Posts

साधनेची मुळाक्षरे – २८

समाधी ही वर्ज्य करायला हवी अशी गोष्ट नाही – पण ती अधिकाधिक सजग करणे आवश्यक असते.

*

‘ईश्वरा’च्या संपर्कात असण्यासाठी समाधी अवस्थेमध्येच असले पाहिजे, असे काही आवश्यक नसते.

*

वाचत असताना किंवा विचार करत असताना, मस्तकाच्या शीर्षस्थानी किंवा मस्तकाच्या वर असणारे स्थान, ‘योगिक’ एकाग्रता करण्यासाठी योग्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 250), (CWSA 30 : 250), (CWSA 29: 311)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २७

सर्वसाधारणपणे आजवरचा योग हा आध्यात्मिक मनाच्या पलीकडे जात नाही – अनेकांना मस्तकाच्या शिखरावर ब्रह्माशी ऐक्य जाणवते, पण त्यांना मस्तकाच्याही वर असलेल्या चेतनेची जाणीव नसते. त्याच प्रमाणे सामान्य योगामध्ये व्यक्तीला ब्रह्मरंध्राप्रत होणार्याह जागृत आंतरिक चेतनेच्या (कुंडलिनी) आरोहणाची संवेदना असते; (या ब्रह्मरंधामध्ये प्रकृती ब्रह्म- चेतनेशी युक्त होते.) मात्र त्यांना ‘अवतरणा’चा (descent) अनुभव येत नाही. काही जणांना अशा गोष्टी अनुभवासही आल्या असतील पण, त्यांचे स्वरूप, त्यांचे तत्त्व किंवा समग्र साधनेमधील त्यांचे स्थान त्यांना उमगले होते की नाही, हे मला माहीत नाही. मला स्वतःला जोपर्यंत असा अनुभव आला नव्हता तोपर्यंत, मी तरी हे इतर कोणाकडून कधी ऐकले नव्हते. याचे कारण पूर्वीचे योगी जेव्हा आध्यात्मिक मनाच्या अतीत जात असत, तेव्हा ते समाधीमध्ये निघून जात असत; याचा अर्थ असा की, (आध्यात्मिक मनाच्या वर, ब्रह्मरंध्राच्या वर असणार्याा) या उच्चतर पातळ्यांविषयी सजग राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला नव्हता – अतिचेतनेमध्ये (Superconscient) ‘निघून जाणे’ हे त्यांचे उद्दिष्ट असे, जागृत चेतनेमध्ये अतिचेतन ‘उतरविणे’ हे त्यांचे उद्दिष्ट नसे, परंतु हे माझ्या योगाचे उद्दिष्ट आहे.

*

’चित्’ (Chit) म्हणजे विशुद्ध चेतना – सत् चित् आनंद यामध्ये असते तशी. तर ’चित्त’ (Chitta) म्हणजे मानसिक-प्राणिक-शारीरिक चेतना यांचे संमिश्रण असलेले द्रव्य आहे; त्यातून विचार, भावना, संवेदना, आवेग इ. वृत्ती निर्माण होतात. पातंजल योगानुसार, या वृत्तीच पूर्णतः शांत करायच्या असतात, ज्यामुळे चेतना निश्चल होऊन, समाधीमध्ये प्रविष्ट होऊ शकेल. ‘चित्तवृत्तीनिरोधा’चे या (पूर्ण)योगात मात्र निराळे कार्य आहे. सामान्य चेतनेच्या वृत्ती येथे निश्चल करायच्या असतात आणि त्या निश्चलतेमध्ये उच्चतर चेतना आणि तिच्या शक्ती खाली उतरवायच्या असतात; जेणेकरून ही चेतना आणि तिच्या शक्ती प्रकृतीमध्ये रूपांतर घडवतील.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 377-378 and 438)

