Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २७०

शरीराचे रूपांतरण

अविचलतापूर्वक चिकाटी बाळगा आणि कशामुळेही नाउमेद होऊ नका. आत्ता जरी (तुमच्यामध्ये) अविचलता आणि उल्हसितपणा या गोष्टी सातत्याने टिकून राहत नसल्या तरी तशा त्या टिकून राहणे अपेक्षित आहे. जेव्हा शारीर-चेतना (physical consciousness) आणि तिच्यामधील अडथळ्यांवर कार्य चालू असते तेव्हा सुरुवातीला नेहमीच हे असे होत असते. तुम्ही जर चिकाटीने प्रयत्न करत राहिलात तर अविचलता आणि उल्हसितपणा या गोष्टी तुमच्यामध्ये – जोपर्यंत शांती आणि आनंदाचा पाया तयार होत नाही तोपर्यंत – वारंवार येऊ लागतील आणि त्या अधिक काळासाठी टिकून राहू शकतील. आणि पृष्ठभागावर ज्या कोणत्या अडचणी, अडथळे येतील ते आता आतपर्यंत जाऊ शकणार नाहीत किंवा तुमचा (शांती आणि आनंदाचा) हा पाया डळमळीत करू शकणार नाहीत किंवा त्यास त्या एखाद्या क्षणाचा अपवाद वगळता, झाकोळूनदेखील टाकू शकणार नाहीत.

मनोवस्थेमध्ये (mood) सातत्याने बदल होत राहणे हीसुद्धा सार्वत्रिक आढळणारी गोष्ट आहे. कारण शारीर-चेतनेप्रमाणेच सध्या शारीर-प्राणावरसुद्धा (physical-vital) कार्य चालू आहे आणि ही अस्थिरता हा शारीर-प्राणाच्या प्रकृतीचा एक गुणधर्म आहे. परंतु त्यामुळे तुम्ही निराश होऊ नका. जेव्हा हा पाया अधिक भरभक्कम होईल तेवढ्या प्रमाणात ती अस्थिरता क्षीण होत जाईल आणि प्राण अधिक स्थायी व समतोल होत जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 370-371)

साधना, योग आणि रूपांतरण – २६९

शरीराचे रूपांतरण

(श्रीअरविंद एका साधकाला लिहीत आहेत…)

तुम्ही स्वतःला पूर्णपणे बाह्यवर्ती शारीर-चेतनेमध्ये (physical consciousness) ठेवले आहे. आणि फक्त बाह्यवर्ती गोष्टी तेवढ्याच खऱ्या असतात आणि आध्यात्मिक व आंतरिक सर्व गोष्टी खऱ्या नसतात असे म्हणत, आणि आपण अपात्र आहोत या सबबीखाली स्वतःला खुले करण्यास ती शारीर-चेतना नकार देत आहे. तुम्ही जर तिचे म्हणणे मनावर घेऊ लागलात तर ती नेहमीच असे करत असते. परंतु अपात्रतेची ही सबब खरी नाही आणि दुसरी सबब देखील खरी नाही. जेव्हा तुम्ही आंतरिक, आध्यात्मिक चेतनेला खुले होता तेव्हा बाह्यवर्ती किंवा शारीरिक चेतनेसाररखीच आंतरिक, आध्यात्मिक चेतना हीदेखील तुमच्यासाठी संपूर्णपणे वास्तव आणि खरी असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 370)

साधना, योग आणि रूपांतरण – २६८

(कालपर्यंत आपण मनाचे आणि प्राणाचे रूपांतरण समजावून घेतले. आजपासून आता शरीराच्या रूपांतरणाबद्दलचे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे विचार जाणून घेऊ या.)

शरीराचे रूपांतरण

तुम्हाला प्राणिक इच्छावासनांपासून मुक्त होण्यामध्ये खूप अडचण जाणवत आहे कारण आता साधना थेटपणे जडभौतिक, शारीरिक स्तरावर (physical plane) सुरू झाली आहे. येथे एखादी सवय जडली असेल किंवा एखादी गोष्ट सवयीची झाली असेल तर तिची ताकद खूप जास्त असते.

