Posts

विचारशलाका १८

 

एकदा का तुम्ही आंतरिक रूपांतरणाच्या दृष्टीने चांगला प्रारंभ केला आणि जर तुम्ही जिवाच्या मुळाशी अवचेतनेपर्यंत (subconscient) प्रवास केलात तर – जे तुमच्यामध्ये तुमच्या पालकांकडून, अनुवंशिकतेतून आलेले असते – ते तुम्हाला दिसू लागते. बहुतांशी या सर्वच अडचणी तेथे आधीपासूनच असतात, जन्मानंतरच्या पहिल्या काही वर्षांमध्ये ज्यांची भर पडते अशा गोष्टी फारच थोड्या असतात.

 

आणि अशा गोष्टी कोणत्याही आकस्मिक क्षणीदेखील घडू शकतात; जर तुम्ही वाईट संगतीमध्ये राहिलात, वाईट पुस्तके वाचलीत, तर ते विष तुमच्यामध्ये शिरेल; अशावेळी या गोष्टींचे अवचेतनामध्ये खोलवर उमटलेले ठसे आणि तुमच्या वाईट सवयी यांच्या विरुद्ध तुम्हाला झगडावे लागते.

 

उदाहरणार्थ, असे काही लोक असतात की ज्यांना खोटे बोलल्याशिवाय तोंडच उघडता येत नाही; ते नेहमीच तसे जाणीवपूर्वक करतात असेही नाही (तसे असेल तर ते जास्तच घातक असते.) किंवा असे काही लोक असतात की, जे इतरांच्या संपर्कात आल्यावर भांडल्याशिवाय राहूच शकत नाहीत, अशा गोष्टी त्यांच्या अवचेतनेमध्ये खोलवर रुजलेल्या असतात.

 

तुम्ही जेव्हा सदिच्छा बाळगता, तेव्हा तुम्ही बाह्यत: या सर्व गोष्टी टाळण्याचा, शक्य असेल तर त्या दुरुस्त करण्याचा हरप्रकारे प्रयत्न करता, त्यावर तुम्ही काम करता, त्यांच्याशी मुकाबला करता; आणि मग तुम्हाला अशी जाणीव होते की, या गोष्टी वारंवार वर येत आहेत, जो भाग तुमच्या नियंत्रणावाचून सुटलेला आहे अशा भागातून त्या वर येत आहेत.

 

पण जर का तुम्ही तुमच्या अवचेतनेमध्ये प्रवेश केलात, तुमच्या चेतनेला त्यामध्ये प्रवेश करू दिलात आणि काळजीपूर्वक पाहू लागलात तर मग तुम्हाला हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळ, उगम कोठे आहे त्याचा शोध लागतो; तुमचे आईवडील, आजी आजोबा कसे होते हे आता तुम्हाला कळू लागते आणि जेव्हा एखाद्या विशिष्ट क्षणी तुम्ही स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा तुम्हाला कळते, ”मी असा आहे कारण ते तसे होते.”

 

तुमच्याकडे लक्ष ठेवून असणारा, तुमची मार्गावर तयारी करून घेणारा असा पुरेसा जागृत चैत्य पुरुष (psychic being) जर तुमच्यामध्ये असेल तर तो तुमच्याकडे तुम्हाला साहाय्यक ठरतील अशा गोष्टी, माणसे, पुस्तके, परिस्थिती खेचून आणू शकतो. कोणा परोपकारी, कृपाळू इच्छेमुळेच जणू घडले असावेत असे छोटे छोटे योगायोग घडून येतात आणि तुम्हाला निर्णय घेण्यासाठी आणि तुम्हाला योग्य दिशेला वळविण्यासाठी एखादा संकेत, कोणती तरी मदत, एखादा आधार पुरविण्यात येतो.

 

पण एकदा का तुम्ही निर्णय घेतला, तुमच्या जिवाचे सत्य शोधून काढायचे एकदा का तुम्ही ठरविलेत, तुम्ही त्या मार्गावरून प्रामाणिकपणे वाटचाल करायला सुरुवात केलीत तर, तुमच्या प्रगतीसाठी मदत व्हावी म्हणून जणू (अज्ञातात) कोणीतरी, सगळेमिळून सर्वकाही घडवत आहेत असे तुम्हाला वाटू लागते. आणि तुम्ही जर काळजीपूर्वक निरीक्षण केलेत तर हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळदेखील तुम्हाला दिसू लागते : “अरे! हा दोष माझ्या वडिलांमध्ये होता तर’’, “अरेच्चा, ही तर माझ्या आईची सवय आहे’’; “खरंच, माझी आजी अशी होती’’, “माझे आजोबाही असे होते;” असे तुम्हाला जाणवू लागते. किंवा मग तुम्ही लहान असताना जिने तुमची काळजी घेतली होती अशी कोणी तुमची आया असेल, किंवा तुम्ही ज्यांच्याबरोबर खेळलात, बागडलात ती तुमची बहीणभावंडे असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, यांच्यात किंवा त्यांच्यात काहीतरी असलेले तुम्हाला तुमच्यामध्ये सापडेल.

