Tag Archive for: व्यावहारिक जीवन

कर्म आराधना – ४०

मानवतेची सेवा करण्याची कल्पना ही महत्त्वाकांक्षेच्या अत्यंत सामान्य रूपांपैकी एक रूप आहे. अशा प्रकारच्या सेवेविषयी किंवा कार्याविषयी असणारी सर्व आसक्ती ही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेची खूण असते. ज्या ‘गुरुं’ची अशी समजूत असते की, त्यांच्यापाशी मानवतेला शिकविण्यासाठी एक फार महान सत्य आहे आणि ज्यांना भरपूर मोठा शिष्यवर्ग हवा असतो आणि शिष्य त्यांच्यापासून निघून जातात तेव्हा जे बेचैन होतात किंवा त्यांच्याकडे जो कोणी येईल त्याला पकडून ते त्या व्यक्तीला शिष्य बनविण्याचा प्रयत्न करतात, असे गुरू निःसंदेहपणे अन्य कशाचे नव्हे तर, स्वतःच्या महत्त्वाकांक्षेचे अनुसरण करत असतात.

– श्रीमाताजी
[CWM 03 : 09]

कर्म आराधना – १५

कौशल्यपूर्ण हात, स्वच्छ दृष्टी, एकाग्र अवधान, अथक चिकाटी या गोष्टी व्यक्तीपाशी असताना व्यक्ती जे काही करेल ते उत्कृष्टच असेल.
*
कौशल्यपूर्ण हात, काटेकोर काळजी, टिकून राहणारे अवधान या गोष्टी ज्या व्यक्तीकडे असतील ती व्यक्ती ‘जडभौतिका’ला ‘चैतन्या’च्या आज्ञा पाळण्यास भाग पाडते.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 308)

कर्म आराधना – १३

कर्मामध्ये सुव्यवस्था आणि सुमेळ असला पाहिजे. वरकरणी पाहता जी गोष्ट अगदीच सामान्य वाटते ती गोष्टसुद्धा अगदी परिपूर्ण पूर्णतेने, स्वच्छतेच्या, सौंदर्याच्या, सुमेळाच्या भावनेने आणि व्यवस्थितपणाने केली पाहिजे.
*
कर्मामध्ये ‘परिपूर्णते’ची आस बाळगणे ही खरी आध्यात्मिकता.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 305-306)

कृतज्ञता – २८

कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपण आपल्यामधील अहंकारावर मात केली पाहिजे आणि या रूपांतरणाच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत. ‘इतरजण तरी कुठे रूपांतरित झाले आहेत,’ या सबबीखाली मानवी अहंभाव स्वतःचा परित्याग करण्यास नकार देतो. परंतु ही एक प्रकारे त्याच्यावर असणारी दुरिच्छेची पकड असते, कारण इतर काय करतात किंवा काय करत नाहीत याकडे लक्ष न देता, स्वतःमध्ये रूपांतर घडविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते.

हे रूपांतर, अहंकाराचा निरास करणे हा स्थायी शांती आणि आनंद मिळविण्याचा एकमेव मार्ग आहे, हे जर लोकांना समजले तर मग आवश्यक प्रयत्न करण्यास ते संमती देतील. हा ठाम विश्वासच त्यांच्यामध्ये जागृत करण्याची आवश्यकता आहे.

प्रत्येकाला हे वारंवार सांगितले पाहिजे की, तुमच्या अहंकाराचा निरास करा म्हणजे शांती तुमच्यावर सत्ता प्रस्थापित करेल.

