Tag Archive for: विभक्त

 

(व्यक्ती मूलत: सच्चिदानंद स्वरूप आहे, पण त्यापासून विभक्त झाल्यामुळे व्यक्तीला त्याचे विस्मरण होते आणि त्यामुळे मी अमुक अमुक कोणीतरी आहे, अशी व्यक्तीची समजूत होते. हा विचार आपण काल समजावून घेतला. आज त्याचा उत्तरार्ध…)

परंतु विभक्ततेच्या वळणावळणाच्या मार्गावरून जाऊन, म्हणजेच विभक्ततेचे, विविधतेचे लाभ घेऊन, जर आपण सच्चिदानंद स्वरूपाशी ऐक्य पुनर्स्थापित केले तर, आपल्याला अधिक उच्च प्रतीचे ऐक्य साध्य होईल.

…जेव्हा सच्चिदानंद हे एकले एकच (absolute) होते, तेव्हा त्या एकत्वाची जाणीव होणार तरी कोणाला? ते एकत्व काय आहे हे समजून घेण्यासाठी म्हणून का होईना, तसे एकत्व नसलेली अशी कोणतीतरी प्रतिमा आपल्यापाशी पाहिजे, कशाचे तरी रूप आपल्यासमोर पाहिजे. आणि मला वाटते विश्वाच्या अस्तित्वाचे हेच रहस्य आहे. कदाचित ईश्वर‌च स्वतःला जाणून घेऊ इच्छित होता, म्हणून त्याने स्वतःला स्वतःपासून विभक्त केले आणि त्याने स्वतःला न्याहाळले आणि आता, स्वतःच्या पूर्ण ज्ञानानिशी, तो स्वतःच्या अस्तित्वाची शक्यता स्वतःच उपभोगू इच्छित आहे. आणि ही गोष्ट अधिक स्वारस्यपूर्ण आहे.

– श्रीमाताजी (CWM 07 : 237)

 

(पूर्वार्ध)

व्यक्तीमध्ये म्हणजे व्यक्तीच्या अंतरंगामध्ये जर ईश्वरा‌चे अस्तित्व नसते तर, व्यक्तीला ईश्वरा‌ची जाणीव कधीच होऊ शकली नसती; ती एक अशक्यप्राय गोष्ट ठरली असती. पण याच गोष्टीकडे तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेत तर, ‘तुमच्या अंतरंगामध्ये ईश्वर‌ आहे तसेच तुमचे वास्तव्य ईश्वरा‌मध्ये आहे,’ याचे ज्या क्षणी तुम्हाला या किंवा त्या मार्गाने आकलन होते, तसे जाणवते, जेव्हा तुम्ही ते मान्य करता, तेव्हा साक्षात्काराच्या दिशेने दार किंचितसे उघडले गेलेले असते, किलकिले झालेले असते.

नंतर कधीतरी जर व्यक्तीमध्ये अभीप्सा निर्माण झाली, ईश्वरा‌ला जाणून घेण्याची आणि ईश्वर‌च होण्याची तीव्र निकड निर्माण झाली तर त्यामुळे, ते किंचितसे उघडलेले दार, व्यक्तीचा त्यातून आतमध्ये प्रवेश होण्याइतके उघडले जाते आणि एकदा आत प्रवेश झाला की मग, व्यक्तीला आपण कोण आहोत याची जाणीव होते.

अगदी नेमकी हीच गोष्ट श्रीअरविंद सांगत आहेत की, सत्‌‍, चित, आनंद यांच्यापासून विभक्त झाल्यामुळेच, व्यक्तीला स्वत:च्या मूळ रूपाचे विस्मरण झाले आहे. तिला ‘स्व’चे विस्मरण झाले आहे. व्यक्तीला वाटते की, मी अमुक कोणीतरी आहे, म्हणजे असे की, मी मुलगी आहे, मुलगा आहे, मी पुरुष आहे, स्त्री आहे, कुत्रा आहे, घोडा आहे किंवा मी म्हणजे एखादा दगड, समुद्र, सूर्य आहे इत्यादी. ‘मी स्वत: ईश्वर आहे,’ असा विचार करण्याचे सोडून, इतर सर्व गोष्टी म्हणजे मी आहे, असा व्यक्ती विचार करत असते. व्यक्तीने खरोखरच, आपण तो एकमेवाद्वितीय ईश्वर‌ आहोत याची जाणीव जर कायम ठेवली असती तर, मग अशा व्यक्तीच्या दृष्टीने विश्वाचे वेगळे असे अस्तित्वच शिल्लक राहिले नसते. विश्वाचे अस्तित्व असण्यासाठी विभक्तीकरणाची ही घटना अटळच आहे असे दिसते, अन्यथा ईश्वर‌ (मूळ रूपात) जसा होता तसाच (अव्यक्त) नेहमी राहिला असता. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 07 : 236-237)