Tag Archive for: श्रीमाताजी

श्रीमाताजी आणि समीपता – १४

तुम्हाला जर सदोदित श्रीमाताजींच्या संपर्कात राहायचे असेल तर निराशेमधून, औदासिन्यातून आणि त्यामधून ज्या मानसिक कल्पना तुम्ही करत राहता, त्यातून तुम्ही तुमची सुटका करून घेतली पाहिजे. त्यापेक्षा अन्य कोणतीच गोष्ट मार्गामध्ये इतका अडथळा निर्माण करणारी असत नाही.
*
कोणालाही दुसऱ्याविषयी किंवा दुसऱ्या गोष्टीबाबत मत्सर वाटण्याचे काहीच कारण नाही; कारण सर्वांना श्रीमाताजी व श्रीअरविंदांचा जो संपर्क लाभतो त्याव्यतिरिक्त, त्या दोघांशी संपर्क साधण्याचे प्रत्येकाचे स्वतःचे म्हणून एक कारण असते, ते अन्य कोणाकडेच नसते.
*
तुम्ही जर ‘श्रीमाताजीं’च्या चेतनेच्या संपर्कात राहिलात तर तो संपर्कच तुम्हाला सर्व खऱ्या अभीप्सांच्या पूर्ततेप्रत आणि सर्व आवश्यक त्या साक्षात्कारांप्रत घेऊन जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 459, 459, 457)

श्रीमाताजी आणि समीपता – १३

साधक : एखादी व्यक्ती जर स्वतःच्या अंत:करणामध्ये डोकावून पाहील तर तिथे व्यक्तीला निश्चितपणे श्रीमाताजींचे स्मितहास्य आढळून येईल. असे असताना मग हृदयातून बाहेरच का पडायचे आणि त्यांचे स्मितहास्य बाहेर शोधत का हिंडायचे?

श्रीअरविंद : अंतरंगामध्ये राहणे आणि अंतरंगामध्ये राहून, भौतिक जीवनाला नवीन आकार देणे हे आध्यात्मिक जीवनाचे पहिले तत्त्व आहे. परंतु बरेच जण बाह्य गोष्टींमध्येच रममाण होण्यावर भर देतात, त्यामुळे त्यांचे श्रीमाताजींशी असलेले नाते हे आध्यात्मिकीकरण न झालेल्या बाह्यवर्ती प्रकृतीच्या सामान्य प्रतिक्रियांनीच संचालित होत असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 453)

श्रीमाताजी आणि समीपता – १२

साधक : एकमेव श्रीमाताजींमध्ये विलीन होण्याची आणि प्रत्येकाशी असलेले माझे नातेसंबंध तोडण्याची माझी तयारी आहे. सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी मी कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे ते कृपा करून मला सांगाल का? श्रीमाताजींनी मला आंतरिकरित्या आणि बाह्यतः देखील साहाय्य करावे, अशी माझी प्रार्थना आहे.

श्रीअरविंद : तुम्ही अंतरंगातून श्रीमाताजींकडे वळले पाहिजे, केवळ त्यांच्याकडेच वळले पाहिजे, हीच त्यासाठीची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी पूरक ठरावे म्हणूनच केवळ बाहेरचे अतिरिक्त संपर्क टाळणे आवश्यक असते. परंतु लोकांबरोबर असलेले सर्वच संपर्क टाळणे हे अभिप्रेत नाही किंवा त्याची आवश्यकही नाही. जर कोणती गोष्ट आवश्यक असेल तर ती हीच की, तुम्ही स्वतःला पूर्णपणे बहिर्मुख न होऊ देता, तुमच्या संपर्कातील व्यक्तींना योग्य आंतरिक चेतनेनिशी भेटले पाहिजे. त्या पृष्ठवर्ती गोष्टी आहेत असे समजून त्यांच्याशी वागले पाहिजे; त्यांच्याशी खूप सलगीने किंवा त्यांच्यामध्येच मिसळून गेल्याप्रमाणे वागता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 459)

श्रीमाताजी आणि समीपता – ११

साधक : मी माझ्या खोलीत एकटा होतो तेव्हा खूप खुश होतो, तेव्हा मला श्रीमाताजींच्या चेतनेची आंतरिक जाणीव होती. जेव्हा मी ‘क्ष’ला भेटायला बाहेर गेलो तेव्हा मात्र श्रीमाताजींसोबत असलेला माझा आंतरिक संपर्क तुटला आणि मला लगेचच अस्वस्थ वाटू लागले. लोकांमध्ये मिसळल्याने (श्रीमाताजींच्या सन्निध असल्याची) माझी ही आंतरिक जाणीव नष्ट होते, पण मी कायम एकांतवासात तर राहू शकत नाही. मग अशा वेळी काय केले पाहिजे?

