Tag Archive for: साधना

अमृतवर्षा ०४

 

आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व क्रियांचे रूपांतरण हवे आहे. पूर्वी जेव्हा रूपांतरणाविषयी बोलले जात असे तेव्हा तेथे केवळ आंतरिक चेतनेचे रूपांतरणच अभिप्रेत असे. ही सखोल चेतना स्वत:मध्ये शोधण्याचा व्यक्ती प्रयत्न करत असे; हे करत असताना, आंतरिक गतिविधींवरच लक्ष केंद्रित करायचे असल्याने, शरीराला आणि त्याच्या क्रियाकलापांना, ती व्यक्ती एक लोढणं समजत असे; आणि निरुपयोगी गोष्ट म्हणून त्यास ती धुडकावून देत असे.

परंतु, हे पुरेसे नसल्याचे श्रीअरविंदांनी स्पष्ट केले. जडभौतिक जगताने देखील या रूपांतरणामध्ये सहभागी व्हावे आणि त्यानेही या गहनतर ‘सत्या’ची अभिव्यक्ती करावी, अशी त्या ‘सत्या’कडून मागणी होत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

परंतु लोकांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना असे वाटले की, अंतरंगामध्ये काय घडत आहे याची अजिबात काळजी न करतादेखील शरीर आणि त्याच्या क्रिया यांचे रूपांतरण घडविणे शक्य आहे, – अर्थात हे खरे नाही.

हे शारीरिक रूपांतरणाचे कार्य हाती घेण्यापूर्वी, – हे कार्य म्हणजे, जे सर्वात अवघड असे कार्य आहे ते हाती घेण्यापूर्वी – तुमची आंतरिक चेतना ही ‘सत्या’मध्ये दृढपणे, सघनपणे प्रस्थापित झालेली असली पाहिजे; म्हणजे मग हे रूपांतरण म्हणजे त्या ‘सत्या’चा चरम आविष्कार असेल – किमान आत्ताच्या घडीपुरता तरी ‘चरम’.

या रूपांतरणाचा प्रारंभबिंदू असतो ग्रहणशीलता! रूपांतरण प्राप्त करून घेण्यासाठीची ही अत्यावश्यक अट आहे. त्यानंतर चेतनेमध्ये परिवर्तन घडून येते.

चेतनेचे हे परिवर्तन आणि त्याची पूर्वतयारी यांची तुलना नेहमी अंड्यातील कोंबडीच्या पिलाच्या घडणीशी केली जाते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अंडे जसेच्या तसे असते, त्यामध्ये काहीही बदल दिसत नाही आणि जेव्हा ते पिल्लू आत पूर्ण विकसित झालेले असते, पूर्णतया जिवंत झालेले असते, तेव्हा ते त्याच्या छोट्याशा चोचीने त्या कवचाला टोचे मारते आणि त्यातून बाहेर पडते.

चेतनेच्या परिवर्तनाच्या क्षणीसुद्धा असेच काहीसे घडून येते. दीर्घ काळपर्यंत काहीच घडत नाही असेच तुम्हाला वाटत असते; तुमची चेतना नेहमीप्रमाणेच आहे, त्यात काहीच बदल नाही असेच तुम्हाला वाटत असते. तुमच्यापाशी जर का तीव्र अभीप्सा असेल तर तुम्हाला कधीकधी विरोधदेखील जाणवतो; जणूकाही तुम्ही एखाद्या भिंतीवर धक्के देत असता पण ती काही ढासळत नाही. पण जेव्हा तुमची अंतरंगातून तयारी झालेली असते तेव्हा एक शेवटचा प्रयत्न – तुमच्या अस्तित्वाच्या कवचाला धक्के देण्याचा एक प्रयत्न पुरेसा ठरतो आणि मग सर्वकाही खुले होते आणि तुम्ही एका आगळ्यावेगळ्या चेतनेमध्ये उन्नत झालेले असता.

