Tag Archive for: साक्षात्कार

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०३

पूर्णयोगामध्ये केवळ ईश्वराचा साक्षात्कार अपेक्षित नाही तर संपूर्ण आत्मनिवेदन (consecration) अभिप्रेत आहे, तसेच जोपर्यंत ईश्वरी चेतनेचे आविष्करण करण्यासाठी व्यक्तीचे आंतरिक व बाह्य जीवन सुपात्र ठरत नाही आणि जोपर्यंत व्यक्तीचे जीवन हे ईश्वरी कार्याचाच एक भाग बनून राहत नाही तोपर्यंत, आंतरिक व बाह्य जीवनामध्ये परिवर्तन घडवत राहणे हे या योगामध्ये अभिप्रेत आहे. याचा अर्थ असा की, निव्वळ नैतिक आणि शारीरिक उग्र तपस्येहून कितीतरी अधिक अचूक आणि कठोर असे आंतरिक अनुशासन (discipline) येथे अभिप्रेत आहे.

पूर्णयोगाचा मार्ग हा इतर बहुतांश योगमार्गांपेक्षा अधिक विशाल व अधिक दुःसाध्य आहे. त्यामुळे, आपल्याला अंतरात्म्याकडून हाक आली आहे आणि अंतिम ध्येयाप्रत वाटचाल करत राहण्याची आपली तयारी आहे, या गोष्टीची खात्री पटल्याशिवाय व्यक्तीने या मार्गात प्रवेश करता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 27)

जीवन जगण्याचे शास्त्र – २२

अविचलता (quietness) म्हणजे तामसिकता नव्हे. वास्तविक अविचल स्थितीमध्येच योग्य गोष्टी केल्या जाऊ शकतात. कोणत्याही गोष्टीमुळे विचलित न होता, प्रत्येक गोष्टीचे अवलोकन करणे आणि कोणत्याही गोष्टीमुळे विचलित न होता, कर्म करणे याला मी ‘अविचलता’ म्हणते.

*

अविचलतेमध्ये एक स्थिरशांत (calm) आणि एकाग्र एकवटलेली अशी ताकद असते, ती इतकी अविचल असते की, तिला कोणीही धक्का लावू शकत नाही. पूर्ण साक्षात्कारासाठीचा हा अनिवार्य पाया आहे.

*

तुम्ही जेव्हा अविचल असाल तेव्हा तुम्हाला अशी जाणीव होईल की, दिव्य शक्ती, तिचे साहाय्य आणि तिचे संरक्षण हे सदोदित तुमच्या सोबत आहे.

*

तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची असते आणि ती म्हणजे शांत, अविचल राहायचे आणि पूर्णतः केवळ ईश्वराभिमुख व्हायचे, मग बाकी सारे ‘त्या’च्या हाती असते.

*

अविचलता, शांती आणि निश्चल-नीरवतेच्या (silence) स्थितीमध्ये आध्यात्मिक शक्ती कार्य करते. व्यक्ती विरोधी शक्तींच्या अंमलाखाली आली की, क्षुब्ध होणे आणि उत्तेजित होणे अशा सर्व गोष्टी होतात.

*

तुम्ही अविचलतेचा शोध बाह्य परिस्थितीमध्ये घेता कामा नये, तर त्याची सुरुवात तुम्ही तुमच्या अंतरंगापासून केली पाहिजे. तुमच्या अंतरंगामध्ये खोलवर शांती असते आणि त्या शांतीमधूनच तुमच्या समग्र अस्तित्वामध्ये एक प्रकारची स्थिरता, अविचलता येते; ती अगदी तुमच्या शरीरापर्यंत जाऊन पोहोचते. अर्थात त्यासाठी तुम्ही तिला वाव दिला पाहिजे. तुम्ही ती शांती मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे; म्हणजे मग तुम्हाला हवी असलेली अविचलता, स्थिरता तुम्हाला लाभेल.

– श्रीमाताजी (CWM 14 : 135, 135, 135, 111, 137, 138)

आत्मसाक्षात्कार – २२

पूर्णयोगाचे मूलभूत साक्षात्कार खालीलप्रमाणे आहेत.

१) संपूर्ण भक्ती ही ज्यायोगे हृदयाची मुख्य प्रेरणा व विचारांची स्वामिनी बनेल आणि ज्यायोगे जीवन व कर्म ‘श्रीमाताजीं’च्या आणि त्यांच्या ‘उपस्थिती’च्या नित्य एकत्वात घडत राहील अशा प्रकारचे चैत्य, अंतरात्मिक परिवर्तन (psychic change) घडणे.