‘ईश्वरी’ साहाय्य प्रामाणिक अभीप्सेला नेहमीच प्रतिसाद देते.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 428)

कृतज्ञता – २५

निराशा आपल्याला कोठेच घेऊन जात नाही. सुरुवातीलाच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपण स्वतःलाच एक गोष्ट सांगितली पाहिजे की, आपण प्रगती करत आहोत की नाही, हे जाणण्यासाठी आपण पूर्णतः अक्षम असतो. कारण आपल्याला जेव्हा साचलेपण (stagnation) आल्यासारखे वाटते तेव्हा ती स्थिती बरेचदा दीर्घकाळाची असू शकते, परंतु ती निश्चितच अंतहीन नसते तर ती पुढे झेप घेण्यासाठीची पूर्वतयारी असते. कधी कधी या पूर्वतयारीचा कालावधी काही आठवडे किंवा महिने चालू असल्याचे आपल्या निदर्शनास येते. आणि नंतर दीर्घकाळपर्यंत ज्याची तयारी चालू होती ती गोष्ट एकदम अचानक प्रत्यक्षात उतरलेली दिसून येते आणि मग आपल्याला बराच लक्षणीय बदल झालेला दिसून येतो आणि हा बदल एकाच वेळी अनेक बाबतीत झालेला असतो.

योगातील सर्व गोष्टींप्रमाणेच, प्रगतीसाठी केलेले प्रयत्न हे देखील प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रेमाखातरच केले गेले पाहिजेत. प्रयत्नांचा आनंद, प्रगतीची आस या गोष्टी स्वयमेव पुरेशा असल्या पाहिजेत, त्या त्याच्या परिणामांवर अवलंबून असता कामा नयेत. व्यक्तीने योगामध्ये केलेली प्रत्येक कृती ही, ती कृती करण्याच्या आनंदासाठीच केली पाहिजे, त्यापासून व्यक्तीला ज्या फळाची अपेक्षा असते, त्या फळासाठी ती कृती व्यक्तीने करता कामा नये. खरोखरच, जीवनामध्ये नेहमीच, कोणत्याही गोष्टीचे फळ आपल्या हाती नसते. आपल्याला जर योग्य दृष्टिकोन बाळगण्याची इच्छा असेल तर त्यासाठी आपण काय केले पाहिजे? आपण जे करणे आवश्यकच आहे, तीच गोष्ट आपण अगदी उत्स्फूर्तपणे केली पाहिजे, ती गोष्ट आपल्याला जाणवली पाहिजे, आपण त्या गोष्टीचाच विचार केला पाहिजे, आणि त्याचा काहीतरी परिणाम साध्य करून घेण्याच्या दृष्टीने नव्हे तर, ती गोष्ट मिळविण्यासाठीच धडपड केली पाहिजे. आपण ज्या क्षणी परिणामाचा विचार करायला लागतो त्या क्षणीच सौदेबाजी करायला सुरुवात करतो आणि अशा रीतीने त्या प्रयत्नांमधील सारी प्रामाणिकता हरवून जाते. तुम्ही प्रगतीसाठी प्रयत्न करता कारण तुम्हाला प्रयत्न करण्याची, प्रगती करण्याची एक अनिवार्य अशी निकड आतूनच जाणवते; आणि हे प्रयत्न म्हणजे तुम्ही तुमच्या अंतरंगातील ‘ईश्वरी चेतने’ला, ‘विश्वा’तील ‘ईश्वरी चेतने’ला अर्पण केलेली भेट असते, कृतज्ञता व्यक्त करण्याचा, स्वतःला अर्पण करण्याचा तो तुमचा मार्ग असतो…

समजा, तुम्हाला प्रगती करण्याची इच्छा आहे, तुम्ही स्वतःवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहात, उदाहरणार्थ, तुम्हाला तुमच्यातील विशिष्ट दोषांवर मात करायची आहे, कमतरतेवर, उणिवांवर मात करायची आहे पण तुमच्या प्रयत्नांचे तुम्हाला कमीअधिक परिणाम लवकरात लवकर दिसून यावेत अशी तुमची अपेक्षा असेल तर, अशा वेळी तुमच्या प्रयत्नांमधील सर्व प्रामाणिकपणा तुम्ही हरवून बसता, कारण आता तो एक व्यवहार बनलेला असतो. तुम्ही म्हणता, ”मी आता प्रयत्न करणार आहे, पण ते याचसाठी की, त्या प्रयत्नांच्या मोबदल्यात मला अमुक अमुक गोष्ट हवी आहे.” अशा वेळी तुमच्यातील उत्स्फूर्तता, सहजता नाहीशी झालेली असते.