 

– श्रीमाताजी [CWM 04 : 18-19]

विचारशलाका ३४

आळस आणि निष्क्रियता यांचा परिणाम म्हणजे तमस, तामसिकता. त्यातून व्यक्ती अचेतनतेमध्ये जाऊन पडते आणि ती गोष्ट प्रगती व प्रकाशाच्या पूर्णपणे विरोधी असते. अहंकारावर मात करणे आणि केवळ ‘ईश्वरा’च्या सेवेमध्ये जीवन व्यतीत करणे, हा खरी ‘चेतना’प्राप्त करून घेण्याचा निकटतम व आदर्श मार्ग आहे.

– श्रीमाताजी [CWM 13 : 212]

विचारशलाका ३१

 

साधक : व्यक्ती जेव्हा झोपलेली असते तेव्हा तिची चेतना ही जागेपणी असलेल्या चेतनेपेक्षा कशा प्रकारे वेगळी असते?

श्रीमाताजी : ती भिन्न असल्याचे तुमच्या कधी लक्षात आले नाही का? तुमची शारीर चेतना (physical consciousness) किंवा तुमची सूक्ष्म शारीर चेतना (subtle physical consciousness), तुमची प्राणिक चेतना (vital consciousness) किंवा तुमच्यामधील कनिष्ठ किंवा उच्चतर प्राणिक चेतना, तुमची आंतरात्मिक चेतना (psychic consciousness), तुमची मानसिक चेतना (mental consciousness), या सगळ्या एकमेकींपासून पूर्णत: भिन्न असतात.

म्हणून जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा तुमच्यात एक चेतना असते आणि जेव्हा तुम्ही जागे असता तेव्हा वेगळीच चेतना तुमच्यात असते. तुम्ही जागे असता तेव्हा गोष्टी तुमच्या बाहेर प्रक्षेपित झालेल्या तुम्ही पाहता, तर निद्रावस्थेत त्याच गोष्टी तुम्ही अंतरंगात पाहता. म्हणजे जागे असताना, तुम्हाला जणू बाहेर धाडण्यात आलेले असते आणि तुम्ही त्याकडे समोरून पाहता आणि निद्रावस्थेत तुम्ही स्वत:कडेच आंतरिक आरशामध्ये पाहता. व्यक्तीने चेतनांच्या स्थितीमध्ये फरक करायला शिकले पाहिजे अन्यथा व्यक्ती कायमच गोंधळलेली राहील.

वास्तविक, ही योगमार्गावरील पहिली पायरी आहे, ही धाग्याची सुरुवात आहे. जर व्यक्तीने हा धागा शेवटपर्यंत पकडून ठेवला नाही तर, व्यक्ती वाट चुकण्याची शक्यता असते. तेव्हा तो धागा शेवटपर्यंत पकडून ठेवणे अत्यंत आवश्यक असते.

– श्रीमाताजी [CWM 07 : 131]

विचारशलाका २८

 

आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश म्हणजे जणू समुद्रात उडी मारल्याप्रमाणे ‘दिव्यत्वा’मध्ये उडी घेणे. आणि तरीदेखील तो शेवट नसतो तर तो प्रारंभ असतो. कारण एकदा का तुम्ही त्यामध्ये उडी घेतली की, त्यानंतर तुम्हाला ‘दिव्यत्वा’मध्ये जीवन जगता आले पाहिजे. “मी कोठे पडणार तर नाही नां? मला काही होणार तर नाही नां?” असा कोणताही विचार न करता तुम्हाला सरळ उडी मारायची असते. तुमच्या मनामध्ये असणारी चलबिचल तुम्हाला रोखू पाहत असते. पण तुम्ही स्वत:ला झोकून दिले पाहिजे. तुम्हाला समुद्रात उडी मारायची असेल आणि तुम्ही जर सगळा वेळ असा विचार करीत बसलात की, ”अरे बापरे, पण इथे किंवा तिथे एखादा खडक असला तर…” तर मग, तुम्ही कधीच उडी मारू शकणार नाही.