श्रीअरविंद : तुम्ही तुमच्या अंतरंगामध्येच, श्रीमाताजींच्या सन्निध राहायला शिकले पाहिजे, त्यांच्या चेतनेच्या संपर्कात राहायला शिकले पाहिजे आणि इतरांना तुम्ही केवळ तुमच्या पृष्ठवर्ती, बाह्य व्यक्तिमत्त्वाद्वारे भेटले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 457-458)

श्रीमाताजी आणि समीपता – १०

व्यक्ती जोपर्यंत अंतरंगामध्ये जीवन जगत नाही तोपर्यंत व्यक्तीला चिरकाळ टिकेल अशा स्वरूपाचा आनंद मिळणे शक्य नाही. आपले कर्म, आपल्या कृती या श्रीमाताजींना अर्पण केल्याच पाहिजेत, त्या त्यांच्यासाठी म्हणूनच केल्या गेल्या पाहिजेत, त्यामध्ये तुमचा स्वतःसाठीचा विचार, तुमच्या स्वतःच्या कल्पना, तुमचे अग्रक्रम, तुमच्या भावना, पसंती-नापसंती या गोष्टी असता कामा नयेत. आणि जर अशा गोष्टींवर व्यक्तीची नजर असेल तर तिला प्रत्येक पावलागणिक मन किंवा प्राणामध्ये संघर्षाचा सामना करावा लागतो. तसेच समजा जरी व्यक्तीचे मन व प्राण तुलनेने शांत झालेले असले तरीही शरीरामधील आणि मज्जातंतूमधील संघर्षाला तिने सामोरे जाणे अजून बाकी असते. व्यक्ती जेव्हा अंतरंगातून श्रीमाताजींपाशी राहते तेव्हाच फक्त शांती आणि आनंद स्थिर राहू शकतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 460)

श्रीमाताजी आणि समीपता – ०९

पूर्णयोगाच्या साधनेसाठी सर्वाधिक आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे अविचलता आणि शांती, विशेषतः प्राणाची (vital) शांती. ही शांती बाह्य परिस्थितीवर किंवा आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून नसते; तर ती उच्चतर चेतनेशी, म्हणजे ईश्वरी चेतनेशी असलेल्या आंतरिक नात्यावर, म्हणजे ‘श्रीमाताजीं’च्या चेतनेशी असलेल्या आंतरिक नात्यावर अवलंबून असते.

ज्या व्यक्ती आपले मन आणि प्राण श्रीमाताजींच्या सामर्थ्याप्रत आणि शांतीप्रत खुले करतात त्यांना ते सामर्थ्य आणि ती शांती अत्यंत कठीण, अतिशय अप्रिय कामामध्ये आणि अतिशय बिकट परिस्थितीमध्ये असतानासुद्धा लाभू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 458)

श्रीमाताजी आणि समीपता – ०८

साधक : श्रीमाताजींबरोबर असलेले कोणते नाते हे सर्वात खरे आणि सत्य असल्याचे म्हणता येईल? त्यांच्याशी असणारे आत्मत्वाचे नाते (soul relation) हेच एकमेव खरे नाते आहे, असे म्हणता येईल का? आणि आत्मत्वाचे नाते म्हणजे काय? मला ते कसे ओळखता येईल?

श्रीअरविंद : आंतरिक (आत्मत्वाचे) नाते म्हणजे व्यक्तीला श्रीमाताजींच्या अस्तित्वाची जाणीव असणे. अशी व्यक्ती सदोदित त्यांच्याकडे अभिमुख असते. त्यांची शक्ती आपल्याला संचालित करत आहे, त्यांची शक्ती आपल्याला मार्गदर्शन करत आहे, साहाय्य करत आहे याची व्यक्तीला जाणीव असते. अशी व्यक्ती श्रीमाताजींच्या प्रेमभक्तीने आकंठ भारलेली असते. अशी व्यक्ती त्यांच्या भौतिकदृष्ट्या जवळ असो किंवा नसो, तिला त्यांच्या समीपतेची जाणीव असते. व्यक्तीला आपले मन श्रीमाताजींच्या मनाच्या समीप असल्याचे, आपला प्राण हा श्रीमाताजींच्या प्राणाशी सुमेळ राखत असल्याचे, आपली शारीरिक चेतना त्यांच्या चेतनेने परिपूर्ण असल्याचे जाणवेपर्यंत मन, प्राण आणि आंतरिक शरीराच्या बाबतीत या नात्याचा विकास होत राहतो. आंतरिक एकत्वाचे हे सारे घटक असतात, त्यामुळे (अशा प्रकारचे असलेले) हे एकत्व केवळ आत्म्यामध्ये, जिवामध्येच असते असे नाही, तर ते प्रकृतीमध्येही असते. असे आंतरिक नाते घनिष्ठ असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 453-454)

