Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ३०८

रूपांतरण

(व्यक्ती स्वतःला हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बंदिस्त करून घेऊ शकत नाही. हे शारीरिकदृष्ट्या व प्राणिकदृष्ट्या कसे व का अवघड असते ते कालच्या भागात आपण पाहिले.)

मानसिकदृष्ट्या तर ही गोष्ट अधिकच वाईट असते. मानवी मन हे सर्व बाजूंनी उघड्या असणाऱ्या एखाद्या सार्वजनिक ठिकाणासारखे असते. तेथे सर्व बाजूंनी गोष्टी आत येत असतात, जात असतात, एकमेकींवर आदळत असतात आणि त्यातील काही गोष्टी तेथेच स्थिरस्थावर होतात आणि त्या काही नेहमीचांगल्या असतातच असे नाही. आणि अशा या अनेकविध गोष्टींवर नियंत्रण प्रस्थापित करणे हे सर्वात कठीण असते.

तुमच्या मनामध्ये प्रवेश करणाऱ्या विचारांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मी काय म्हणत आहे ते तुमच्या लक्षात येईल. किती काळजीपूर्वक राहावे लागते हे तेव्हा तुमच्या लक्षात येईल. एखाद्या पहारेकऱ्याप्रमाणे, डोळे टक्क उघडे ठेवून, तुम्हाला सतर्क राहावे लागते आणि तुमच्या अभीप्सेशी सुसंगत असणाऱ्या संकल्पना कोणत्या आणि विसंगत असणाऱ्या संकल्पना कोणत्या याविषयी तुम्हाला पूर्णपणे सुस्पष्टपणे जाण असावी लागते. कोणत्याही ऐऱ्यागैऱ्या व्यक्तींचा त्या सार्वजनिक ठिकाणी प्रवेश होऊ नये यासाठी, तुम्हाला एखाद्या पोलिसाप्रमाणे प्रत्येक क्षणी लक्ष ठेवून राहावे लागते.

आणि हे विसरू नका की, तुम्ही अगदी कितीही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल तरीही या सर्व अडचणींचा शेवट एका दिवसात, एका महिन्यात किंवा एका वर्षात होणार नाहीये. व्यक्ती जेव्हा हे प्रयत्न करायला सुरुवात करते तेव्हा तिच्यामध्ये अविचल अशी सहनशीलता, चिकाटी (patience) असणे आवश्यक असते. व्यक्तीने असे म्हटले पाहिजे की, “हे करण्यासाठी मला पन्नास वर्षे लागली, शंभर वर्ष लागली किंवा कितीही वर्षे लागली तरी चालेल, पण मला जे साध्य करायचे आहे ते मी साध्य करेनच.”

एकदा का तुम्ही असा निर्धार केलात आणि तुम्ही निर्धारित केलेले उद्दिष्ट हे सतत व अथक परिश्रम घेण्यायोग्य आहे याची तुम्हाला जाणीव झाली असेल तर मग तुम्ही (रूपांतरणाच्या या प्रक्रियेस) आरंभ करू शकता.

अन्यथा, कालांतराने तुम्ही निराश होऊन जाल, तुमचा उत्साहभंग होईल. मग तुम्ही स्वतःच्या मनाशी म्हणाल, “बापरे! हे खूपच अवघड आहे. मी (अमुक एक गोष्ट करण्याचा) प्रयत्न करतो आणि ती पुन्हा ‘होत्याची नव्हती’ होते, मग मी पुन्हा प्रयत्न करतो, परत तसेच होते. मी पुन्हा एकवार (मनाचा हिय्या करून) प्रयत्न करतो आणि परत तसेच होत्याचे नव्हते होते. काय करावे? मी माझ्या उद्दिष्टापर्यंत कधी जाऊन पोहोचणार?” (आणि म्हणूनच) व्यक्तीकडे प्रचंड सहनशीलता, चिकाटी असली पाहिजे. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०७

रूपांतरण

(रूपांतरणाची प्रक्रिया ही दीर्घकालीन प्रक्रिया असते. त्यामध्ये धीर, चिकाटी यांची कशी आवश्यकता असते ते श्रीमाताजी येथे समजावून सांगत आहेत. या प्रक्रियेस आरंभ करण्यापूर्वी व्यक्तीला त्यासंबंधी पुरेशी स्पष्ट कल्पना असणे आवश्यक आहे, असे त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ दिसतो. हा संपूर्ण भाग मुळातूनच विचारात घ्यावा असा आहे. तो क्रमश: पाच भागांमधून देत आहोत.)

अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही हे खरेतर आपले दुर्दैव आहे असे म्हटले पाहिजे. कारण त्या अन्नाबरोबर, आपण दररोज आणि सातत्याने मोठ्या प्रमाणात अचेतनता, तामसिकता, जडत्व आणि मूढता यांचेही ग्रहण करत असतो. आपण सातत्याने, पूर्णपणे, अखंड सजग राहिले पाहिजे आणि जेव्हा एखादा अन्नघटक आपल्या शरीरामध्ये ग्रहण केला जातो तेव्हा आपण लगेच त्यावर क्रिया करून, त्याच्यामधील प्रकाश तेवढा बाजूला काढला पाहिजे आणि आपल्या चेतनेला अंधकारमय करणाऱ्या त्यामधील साऱ्या गोष्टींचा आपण अस्वीकार केला पाहिजे.

अन्नग्रहण करण्यापूर्वी ईश्वराला नैवेद्य दाखविण्याची, अर्पण करण्याची जी धार्मिक प्रथा आहे त्याचे मूळ येथे आहे आणि हेच त्याचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण आहे. अन्न ग्रहण करताना, ते अन्न आपल्या क्षुद्र अशा मानवी अहंकाराद्वारे ग्रहण केले जाऊ नये तर ते आपल्या अंतरंगातील ईश्वरी चेतनेला अर्पण केले जावे अशी आस व्यक्ती बाळगत असते. सर्व योगमार्गांमध्ये, सर्व धर्मांमध्ये याला महत्त्व दिले जाते. दररोज, सातत्याने, आपल्याही नकळत आपण अचेतनता शोषून घेत असतो, आणि त्याचे प्रमाण वाढवत नेत असतो, ते प्रमाण शक्य तितके कमी केले जावे यासाठी, त्या अन्नाच्या पाठीमागे असणाऱ्या चेतनेशी आपला संपर्क व्हावा, हे त्या प्रथेचे मूळ आहे.

प्राणाच्या बाबतीतही तसेच आहे. प्राणिक दृष्टया तुम्ही प्राणिक जगतामध्ये राहात असता. त्या जगतामधील प्राणिक शक्तीचे प्रवाह तुमच्या चेतनेमध्ये प्रवेश करत असतात, बाहेर जात असतात, ते एकमेकांशी मिळूनमिसळून राहात असतात तर, कधी परस्परांना विरोधही करत असतात. ते प्राणिक प्रवाह भांडत असतात, एकमेकांमध्ये मिसळत असतात. आणि जरी तुम्ही तुमची प्राणिक चेतना शुद्ध करण्याचा वैयक्तिक प्रयत्न केलात आणि त्या चेतनेमधील वासनात्म्यावर व क्षुद्र मानवी अहंकारावर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न केलात तरीही, तुम्ही ज्यांच्यासमवेत राहत असता त्यांच्याकडून आलेली सर्व विरोधी स्पंदने सुद्धा तुमच्याकडून अपरिहार्यपणे (तुमच्या नकळत) शोषून घेतली जातात. (कारण) व्यक्ती स्वतःला हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बंदिस्त करून घेऊ शकत नाही.

शारीरिक दृष्टया असे करण्यापेक्षा प्राणिकदृष्ट्या तसे करणे अधिक अवघड असते आणि (त्यामुळेच) व्यक्ती स्वतःमध्ये सर्व प्रकारच्या गोष्टींचे ग्रहण करत असते. म्हणजे व्यक्ती जर सातत्याने पूर्णपणे जागरूक नसेल, सदैव सावध नसेल आणि आतमध्ये जे जे प्रवेश करत आहे त्यावर तिचे जर पुरेसे नियंत्रण नसेल, म्हणजे ती स्वतःच्या चेतनेमध्ये नको असलेल्या घटकांचा शिरकाव होऊ देत असेल तर, अशा व्यक्तीला तिच्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तींकडून येणाऱ्या सर्व तऱ्हेच्या नकोशा स्पंदनाचा, सर्व लहानसहान अंधकारमय प्रतिक्रियांचा, सर्व कनिष्ठ गतिप्रवृत्तींचा, सर्व इच्छावासनांचा सतत संसर्ग होतो. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