तेव्हा दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. परिणाम काय असायला हवा हे ठरविण्यासाठी आपण अक्षम असतो. आपण जर आपला विश्वास ईश्वरावर ठेवला, आणि आपण जर म्हणालो की, ”मी आता सारे काही प्रदान करू इच्छितो, अगदी सारे काही, मला जे जे देणे शक्य आहे, ते ते सारे प्रयत्न, एकाग्रता या साऱ्या गोष्टी मी देऊ इच्छितो आणि त्याच्या मोबदल्यात मला काय द्यायचे किंवा काही द्यायचे की नाही, हे देखील तो ईश्वरच ठरवेल आणि त्याचे परिणाम काय असतील हे मला माहीत नाहीत.” आपल्यामधील कोणतीही गोष्ट रूपांतरित होण्याआधीच आपल्याला आपण कोणती दिशा पकडणार आहोत, कोणता मार्ग निवडणार आहोत याविषयी काही कल्पना असते का? या रूपांतरानंतर कोणता आकार त्याला प्राप्त होणार आहे, याची थोडीतरी कल्पना आपल्याला असते का ? नाही, अजिबात नसते. त्यावेळी, ती केवळ आपली कल्पना असते आणि सहसा जे परिणाम घडून येणार आहेत त्यांना आपण मोठ्या प्रमाणात मर्यादित करतो, आणि त्यांना आपण अगदी किरकोळ, क्षुद्र, वरवरचे आणि सापेक्ष बनवितो. खरोखरच परिणाम काय असू शकतात, काय असायला हवेत, ते आपल्याला कळत नाहीत. आपल्याला ते नंतर कळतात. जेव्हा तो परिणाम घडून येतो तेव्हा आपण मागे वळून बघतो, आपण म्हणतो, ”अच्छा! म्हणजे माझी वाटचाल या दिशेने चालू होती तर…” पण आपल्याला मात्र ते नंतर, उशिरा समजते. त्याआधी आपल्याला त्याची फक्त धूसर कल्पना असते आणि ती कल्पना आपल्या खऱ्या प्रगतीच्या, खऱ्या रूपांतराच्या तुलनेत काहीशी वरवरची, बालिश असते.

तेव्हा पहिला मुद्दा हा की, आपल्याला एक आस असते पण त्याचे खरे परिणाम काय असायला हवेत हे आपल्याला खऱ्या अर्थाने कळू शकत नाहीत. एका ईश्वरालाच केवळ ते कळू शकतात.

आणि दुसरा मुद्दा असा की, आपण जर ईश्वराला असे सांगितले की, ”मी तुला माझे प्रयत्न अर्पण करत आहे, पण त्या बदल्यात मला माझी प्रगती झालेली हवी आहे, अन्यथा मी तुला काहीही देणार नाही.” तर ही निव्वळ सौदेबाजी झाली.

उत्स्फूर्त, सहजस्वाभाविकपणे केलेली कृती, मी या व्यतिरिक्त अन्य काहीही करू इच्छित नाही असे म्हणून व्यक्तीने केलेली कृती आणि सदिच्छायुक्त भावनेने अर्पण केलेली कृती ही अशी एकमेव कृती असते की, जिला खरोखर काहीतरी मूल्य असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 316-318)

