Tag Archive for: वाचन

साधना, योग आणि रूपांतरण – २५१

मानसिक रूपांतरण

वाचन, विविध गोष्टींविषयी जाणून घेणे, संपूर्ण आणि अचूक माहिती मिळविणे, तर्कशुद्ध विचार करण्यासाठी स्वतःला प्रशिक्षण देणे, एखाद्या समस्येच्या सर्व बाजू अनाग्रही पद्धतीने विचारात घेणे, घाईघाईने काढलेल्या किंवा चुकीच्या अनुमानांना वा निष्कर्षांना नकार देणे, सर्व गोष्टींकडे स्पष्टपणे व समग्रपणे पाहायला शिकणे या सर्व गोष्टींचा समावेश ‘मानसिक प्रशिक्षणा’मध्ये होतो.
*
एखाद्या व्यक्तीने पुष्कळ वाचन केलेले असूनही, ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या मात्र अविकसित असू शकते. विचार केल्याने, जाणून घेतल्याने, बौद्धिकदृष्ट्या श्रेष्ठ असणाऱ्यांचे मानसिक प्रभाव ग्रहण केल्याने व्यक्तीचे मन विकसित होत जाते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 69, 70)

बडोद्यामध्ये आल्यानंतरही श्रीअरविंदांवर काही काळ पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव टिकून होता. मुंबई व कलकत्त्याहून मागविलेल्या पेटाऱ्यातील पुस्तके ते वाचत असत. श्रीअरविंदांना बंगाली शिकविणारे जे शिक्षक होते ते सांगतात, “अरविंद त्यांच्या टेबलाजवळ बसून तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात, डासांचे असह्य दंश रात्रभर सोसत, अगदी सकाळ होईपर्यंत वाचत बसत असत. ध्यानावस्थेत मग्न असलेल्या योग्याला जसे आजूबाजूच्या घटनांचे काही भान नसते त्याप्रमाणे, पुस्तकावर डोळे खिळलेल्या अशा स्थितीत तासन्तास बसून त्यांचे वाचन चालत असे. आगीने घर वेढले जरी गेले असते तरी त्यांची एकाग्रता भंग पावली नसती.”

इंग्रजी, रशियन, जर्मन, फ्रेंच भाषेतील कादंबऱ्या ते वाचत असत. त्याचबरोबर ते भारतातील धर्मग्रंथांचे, उपनिषद, भगवद्गीता, रामायण, महाभारत या ग्रंथांचे वाचन करीत असत.

श्रीअरविंदांच्या एका मित्राने ही हकिकत सांगितली आहे : “श्रीअरविंद कॉलेजमधून परतले आणि आल्या आल्या लगेच तेथे पडलेले एक पुस्तक उघडून त्यांनी वाचायला सुरुवात केली. तेव्हा तेथे आम्ही सर्व मित्र बुद्धिबळाचा डाव मांडून जोरजोराने हसतखिदळत बसलो होतो. सुमारे अर्ध्या तासाने श्रीअरविंदांनी पुस्तक वाचून संपविले. आम्ही त्यांना असे करताना बरेचदा बघितले होते. ते पुस्तक अथपासून इतिपर्यंत वाचून काढतात की, केवळ वरवर चाळतात हे आम्हाला बरेच दिवसांपासून जाणून घ्यायचे होते. आत्ता ती कसोटी घेण्याची वेळ आली. आमच्यातील एकाने पुस्तकातील एक ओळ वाचून दाखविली आणि नंतर त्यापुढची ओळ कोणती असे श्रीअरविंदांना विचारले. श्रीअरविंदांनी क्षणभर मन एकाग्र केले आणि नंतर ती ओळ ज्या पानावर होती त्या पानावरील संपूर्ण मजकूर, एकही चूक न करता जसाच्या तसा सांगितला. जर ते अशा प्रकारे अर्ध्या तासात शंभरेक पाने वाचू शकत असतील तर त्यांनी अल्पावधीतच त्या पेटाऱ्यातील सगळी पुस्तके वाचून संपवली ह्यात नवल ते काय?”

(Sri Aurobindo or The Adventure of Consciousness)