अर्थातच समुद्रात उडी मारण्यापूर्वी ज्याप्रमाणे तुम्ही समुद्र पाहिलेला असला पाहिजे आणि ज्याप्रमाणे तुम्हाला त्याविषयी काही माहिती असली पाहिजे त्याप्रमाणेच, तुम्हाला ‘दिव्य सद्वस्तू’चे (Divine Reality) आधी थोडी तरी झलक दिसलेली असली पाहिजे. ती झलक म्हणजे सहसा आंतरात्मिक चेतनेची (psychic consciousness) जागृती असते. भले तो संपर्क अगदी सखोल आंतरात्मिक किंवा समग्रतया प्रस्थापित झालेला नसला तरीदेखील, तुम्हाला किमान एक सुस्पष्ट अशी मानसिक वा प्राणिक प्रचिती (mental or vital realisation) तरी आलेली असली पाहिजे. तुम्हाला तुमच्या अंतरंगामध्ये किंवा बाहेर सुस्पष्टपणे ‘ईश्वरी उपस्थिती’ची जाणीव झालेली असली पाहिजे, तुम्हाला ‘दिव्य-जगता’चा श्वास जाणवलेला असला पाहिजे. आणि त्याचवेळी त्याविरुद्ध असणाऱ्या सामान्य जगताचा घुसमटवून टाकणारा दबाव तुम्हाला जाणवलेला असला पाहिजे की जो, तुम्हाला या दडपून टाकणाऱ्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करण्यास भाग पाडतो. तुम्हाला जर तसा अनुभव आलेला असेल तर तुम्ही केवळ त्या ‘दिव्य सद्वस्तू’मध्ये नि:शेषतया आश्रय घेणे आणि त्याच्या आधाराने, त्याच्या सुरक्षेमध्ये, केवळ त्यामध्येच राहणे एवढेच करायचे असते. तुम्ही तुमच्या सामान्य जीवनामध्ये कधीतरी हे अंशत: किंवा तुमच्या अस्तित्वाच्या काही भागांनिशी वा कधीतरी, नैमित्तिकरित्या असे केले असेल तर ते आता तुम्ही पूर्णांशाने आणि सदासर्वदासाठी केले पाहिजे. ही उडी तुम्हाला मारायची आहे आणि जर तुम्ही हे केले नाहीत, तर तुम्ही वर्षानुवर्षे ‘योगसाधना’ करत राहिलात तरीही खऱ्या आध्यात्मिक जीवनाविषयी तुम्हाला काहीही माहीत होणार नाही, अशी शक्यता असते. संपूर्णतया आणि नि:शेषतया उडी मारा; तेव्हा तुम्ही या बाह्य गोंधळापासून पूर्णत: मुक्त व्हाल आणि तुम्ही आध्यात्मिक जीवनाची खरीखुरी अनुभूती प्राप्त करून घ्याल.

– श्रीमाताजी [CWM 03 : 21-22]

विचारशलाका २७

मनुष्यामध्ये नेहमीच दोन प्रकारच्या प्रकृती असतात; एक आंतरिक प्रकृती म्हणजे आत्मिक व आध्यात्मिक, जी ‘ईश्वरा’च्या संपर्कामध्ये असते; आणि दुसरी बाह्य प्रकृती म्हणजे मानसिक, प्राणिक आणि शारीरिक. या बाह्य प्रकृतीचे भरणपोषण ‘अज्ञाना’मध्ये झालेले असते आणि ही प्रकृती दोष, अपूर्णता, अशुद्धता यांनी भरलेली असते. आणि त्यामुळेच साधनेमध्ये गोष्टी अचानक एका क्षणात बदलू शकत नाहीत.

आंतरिक अनुभूती वाढत जाते, विस्तारत जाते आणि बाह्य प्रकृतीला ती अधिकाधिक व्यापत जाते. पण जोवर ती अनुभूती बाह्य प्रकृतीला पूर्णतया व्यापत नाही तोवर कोठेतरी अपूर्णता शिल्लक राहतेच.