जेव्हा साधना मानसिक किंवा प्राणिक स्तरावर चालू असते तेव्हा प्राणिक इच्छावासनांवर नियंत्रण मिळविणे किंवा त्यामध्ये परिवर्तन घडविणे अधिक सोपे असते कारण शरीराच्या तुलनेत मन आणि प्राण हे अधिक घडणसुलभ (plastic) असतात.

परंतु दुसऱ्या बाजूने असेही म्हणता येते की, जडभौतिकाच्या, शरीराच्या स्तरावर जर एखादी गोष्ट निश्चितपणे प्राप्त झाली असेल तर ती सिद्धी केवळ मानसिक किंवा केवळ प्राणिक स्तरावरील सिद्धीपेक्षा अधिक टिकाऊ आणि संपूर्ण असते.

*

शरीर आणि अवचेतनेमध्ये (subconscient) जेव्हा कार्य चालू असते तेव्हा ते कार्य मनामध्ये आणि प्राणामध्ये चालू असलेल्या कार्यापेक्षा नेहमीच अधिक संथ असते. कारण जडभौतिक द्रव्याकडून होणारा प्रतिकार हा नेहमीच अधिक जड, आणि निर्बुद्ध आणि कमी समायोजनक्षम (adaptable) असतो. परंतु जणूकाही त्याची भरपाई म्हणून, या संथ प्रक्रियेद्वारे व्यक्तीमध्ये जे कार्य केले जाते ते सरतेशेवटी अधिक संपूर्ण, अधिक सघन आणि अधिक टिकाऊ असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 365, 365-366)

साधना, योग आणि रूपांतरण – २६७

प्राणाचे रूपांतरण

कृती ‘ईश्वरा’र्पण करणे आणि ते करताना त्यामध्ये जी प्राणिक अडचण उद्भवते त्याविषयी सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, ही अडचण टाळणे शक्य नसते. तुम्हाला त्यामधून जावेच लागेल आणि त्यावर विजय मिळवावा लागेल. कारण ज्या क्षणी तुम्ही प्रयत्न करू लागता त्याक्षणी, या परिवर्तनाला विरोध करण्यासाठी, प्राण त्याच्या सर्व अस्वस्थ अपूर्णतांसह उभा ठाकतो. असे असले तरी, त्या अडचणीची तीव्रता कमी करण्यासाठी किंवा ती अडचण कमी करण्यासाठी तीन उपाय तुम्ही करू शकता –

१) या प्राणिक-शारीरिक स्तरापासून तुम्ही स्वतःला अलिप्त करा. ‘तो स्तर म्हणजे तुम्ही नाही’ या भूमिकेतून तुम्ही त्याचे निरीक्षण करा, त्याला नकार द्या. त्याच्या मागण्यांना, त्याच्या भावावेगांना संमती देण्यास नकार द्या, परंतु जो नकार द्याल तो साक्षी ‘पुरुष’ या भूमिकेतून शांतपणे द्या की ज्याच्या नकाराचा अंतिमतः विजय होणेच आवश्यक आहे. तुम्ही जर आधीपासूनच निर्व्यक्तिक, निर्गुण ‘आत्म्या’मध्ये (impersonal Self) अधिकाधिक राहायला शिकला असाल तर, स्वत:ला अलिप्त करणे तुम्हाला कठीण जाण्याचे काहीच कारण नाही.

२) जेव्हा तुम्ही या निर्व्यक्तिकतेमध्ये नसाल, तेव्हाही तुमची मानसिक इच्छाशक्ती आणि तिची संमती किंवा नकार देण्याची शक्ती उपयोगात आणा. हे करताना कोणताही वेदनादायी संघर्ष नको तर अगदी त्याच पद्धतीने, शांतपणे, इच्छावासनांच्या मागण्यांना नकार द्या. जोपर्यंत अनुमती किंवा संमती न मिळाल्यामुळे या मागण्यांची पुन्हा पुन्हा डोकं वर काढण्याची शक्ती शमत नाही आणि ती शक्ती अधिकाधिक क्षीण होत नाही आणि बाहेर पडत नाही, तोपर्यंत मानसिक इच्छाशक्तीचा उपयोग करत राहा.