कृतज्ञता – २३

कधीकधी व्यक्ती अगदी उदारतेने केलेली एखादी कृती पाहते, जगावेगळे असे काहीतरी तिच्या कानावर पडते; उदारता, आत्म्याची थोरवी किंवा एखाद्या धाडसी वीराने केलेली कृती व्यक्ती पाहते, कधीकधी काही विशेष प्रतिभासंपन्न अशा गोष्टी ती पाहते किंवा एखादी गोष्ट अत्यंत असाधारण पद्धतीने, सुंदरतेने केली असल्याचे व्यक्ती पाहते, ते करणाऱ्या व्यक्तीशी तिची गाठभेठ होते; अशा प्रत्येक वेळी व्यक्तीच्या मनामध्ये अचानकपणे एक प्रकारचा उत्साह, एक प्रकारचे कौतुक, एक प्रकारची कृतज्ञता दाटून येते आणि त्यातूनच अभूतपूर्व अशा आनंदाची, एका उबदार, प्रकाशमय, चेतनेच्या एका नव्या स्थितीकडे घेऊन जाणारी द्वारे खुली होतात. हा देखील मार्गदर्शक सूत्र पकडण्याचा एक मार्ग आहे.

*

‘ईश्वरा’प्रत कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आनंदी राहणे.

‘ईश्वरा’ प्रत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, शांतीपूर्वक आनंदी राहण्यासारखा अन्य कोणताही चांगला मार्ग नाही.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 405), (CWM 14 : 154-155)

कृतज्ञता – २०

रोज सकाळी तुम्ही जेव्हा झोपून उठता तेव्हा, तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही मानववंशाचे त्राते असणाऱ्या महान समुदायाविषयी कृतज्ञतेने, प्रेमाने आणि स्तुतीने करा. (येथे श्रीमाताजी आध्यात्मिकतेची शिकवण देणाऱ्या संतमंडळींबद्दल सांगत आहेत.) ते सारे एकसारखेच असतात. पूर्णत्वाची अवघड चढण चढता येण्यासाठी मदत करावी या हेतुने ते मार्गदर्शक म्हणून, प्रशिक्षक म्हणून, त्यांच्या बांधवांचे विनम्र आणि अद्भुत सेवक म्हणून, आजवर जन्म घेत आले आहेत, ते आत्ताही आहेत, आणि काळाच्या अंतापर्यंत असणार आहेत. जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुमचे विचार पूर्ण विश्वासाने आणि कृतज्ञतेने त्यांच्यावर एकाग्र करा. लवकरच या एकाग्रतेचे लाभदायक परिणाम तुमच्या अनुभवास येतील. तुमच्या हाकेला त्यांचे अस्तित्व प्रतिसाद देत आहे असे तुम्हाला जाणवेल, त्यांच्या प्रकाशाने व प्रेमाने तुम्हाला कवळले आहे, त्यांच्या प्रकाशाच्या आणि प्रेमाच्या रंगात तुम्ही न्हाऊन निघाले आहात असे तुम्हाला जाणवेल. आणि मग थोडेसे अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठीचे, थोडे अधिक प्रेम करण्यासाठीचे, अधिक सेवा करण्यासाठीचे तुमचे दैनंदिन प्रयत्न अधिक परिणामकारक आणि अधिक सहजसुलभ होतील. तुम्ही इतरांना जी मदत कराल ती अधिक परिणामकारक ठरेल आणि तुमचे हृदय एका अतूट आनंदाने भरून जाईल.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 115-116)

कृतज्ञता – १९

(धम्मपदातील एका वचनाबद्दल श्रीमाताजी भाष्य करीत आहेत…)

मी तुम्हाला आश्चर्याचा धक्का देणार आहे. तो असा की, हे जग बदलावे म्हणून जर द्वेषभावनेला प्रेमभावनेने प्रत्युत्तर द्यायचे असेल तर, प्रेमाला प्रेमाने प्रतिसाद द्यावा हे अधिक जास्त स्वाभाविक नाही का?