– श्रीअरविंद [CWSA 28 : 89-90]

विचारशलाका २६

 

कधीकधी असे होते की, व्यक्ती तत्त्वज्ञानाचे एक आख्खे पुस्तक वाचून काढते पण, एका पाऊलदेखील तिची प्रगती होत नाही. कधी असेही घडते की, एखादी व्यक्ती अतिशय धर्मनिष्ठ असूनही, तिची अजिबात प्रगती होत नाही. अशीही काही माणसं आहेत की, ज्यांनी त्यांचे आख्खे आयुष्य हे ध्यानधारणेमध्ये व्यतीत केले आहे आणि तरीदेखील त्यांना काहीच प्राप्त झालेले नाही. (आणि दुसरीकडे) जुन्या चप्पलबूट शिवण्यासारखी अगदी साधी कामे करणारीसुद्धा काही माणसं आहेत की ज्यांना आध्यात्मिक अनुभव आलेला आहे. व्यक्ती काय विचार करते, काय बोलते यापेक्षा असे अनुभव या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. ती एक देणगी असते. आणि यासाठी काय आवश्यक असेल तर ते म्हणजे – त्या ‘ईश्वरा’शी एकत्व पावण्यामध्ये यशस्वी होणे आणि ‘ईश्वरा’मध्ये जीवन जगणे. कधीकधी तुम्ही पुस्तकातील एखादे वाक्य वाचता आणि तुम्हाला ते वाक्य तेथे घेऊन जाते. तर कधी तुम्ही धर्मग्रंथ किंवा तत्त्वज्ञानाची पुस्तकेच्या पुस्तके वाचूनही काही उपयोग होत नाही. हो, पण अशीही काही माणसं असतात की, तत्त्वज्ञानाची पुस्तके वाचल्यामुळे त्यांना प्रगती करण्यासाठी काही मदत झालेली असते. पण या सर्व गोष्टी दुय्यम आहेत.

एकच गोष्ट अतिशय महत्त्वाची असते : प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण इच्छा, संकल्प; कारण (प्रगती, अनुभव इत्यादी) गोष्टी निमिषार्धात होत नाहीत. त्यामुळे व्यक्तीने चिकाटी ठेवली पाहिजे.

एखाद्याला जेव्हा असे वाटते की, त्याची प्रगती होत नाहीये, अशावेळी त्याने नाउमेद होता कामा नये. त्याच्या प्रकृतीमध्ये असे काय आहे की, जे या गोष्टींना विरोध करत आहे ते त्याने शोधून काढले पाहिजे; आणि मग त्याने आवश्यक ती प्रगती केली पाहिजे. त्यामुळे व्यक्ती एकाएकी पुढे जाते. आणि जेव्हा तुम्ही शेवटापर्यंत जाता तेव्हा तुम्हाला अनुभव येतो.

आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, ज्या माणसांनी परस्परांहून अगदी विभिन्न असे मार्ग अनुसरलेले असतात, ज्यांच्या विभिन्न अशा मनोवृत्ती असतात, त्यांच्यापैकी काहीजण खूप भाविक असतात तर काही अगदी नास्तिक असतात, काही जण तर अगदी जडवादी असतात पण ते सारे एकाच प्रकारच्या अनुभवापाशी येऊन पोहोचतात; तो अनुभव सर्वांना सारखाच येतो. कारण तो ‘सत्य’ असतो – तो खरा असतो, कारण ते एकमेव वास्तव असते. एखादा त्याबद्दल काय बोलतो ते महत्त्वाचे नाही, तर महत्त्वाचे आहे ते तुम्ही तुमच्या मार्गाचे अनुसरण करणे, भले मग तो मार्ग कोणताही असो, त्याचे अनुसरण करणे हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे.

