Tag Archive for: साक्षात्कार

साधना, योग आणि रूपांतरण – ७४

(एका साधकाने ‘ध्याना’मध्ये त्याला जो साक्षात्कार झाला त्यासंबंधी श्रीअरविंद यांना लिहून कळविले आहे, असे दिसते. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

वास्तविक, हा साक्षात्कार जाग्रतावस्थेमध्ये होणे आवश्यक आहे आणि तो जीवनाची वास्तविकता व्हावी यासाठी टिकून राहणेदेखील आवश्यक आहे. केवळ समाधी अवस्थेमध्येच जर त्याचा अनुभव आला तर तो अतिचेतन (superconscient) स्थितीचा, आंतरिक अस्तित्वाच्या फक्त काही भागांसाठीच खरा असणारा अनुभव असेल; मात्र तो संपूर्ण चेतनेला खरा वाटणार नाही.

समाधी अवस्थेमधील अनुभवांचा उपयोग व्यक्तित्व खुले होण्यासाठी आणि त्याच्या तयारीसाठी होतो. परंतु (ध्यानामधील) साक्षात्कार जेव्हा जाग्रतावस्थेमध्येही नित्य टिकून राहतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने प्राप्त झालेला असतो. त्यामुळे ‘पूर्णयोगा’मध्ये जाग्रतावस्थेतील अनुभवाला आणि साक्षात्काराला सर्वाधिक महत्त्व दिले जाते.

‘स्थिरचित्त नित्य-विस्तारत जाणाऱ्या या चेतनमध्ये कर्म करणे ही एकाच वेळी साधना असते आणि तीच सिद्धीही असते,’ हे जे तुम्ही कर्माबाबत लिहिले आहे ते योग्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 253)

साधना, योग आणि रूपांतरण – ६४

भौतिक मनाच्या (physical mind) गोंगाटाला, तुम्ही अस्वस्थ न होता, अविचलपणे नकार दिला पाहिजे. इथपर्यंत नकार दिला पाहिजे की तो (गोंगाट) नाउमेद होऊन जाईल आणि मान हलवत निघून जाईल आणि म्हणेल, “छे! हा माणूस फारच शांतचित्त आणि कणखर आहे.”

नेहमीच अशा दोन गोष्टी असतात की ज्या वर उफाळून येतात आणि तुमच्या शांत अवस्थेवर हल्ला चढवितात. प्राणाकडून आलेल्या सूचना आणि भौतिक मनाची यांत्रिक पुनरावृत्ती या त्या दोन्ही गोष्टी असतात. दोन्ही बाबतीत शांतपणे नकार देत राहणे हाच उपाय असतो.

अंतरंगात असणारा पुरुष हा प्रकृतीला आदेश देऊ शकतो आणि तिने काय स्वीकारावे किंवा काय नाकारावे हे तिला सांगू शकतो. मात्र त्याची इच्छा ही शक्तिशाली, अविचल इच्छा असते; तुम्ही जर अडचणींमुळे अस्वस्थ झालात किंवा क्षुब्ध झालात तर एरवी त्या ‘पुरुषा’ची इच्छा जितकी परिणामकारक रीतीने कार्य करू शकली असती तितकी परिणामकारक रीतीने (तुम्ही अस्वस्थ किंवा क्षुब्ध असताना) ती कार्य करू शकत नाही.

उच्चतर चेतना ही प्राणामध्ये पूर्णपणे उतरली असताना कदाचित सक्रिय साक्षात्कार (dynamic realisation) होऊ शकेल. उच्चतर चेतना जेव्हा मनामध्ये उतरते तेव्हा ती आपल्याबरोबर ‘पुरुषा’ची शांती आणि मुक्ती तसेच ज्ञानसुद्धा घेऊन येते. ती जेव्हा प्राणामध्ये उतरते तेव्हा सक्रिय साक्षात्कार वर्तमानात प्रत्यक्षात होऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 304-305)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२४)

माझ्या योगामध्ये (पूर्णयोगामध्ये) खरोखर, इतर जगतांचा – ‘परम आत्म्या’च्या स्तराचा, भौतिक जगताचा आणि दरम्यानच्या सर्व स्तरांचा – तसेच त्यांचा आपल्या जीवनावर व भौतिक जगतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा आणि त्यांच्या पूर्ण अनुभवांचादेखील समावेश होऊ शकतो. पण हेदेखील शक्य आहे की, आधी केवळ ‘परमपुरुषा’च्या साक्षात्कारावर भर द्यायचा अन्यथा, ‘ईश्वरा’च्या अगदी एखाद्या पैलूवर म्हणजे जगदाधिपती आणि आपला व आपल्या कर्मांचा स्वामी असलेल्या ‘कृष्ण’, ‘शिव’ यांच्या साक्षात्कारावर भर द्यायचा; अन्यथा, विश्वात्मक ‘सच्चिदानंदा’वर भर द्यायचा आणि या ‘योगा’साठी (पूर्णयोगासाठी) आवश्यक असणारे पायाभूत परिणाम साध्य करून घ्यायचे; आणि नंतर त्या परिणामांपासून प्रगत होत, समग्र परिणामांकडे वळायचे. (म्हणजे) जर एखाद्याने ‘दिव्य जीवना’कडे वाटचाल करणे आणि भौतिक जीवनावर आत्म्याचे आधिपत्य निर्माण करणे’ हे ध्येय स्वीकारलेले असेल तर पूर्णयोगाचे पायाभूत परिणाम साध्य करून घेतल्यानंतर, मग त्याच्या समग्र परिणामांकडे वळायचे, हे शक्य आहे.