३) तुमच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या किंवा तुमच्या हृदयांतरी असणाऱ्या ‘ईश्वरा’विषयी तुम्ही जर सजग झालात तर तेथूनच, त्याच्या साहाय्यासाठी त्याला आवाहन करा, स्वयमेव त्या प्राणामध्येच परिवर्तन व्हावे म्हणून प्रकाशाला आणि शक्तीला आवाहन करा. आणि जोपर्यंत तो प्राण स्वतःहून या परिवर्तनासाठी प्रार्थना करायला शिकत नाही तोपर्यंत त्या प्राणाला आग्रहपूर्वक सांगत राहा.

शेवटी, ‘ईश्वरा’बद्दल असलेल्या तुमच्या अभीप्सेच्या प्रामाणिकतेद्वारे आणि तुमच्या समर्पणामुळे, तुमच्या हृदयामध्ये गुप्त असलेला ‘चैत्य पुरुष’ (psychic being) तुम्ही जागृत करू शकलात तर त्यामुळे तो अग्रभागी येईल आणि कायम तेथेच राहील. आणि, तो मन, प्राण आणि शारीरिक चेतनेच्या सर्व गतिविधींवर प्रभाव टाकेल आणि तत्क्षणी तुमच्या अडचणी अगदी कमी होऊन जातील. त्यानंतरसुद्धा रूपांतरणाचे कार्य करावेच लागणार आहे, परंतु त्या क्षणानंतर मात्र ते कार्य तितकेसे कठीण आणि कष्टदायक असणार नाही.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 113-114)

साधना, योग आणि रूपांतरण – २६६

प्राणाचे रूपांतरण

संपूर्ण प्राणिक प्रकृतीचे शुद्धीकरण व्हावे आणि सर्व अहंभावात्मक इच्छावासना व आवेग नाहीसे होऊन, ‘ईश्वरी संकल्पा’शी सुसंगत असतील तेवढ्याच शुद्ध, सात्त्विक वृत्तीप्रवृत्ती शिल्लक राहाव्यात यासाठी, संपूर्ण प्राणिक प्रकृती आणि तिच्या वृत्तीप्रवृत्ती ‘ईश्वरा’ला अर्पण करणे म्हणजे प्राणाचे स्वाहाकरण (vital consecration) होय.
*
साधक : ‘प्राणाचे स्वाहाकरण’ म्हणजे काय ?
श्रीअरविंद : समग्र प्राणिक प्रकृती ही कनिष्ठ प्रकृतीशी नव्हे तर, श्रीमाताजींशी संबंधित व्हावी यासाठी, समग्र प्राणिक प्रकृती श्रीमाताजींना समर्पित करणे आणि ती शुद्ध बनविणे, म्हणजे ‘प्राणाचे स्वाहाकरण’.
*
तुम्हाला ज्या मुक्तीची आस लागली आहे ती साधकासाठी खरोखरच अत्यंत आवश्यक असते. आणि याचा अर्थ, प्रकृतीच्या समग्र प्राणिक भागाच्या मुक्तीची आस असा आहे. मात्र ही गोष्ट एकाएकी किंवा इतक्या सहजतेने करता येणे शक्य नसते. तुमची तळमळ ही सातत्यपूर्ण, धीरयुक्त आणि चिकाटीची असली पाहिजे, (ती तशी असेल तरच) अंतिमतः तिचा विजय होईल. वरून उच्चतर स्थिरता आणि शांती आपल्या प्रणालीमध्ये (system) खाली अवतरावी म्हणून तिला आवाहन करणे ही मुख्य गोष्ट असते; ती अवतरित होत आहे अशी जाणीव जर तुम्हाला होत असेल तर तो मुक्तीचा आरंभ असतो.
*
खरी चेतना तुमच्या प्राणामध्ये अवतरित होत होती, परंतु तुमच्या शरीरामध्ये पुन्हा एकदा जुनीच अडचण उफाळून आली आहे, पुन्हा एकदा प्राणिक हल्ला झालेला आहे. जेव्हा तुमचा प्राण अशांत, विचलित न होता, किंवा आक्रंदन न करता, सदोदित या हल्ल्याला सामोरा जाऊ शकेल आणि तुमच्या अंतरंगात स्थिरशांत असणारी प्रतिकार व अस्वीकार करणारी शक्ती जेव्हा दूर लोटून तिचा प्रतिबंध करेल, तेव्हा ती संपूर्ण मुक्तीची खूण असेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 113, 313), (CWSA 31 : 111, 111 )