– श्रीमाताजी [CWM 06 : 26-27]

विचारशलाका २५

 

पूर्णयोगामध्ये चक्रं ही संकल्पपूर्वक, प्रयत्नपूर्वक खुली केली जात नाहीत, तर ‘शक्ती’च्या अवतरणामुळे ती आपलीआपणच स्वत:हून खुली होतात. तांत्रिक साधनेमध्ये ती खालून वर, ऊर्ध्वगामी दिशेने खुली होत जातात, म्हणजे मूलाधार चक्र प्रथम खुले होते तर आपल्या पूर्णयोगामध्ये, चक्रं वरून खाली खुली होत जातात. तरीसुद्धा मूलाधारातून शक्तीचे आरोहण घडून येतेच.

*

‘पूर्णयोगा’मध्ये मज्जारज्जूमध्ये (कुंडलिनीच्या) प्रवाहाची कधीतरी जाणीव होते, जशी ती इतर नाडी-प्रवाहमार्गांमध्ये किंवा शरीराच्या विविध भागांमध्येही होते. परंतु ‘पूर्णयोगा’मध्ये बलपूर्वक किंवा हटातटाने कुंडलिनी जागृती केली जात नाही. या योगामध्ये, उच्च स्तरीय आध्यात्मिक चेतनेला जाऊन मिळण्यासाठी, कनिष्ठ चक्रांमधून चेतना शांतपणे वर चढत जाते आणि ‘ईश्वरी शक्ती’चे वरून अवतरण होते आणि ती ‘ईश्वरी शक्ती’ मन आणि शरीरावर तिचे कार्य करते. त्या कार्याची पद्धत व त्याच्या पायऱ्या प्रत्येक साधकामध्ये वेगवेगळ्या असतात. ‘दिव्य माते’वर पूर्ण ‘विश्वास’ आणि येणाऱ्या सर्व चुकीच्या सूचनांना व प्रभावांना दूर सारण्यासाठी आवश्यक असणारी ‘सतर्कता’ या गोष्टी म्हणजे ‘पूर्णयोगा’चा मुख्य नियम आहे.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 460, 462]

विचारशलाका ११

साधक : अनुभवाची नकारात्मक बाजू (Negative Side). आणि सकारात्मक बाजू (Positive Side). म्हणजे काय?

श्रीमाताजी : तुमच्यामध्ये निश्चितपणे काही दोष आहेत, ते तुम्हालादेखील माहीत आहेत, जे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करतात. ते दोष घालविण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांच्यापासून सुटका करून घेणे ही झाली (अनुभवाची) नकारात्मक बाजू (Negative Side).

काही बाबी वास्तवात उतरविण्यासाठी, काही बाबतीत त्यामध्ये तुमचे स्वत:चे असणे, काही बाबतीत तुम्ही स्वत:ला घडविणे तसेच काही गुण तुम्ही तुमच्या अंगी बाणवणे गरजेचे असते. तेव्हा ही झाली (अनुभवाची) रचनात्मक बाजू म्हणजे सकारात्मक बाजू (Positive Side).

तुमच्यात एक दोष आहे, उदाहरणार्थ, खरे न बोलण्याची सवय. आता, खरे न बोलणे व खरे न बघणे, ही जी खोटेपणाची सवय आहे, ती सवय घालविण्याचा प्रयत्न करून, तसेच तुमच्या चेतनेतील खोटेपणाचा अस्वीकार करून, तुम्ही त्या सवयीविरुद्ध लढा देता. ही गोष्ट करण्यासाठी, तुम्ही फक्त सत्यच बोलण्याची सवय तुमच्या अंगी बाणवली पाहिजे. आणि त्यासाठी, सत्य काय ते समजावून घेण्याची व नेहमी सत्यच सांगण्याची सवय तुम्ही अंगी बाणवली पाहिजे. तुम्ही दोषांना नकार देता, ती झाली नकारात्मक बाजू. तुम्ही गुण अंगी बाणवता, ही दुसरी बाजू म्हणजे सकारात्मक बाजू; हे असे आहे.