 

तुम्ही जर प्रामाणिक राहिलात तर या सगळ्या गोष्टी तुम्ही शांतपणे पार करू शकता, असे तुम्हाला आढळून येईल. आणि कालांतराने ज्या बंधांनिशी तुम्ही जन्माला आला होतात ते सारे बंध, त्या बेड्या तुम्ही तोडून टाकाल आणि तुमच्या मार्गावरून तुम्ही अगदी मुक्तपणे पुढे जाल. तुम्हाला जर तुमचे व्यक्तिमत्त्व बदलायचे असेल तर तुम्ही हे केलेच पाहिजे.

 

– श्रीमाताजी [CWM 04 : 261-262]

विचार शलाका – ०४

धैर्यवान बना आणि स्वत:विषयी फार विचार करत बसू नका. तुम्ही तुमच्या क्षुद्र अहंकाराला सर्व जीवनव्यवहाराचे केंद्र बनविता आणि त्यामुळे तुम्ही असमाधानी व खिन्न होता. स्वत:ला विसरणे हाच सर्व व्याधींवरील रामबाण उपाय आहे.

*

धीर धरा ! प्रतिदिनी प्रात:काळी आपल्या पहिल्या किरणांच्याद्वारे उगवता सूर्य जी शिकवण, जो संदेश पृथ्वीला देतो तो ऐका. तो आशेचा किरण असतो; तो दिलासादायक संदेश असतो. अशी कोणतीच रात्र नाही की जिच्या अंती उषेचा उदय होत नाही; अंधकार जेव्हा अति घनदाट होतो त्याचवेळी उषेचे आगमन होण्याची तयारी झालेली असते….

– श्रीमाताजी [CWM 16 : 175], [CWM 02 : 44]

कोणत्याही परिस्थितीत अंतरंगामध्ये अविचल राहणे म्हणजे समत्व.
*
सुदृढ मनाच्या नियमनामुळे समता प्राप्त होऊ शकते. (संसारी माणूस सर्व प्रकारच्या अडचणी पेलूशकतो.) पण ती ‘समता’ नव्हे;तर ती ‘तितिक्षा’ असते. सहन करण्याची ही शक्ती समतेची पहिली पायरी आहे किंवा समतेचे पहिले तत्त्व आहे.
*
समता म्हणजे अहंकाराचा अभाव नव्हे तर, इच्छेचा आणि आसक्तीचा अभाव म्हणजे समत्व.
*
इतर लोक काय बोलतात किंवा काय सुचवितात याकडे लक्ष देण्यात अर्थ नाही. या दोन्ही गोष्टींमुळे प्रभावित न होण्यास शिकले पाहिजे. खरे संतुलन प्राप्त करून घेण्यासाठी, एक विशिष्ट अशी समता आवश्यक असते. ईश्वराचा साक्षात्कार हीच एकमेव महत्त्वाची गोष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 130,135,133),(CWSA 31 : 314)

ईश्वरी कृपा – ०४

प्रश्न : ईश्वराचा धावा केला तर ‘ईश्वरी कृपा’ हस्तक्षेप करते का?

श्रीमाताजी : धावा केला असताना? हो. मात्र केवळ त्यामुळेच आणि तेवढ्यासाठीच ‘ईश्वरी कृपा’ हस्तक्षेप करते असे मात्र नाही. पण खचितच, व्यक्तिची जर ईश्वरी कृपेवर श्रद्धा असेल आणि व्यक्ती तशी अभीप्सा बाळगत असेल आणि एखादे लहान मूल आईकडे धावत जाऊन जसे म्हणते की, “आई, मला अमुक अमुक दे,” त्या साधेपणाने जर व्यक्ती धावा करेल, आणि ईश्वरी कृपेकडे वळेल आणि म्हणेल, “मला अमुक अमुक दे,” तर माझा विश्वास आहे की, ती ते ऐकते. अर्थात व्यक्तिने स्वतःसाठी अहितकारक असेल असे जर काही मागितले तर मात्र ती ते ऐकत नाही. व्यक्ती जर काहीतरी घातक किंवा प्रतिकूल अशा एखाद्या गोष्टीची मागणी करेल, तर मग मात्र ती ऐकली जाणार नाही.