*

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १८

आपण हे समजावून घेतले की हठयोग, प्राण आणि शरीराच्या साहाय्याने, शारीरिक जीवन आणि त्याच्या क्षमता यांच्या अलौकिक पूर्णत्वाचे लक्ष्य करतो. त्याचप्रमाणे राजयोग हा मनाच्या साहाय्याने, मानसिक जीवनाच्या क्षमतांच्या विस्ताराचे आणि त्याच्या असाधारण अशा पूर्णत्वाचे लक्ष्य बाळगतो. असे करत असताना तो आध्यात्मिक अस्तित्वाच्या प्रांतामध्ये प्रवेश करतो. पण या प्रणालीचा दोष हा आहे की, त्यामध्ये समाधीच्या असामान्य स्थितीवर अतिरिक्त भर दिला जातो. हा दोष प्रथमतः भौतिक जीवनापासून एक प्रकारच्या दूरस्थपणाकडे घेऊन जाणारा ठरतो. वास्तविक हे भौतिक जीवन म्हणजे आपला आधार आहे आणि हे असे क्षेत्र आहे की, ज्यामध्ये आपल्याला आपले मानसिक आणि आध्यात्मिक लाभ उतरवायचे असतात. विशेषतः या प्रणालीमध्ये आध्यात्मिक जीवन हे समाधी-अवस्थेशी खूपच संबद्ध केले जाते. आध्यात्मिक जीवन आणि त्याचे अनुभव हे जागृत अवस्थेमध्ये आणि अगदी कार्याच्या सामान्य वापरामध्ये देखील पूर्णतः सक्रिय आणि पूर्णतः उपयोगात आणता येतील असे करावयाचे, हे आपले उद्दिष्ट आहे. आपल्या समग्र अस्तित्वाचा ताबा घेण्याऐवजी आणि त्यामध्ये अवतरित होण्याऐवजी, आपल्या सामान्य अनुभवाच्या मागे असणाऱ्या सुप्त प्रदेशामध्ये निवृत्त होण्याकडेच राजयोगाचा कल असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 37)

हे ईश्वरा, जरी एखाद्याने नीरव एकांतवासामध्ये, पूर्ण समाधी अवस्था प्राप्त करून घेतली तरी ती अवस्था त्याने स्वत:च्या शरीरापासून स्वत:स विलग करून, शरीराची उपेक्षा करून मिळविलेली असते आणि त्यामुळे ज्या घटकांनी देह बनलेला असतो ते घटक तसेच अशुद्ध, आधीइतकेच अपूर्ण राहून जातात, कारण त्याने त्यांना तसेच सोडून दिलेले असते. आणि गूढवादाची शिकवण चुकीच्या रीतीने आकलन झाल्यामुळे, अतिभौतिकाच्या वैभवाने मोहित होऊन, स्वतःच्या वैयक्तिक समाधानासाठी जेव्हा तुझ्याशी एकत्व पावण्याची अहंभावी इच्छा तो बाळगतो, तेव्हा त्याने त्याच्या पार्थिव अस्तित्वाच्या मूळ कारणाकडेच पाठ फिरविलेली असण्याची शक्यता असते. ‘जडभौतिकाचे शुद्धीकरण आणि त्याचा उद्धार’ हे त्याचे खरे जीवितकार्य पूर्ण करण्यास, त्याने एखाद्या भित्र्या माणसाप्रमाणे नकार दिलेला असू शकतो. आपल्या अस्तित्वातील एखादा भाग हा संपूर्णत: शुद्ध झाला आहे हे जाणणे, त्या शुद्धतेशी संबंध प्रस्थापित करणे, त्याच्याशी एकत्व पावणे हे सारे तेव्हाच उपयुक्त ठरू शकते, जेव्हा हे ज्ञान या पृथ्वीचे रूपांतरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्वरा करण्यासाठी, म्हणजेच तुझे उदात्त कार्य पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणले जाते.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 20)

राजयोगात सर्वप्रथम जी क्रिया हाती घेण्यात येते ती अवधानपूर्वक, काळजीपूर्वक आत्मशासन करण्याची क्रिया होय. या आत्मशासनामध्ये, निम्न पातळीवरील नाडी-पुरुषाच्या बेबंद क्रियांची जागा मनाच्या चांगल्या सवयींनी घेतली जाते. सत्याचा अभ्यास, अहंकारी धडपडीचे सर्व प्रकार टाकून देणे, दुसऱ्यांना इजा करण्याचे टाळणे, पावित्र्य, मानसिक राज्याचा खरा स्वामी जो दिव्य पुरुष त्याचे नित्य चिंतन, त्याचा नित्य ध्यास या गोष्टींनी मन व हृदय पवित्र, आनंदमय व विचक्षण बनते.

