नाही, इच्छा नाहीत, आवेग नाहीत, पसंती-नापसंती नाही; संपूर्ण समता, अविचल शांती आणि ‘ईश्वरी’ संरक्षणाविषयी परिपूर्ण श्रद्धा : हे सारे असेल तर तुम्ही सुरक्षित असता; नसेल तर तुम्ही भयग्रस्त असता. आणि जोपर्यंत तुम्ही सुरक्षित नसता, तोपर्यंत कोंबडीची पिल्ले ज्याप्रमाणे आपल्या आईच्या पंखाखाली आसरा घेतात, तसे करणे अधिक चांगले !

– श्रीमाताजी (CWM 03 : 48)

आपण संपूर्णतया आणि प्रामाणिकपणे आपले सर्वस्व ‘ईश्वरा’ला समर्पित करू या आणि त्याच्या संरक्षणाचा आनंद घेऊ या.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 47)

बाह्य गोष्टी जेव्हा गोंधळाच्या होतात तेव्हा, त्यांच्या रूपांवरून त्यांच्याविषयीचे मत बनवायचे नाही, असा एक दंडक तुम्ही तुमच्या मनावर त्वरित घालून घेतला पाहिजे. सर्व काही सुस्पष्ट होईल या विश्वासाने, अंतरंगातील श्रीमाताजींच्या प्रकाशाकडे त्या साऱ्या गोष्टी सोपविल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 418)

एखाद्याने आपले एक पाऊल एकीकडे आणि दुसरे पाऊल दुसरीकडेच तर पडत नाही ना, आपापल्या मार्गाने जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या बोटींमध्ये तर आपण उभे नाही ना, याची काळजी घ्यावयास हवी. श्रीअरविंदांचे असे सांगणे आहे की, व्यक्तीने ‘दुहेरी जीवन’ जगता कामा नये. त्याने एक तर ही गोष्ट सोडावयास हवी किंवा ती – एकाच वेळी दोन्हींचे अनुसरण करता येत नाही.

-श्रीमाताजी
(CWM 04 : 377-378)