अवचेतनामधील (subconscient) जडत्व दूर करण्यासाठी शरीराचे साहाय्य होऊ शकते याचे कारण असे की, अवचेतन हे शरीराच्या लगेच खाली असते. त्यामुळे प्रकाशित, प्रबुद्ध शरीर हे अवचेतनावर थेटपणे आणि संपूर्णपणे कार्य करू शकते आणि मन व प्राणदेखील करू शकणार नाहीत अशा रीतीने ते कार्य करू शकते. तसेच या थेट कार्यामुळे मन व प्राण मुक्त होण्यासदेखील साहाय्य होऊ शकते.
*
जेव्हा मन, प्राण व शरीर हे संपूर्णपणे दिव्य होतील आणि त्यांचे अतिमानसिकीकरण (supramentalised) घडून येईल तेव्हा ते ‘परिपूर्ण रूपांतरण’ असेल आणि त्या दिशेने घेऊन जाणारी प्रक्रिया हीच रूपांतरणाची खरी प्रक्रिया होय.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 598) (CWSA 28 : 297)

*

केवळ मन आणि प्राणानेच नव्हे तर, शरीराने सुद्धा त्याच्या सर्व पेशींसहित दिव्य रूपांतरणाची आस बाळगली पाहिजे.
– श्रीमाताजी (CWM 15 : 89)

साधना, योग आणि रूपांतरण – २८७

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

आंतरिक अस्तित्व हे अवचेतनावर (subconscient) अवलंबून नसते. परंतु बाह्यवर्ती अस्तित्व मात्र जन्मानुजन्मं अवचेतनावर अवलंबून राहत आले आहे. आणि त्यामुळे बाह्यवर्ती अस्तित्व आणि शारीर-चेतनेची अवचेतनाला प्रतिसाद देण्याची सवय, या गोष्टी साधनेच्या प्रगतीमध्ये एक भयंकर मोठा अडथळा ठरू शकतात आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत तो तसा अडथळा ठरतो देखील.

अवचेतन हे जुन्या गतिप्रवृत्तींची पुनरावृत्ती साठवून ठेवत असते. ते चेतनेला नेहमी खाली खेचत असते. ते (चेतनेच्या) आरोहण-सातत्याला विरोध करत असते. ते जुन्या प्रकृतीस किंवा मग तामसिकतेस (अ-प्रकाश आणि अ-क्रियता) अवरोहणाच्या (descent) आड आणत असते.

तुम्ही जर समग्रतया आणि गतिशीलपणे, सक्रियपणे आंतरिक अस्तित्वामध्येच जीवन जगत असाल आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे केवळ एक वरवरची गोष्ट आहे असे तुम्हाला जाणवत असेल, तर तुम्ही (अवचेतनाच्या) या अडथळ्यापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकता किंवा बाह्यवर्ती चेतनेचे रूपांतरण पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हा अडथळा निदान कमी तरी करू शकता.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 597)

साधना, योग आणि रूपांतरण – २८३

शरीराचे रूपांतरण

आपण जेव्हा (शरीराच्या) रूपांतरणाबद्दल (transformation) बोलत असतो तेव्हा अजूनही त्याचा काहीसा धूसर अर्थच आपल्या मनामध्ये असतो. आपल्याला असे वाटत असते की, आता काहीतरी घडणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून सारे काही सुरळीत, चांगले होणार आहे. म्हणजे आपल्याला काही अडचणी भेडसावत असतील तर त्या अडचणी नाहीशा होऊन जातील, जे आजारी असतील ते बरे होतील, शरीर अशक्त आणि अक्षम असेल तर शरीराच्या त्या साऱ्या दुर्बलता आणि अक्षमता नाहीशा होऊन जातील, अशा काहीतरी गोष्टी आपल्या कल्पनेमध्ये असतात. पण मी म्हटले त्याप्रमाणे, हे सारे अगदी धूसर असे आहे, केवळ एक कल्पना आहे.