हे जे आतापर्यंत वर्णन केले ते राजयोगातील केवळ पहिले पाऊल होय. यानंतर साधकाने मनाचे आणि इंद्रियांचे सामान्य व्यापार अगदी शांत करावयाचे असतात; असे केले म्हणजेच साधकाचा आत्मा जाणिवेच्या उच्चतर स्तरांवर चढून जाण्यास मोकळा होतो आणि पूर्ण-स्वातंत्र्य व पूर्ण आत्म-प्रभुत्व यासाठी लागणारा पाया त्याला लाभतो. सामान्य मनाला नाडीसंघाच्या व शरीराच्या प्रतिक्रियांच्या आधीन राहावे लागते आणि त्यामुळे या मनाचे अनेक दोष व उणिवा उत्पन्न होतात, ही गोष्ट राजयोग विसरत नाही. हे दोष व उणिवा घालविण्यासाठी हठयोगातील आसन व प्राणायाम यांचा उपयोग राजयोग करतो; मात्र आसनांचे अनेक गुंतागुंतीचे प्रकार हठयोगात असतात, ते राजयोग बाजूला ठेवतो आणि त्याच्या स्वत:च्या साध्याला पुरेसा उपयोगी असा एकच सर्वात सोपा व परिणामकारक असा आसनाचा प्रकार तो घेतो. प्राणायामाचाही असाच एक सर्वात सोपा व परिणामकारक प्रकार तो घेतो. याप्रमाणे हठयोगाची गुंतागुंत व अवजडपणा राजयोग टाळतो; आणि त्याच्या प्रभावी, शीघ्र परिणामकारी प्रक्रियांचा उपयोग करून शरीर व प्राणक्रिया यांजवर ताबा मिळवतो आणि कुंडलिनी जागृत करतो – कुंडलिनी म्हणजे मूलाधार चक्रामध्ये वेटोळे घालून झोप घेत पडलेली शक्तिसर्पिणी; या सर्पिणीत सुप्त अशी सामान्यातीत शक्ति असते. कुंडलिनीची जागृती केल्यानंतर राजयोग हा चळवळ्या, चंचल मनाला पूर्ण शांत करून उच्चतर पातळीवर नेण्याचे कार्य करतो; याकरता तो क्रमाक्रमाने मानसिक शक्ती अधिकाधिक एकाग्र करीत जातो; या क्रमवार एकाग्रतेचा शेवट समाधीत होतो.

समाधी ही, मनाला त्याच्या मर्यादित जागृत व्यापारांपासून परावृत्त होऊन, अधिक मोकळ्या व अधिक उन्नत अशा जाणिवेच्या अवस्थांमध्ये जाण्याची शक्ति देते; या समाधि-शक्तीमुळे राजयोग एकाच वेळी दोन कार्यं साधतो. बाह्य जाणिवेच्या गोंधळापासून मुक्त अशी शुद्ध मानसिक क्रिया करून, मनाच्या पातळीवरून तो राजयोगी उच्चतर अतिमानसिक पातळीवर जातो; या पातळीवर व्यक्तीचा आत्मा आपल्या खऱ्या आध्यात्मिक अस्तित्वात प्रविष्ट होतो: हें एक कार्य; दुसरें कार्य : जाणिवेचा जो कोणता विषय असेल, त्या विषयावर जाणिवेची अनिर्बध एकाग्रता करण्याची शक्ति समाधीमुळे राजयोग्याला प्राप्त होते. आमच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे आद्य विश्वशक्तीचे कार्य वरीलप्रमाणे चालते; जगावर दिव्य क्रिया घडते ती वरील पद्धतीने घडते.

राजयोगी हा समाधिस्थितीत उच्चतम विश्वातीत ज्ञान व अनुभव यांचा भोक्ता असतोच; त्याला वरील अनिर्बध एकाग्रतेने कोणत्याहि विषयावर आपली जाणीव वापरण्याची शक्ति मिळाली म्हणजे तो या शक्तीचा वापर करून, जागृत अवस्थेत त्याला हवे ते वस्तुविषयक ज्ञान मिळवू शकतो; तसेच वास्तव जगांत हवे ते प्रभुत्व, अर्थात् जगाला उपयुक्त व आवश्यक असे प्रभुत्व गाजवू शकतो.