हे प्रत्येक बाबतीतच असे आहे. उदाहरणार्थ, तुमच्या अस्तित्वामध्ये कोठेतरी तुम्हाला एक प्रकारच्या बंडखोरीची – अज्ञानी, दुराग्रही, अस्फुटशा बंडखोरीची अशी एक खोड असते; की ती सवय, जे काही वरून येते त्याला नकार देते. तेव्हा या सवयीच्या विरोधात लढा देणे, तिला अभिव्यक्त होण्यापासून रोखणे, आणि तुमच्या प्रकृतीतून तिला हद्दपार करणे ही झाली नकारात्मक बाजू. आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूने तुम्ही तुमच्यामध्ये सकारात्मकतेने समर्पणवृत्ती, समजूतदारपणा, आत्म-निवेदन, आत्म-दान, आणि दिव्य शक्तींशी पूर्णत: सहकार्य करण्याची भावना या बाबींचा अंगीकार केला पाहिजे. ही झाली सकारात्मक बाजू. समजले? त्याप्रमाणेच – जे लोक खूप रागीट असतात… जे खूप चिडतात, अचानक रागाचा उद्रेक होणे ही ज्यांची सवयच असते… त्यापैकी कोणी एखादा त्या सवयीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो, रागावणे नाकारतो, स्वत:मध्ये असणाऱ्या रागाच्या उर्मींना झुगारून देतो; मात्र या साऱ्याची जागा अविचल शांतीने, परिपूर्ण सहनशक्तीने, दुसऱ्यांची भूमिका समजून घेण्याच्या वृत्तीने, सुस्पष्ट आणि स्थिरचित्त दृष्टीने, प्रशांत अशा निर्णयाने घेतली गेली पाहिजे, ही झाली सकारात्मक बाजू.

– श्रीमाताजी [CWM 07 : 202-203]

विचारशलाका ०९

साधक : आम्हाला ‘योगा’संबंधी काही सांगाल का?

श्रीमाताजी : ‘योग’ तुम्हाला कशासाठी हवा आहे? शक्ती प्राप्त व्हावी म्हणून? मन:शांती, शांतचित्तता लाभावी म्हणून? का मानवतेची सेवा करायची आहे म्हणून? तुम्ही योगमार्ग स्वीकारण्यास पात्र आहात हे दर्शविण्यासाठी वरीलपैकी कोणतेही उद्दिष्ट पुरेसे नाही.

त्याकरता तुम्हाला पुढील काही प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत :

तुम्हाला ‘ईश्वरा’साठी ‘योगमार्गा’चे आचरण करावेसे वाटते का?

‘ईश्वर’ हाच तुमच्या जीविताचे परमोच्च सत्य आहे का?

म्हणजे ‘ईश्वरा’वाचून जगणेच आता अगदी अशक्य झाले आहे, अशी तुमची अवस्था आहे का?

तुम्हाला असे वाटते का की, ‘ईश्वर’ हेच तुमच्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे आणि ‘ईश्वरा’विना तुमच्या जीवनास काहीच अर्थ नाही?

तसे असेल तरच तुम्हाला ‘योगमार्ग’ स्वीकारण्याविषयी आंतरिक हाक आली आहे असे म्हणता येईल.

‘ईश्वरा’विषयीची तळमळ, अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या अभीप्सेचे संगोपन करायचे; ती सतत जागृत, सावध व जिवंत ठेवायची. आणि त्यासाठी जर कशाची गरज असेल तर ती असते एकाग्रतेची! ‘ईश्वरा’वरील एकाग्रतेची – ईश्वरी संकल्प व उद्दिष्ट यांच्याप्रत समग्रपणे व नि:शेषतया वाहून घेता यावे या दृष्टिकोनातून ‘ईश्वरा’वर एकाग्रता करणे आवश्यक असते.