प्रश्न : हा धावा आणि त्याच्या परिणामाचे कारण काय?

श्रीमाताजी : कदाचित व्यक्तीने धावा करावा हे विधिलिखित असावे. म्हणजे ‘कोंबडी आधी की अंडे आधी?’ अशा सारखाच हा प्रकार आहे. ईश्वरी कृपेचा धावा करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणारी ‘ईश्वरी कृपा’च असते, का, ईश्वरी कृपेचा धावा केल्यामुळे ‘ईश्वरी कृपा’ होते, हे सांगणे कठीण आहे.

मूलतः श्रद्धेचाच अभाव असण्याची बहुतांशी शक्यता असते. आपल्या विचारांमध्येच एक छोटासा कोपरा असा असतो, की जो शंका उपस्थित करतो, वादविवाद करतो, आणि त्यानेच सारे काही बिनसून जाते. व्यक्ती जेव्हा अतिशय चिंताजनक परिस्थितिमध्ये असते, जेव्हा मनाला जाणवते की, ते काहीही करू शकत नाहीये, अगदी काहीच करू शकत नाहीये, जेव्हा ते अगदी वेड्यासारखे, असमर्थ होऊन चूपचाप उभे राहते, तेव्हा, त्या क्षणी, व्यक्ती जर उच्चतर मदतीसाठी धावा करेल, म्हणजे एखादी व्यक्ती निराशाग्रस्त असताना जसा धावा करते अगदी तेवढ्याच उत्कटतेने व्यक्ती धावा करेल, तर तेव्हा परिणाम दिसून येतो. पण जर का तुमचा विचार युक्तिवादच करत राहिला आणि म्हणाला, “हो, मी आस बाळगली आहे खरी, मी प्रार्थनाही केली आहे पण वेळ आली आहे की नाही देवच जाणे, आणि ईश्वरी कृपा होईल का, आणि ते शक्य आहे की नाही कोण जाणे,” असे झाले तर मग सगळेच संपून जाते, ती (‘ईश्वरी कृपा’) कार्य करत नाही. ही एक अगदी नेहमीच आढळून येणारी गोष्ट आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 366-367)

प्रत्येकामध्ये असणाऱ्या क्षुद्र अहंकाराला, दुसऱ्यामधील (खरे किंवा खोटे) दोष शोधणे आणि ते दोष खरे आहेत की खोटे आहेत याची पर्वा न करता, त्याविषयी बोलत राहणे आवडते. वास्तविक, अहंकाराला त्यांच्याबाबतीत निर्णय देण्याचा अधिकारच नसतो कारण अहंकारापाशी योग्य दृष्टिकोन किंवा योग्य वृत्ती नसते. स्थिर, निःस्वार्थी, नि:पक्षपाती असणारा आणि सर्वांविषयी करुणा व प्रेम बाळगणारा ‘आत्मा’च प्रत्येक व्यक्तीमधील सामर्थ्य व दुर्बलता योग्य प्रकारे पाहू शकतो, जोखू शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 351-352)

प्रश्न : मानसिक, प्राणिक आणि शारीरिक भीतीमध्ये काय फरक असतो?

श्रीमाताजी : जर तुम्ही तुमच्या मनाची स्पंदने, प्राणाच्या गतिविधी आणि शरीराच्या हालचाली यांविषयी सजग असाल, तर तुम्हाला तो फरक माहीत असतो. मनाच्या बाबतीत सांगावयाचे, तर ते अगदीच सोपे आहे. उदाहरणार्थ – विचार येतात; तुम्ही विचार करायला लागता की, सध्या हा असा असा आजार आहे, तो फारच संसर्गजन्य आहे, कदाचित त्याचा संसर्ग मला होण्याची शक्यता आहे आणि तसे जर का झालेच, तर ते फारच भयंकर असेल, मग हा आजार होऊ नये म्हणून काय केले पाहिजे, उद्या काय होणार आहे कोण जाणे? इ. इ. …तेव्हा मन गडबडून जाते, भयभीत होते.

प्राणाच्या बाबतीत सांगावयाचे तर, तुम्हाला त्याची जाणीव होते. तुमच्या संवेदनांना त्याची जाणीव होते. तुम्हाला एकाएकी एकदम गरम वाटायला लागते, किंवा गार वाटायला लागते; तुम्हाला दरदरून घाम येतो किंवा अस्वस्थ वाटायला लागते. आणि मग तुम्हाला जाणवते की, हृदय खूप जोराने धडधडत आहे आणि अचानक तुम्हाला ताप भरतो, रक्ताभिसरण थांबल्यासारखे होते आणि तुम्ही गार पडता.