राजयोगाची प्राचीन पद्धति ही, केवळ स्व-राज्य हे राजयोगाचे साध्य मानीत नव्हती, तर साम्राज्य हे पण त्याचे साध्य मानीत होती. स्व-राज्य म्हणजे आत्म्याचे स्वत:वरचे राज्य, स्वत:च्या क्षेत्रांतील सर्व अवस्था व व्यापार याजवर आत्म्याच्या, ज्ञात्याच्या जाणिवेचा पूर्ण ताबा असणे. साम्राज्य म्हणजे आत्म्याच्या, ज्ञात्याच्या जाणिवेने, तिच्या बाह्य व्यापारांवर आणि परिसरावर सुद्धां हुकमत चालविणे.

प्राणशक्ति व शरीर यांजवर हठयोग आपलें कार्य करतो, शारीरिक जीवन आणि या जीवनाच्या शक्ति पूर्णत्वास नेणे, त्यांना अतिनैसर्गिक सामर्थ्य येईल असे करणे हे आपले साध्य मानतो; तसेच हे साध्य साधून तो मानसिक जीवनाच्या क्षेत्रात पाऊल टाकतो; त्याप्रमाणे राजयोग मनाशी आपला व्यवहार करतो व मानसिक जीवनाच्या शक्तींत, अतिनैसर्गिक पूर्णत्व व व्यापकत्व आणण्याचे साध्य स्वत:समोर ठेवतो; आणि त्यापुढे पाऊल टाकून, आध्यात्मिक अस्तित्वाच्या क्षेत्रांत तो प्रवेश करतो.

हे सर्व ठीक – परंतु राजयोगांत हा दोष आहे कीं, समाधीच्या अनैसर्गिक अवस्थांवर तो प्रमाणाबाहेर भर देतो. राजयोगाच्या या दोषामुळे, मर्यादेमुळे, राजयोगी भौतिक जीवनापासून काहीसा दूर राहतो; हे भौतिक जीवन आमच्या सर्व जीवनाचा पाया असते, आणि आम्ही मानसिक व आध्यात्मिक गोष्टी ज्या मिळवतो, त्या शेवटी आम्हाला भौतिक जीवनाच्या क्षेत्रांत आणावयाच्या असतात. राजयोगांत आध्यात्मिक जीवन समाधिस्थितीशी फारच निगडित असते, हा त्याचा विशेष दोष आहे.

आध्यात्मिक जीवन आणि या जीवनाचे अनुभव जागृतीच्या अवस्थेत आणि आमच्या सामान्य व्यवहारात पूर्णतया उपयोगात आणावे, पूर्णतया कार्यकारी करावे, हा आमचा उद्देश आहे. परंतु राजयोगांत आध्यात्मिक जीवन आमचे सर्व अस्तित्व व्यापण्यासाठी खाली उतरत नाही, ते आमच्या सामान्य अनुभवांच्या पाठीमागे राहते, दुय्यम भूमिका घेते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 36)

(श्रीमाताजींनी त्याच्या घडणीच्या काळामध्ये, तीव्र योगसाधना केली होती, त्या काळामध्ये त्यांच्या योगसाधनेचा एक मार्ग होता तो म्हणजे ‘प्रार्थना व ध्यान’. त्या काळामध्ये त्या रोज पहाटे ध्यानाला बसत असत आणि त्यातून प्रस्फुटीत झालेले विचार नंतर लिहून काढत असत, ते विचार पुढे Prayers and Meditations या ग्रंथामध्ये समाविष्ट करण्यात आले. मुळात फ्रेंच भाषेमध्ये लिहिलेल्या यातील काही प्रार्थनांचे श्रीअरविंदांनी इंग्रजीत भाषांतर केले. या प्रार्थना योगसाधकांना मार्गदर्शक आहेत.)

१५.०६.१९१३ रोजी श्रीमाताजींनी केलेली प्रार्थना. Read more