हे जीवन, कृती आणि माणसांची हृदये जशी आहेत तशीच विचारात घेतली तर, ‘ईश्वरी कृपा’ या विश्वावर ‘प्रेमा’चा जो अपरिमित वर्षाव करते त्या प्रेमाला प्रत्युत्तर म्हणून मिळणारा सर्व द्वेष, तिरस्कार तसेच अलिप्तता पाहून आश्चर्यचकित होण्याचा व्यक्तीला नक्कीच अधिकार आहे; कारण या विश्वाला ईश्वरी आनंदाकडे घेऊन जाण्यासाठी म्हणून हे अपरिमित ईश्वरी ‘प्रेम’ प्रत्येक क्षणाला कार्य करत असते आणि तरीसुद्धा त्याला मानवी हृदयामध्ये अत्यल्प प्रतिसाद मिळतो.

परंतु लोकांना दुष्ट, अपंग, ज्यांच्या बाबतीत काहीतरी अघटित घडलेले असते अशांविषयी, अपयशी व्यक्तींविषयी, अपयशाविषयी कणव असते – वास्तविक हे एक प्रकारे त्या दुष्टतेला आणि अपयशाला दिलेले प्रोत्साहनच असते. समस्येच्या या पैलूचा व्यक्तीने थोडा अधिक विचार केला तर कदाचित द्वेषाला प्रेमाने प्रतिसाद देण्याच्या आवश्यकतेवर भर देण्याची गरज कमी भासेल. कारण मानवी हृदयामध्ये ज्या ईश्वरी प्रेमाचा वर्षाव केला जात असतो त्या प्रेमाला, जर त्याने, जे समजून घेऊ शकते आणि जे दाद देऊ शकते अशा प्रेमाच्या उत्स्फूर्त कृतज्ञतेनिशी आणि पूर्ण प्रामाणिकतेनिशी प्रतिसाद दिला तर, विश्वामध्ये गोष्टी त्वरेने बदलू शकतील.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 187)

कृतज्ञता – १८

कोणते तरी संकट आल्याशिवाय लोकांना ‘ईश्वरी कृपे’च्या कार्याची जाणीवच होत नाही; म्हणजे जेव्हा एखादा अपघात घडणार असतो किंवा एखादा अपघात घडलेला असतो आणि त्यातून ते सहीसलामत वाचलेले असतात, तेव्हा लोकांना त्या कृपेची जाणीव होते. पण एखादा प्रवास किंवा तत्सम कोणता प्रसंग, जर विनाअपघात सुरळीत पार पडला, तर ती त्याहूनही अधिक उच्च अपरिमित अशी ‘ईश्वरी कृपा’ आहे, याची त्यांना कधीच जाणीव नसते. म्हणजे खरंतर, काहीही विपरित घडू नये अशा रीतीनेच तेथे सुसंवाद प्रस्थापित झालेला असतो. पण लोकांना मात्र ते अगदी सहजस्वाभाविक असल्यासारखे वाटते.

लोक आजारपणातून जेव्हा पटकन बरे होतात, तेव्हा त्यांच्याठायी कृतज्ञता असते; पण एरवी जेव्हा ते ठणठणीत बरे असतात तेव्हा त्यांना कृतज्ञ असावे असे कधीच वाटत नाही. खरंतर, हीच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे !

– श्रीमाताजी
(CWM 05 : 406)

कृतज्ञता – १७

(श्रीमाताजी येथे ‘धम्मपदा’तील एका वचनाविषयी विवेचन करत आहेत.)

मानवी प्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वच धर्मग्रंथांमध्ये नेहमीच असे सांगितलेले आढळते की, जो तुम्हाला तुमचे दोष दाखवून देतो त्या व्यक्तीविषयी तुम्ही कृतज्ञ असले पाहिजे आणि त्याच्या सहवासाची तुम्ही इच्छा बाळगली पाहिजे. पण येथे धम्मपदामध्ये तीच गोष्ट मोठ्या समर्पकपणे सांगितलेली आहे : एखादा दोष तुम्हाला दाखविण्यात आला तर जणू काही तुम्हाला खजिनाच दाखविण्यात आला आहे, असे समजा. म्हणजेच याचा अर्थ असा की, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष, अक्षमता, आकलनक्षमतेचा अभाव, दुर्बलता, अप्रामाणिकपणा, तुम्हाला प्रगतीपासून रोखणारे असे जे जे काही तुमच्यामध्ये सापडेल तेव्हा ते म्हणजे जणू काही अद्भुत खजिनाच लाभल्यासारखे तुम्हाला वाटेल.