साधना, योग आणि रूपांतरण – २६५

प्राणाचे रूपांतरण

प्राणाला जबरदस्तीने काही करायला भाग पाडणे शक्य असले तरी तसे करणे सोपे नसते. सातत्याने अत्यंत मनःपूर्वकतेने प्राणाला पटवून सांगणे आणि त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे अधिक सोपे असते. परंतु असे करण्याच्या या मानसिक पद्धतीमध्ये, प्राण हा बरेचदा स्वतःच्या कोणत्यातरी फायद्यासाठी आध्यात्मिक आदर्शाला स्वतःहून जोडून घेतो, हे खरे आहे. प्राणाने स्वतःच स्वतःसमोर अनावृत (expose) व्हावे यासाठी, प्राणामध्ये प्रकाश सदोदित खाली उतरवत राहणे हा एक परिणामकारक मार्ग असतो. असे केल्यामुळे स्वतःमध्ये काय चुकीचे आहे हे पाहण्यासाठी तो प्रवृत्त होतो आणि सरतेशेवटी आपल्यामध्ये परिवर्तन घडावे यासाठी तो प्रामाणिकपणे इच्छा बाळगू लागतो.

प्राणिक प्रकृतीमध्ये हा प्रकाश एकतर अंतरंगामधून, चैत्य अस्तित्वाकडून आणता येतो नाहीतर तो वरून, मनाच्या माध्यमातून उतरविता येतो. मनाच्या ऊर्ध्वस्थित असणारा प्रकाश आणि शक्ती अवतरित व्हावी म्हणून त्यांस आवाहन करणे ही पूर्णयोगाच्या अनेकविध पद्धतींपैकी एक प्रमुख पद्धती आहे. परंतु कोणताही मार्ग अवलंबला तरीदेखील तो नेहमीच चिकाटीने आणि धीरयुक्त आध्यात्मिक परिश्रमाने अमलात आणावा लागतो.

प्राणामध्ये अकस्मात परिवर्तन घडविता येऊ शकते पण अशा अकस्मात झालेल्या परिवर्तनानंतरसुद्धा त्याच्या परिणामकारकतेसाठी, त्यावर काम करावे लागते, त्यावर परिश्रम घ्यावे लागतात, ते परिवर्तन प्राणाच्या प्रत्येक भागावर अंमलात आणावे लागते. जोपर्यंत त्याचा परिणाम परिपूर्ण होत नाही तोपर्यंत ते करावे लागते आणि त्यासाठी बरेचदा दीर्घ काळ लागतो. शारीरिक चेतनेबाबत सांगायचे तर, दीर्घकाळ प्रयत्न केल्यानंतरच तिच्यामध्ये परिवर्तन घडविणे शक्य असते. हां, एखाद्या विशिष्ट घटकामध्ये त्वरेने परिवर्तन करता येऊ शकते पण समग्र परिवर्तन घडविण्यासाठी दीर्घकाळ आणि चिकाटीने परिश्रम करावे लागतात.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 110-111)

साधना, योग आणि रूपांतरण – २६४

प्राणाचे रूपांतरण

तुमच्यामध्ये परिवर्तन व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रथमतः तुमच्या प्राणिक अस्तित्वामधील दोषांपासून निर्धारपूर्वक, चिकाटीने सुटका करून घेतली पाहिजे. भलेही मग ते करणे कितीही अवघड असो किंवा त्याला कितीही वेळ लागो, सदासर्वकाळ ‘ईश्वरा’च्या साहाय्यासाठी आवाहन करत राहा आणि स्वतःला पूर्णपणे प्रामाणिक होण्यासाठी नेहमी प्रवृत्त करा.