श्रीमाताजी आणि समीपता – ०७

भौतिकदृष्ट्या ज्या व्यक्ती श्रीमाताजींच्या निकट आहेत केवळ त्याच व्यक्ती त्यांना जवळच्या आहेत असे नव्हे; तर ज्या व्यक्ती श्रीमाताजींप्रति खुल्या असतात, आंतरिक अस्तित्वातून त्यांच्याजवळ असतात, श्रीमाताजींच्या इच्छेशी एकरूप झालेल्या असतात, त्या व्यक्ती श्रीमाताजींची खरी लेकरे असतात आणि ती श्रीमाताजींना अधिक जवळची असतात.

*

साधक : कधीकधी मी जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा मी ‘माँ – माँ – माँ’ असे म्हणत असतो. आणि मग सारे काही निःस्तब्ध होते आणि मला माझ्या अंतरंगामध्ये आणि बाहेरही एक प्रकारच्या महान शांतीचा अनुभव येतो. अगदी अवतीभोवतीच्या वातावरणामधूनसुद्धा मला ‘माँ – माँ – माँ’ असे ऐकू येते. हे खरे आहे का? की, हा केवळ एक प्रतिध्वनी आहे?

श्रीअरविंद : तुमच्या अंतरंगामध्ये येणारा हा अनुभव जसा तुमच्या चेतनेचा एक भाग असतो अगदी त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या अवतीभोवती निर्माण केलेले वातावरण हाही तुमच्या चेतनेचाच भाग असतो. जेव्हा तुम्ही श्रीमाताजींचे नामस्मरण करत असता, तेव्हा त्याचा प्रतिध्वनी तुमच्या चेतनेमध्ये म्हणजे, तुमच्या अंतरंगामध्ये तसेच तुमच्या बाहेरदेखील उमटायला सुरूवात होते. त्यामुळे तुम्हाला हा जो अनुभव आला तो खरा अनुभव आहे आणि तो चांगला अनुभव आहे.

*

साधक : माताजी, माझ्यामध्ये हजारो अपूर्णता असल्या तरीदेखील एक गोष्ट मात्र माझ्या मनात दृढ झाली आहे ती म्हणजे – तुम्ही माझी मायमाऊली आहात आणि मी तुमच्या हृदयातून जन्माला आलो आहे. गेल्या सहा वर्षांत हे एकच सत्य माझ्या प्रचितीस आले आहे. निदान ही गोष्ट जाणवण्याइतपत का होईना, पण मी पात्र ठरलो म्हणून मी तुमच्याप्रति कृतज्ञ आहे.
श्रीअरविंद : येऊ घातलेल्या सत्यांसाठी हे अत्युत्तम असे अधिष्ठान आहे; कारण ती सत्यं या अधिष्ठानाचा परिणाम म्हणूनच उदयाला यायची आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 496, 478-479, 478)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

श्रीमाताजी आणि समीपता – ०६

(एका साधकाला मार्गदर्शन करणारे श्रीअरविंद लिखित पत्र…)

“श्रीमाताजींपासून लपवावीशी वाटेल अशी कोणतीही गोष्ट करू नका, अशी कोणतीही गोष्ट बोलू नका अथवा अशा कोणत्या गोष्टीचा विचारही करू नका.” आणि येथेच, तुमच्याकडून म्हणजे तुमच्या प्राणाकडून जी शंका उपस्थित करण्यात आली आहे त्याचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल. अशा ‘किरकोळ गोष्टी’ श्रीमाताजींच्या नजरेस कशा आणून द्यायच्या ही तुमची शंका आहे. श्रीमाताजींना या गोष्टींचा त्रास होईल किंवा त्या या गोष्टींना क्षुल्लक मानतील असे तुम्हाला का वाटते? सर्व जीवन योगमय करायचे असेल तर, येथे क्षुल्लक किंवा बिनमहत्त्वाचे असे काही कसे काय असू शकेल?