“अरे देवा, अजून एक दोष!” असे म्हणत न बसता व त्याविषयी खंत बाळगत न बसता, उलट तुम्हाला जणूकाही एखादी अद्भुत उपलब्धी झाली असल्याप्रमाणे आनंद झाला पाहिजे. कारण आजवर जी गोष्ट तुम्हाला प्रगत होण्यापासून रोखत होती, ती गोष्ट आता तुमच्या पकडीत आलेली असते. आणि एकदा का ती गोष्ट तुमच्या पकडीत आली की, तिला खेचून बाहेर काढा. कारण असे मानले जाते की जो योगसाधना करतो, त्याला ज्या क्षणी अमुक एक गोष्ट करण्यास योग्य नाही असे समजते, त्याच क्षणी ती दूर सारणे, बाद करणे आणि नष्ट करणे ही शक्ती त्याच्या ठायी असते.

दोषाचा शोध लागणे ही एक प्राप्ती असते, उपलब्धी असते. जणू काही नुकत्याच बाहेर घालवून दिलेल्या धूसरतेच्या छोट्या कणाची जागा घेण्यासाठी प्रकाशाचा पूर आत शिरला आहे.

तुम्ही जर योगसाधना करत असाल, तर तुम्ही दुर्बलता, नीचता, इच्छाशक्तीचा अभाव, ज्ञानापाठोपाठ सामर्थ्य न येणे ह्या बाबींचा स्वीकार करता कामा नये. एखादी गोष्ट आपल्यात असता कामा नये याची जाणीव होणे आणि तरीही ती तशीच चालू ठेवणे हे दुर्बलतेचे लक्षण असते; ही दुर्बलता कोणत्याही गंभीर अशा योगसाधनेत स्वीकारली जात नाही; अशा संकल्पशक्तीचा अभाव हा व्यक्तीला अप्रामाणिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडतो.

अमुक एक गोष्ट असता कामा नये, हे तुम्हाला ज्या क्षणी कळते, तेव्हा ती गोष्ट आपल्यात राहता कामा नये, हे ठरविणारे तुम्हीच असता. कारण ज्ञान आणि सामर्थ्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे असे म्हणता येईल की, तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागात तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मध्यवर्ती संकल्पशक्तीला विरोधी असणाऱ्या, वाईट इच्छेच्या छायेला थारा देता कामा नये; कारण तसे केल्याने ज्या अनिष्टाचा तुम्ही नायनाट केला पाहिजे त्याच अनिष्टासमोर तुमच्या प्रगतीची संकल्पशक्ती पौरुषहीन, दुबळी, धैर्यहीन, सामर्थ्यहीन ठरते…

अज्ञानातून घडलेले पाप हे पाप नसते; तो या जगतातील सर्वसाधारण अशा अनिष्टाचा एक भाग असतो; पण तुम्हाला माहीत असूनदेखील तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा ते अधिक गंभीर असते. याचा अर्थ असा की, फळामध्ये ज्याप्रमाणे एखादा कृमी दडून बसलेला असतो तसा दुरिच्छेचा एखादा घटक तुमच्यामध्ये दडून बसलेला असतो, त्याला शोधून कोणत्याही परिस्थितीत नष्ट केले पाहिजे, कारण बरेचदा अशा वेळी दाखविलेली दुर्बलता ही पुढे जाऊन कधीच दुरुस्त न होऊ शकणाऱ्या अडचणींचे कारण बनते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 220-221)