Tag Archive for: शारीरिक चेतना

साधना, योग आणि रूपांतरण – २६५

प्राणाचे रूपांतरण

प्राणाला जबरदस्तीने काही करायला भाग पाडणे शक्य असले तरी तसे करणे सोपे नसते. सातत्याने अत्यंत मनःपूर्वकतेने प्राणाला पटवून सांगणे आणि त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे अधिक सोपे असते. परंतु असे करण्याच्या या मानसिक पद्धतीमध्ये, प्राण हा बरेचदा स्वतःच्या कोणत्यातरी फायद्यासाठी आध्यात्मिक आदर्शाला स्वतःहून जोडून घेतो, हे खरे आहे. प्राणाने स्वतःच स्वतःसमोर अनावृत (expose) व्हावे यासाठी, प्राणामध्ये प्रकाश सदोदित खाली उतरवत राहणे हा एक परिणामकारक मार्ग असतो. असे केल्यामुळे स्वतःमध्ये काय चुकीचे आहे हे पाहण्यासाठी तो प्रवृत्त होतो आणि सरतेशेवटी आपल्यामध्ये परिवर्तन घडावे यासाठी तो प्रामाणिकपणे इच्छा बाळगू लागतो.

प्राणिक प्रकृतीमध्ये हा प्रकाश एकतर अंतरंगामधून, चैत्य अस्तित्वाकडून आणता येतो नाहीतर तो वरून, मनाच्या माध्यमातून उतरविता येतो. मनाच्या ऊर्ध्वस्थित असणारा प्रकाश आणि शक्ती अवतरित व्हावी म्हणून त्यांस आवाहन करणे ही पूर्णयोगाच्या अनेकविध पद्धतींपैकी एक प्रमुख पद्धती आहे. परंतु कोणताही मार्ग अवलंबला तरीदेखील तो नेहमीच चिकाटीने आणि धीरयुक्त आध्यात्मिक परिश्रमाने अमलात आणावा लागतो.

प्राणामध्ये अकस्मात परिवर्तन घडविता येऊ शकते पण अशा अकस्मात झालेल्या परिवर्तनानंतरसुद्धा त्याच्या परिणामकारकतेसाठी, त्यावर काम करावे लागते, त्यावर परिश्रम घ्यावे लागतात, ते परिवर्तन प्राणाच्या प्रत्येक भागावर अंमलात आणावे लागते. जोपर्यंत त्याचा परिणाम परिपूर्ण होत नाही तोपर्यंत ते करावे लागते आणि त्यासाठी बरेचदा दीर्घ काळ लागतो. शारीरिक चेतनेबाबत सांगायचे तर, दीर्घकाळ प्रयत्न केल्यानंतरच तिच्यामध्ये परिवर्तन घडविणे शक्य असते. हां, एखाद्या विशिष्ट घटकामध्ये त्वरेने परिवर्तन करता येऊ शकते पण समग्र परिवर्तन घडविण्यासाठी दीर्घकाळ आणि चिकाटीने परिश्रम करावे लागतात.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 110-111)

अमृतवर्षा ०५

 

साधक : आम्हाला सदासर्वकाळ भौतिक परिस्थितीमध्ये अडकवून ठेवणाऱ्या शारीरिक चेतनेमधून आम्ही बाहेर कसे पडावे?

श्रीमाताजी : त्यासाठी अनेक मार्ग आहेत. बौद्धिक, भावनिक, कलात्मक आणि आध्यात्मिक मार्ग आहेत. आणि साधारणपणे, ज्याला जो मार्ग सर्वाधिक सोपा वाटतो तो मार्ग त्याने अवलंबणे कधीही चांगले. कारण सर्वात अवघड असे जे आहे त्यापासून सुरुवात करायची म्हटले तर हाती काहीच लागणार नाही. आणि इथेच आपण श्रीअरविंदांनी ‘The Synthesis of Yoga’ या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग किंवा कर्ममार्ग यांच्यापाशी परत येऊन पोहोचतो. यातील कर्ममार्ग हा प्रामुख्याने तुम्हाला भौतिक जीवनाशी जोडून ठेवतो आणि त्यामध्येच मुक्तीचा शोध घेण्यास प्रवृत्त करतो. कदाचित हा सर्वात परिणामकारक पण सर्वात अवघड असा मार्ग आहे.

बहुतांशी मुमुक्षू लोकांना ध्यानाचा, एकाग्रतेचा मार्ग, या भौतिक जीवनापासून दूर राहण्याचा, भौतिक क्रियाकलापांचा परित्याग करण्याचा मार्ग हा कर्ममार्गापेक्षा निश्चितपणे सोपा वाटतो. पण, ते भौतिक चेतनेला, ती जशी आहे तशीच सोडून देतात, तिच्यामध्ये कोणतेही परिवर्तन घडवून न आणता, तशीच सोडून देतात; या मार्गामध्ये, व्यक्ती जोवर एखाद्या साधु वा संन्याशाप्रमाणे सक्रिय जीवन बाजूला सारत नाही आणि सदासर्वदा ध्यानामध्ये निमग्न राहत नाही तोवर तिला काहीच साध्य होत नाही. म्हणजेच, व्यक्तित्वाचा एक संपूर्ण भाग कधीच रूपांतरित होत नाही, तो तसाच शिल्लक राहतो. रूपांतरण करणे हा त्यांच्याकडे मार्गच नसतो, तर शरीराला नकार देऊन, त्या शरीरातून शक्य तितक्या त्वरेने बाहेर पडणे हाच केवळ एक मार्ग त्यांच्याकडे असतो. पूर्वी योगसाधनेमध्ये हेच अभिप्रेत असे आणि साहजिकच ते अधिक सोपे होते. पण आपल्याला जे हवे आहे ते हे नाही.

आपल्याला शारीरिक, भौतिक चेतनेचे रूपांतरण हवे आहे, त्याला नकार देणे येथे अभिप्रेत नाही. आणि येथेच श्रीअरविंदांनी अगदी थेट आणि अगदी परिपूर्ण असा ‘ईश्वरा’प्रत नेणारा समर्पणाचा मार्ग सुचविलेला आहे. क्रमश: अधिकाधिक समग्र होत जाणारे आणि भौतिक क्रियाकलापांचा व भौतिक चेतनेचादेखील समावेश करून घेणारे समर्पण. आणि व्यक्ती ते करण्यामध्ये यशस्वी झाली तर शरीर किंवा जडभौतिक हे मार्गातील धोंड न ठरता, साहाय्यक बनते.

 

– श्रीमाताजी [CWM 08 : 299-300]