शारीर-चेतनेच्या (body consciousness) बाबतीत एक उल्लेखनीय बाब अशी असते की, जोपर्यंत तिच्याबाबत एखादी गोष्ट अगदी पूर्ण होण्याच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचत नाही तोपर्यंत तिला (शारीर-चेतनेला) ती गोष्ट अगदी नेमकेपणाने आणि पूर्ण तपशिलवारपणे कळू शकत नाही.

म्हणून, जेव्हा रूपांतरणाची प्रक्रिया अगदी सुस्पष्ट होईल, म्हणजे ती प्रक्रिया कोणत्या टप्प्यांमधून जाणार आहे, त्या संपूर्ण रूपांतरणाच्या दरम्यान कोणकोणते बदल घडून येणार आहेत, म्हणजे त्यांचा क्रम कसा असेल, त्यांचा मार्ग कोणता असेल, त्यातील कोणत्या गोष्टी आधी होतील, त्यानंतर कोणत्या गोष्टी घडतील, इत्यादी सारा तपशील जेव्हा अगदी पूर्णपणे ज्ञात होईल, तेव्हा ते प्रत्यक्षात येण्याची घटिका आता जवळ आली आहे, याची ती निश्चित खूण असेल. कारण ज्या ज्या वेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीचा इतक्या अचूकपणाने तपशिलवार बोध होतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की, आता तुम्ही ती गोष्ट साध्य करण्यासाठी सक्षम झाला आहात. त्या क्षणी तुम्हाला (त्या गोष्टीबाबत) समग्रतेची दृष्टी प्राप्त होऊ शकते.

उदाहरणार्थ, आता हे पूर्ण निश्चितपणे सांगता येऊ शकते की, अतिमानसिक प्रकाशाच्या (supramental light) प्रभावाखाली सर्वप्रथम शारीर-चेतनेचे रूपांतरण होईल; त्याच्या पाठोपाठ, शरीराच्या विविध अवयवांच्या कार्यावर, त्यांच्या सर्व गतिविधींवर नियंत्रण आणि प्रभुत्व निर्माण होईल; त्यांनतर, हे प्रभुत्व क्रमाक्रमाने गतिविधींमध्ये एक प्रकारचे मूलगामी परिवर्तन घडवून आणेल आणि त्यानंतर मग स्वयमेव अवयवांच्या घडणीमध्येच परिवर्तन घडून येईल. जरी या साऱ्याचा बोध अजूनही पुरेसा नेमकेपणाने झालेला नसला तरीही, हे सारे आता निश्चितपणे घडून येणार आहे.

परंतु अंतिमतः हे सारे कसे घडून येईल? तर, जेव्हा विविध अवयवांची जागा विविध शक्तींच्या, विविध गुणधर्मांच्या आणि प्रकृतीच्या एकीकृत केंद्रांद्वारे घेतली जाईल, तेव्हा त्यातील प्रत्येक केंद्र त्याच्या स्वतःच्या विशिष्ट पद्धतीने कार्य करेल. अजूनही या साऱ्या गोष्टी संकल्पनात्मक पातळीवरच आहेत आणि (त्यामुळे) शरीराला या साऱ्याचे चांगल्या रीतीने आकलन होऊ शकत नाही कारण या साऱ्या गोष्टी प्रत्यक्षात यायला अजून पुष्कळ अवकाश आहे. आणि (मी सुरुवातीला म्हटले त्याप्रमाणे) शरीर जेव्हा स्वतः एखादी गोष्ट करू शकते तेव्हाच म्हणजे, त्या टप्प्यावर आल्यावरच शरीराला खऱ्या अर्थाने त्या गोष्टीचे आकलन होऊ शकते.

– श्रीमाताजी (CWM 15 : 280-281)

साधना, योग आणि रूपांतरण – २८२

शरीराचे रूपांतरण

दु:ख येते तेव्हा ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते आणि जितक्या लवकर आपण हा धडा घेऊ तितक्या प्रमाणात दु:खाची गरज कमी होते आणि जेव्हा आपल्याला त्याचे रहस्य कळते, तेव्हा दु:खाची शक्यताच मावळून जाते. कारण ते रहस्य आपल्याला कारणाचा उलगडा करून देते; दु:खाचे मूळ, त्याचे ध्येय आणि त्याच्या पलीकडे जाण्याचा मार्ग प्रकट करते.