२) शरीराच्या पेशी न्‌ पेशी ज्यामुळे भारल्या जातील अशा प्रकारे, ‘उच्चतर चेतने’च्या ‘शांती, प्रकाश, शक्ती’ इत्यादी गोष्टींचे मस्तकाद्वारे व हृदयाद्वारे संपूर्ण अस्तित्वामध्ये अवतरण होणे.

३) सर्वत्र अनंतत्वाने वसणाऱ्या ‘एकमेवाद्वितीय’ अशा ईश्वराची व श्रीमाताजींची अनुभूती येणे आणि त्या अनंत चेतनेमध्ये वास्तव्य घडणे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 319)

आत्मसाक्षात्कार – २१

खालील चार गोष्टींवर साक्षात्कार आधारित केला गेला पाहिजे.

१) मनाच्या वर असणाऱ्या केंद्रामध्ये उन्नत होणे
२) वैश्विक चेतनेप्रत खुले होणे
३) चैत्य खुलेपण
४) उच्चतर चेतनेचे तिच्या शांती, प्रकाश, शक्ती, ज्ञान, आनंद इत्यादीसहित अस्तित्वाच्या अगदी भौतिक स्तरापर्यंतच्या सर्व स्तरांमध्ये अवतरण होणे.

श्रीमाताजींच्या शक्ती-कार्याला तुमच्या अभीप्सेची, श्रद्धेची आणि समर्पणाची जोड देऊन, उपरोक्त साऱ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. हाच मार्ग आहे. बाकी साऱ्या गोष्टी म्हणजे या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठीचे प्रयत्न आहेत, आणि त्यासाठी श्रीमाताजी तुमच्यामध्ये जे कार्य करत आहेत त्यावर श्रद्धा असणे आवश्यक आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 319)

आत्मसाक्षात्कार – १९

ईश्वराचा साक्षात्कार हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे आणि एखादी गोष्ट जर त्याकडे घेऊन जाणारी असेल किंवा त्यासाठी साहाय्यक ठरत असेल किंवा जर ती गोष्ट प्रत्यक्षात आणल्याने तो साक्षात्कार अधिक व्यापक होणार असेल किंवा त्या साक्षात्काराचे आविष्करण होणार असेल, तरच ती गोष्ट इष्ट असते.

साक्षात्कारासाठी वैयक्तिक व सामूहिक साधना आणि ईश्वराचा साक्षात्कार झालेल्या व्यक्तींचे सामुदायिक जीवन ही, ईश्वरी कार्यासाठी समग्र जीवनाचे सुसंघटन किंवा आविष्करण करण्यासाठी आवश्यक असणारी पहिली आवश्यक गोष्ट आहे. आणि यासाठी आवश्यक असणारी दुसरी गोष्ट म्हणजे, ‘प्रकाशा’प्रत वळण्यासाठी आणि त्यामध्ये जीवन जगता यावे यासाठी जगाला मदत करणे. हे माझ्या योगाचे (पूर्णयोगाचे) प्रयोजन आहे आणि तोच त्याचा सर्वार्थ आहे.

परंतु साक्षात्कार ही पहिली आवश्यक गोष्ट आहे आणि त्या भोवतीच सारे काही फिरत असते; अन्यथा, त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याच गोष्टीला काही अर्थ नाही.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 784)

आत्मसाक्षात्कार – १८

‘केवळ ईश्वराचा साक्षात्कार पुरेसा नाही’, असे जेव्हा मी म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की, असा साक्षात्कार चेतनेमध्ये चिरस्थायी परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुरेसा नसतो. मानवी प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवायचे असेल तर, त्यासाठी ‘ईश्वराच्या गतिशील शक्ती’च्या कार्याची आवश्यकता असते.

…‘ईश्वरी चेतना’ धारण करण्याची क्षमता सर्वच आधारांमध्ये, म्हणजे प्राकृतिक रचनांमध्ये नसते, हे खरे आहे आणि या प्राकृतिक साधनाची क्षमता वृद्धिंगत करण्याचा ते कोणता प्रयत्नही करत नाहीत. एकदा का तुम्ही त्या ईश्वरी चेतनेमधून खाली उतरलात की मग, तुम्ही अगदी एखाद्या सामान्य माणसासारखेच होऊन जाता. आणि म्हणून, जेव्हा ईश्वराचे अवतरण होते तेव्हा ते धारण करण्यासाठी म्हणून, व्यक्तीने स्वतःच्या प्राकृतिक साधनाच्या क्षमता, त्याच्या जटिलतेनिशी आणि बहुअंगांनिशी वृद्धिंगत करत नेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.