पात्र-अपात्रतेच्या बाबतीत (सांगायचे झाले तर) पूर्णयोगासाठी कोणतीच व्यक्ती पूर्णपणे सुपात्र असते असे म्हणता येणार नाही. अभीप्सा, अभ्यास, प्रामाणिकपणा आणि समर्पण यांद्वारे व्यक्तीने स्वतःला सुपात्र बनविणे अभिप्रेत असते. तुमच्यामधील आंतरात्मिक भागाला आजवर नेहमीच आध्यात्मिक जीवनाची आस होती; मात्र तुमच्या प्राणामुळे त्यामध्ये नेहमीच आडकाठी निर्माण होत आली आहे. तुमच्या प्राणामध्ये एक प्रामाणिक इच्छा प्रस्थापित करा; वैयक्तिक इच्छावासना, मागण्या, स्वार्थीपणा आणि मिथ्यत्व या गोष्टींची सरमिसळ तुमच्या साधनेमध्ये होऊ देऊ नका. असे केलेत तरच तुमच्यामधील प्राण हा साधनेसाठी सुपात्र होईल. तुम्ही यशस्वी होऊ इच्छित असाल तर ते प्रयत्न नेहमीच अधिकाधिक विशुद्ध, अधिक स्थिर आणि चिकाटीपूर्ण झाले पाहिजेत.

तुम्ही जर प्रामाणिकपणे साधना करत राहिलात तर, आवश्यक असलेले साहाय्य तुम्हाला लाभेल. तुमच्या कर्माबाबत तुम्ही योग्य दृष्टिकोन बाळगलात तर स्वयमेव त्यातूनच तुम्हाला साहाय्य मिळेल. ‘ईश्वरा’साठी ‘ईश्वरा’र्पण भावाने कर्म करणे, त्यामध्ये फळाची कोणतीही मागणी नसणे, त्यामध्ये कोणतेही स्वार्थी हक्क आणि इच्छावासना मिसळलेल्या नसणे, कोणताही दुराग्रह आणि उद्धटपणा नसणे, तुमच्या सहकाऱ्यांसोबत वादविवाद न करणे, तुम्ही करत असलेले कर्म हे तुमचे स्वतःचे नाही तर ते श्रीमाताजींचे कार्य आहे, हे लक्षात ठेवणे आणि कर्म करत असताना, त्याच्या पाठीशी त्यांची शक्ती कार्यरत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कर्माबाबत योग्य दृष्टिकोन बाळगणे होय. तुम्ही जर असे करू शकलात तर तुमच्या प्रकृतीमध्ये परिवर्तन होईल आणि तुमची प्रगती होईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 108-109)

साधना, योग आणि रूपांतरण – २६३

प्राणाचे रूपांतरण

बाह्यवर्ती प्राणाच्या शुद्धीकरणासाठी बाह्य शिस्तीची आवश्यकता असते, हे खरे आहे. अन्यथा तो अस्वस्थ आणि लहरी, कल्पनाविलासात रमणारा असा राहतो आणि तो त्याच्या स्वतःच्या भावावेगांचा गुलाम बनून राहतो. आणि त्यामुळे, अविचल आणि स्थायी अशी उच्चतर चेतना तेथे दृढपणे टिकून राहावी यासाठी तेथे कोणताही पाया बांधता येत नाही.

*

नियंत्रणामध्ये राहून किंवा योग्यायोग्यतेचे जे मापदंड आहेत त्यानुसार कृती करणे आणि जीवन जगणे म्हणजे, प्राणाला किंवा शरीराला त्यांना वाटेल तसे वागण्यास मुभा न देणे आणि सत्यविरहित किंवा व्यवस्थाविरहित स्वैरकल्पनांनुसार मनाला सैरावैरा भटकण्यास संमती न देणे, हा शिस्तीचा, अनुशासनाचा अर्थ आहे. ज्यांचे आज्ञापालन करणे आवश्यक आहे त्यांचे आज्ञापालन करणे याचाही समावेश शिस्तीमध्ये होतो.

*

योग्य रीतीने उपयोग केला तर प्राण चांगला असतो. तो कृती करण्यासाठी आवश्यक असणारे साधन असतो. परंतु सर्वसाधारणपणे तो त्याच्या कनिष्ठ कृतीमध्ये अहंकार आणि इच्छावासना यांचे साधन बनतो आणि म्हणूनच त्याच्यामध्ये लिप्त होता कामा नये, तर उलट त्याला कठोर शिस्तीमध्ये ठेवले पाहिजे.

*

तुमच्या प्राणिक वृत्तीप्रवृत्ती आणि त्याच्या रचना यांच्याबाबत सावधगिरी बाळगा, (कारण) जेव्हा तुम्ही त्यांना मुभा देता तेव्हा तुम्ही एका घातक अशा उताराला लागलेले असता.