स्वत:च्या हृदयामध्ये एकाग्रता करा. त्यात प्रवेश करा, जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे आत खोल खोल, अगदी आत जा. तुमच्या चेतनेचे बाहेर दूरवर पसरलेले सारे धागे एकत्रित करून, ते सारे गुंडाळून घ्या आणि आत बुडी मारा, आत खोल खोल जा. तुम्हाला आढळेल की, हृदयाच्या त्या निवांत प्रशांत गाभाऱ्यांत एक ज्योत तेवत आहे. तेच तुमच्या अंतरीचे ‘ईश्वरत्व’, तेच तुमचे खरेखुरे अस्तित्व. त्याचा आदेश ऐका, त्याच्या आज्ञेचे अनुसरण करा.

एकाग्रता करण्याची इतरही केंद्र आहेत – एक असते मस्तकाच्या वर (सह्स्त्रार), दुसरे असते दोन भुवयांच्या मध्यभागी (भ्रूमध्यामध्ये, आज्ञाचक्र)! प्रत्येक केंद्राची स्वतंत्र अशी उपयुक्तता असते आणि त्यातून तुम्हाला वेगवेगळे विशिष्ट असे परिणामही अनुभवास येतात. पण मध्यवर्ती अस्तित्व (central being) हे हृदयामध्येच असते आणि सर्व मुख्य प्रवृत्ती हृदयामध्येच उत्पन्न होतात – रूपांतरणास आवश्यक असलेली प्रेरणा व उत्कटता आणि साक्षात्कार करून घेण्याची शक्ती या सुद्धा तेथूनच निर्माण होतात.

– श्रीमाताजी [CWM 03 : 01]

विचारशलाका ०८

‘ईश्वरी प्रभावा’प्रत स्वत:ला खुले करणे, उन्मुख करणे हे ‘पूर्णयोगा’चे समग्रतत्त्व आहे. हा प्रभाव तुमच्या उर्ध्वस्थित असतो आणि तुम्ही जर त्याबाबत सचेत झालात तर, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही त्यास आवाहन करायचे असते. तो ईश्वरी प्रभाव तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये ‘शांती’च्या रूपाने, ‘प्रकाशा’च्या रूपाने, कार्यकारी ‘शक्ती’च्या रूपाने अवतरतो; ‘आनंद’रूपाने अवतरतो; तो साकार किंवा निराकार रूपातील ‘ईश्वरी उपस्थिती’ म्हणून अवतरतो.

व्यक्तीला जोपर्यंत ही चेतना लाभत नाही तोपर्यंत तिने श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणासाठी आस बाळगली पाहिजे. अभीप्सा, आवाहन, प्रार्थना या सगळ्या गोष्टी म्हणजे एकाचीच विविध रूपे असतात आणि या साऱ्याच गोष्टी सारख्याच प्रभावी असतात. यांपैकी, तुमच्यापाशी जी कोणती गोष्ट येते किंवा जी तुम्हाला अगदी सहजसोपी, स्वाभाविक वाटते ती गोष्ट तुम्ही अवलंबावी.

दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करायची (काहीजण मस्तकामध्ये वा मस्तकाच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करायचे आणि तेथे त्यांना आवाहन करायचे. व्यक्ती यांपैकी कोणतीही गोष्ट करू शकते किंवा वेगवेगळ्या वेळी (आलटून-पालटून) या दोन्ही गोष्टी करू शकते – जी गोष्ट तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ती गोष्ट तुम्ही करावी.

विशेषत: सुरुवातीला एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, स्पंदने हद्दपार करायची. अशा शांत मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतीशील तयारी चालू होते. परंतु हे सारे जरी एकदम जमले नाही तरी त्यामुळे तुम्ही अधीर, अस्वस्थ होता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी पुष्कळ काळ लागतो; तुमच्या चेतनेची तयारी होईपर्यंत तुम्हाला वाटचाल करत राहावी लागते.

श्रीअरविंद [CWSA 29 : 106]