– श्रीअरविंद (Evening Talks with Sri Aurobindo : 349-350)

आत्मसाक्षात्कार – १६

(जडभौतिक विश्व आणि आंतरात्मिक व आध्यात्मिक विश्व यांच्या अतीत असणाऱ्या ‘परमसत्या’च्या, ‘परमज्ञाना’च्या विश्वाबद्दल येथे संवाद चालू आहे. श्रीमाताजी असे सांगत आहेत की, “हे विश्व उदयाला आले आहे; पण ते अजून संपूर्णपणे अस्तित्वात यायचे आहे. आणि त्यासाठी केवळ एकटा अवतार पुरेसा नाही तर, त्यासाठी ईश्व रप्राप्तीची अभीप्सा बाळगणाऱ्या अनेक माणसांची आवश्यकता आहे.’’ हे ऐकल्यानंतर, एका साधकाने त्यांना प्रश्न विचारला आहे की, आम्ही त्यामध्ये सहभागी होण्यासाठी काय केले पाहिजे?)

श्रीमाताजी : त्यासाठी व्यक्तीने स्वतःच्या अस्तित्वाचा, ‘पुरुषा’चा, ‘आत्म्या’चा साक्षात्कार करून घेतला पाहिजे; स्वतःच्या अस्तित्वाचे जे परम‘सत्य’ आहे, त्याच्याशी सचेत (conscious) नाते जोडले पाहिजे; ते नाते कोणत्याही रूपातील असले, ते कोणत्याही मार्गाने जोडलेले असले, तरी त्याने काही फरक पडत नाही, परंतु हाच एकमेव मार्ग आहे.

प्रत्येक व्यक्ती आपल्या अंतरंगामध्ये एक सत्य वागवत असते आणि त्या सत्याशीच व्यक्तीने ऐक्य साधले पाहिजे, तेच सत्य ती जगली पाहिजे. या सत्याप्रत पोहोचण्यासाठी आणि त्याचा साक्षात्कार करून घेण्यासाठी व्यक्तीला जो मार्ग अनुसरावा लागेल तोच मार्ग व्यक्तीला त्या (उपरोक्त) परम‘ज्ञाना’च्या अधिकाधिक निकट घेऊन जाईल. म्हणजे असे म्हणता येईल की, (अंतिमतः) वैयक्तिक साक्षात्कार आणि परम‘ज्ञान’ या दोन्ही गोष्टी अगदी एकच आहेत.

– श्रीमाताजी (CWM 10 : 136)

आत्मसाक्षात्कार – ०६

बरेचदा असे आढळून येते की, जे लोक अरण्यामध्ये एकटेच राहतात त्यांची आजूबाजूच्या प्राण्यांशी, झाडांशी मैत्री होते. पण केवळ असे एकटे राहिल्यामुळे, आंतरिक ध्यानामध्ये प्रविष्ट होण्याची वा ‘परमसत्या’शी ऐक्य साधून राहण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते असे मात्र अजिबात नाही. जेव्हा तुम्हाला करण्यासारखे इतर काहीच नसते, अशा परिस्थितीमध्ये कदाचित ते सोपे असेलही पण मला ते काही तितकेसे पटत नाही.

व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत काही ना काही उद्योग शोधून काढू शकते. मला माझ्या अनुभवावरून असे वाटते की, सर्व अडीअडचणींच्या धुमश्चक्रीत असतानासुद्धा जी व्यक्ती स्वत:च्या वृत्तीप्रवृत्तींचे दमन करण्यात यशस्वी होते; ‘ईश्वरी कृपे’द्वारे व्यक्तीला ज्या कोणत्या परिस्थितीत ठेवण्यात आलेले असते ती परिस्थिती तशीच असतानादेखील, जी व्यक्ती आपल्या अंतरंगातील चिरंतन ‘उपस्थिती’सोबत एकांतात राहण्यात यशस्वी होते; अशा वेळी त्या व्यक्तीला जो साक्षात्कार होतो तो अनंतपटीने अधिक खरा, अधिक गहन व अधिक चिरस्थायी असतो.