तुमच्या कृतीची आणि स्वयं-विकासाची कोणतीही गोष्ट सुयोग्य वृत्तीने त्यांच्यासमोर मांडणे म्हणजे ती गोष्ट श्रीमाताजींच्या संरक्षणछत्राखाली नेण्यासारखी आहे; रूपांतरणासाठी कार्यरत असणाऱ्या त्यांच्या शक्तीकिरणांमध्ये, ‘सत्या’च्या प्रकाशात नेण्यासारखी आहे. कारण श्रीमाताजींच्या नजरेला जे आणून देण्यात आलेले असते त्या गोष्टीवर त्यांचे शक्तीकिरण लगेचच कार्य करू लागतात. तुमचा अंतरात्मा तुम्हाला एखादी गोष्ट करण्यासाठी प्रेरित करत असेल आणि तेव्हा तुमच्यामधीलच कोणीतरी, तुम्हाला ती गोष्ट तुम्ही करू नये असे सुचवत असेल तर ते म्हणजे, तो ‘प्रकाश’किरण आणि त्या ‘शक्ती’चे कार्य टाळण्यासाठी तुमच्या प्राणाने वापरलेले ते एक हत्यार असण्याची खूपच शक्यता असते.

आणखी एक गोष्टसुद्धा लक्षात घेतली पाहिजे आणि ती अशी की, तुम्ही जर तुमच्या कोणत्याही भागाच्या वृत्ती-प्रवृत्ती श्रीमाताजींनी पाहाव्यात म्हणून त्यांच्या नजरेसमोर ठेवून, श्रीमाताजींप्रति स्वतःला खुले केलेत तर, त्यातूनच स्वयमेव त्यांच्याबरोबरचे तुमचे एक नाते तयार होते आणि त्यातून एक वैयक्तिक जवळीक निर्माण होते. त्यांचे सर्व साधकांबरोबर जे एक सर्वसाधारण, मूक नाते असते किंवा श्रीमाताजींनी आपल्यामध्ये कार्य करावे अशी कोणतीही विनवणी व्यक्तीने केलेली नसतानाचे त्या व्यक्तीचे श्रीमाताजींशी जे नाते असते (not directly invited action) त्यापेक्षा हे जवळीकीचे नाते काहीसे निराळे असते.

अर्थातच, हे सारे केव्हा घडून येऊ शकते? अशा प्रकारच्या खुलेपणासाठी तुम्ही तयार झाले आहात, असे जर तुम्हाला वाटत असेल आणि तुमच्या अंतरंगामध्ये जे काही आहे ते जसेच्या तसे अगदी उघडपणे श्रीमाताजींसमोर ठेवण्यासाठी तुमचा अंतरात्मा तुम्हाला प्रेरित करत असेल तेव्हाच हे घडून येऊ शकते. जेव्हा ही गोष्ट अंतरंगातून उमलून येते आणि जेव्हा ती उत्स्फूर्त, खरीखुरी असते तेव्हाच ती फलदायी ठरते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 449)

श्रीमाताजी आणि समीपता – ०२

साधक : श्रीमाताजींबरोबरचे आमचे खरे नाते कोणते? माता आणि बालक हेच नाते खरे ना?

श्रीअरविंद : एखादे बालक मातेवर ज्याप्रमाणे संपूर्णतया, प्रामाणिकपणे आणि साध्यासुध्या विश्वासाने, प्रेमाने विसंबून असते तेच नाते हे श्रीमाताजींबरोबर असलेले खरे नाते होय.

*

तुम्ही श्रीमाताजींचे बालक आहात आणि मातेचे तिच्या बालकांवर अतोनात प्रेम असते आणि त्यांच्या प्रकृतीमधील दोष ती धीराने सहन करत राहते. श्रीमाताजींचे खरेखुरे बालक होण्याचा प्रयत्न करा. ते तुमच्यामध्ये आहे, पण तुमचे बाह्य मन व्यर्थपणे किरकोळ गोष्टींमध्ये गुंतलेले राहते आणि बरेचदा उगाचच तुम्ही त्या गोष्टींचा बाऊ करत बसता. श्रीमाताजींचे दर्शन तुम्ही फक्त स्वप्नातच घेता कामा नये तर, त्यांना तुमच्यासमवेत आणि तुमच्या अंतरंगात सदासर्वकाळ पाहण्याचा आणि त्यांचे अस्तित्व अनुभवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा मग तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणणे सोपे जाईल. कारण त्या तेथे (तुमच्या अंतरंगात) राहून तुमच्यासाठी ती गोष्ट करू शकतील.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 448, 452-453)