व्यक्तीने अहंभावाच्या वर उठून, त्याच्या तुरुंगातून बाहेर पडावे, ‘ईश्वरा’शी स्वत:चे ऐक्य साधावे, त्याच्यामध्ये विलीन व्हावे, आपण ‘ईश्वरा’पासून दुरावले जाऊ अशी संधी व्यक्तीने कोणत्याही गोष्टीला देऊ नये; (हे व्यक्तीला उमगावे म्हणून दु:खभोग असतात,) हे ते रहस्य आहे. आणि एकदा का व्यक्तीला हे रहस्य गवसले आणि तिने स्वत:मध्ये त्याची अनुभूती घेतली की, दु:खाचे प्रयोजनच संपून जाते आणि दु:खभोग नाहीसे होतात. हा एक सर्वात शक्तिमान उपाय असून अस्तित्वाच्या केवळ सखोल भागांमध्ये, आत्म्यामध्ये, किंवा आध्यात्मिक चेतनेमध्येच तो शक्तिमान ठरतो असे नव्हे, तर तो उपाय जीवन आणि शरीर यांच्या बाबतीतही उपयोगी असतो. या रहस्याचा जो शोध लागलेला असतो त्यास किंवा ते रहस्य प्रत्यक्षात उतरविण्याच्या कृतीस विरोध करू शकेल असा कोणताच आजार किंवा कोणताच विकार नसतो. म्हणजे असा आजार केवळ व्यक्तीच्या उच्चतर भागांमध्येच नव्हे तर, शरीराच्या पेशींमध्येदेखील असू शकत नाही.

पेशींना त्यांच्या आतमध्ये दडलेल्या वैभवाविषयी शिकविण्याची युक्ती जर व्यक्तीला कळली; तसेच त्या पेशी ज्यामुळे अस्तित्वात आहेत, ज्यामुळे त्यांना जीवन प्राप्त झाले आहे त्या वास्तविकतेची जाण एखादी व्यक्ती जर त्यांना करून देऊ शकली, तर त्या पेशीसुद्धा संपूर्ण सुसंवादी होतात आणि ज्याप्रमाणे व्यक्तीचे इतर सारे विकार नाहीसे होतात अगदी त्याचप्रमाणे शारीरिक विकारही नाहीसे होतात.

परंतु असे व्हायला हवे असेल तर व्यक्तीने भित्रे किंवा भीतीग्रस्त असता कामा नये. जेव्हा एखादी शारीरिक व्याधी येते तेव्हा व्यक्तीने घाबरून जाता कामा नये किंवा तिच्यापासून पळ काढता कामा नये, तर व्यक्तीने त्या व्याधीला धीराने, शांतस्थिरतेने, विश्वासाने आणि खात्रीने सामोरे गेले पाहिजे. त्या व्यक्तीला ही खात्री असली पाहिजे की, आजारपण हे मिथ्यत्व आहे, आणि व्यक्ती जर पूर्णपणे, अगदी पूर्ण विश्वासाने, संपूर्ण अविचलतेने ‘ईश्वरी कृपे’कडे वळली तर ती कृपा, जशी व्यक्तीच्या अंतरंगामध्ये खोलवर प्रस्थापित झालेली असते तशीच ती या पेशींमध्ये स्थिर होईल आणि शाश्वत ‘सत्य’ व ‘आनंदा’मध्ये या पेशीसुद्धा सहभागी होतील.

– श्रीमाताजी (CWM 09 : 42-43)

साधना, योग आणि रूपांतरण – २८१

शरीराचे रूपांतरण

तुमच्या साधनेसाठी पहिली आवश्यक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे तुमच्या शारीरिक अस्तित्वामध्ये (physical being) तुम्ही संपूर्ण खुलेपणा प्रस्थापित केला पाहिजे. आणि त्यामध्ये शांत-स्थिरता, सामर्थ्य, विशुद्धता आणि हर्ष यांचे अवतरण स्थिर केले पाहिजे. तसेच त्याबरोबरच तुमच्यामधील श्रीमाताजींच्या ‘शक्ती’च्या उपस्थितीची आणि कार्याची जाणीवसुद्धा स्थिर केली पाहिजे. या खात्रीशीर आधारावरच व्यक्ती ‘ईश्वरी’ कार्यासाठीचे संपूर्णतया प्रभावी असे साधन (instrument) बनू शकते.