अडीअडचणींपासून पलायन करणे हा काही त्यांच्यावर विजय प्राप्त करण्याचा उपाय होऊ शकत नाही. तो आकर्षक नक्कीच आहे. जे लोक आध्यात्मिक जीवन जगू इच्छितात त्यांच्यामध्ये अशी एक मानसिकता असते; ते म्हणतात, “झाडाखाली अगदी एकांतात, एकटे बसणे, ध्यानमग्न होऊन राहणे, बोलण्याची वा कृतीची कोणतीही उर्मी नसणे, हे किती रम्य असेल!” त्यांना हे असे वाटते याचे कारण त्या दिशेने त्यांच्या विचारांची ठाम बैठक तयार झालेली असते पण ती फारच भ्रामक असते.

ज्या ध्यानामध्ये एकाएकी तुमचे अनुसंधान साधले जाते ते ध्यान सर्वोत्तम असते. अशावेळी एकाग्र होणे, ध्यान लागणे आणि वरकरणी दिसणाऱ्या रूपांच्या पलीकडे जाऊन पाहणे याव्यतिरिक्त तुम्ही काही करूच शकत नाही, इतकी त्या क्षणी ध्यानाला बसण्याची अनिवार्य निकड तुम्हाला जाणवत असते. आणि त्यासाठी अरण्यामध्ये एकांतवासात जाण्याची गरज नसते; जेव्हा तुमच्यातील काहीतरी सज्ज झालेले असते, जेव्हा ती वेळ आलेली असते, जेव्हा खरी आस लागलेली असते आणि जेव्हा ‘ईश्वरी कृपा’ तुमच्यासोबत असते, तेव्हा हे घडून येते.

मला वाटते की, मानवतेने प्रगतीचा थोडा टप्पा गाठलेला आहे आणि आता जीवनामध्ये राहूनच खरा विजय प्राप्त करून घेतला पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या बाह्य परिस्थितीत असतानादेखील, त्या ‘चिरंतन’, ‘अनंत’ अस्तित्वासोबत एकांतात कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. सर्व व्यवहारांमध्ये व्यग्र असतानादेखील, त्यांपासून मुक्त होऊन, त्या ‘परमेश्वरा’ला आपला सांगाती बनवून कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. हाच खरा विजय!

– श्रीमाताजी (CWM 03 : 276)

आत्मसाक्षात्कार – ०५

साधक : पूर्णयोगामध्ये ‘साक्षात्कारा’चे स्वरूप काय असते?

श्रीअरविंद : या योगामध्ये आपण सत्य-चेतना’ (Truth-consciousness) समग्र अस्तित्वामध्ये उतरवू इच्छित आहोत. अस्तित्वाचा कोणताही भाग त्याविना रिक्त राहता कामा नये. हे कार्य स्वयमेव ‘उच्चतर शक्ती’द्वारेच केले जाऊ शकते. मग तुम्ही काय करणे आवश्यक असते? तर, तुम्ही स्वतःला तिच्याप्रत खुले करायचे असते.

साधक : उच्चतर शक्तीच जर कार्य करणार असेल तर मग ती सर्व माणसांमध्येच ते का करत नाही?

श्रीअरविंद : कारण, सद्यस्थितीत, मनुष्य त्याच्या मनोमय अस्तित्वामध्ये, त्याच्या प्राणिक प्रकृतीमध्ये आणि त्याच्या शारीर-चेतनेमध्ये आणि त्यांच्या मर्यादांमध्ये बंदिस्त आहे. तुम्ही स्वतःला खुले केले पाहिजे. खुले करणे (an opening) म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, ऊर्ध्वस्थित असणारी ‘शक्ती’ खाली अवतरित व्हावी म्हणून हृदयामध्ये अभीप्सा (Aspiration) बाळगली पाहिजे आणि ‘मना’मध्ये किंवा ‘मना’च्या वर असणाऱ्या पातळ्यांमध्ये त्या शक्तीप्रत खुले होण्याची इच्छा बाळगली पाहिजे.

उच्चतर शक्ती कार्य करू लागल्यावर प्रथम ती अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये शांती प्रस्थापित करते आणि ऊर्ध्वमुख खुलेपणा आणते. ही शांती म्हणजे केवळ मानसिक शांती नसते तर, ती शक्तीने ओतप्रोत भरलेली असते आणि त्यामुळे अस्तित्वामध्ये कोणतीही क्रिया घडली तरी समता, समत्व हा तिचा पाया असतो आणि शांती व समता कधीही विचलित होत नाहीत. ऊर्ध्वदिशेकडून शांती, शक्ती व हर्ष या गोष्टी अवतरित होतात. त्याचबरोबरीने उच्चतर शक्ती, आपल्या प्रकृतीच्या विविध भागांमध्ये परिवर्तन घडवून आणते, जेणेकरून हे भाग उच्चतर शक्तीचा दबाव सहन करू शकतील.