शारीरिक दृष्ट्या सांगावयाचे तर, जेव्हा तुमच्यामध्ये इतर दोन प्रकारच्या भीती नसतात, तेव्हा तुम्ही शारीरिक भीतीविषयी जागृत होऊ शकता. सर्वसाधारणतः इतर दोन अधिक जाणिवयुक्त असतात. मानसिक व प्राणिक भीती ह्या शारीरिक भीतीला तुमच्यापासून लपवून ठेवतात. मात्र जेव्हा तुमच्यामध्ये मानसिक किंवा प्राणिक भीती उरत नाही तेव्हा मग, तुम्हाला शारीरिक भीतीची जाणीव होऊ लागते. शरीरामधील भीती हे एक प्रकारचे चौकस, लहानसे असे स्पंदन असते, ते पेशींमध्ये शिरते आणि मग त्यांचा थरकाप उडू लागतो. पण हृदयाप्रमाणे त्या जोरजोराने धडधडत नाहीत. ती भीती त्या पेशींमध्येच असते आणि थोड्याशा कंपनाने सुद्धा त्यांचा थरकाप उडतो. आणि मग त्यावर नियंत्रण करणे अवघड असते. परंतु त्यावर नियंत्रण करता येणे शक्य असते.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 167)

आजारपणाची भावना ही सुरुवातीला फक्त एक सूचना या स्वरूपाची असते; तुमच्या शारीर जाणिवेने तिचा स्वीकार केल्यामुळे ती वास्तविकता बनते. मनात उठणाऱ्या चुकीच्या सूचनेसारखीच ही गोष्ट असते. जर मनाने तिचा स्वीकार केला तर, मनावर मळभ येते आणि ते गोंधळून जाते आणि प्रसन्नता व सुसंवाद परत लाभावा म्हणून त्याला झगडावे लागते. तीच गोष्ट शारीरिक जाणीव आणि आजारपणालाही लागू पडते.

तुम्ही आजारपणाची सूचना स्वीकारता कामा नये; एवढेच नव्हे तर, तिला तुमच्या शारीरिक मनामधून नकार दिला पाहिजे आणि ती सूचना धुडकावून देण्यास शारीरिक जाणिवेला मदत केली पाहिजे. आवश्यकता असेल तर, ”मी पूर्णपणे निरोगी राहीन, मी स्वस्थ, सुरक्षितच आहे आणि सुरक्षितच राहीन,” अशी प्रति-सूचना करा. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आजारपणाची सूचना आणि त्या सूचनेमुळे येणारे आजारपण, फेकून देण्यासाठी श्रीमाताजींच्या शक्तीचा धावा करा.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 555)

“आजारपणाची सूचना’ या शब्दांमधून मला केवळ विचार वा शब्दच अभिप्रेत नाहीत. जेव्हा संमोहनकार, “झोपा” असे म्हणतो, तेव्हा ती सूचना असते; परंतु जेव्हा तो काहीही बोलत नाही तर, तुम्ही झोपावे म्हणून तो त्याची मौन इच्छा संक्रमित करतो, तेव्हा तीदेखील एक प्रकारची सूचनाच असते किंवा तुमच्या चेहऱ्यावर हातांच्या तो ज्या काही हालचाली करतो, तीदेखील एक प्रकारची सूचनाच असते.

जेव्हा एखादी शक्ती तुमच्यावर आघात करते किंवा आजारपणाचे एखादे स्पंदन उमटते तेव्हा त्यातून शरीराला एक प्रकारची सूचना मिळते. एक प्रकारचे स्पंदन, जणू एक लाटच शरीरात घुसते आणि शरीराला तापाची आठवण होते किंवा मग त्याला तापाची जाणीव होऊ लागते अणि मग ते खोकायला लगते, शिंकायला लागते किंवा त्याला थंडी वाजू लागते तेव्हा ”मला बरे वाटत नाहीये, मला अशक्त वाटतंय, मला ताप येणार आहे,” अशा तऱ्हेच्या सूचना मनाला मिळतात.
*

डेंग्यू किंवा एन्फ्लुएंझा होणार अशी वातावरणात एक सर्वसाधारण सूचना असते. या सूचनांमुळे विरोधी शक्तींना तशा प्रकारची लक्षणे घडवून आणणे शक्य होते आणि त्यातून आजाराच्या तक्रारी पसरतात. व्यक्तीने जर अशा सूचना आणि ती लक्षणे या दोन्हींना धुडकावून लावले तर, या गोष्टी प्रत्यक्षात उतरणार नाहीत.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 556-557)