*

प्राणिक सवयी या अचानकपणे आणि निर्णायकपणे थांबविणे हा या सवयींबाबत सर्वात सोपा आणि सर्वोत्तम मार्ग असतो, हे निश्चित!

– श्रीअरविंद (CWSA 31 : 107, 107), (CWSA 31 : 108, 108, 108)

साधना, योग आणि रूपांतरण – २६२

प्राणाचे रूपांतरण

तुमच्यामध्ये जर निष्काळजीपणा असेल तर येथून पुढे तुम्ही तुमच्या सर्व कृतींमध्ये सचेत (conscious) होण्यास शिकलेच पाहिजे. तसे केलेत तर मग प्राणिक वृत्तीप्रवृत्ती तुम्हाला फसवू शकणार नाहीत किंवा कोणते फसवे रूप घेऊन तुमच्या समोर येऊ शकणार नाहीत. या प्राणिक वृत्तीप्रवृत्तींचे निरीक्षण करण्यासाठी आणि त्या जशा आहेत तशा त्या तुम्हाला पाहता याव्यात यासाठी, तुम्ही अगदी पूर्णपणे प्रामाणिक असले पाहिजे.

तुम्ही एकदा जर चैत्य पुरुष (psychic being) खुला करू शकलात आणि तो तसाच खुला ठेवू शकलात तर, तुमच्या अंतरंगामधूनच तुम्हाला प्रत्येक पावलागणिक वास्तविक सत्य काय आहे हे दाखविणारा बोध सातत्याने मिळत राहील आणि कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून तो तुमचे रक्षण करत राहील. तुम्ही जर सतत आस बाळगलीत आणि शांती वृद्धिंगत होण्यास आणि ‘दिव्य शक्ती’ला तुमच्यामध्ये कार्य करू देण्यास वाव दिलात तर अशी उन्मुखता, असे खुलेपण येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 105)

साधना, योग आणि रूपांतरण – २६१

प्राणाचे रूपांतरण

प्राणाचे शुद्धीकरण ही सहसा यशस्वी साधनेसाठी आवश्यक असणारी अट आहे असे मानले जाते. प्राणाचे शुद्धीकरण झालेले नसतानाही व्यक्तीला काही अनुभव येऊ शकतात पण चिरस्थायी साक्षात्कारासाठी, प्राणिक गतिविधींपासून पूर्णपणे अलिप्तता असणे हे तरी किमान आवश्यक असते.

*

‘क्ष’ ने जे जाळे पसरले होते त्या जाळ्यात तुम्ही अडकलात ही गोष्ट खरोखरच आश्चर्यकारक वाटावी अशी आहे. ती मिथ्या, नाटकी आणि स्वप्नाळू प्राणाची वृत्ती असते, ती तर्कबुद्धीला झाकोळून टाकते आणि साध्यासरळ सत्यावरही पडदा पडल्यासारखे होते व सामान्य व्यवहारबुद्धीही (common sense) चालेनाशी होते.

तुम्हाला तुमच्या प्राणाचे शुद्धीकरण करायचे असेल तर, मिथ्यत्वाबरोबर प्राण जी तडजोड करत आहे (मग भलेही तो त्याच्या समर्थनासाठी कोणतीही कारणे का देईनात) ती त्यामधून काढून टाकली पाहिजे. आणि साधे सरळ प्रामाणिक आंतरात्मिक सत्य कोरून ठेवण्याची सवय त्या प्राणाला लावली पाहिजे म्हणजे मग त्याच्यामध्ये प्रवेश करण्यास कोणालाच वाव मिळणार नाही. तुमच्या प्राणामधील जो भाग अशा प्रकारच्या तडजोडी करत आहे त्या भागावर हा धडा पक्का कोरून ठेवता आला तर, (तुमच्या हातून घडलेल्या) या चुकीच्या गोष्टीमधूनही निश्चितपणे काहीतरी चांगले निष्पन्न होईल. “येथून पुढे मिथ्यत्वाला आतमध्ये प्रवेश नाही,” ही श्रीमाताजींची सूचना तुमच्या प्राणिक अस्तित्वाच्या दरवाजावर चिकटवून ठेवा. आणि ती सूचना काटेकोरपणे अंमलात आणली जात आहे ना, हे पाहण्यासाठी दरवाजावर एक पहारेकरी नेमा.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 107), (CWSA 31 : 104-105)