टप्प्याटप्प्याने आपल्यामध्ये ज्ञानदेखील विकसित व्हायला लागते आणि ते आपल्या अस्तित्वामधील कोणत्या गोष्टी काढून टाकणे आवश्यक आहे आणि कोणत्या गोष्टी जपून ठेवणे आवश्यक आहे हे आपल्याला दाखवून देते. खरंतर, ज्ञान आणि मार्गदर्शन दोन्ही गोष्टी एकत्रितपणे येतात. आणि त्यासाठी तुम्ही त्या मार्गदर्शनाला सातत्याने संमती देणे आवश्यक असते. एका बाजूपेक्षा दुसऱ्या बाजूने होणारी प्रगती काहीशी अधिक होत आहे, असे असू शकते. परंतु काहीही असले तरी, उच्चतर शक्तीच कार्य करत असते. बाकी सर्व गोष्टी या अनुभव आणि शक्तीच्या गतिविधीशी संबंधित असतात.

– श्रीअरविंद (Evening talks with Sri Aurobindo : 34-35)

भारताचे पुनरुत्थान – १०

‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. २२ फेब्रुवारी १९०८

मनुष्याच्या अंतरंगामध्ये ईश्वराचे वास्तव्य असते (याचे प्रत्यंतर येणे) म्हणजे संपूर्ण साक्षात्कार आणि तोच समग्र धर्म आहे. जेव्हा भारताला (आद्य) शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य यांच्याकडून मिळालेल्या शिकवणुकीचे स्मरण होईल; श्रीरामकृष्ण (परमहंस) कोणते सत्य प्रकट करण्यासाठी आले होते याची जेव्हा भारताला जाणीव होईल तेव्हा भारताचा अभ्युदय होईल. वेदान्त हेच भारताचे जीवन आहे.

जो हिंदू आहे तो कधीच आपण (मानव) म्हणजे केवळ बौद्धिक जीव आहोत, असा विचार करणार नाही. ज्याने ईश्वर कधीच पाहिलेला नाही त्याने खुशाल बुद्धीचे गुणगान करावे, असे हिंदुधर्म मानतो. केवळ ईश्वराच्याच महानतेचे आणि तेजस्वितेचे गुणगान करावे असा आदेश त्या ईश्वरानेच हिंदुधर्माला दिला आहे आणि हिंदुधर्म हजारो वर्षे त्याचेच गुणगान करत आला आहे.

पहिल्यांदा जेव्हा कधी आपण युरोपियन शिक्षण स्वीकारले, तेव्हाच आपण विज्ञानाच्या (science) प्रकाशाने स्वत:ची दिशाभूल होऊ देण्यास संमती दिली. विज्ञान हा एका मर्यादित खोलीतील प्रकाश आहे, जग उजळवून टाकू शकेल असा सूर्य नव्हे. विज्ञानाची गोळाबेरीज म्हणजे अपराविद्या. पण त्याहून अधिक उच्च अशी एक विद्या आहे, महान असे एक ज्ञान आहे. जेव्हा आपण अपरा विद्येच्या प्रभावाखाली वावरत असतो, तेव्हा आपणच कर्ते आहोत अशा भ्रमात आपण वावरत असतो आणि जणू काही बुद्धीच सार्वभौम व सर्वशक्तिमान आहे असे समजून, आपण ज्या परिस्थितीत आहोत ती परिस्थिती बुद्धीच्या साहाय्याने समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण हा भ्रामक आणि मायिक दृष्टिकोन असतो.

एखाद्याने एकदा जरी स्वत:च्या अंतरंगात वसलेल्या ईश्वराची दिव्य प्रभा अनुभवलेली असेल तर बुद्धी हीच सर्वोच्च असते, यावर तो पुन्हा कधीच विश्वास ठेवणार नाही. (बुद्धीपेक्षा श्रेष्ठ) एक उच्चतर आवाज असतो, एक अमोघ अशी आकाशवाणी असते. हृदयामध्ये ईश्वराचा अधिवास असतो. ईश्वर मेंदुद्वारे कार्य करतो, पण मेंदू हे त्याच्या अनेक साधनांपैकी एक साधन असते. मेंदू ज्या गोष्टीची योजना आखण्याची शक्यता असते, ती गोष्ट हृदयाला आधीच ज्ञात असते. आणि जो कोणी मेंदुच्या पलीकडे जाऊन, हृदयापर्यंत पोहोचू शकतो तोच शाश्वताची (Eternal) वाणी ऐकू शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 891-892)