‘ईश्वरा’चा, ‘परमेश्वरा’चा साक्षात्कार ही निश्चितच आवश्यक गोष्ट आहे. पण प्रेम, श्रद्धा, भक्ती यांसहित त्याच्याकडे वळणे, स्वतःच्या कर्मांद्वारे त्याची सेवा करणे आणि त्याला जाणणे – त्याला ‘बौद्धिक आकलना’द्वारेच जाणले पाहिजे असे नाही तर ‘आध्यात्मिक अनुभूती’च्या माध्यमातून त्याला जाणणे – यादेखील ‘पूर्णयोगा’च्या मार्गावरील आवश्यक गोष्टी आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 375)

आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश म्हणजे जणू काही समुद्रात उडी मारल्याप्रमाणे दिव्यत्वामध्ये उडी घेणे. आणि तरीदेखील तो शेवट नसतो तर ती केवळ सुरुवात असते. कारण एकदा का तुम्ही त्यामध्ये उडी घेतली की, त्यानंतर तुम्हाला दिव्यत्वामध्ये जीवन जगता आले पाहिजे. तुम्ही ते कसे करू शकता? “मी कोठे पडेन? नंतर माझे काय होईल?” असा कोणताही विचार न करता तुम्हाला सरळ उडी मारायची असते. तुमच्या मनामध्ये असणारी चलबिचल तुम्हाला रोखू पाहते. पण तुम्ही स्वत:ला जाऊ दिले पाहिजे. तुम्हाला समुद्रात उडी मारायची असेल आणि जर तुम्ही सगळा वेळ असाच विचार करीत बसलात,”अरे बापरे, पण इथे किंवा तिथे एखादा दगड असेल इ..” तर तुम्ही कधीच उडी घेऊ शकणार नाही.

पण अर्थातच समुद्रात उडी मारण्यापूर्वी ज्याप्रमाणे तुम्ही समुद्र पाहिलेला हवा आणि तुम्हाला त्याविषयी काही माहिती हवी त्याप्रमाणेच तुम्हाला दिव्य सद्वस्तूचे आधी थोडे का होईना दर्शन घडलेले असावे. हे दर्शन म्हणजे सहसा चैत्य जाणिवेची जागृती असते. भले त्या दिव्य सद्वस्तूशी अगदी खोलवरचा चैत्यमय वा संपूर्ण संपर्क प्रस्थापित झालेला नसला तरीदेखील किमान एक सुस्पष्ट असा मानसिक वा प्राणिक साक्षात्कार तरी तुम्हाला झालेला असला पाहिजे. तुम्हाला सुस्पष्टपणे तुमच्या अंतरंगामध्ये किंवा बाहेर ईश्वरी उपस्थितीची जाणीव झालेली असली पाहिजे, तुम्हाला दिव्य विश्वाचा श्वास जाणवला असला पाहिजे. आणि त्याचवेळी त्याविरुद्ध अशा या सामान्य जगताचा घुसमटवून टाकणारा दाब तुम्हाला जाणवलेला असला पाहिजे की जो, तुम्हाला या दडपून टाकणाऱ्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करण्यास भाग पाडेल. जर तुम्हाला तसा अनुभव असेल तर तुम्ही केवळ त्या दिव्य सद्वस्तूमध्ये नि:शेषतया आश्रय घेणे आणि त्याच्या आधाराने, त्याच्या सुरक्षेमध्ये, केवळ त्यामध्येच राहणे एवढेच करावयाचे आहे. तुम्ही तुमच्या सामान्य जीवनामध्ये कधीतरी हे अंशत: किंवा तुमच्या अस्तित्वाच्या काही भागांनिशी वा कधीतरी, नैमित्तिकरित्या असे केले असेल तर ते आता तुम्ही पूर्णांशाने आणि सदासर्वदासाठी करावयास हवे. ही उडी तुम्हाला मारावयाची आहे आणि जर तुम्ही हे केले नाहीत, तर तुम्ही वर्षानुवर्षे योगसाधना करीत राहिलात तरीही खऱ्या आध्यात्मिक जीवनाविषयी तुम्हाला काहीही माहीत होणार नाही ह्याची शक्यता असते. संपूर्णतया आणि नि:शेषतया उडी मारा; तेव्हा तुम्ही या बाह्य गोंधळापासून पूर्णत: मुक्त व्हाल आणि आध्यात्मिक जीवनाची खराखुरी अनुभूती प्राप्त करून घ्याल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 21-22)