व्यक्ती असे साधन झाली तरीदेखील अजून या साधनभूत व्यक्तीचे गतिमान रूपांतरण (dynamic transformation) साध्य करून घेणे शिल्लक असते. आणि ते रूपांतरण मन, प्राण आणि शरीरामध्ये होणाऱ्या उच्चतर आणि अधिक उच्चतर अशा चेतनाशक्तीच्या अवतरणावर अवलंबून असते. अतिमानसिक ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ यांच्या जे अधिकाधिक समीप आहे, त्याचा अर्थबोध येथे ‘उच्चतर’ अस्तित्व या शब्दाने होतो.

मी ज्याचा उल्लेख केला त्याच्या आधारावरच या उच्चतर शक्तीचे अवतरण करणे शक्य असते. त्यासाठी चैत्य पुरुष (psychic being) सातत्याने अग्रभागी राहणे तसेच साधनभूत झालेल्या मन, प्राण व शरीर आणि अस्तित्वाच्या या उच्चतर स्तरांच्या दरम्यान त्याने मध्यस्थ म्हणून कार्य करणे आवश्यक असते. म्हणून प्रथम हे पायाभूत स्थिरीकरण (stabilisation) पूर्ण झाले पाहिजे.

*

शारीर-चेतनेमध्ये उच्चतर स्तरावरील समग्र ऊर्जा किंवा अनुभूती खाली उतरविणे शक्य नसते. रूपांतरणकार्यासाठी साहाय्य करण्यासाठी म्हणून त्यांचा फक्त प्रभाव खाली येतो. एकदा का हे रूपांतरण घडून आले की मग, शरीर अधिक सक्षम होईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 362, 362-363)

साधना, योग आणि रूपांतरण – २८०

शरीराचे रूपांतरण

(शरीराच्या एखाद्या भागाचे) रूपांतरण घडविताना, अडचणींना सामोरे जाणे आणि व्यक्तित्वाच्या प्रत्येक भागामध्ये जे काही उद्भवते त्याच्यावर मात करणे किंवा त्यामध्ये परिवर्तन करणे अध्याहृत असते; जेणेकरून तो भाग, उच्चतर गोष्टींना प्रतिसाद देऊ शकेल. परंतु समग्र व्यक्तित्वामध्ये संपूर्ण परिवर्तन हे ‘ऊर्ध्वस्थित’ असणाऱ्या ‘ईश्वरा’प्रत केलेल्या आरोहणाद्वारे आणि ‘ईश्वरा’च्या अवतरणाद्वारे शक्य होते. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘आत्म्या’चा साक्षात्कार आणि अगदी शारीर-स्तरापर्यंत येत, उच्चतर शांतीचे झालेले संपूर्ण अवतरण ही त्याची पहिली पायरी असते.

*

हो, नक्कीच. आणि म्हणूनच मी, ज्या जडभौतिक भागाने स्वतःला इतके अग्रस्थान देऊ केले आहे, त्या भागामध्ये साक्षात्कार व्हावा यावर एवढा भर देत आहे. व्यक्तीमधील एखादा भाग जेव्हा अशा रीतीने स्वतःचे सारे दोष व मर्यादा दाखवून देत लक्ष वेधून घेतो, तेव्हा त्या गोष्टींवर मात केली जावी या हेतुने तो पृष्ठस्तरावर येत असतो. येथे (तुमच्या उदाहरणामध्ये) जडत्व किंवा अक्षमता (अप्रवृत्ती), अंधकार किंवा विस्मरण (अप्रकाश) या साऱ्या गोष्टी, त्या नीट व्हाव्यात या हेतुने आणि त्यांचे प्रथमतः किंवा प्राथमिक रूपांतरण व्हावे यासाठी पृष्ठस्तरावर आल्या आहेत.

मनामध्ये शांती आणि प्रकाश, हृदयामध्ये प्रेम आणि सहानुभूती, प्राणामध्ये शांतस्थिरता आणि ऊर्जा, शरीरामध्ये स्थायी ग्रहणशीलता व प्रतिसाद (प्रकाश, प्रवृत्ती) या गोष्टी निर्माण होणे म्हणजे आवश्यक असणारे परिवर्तन होय.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 362, 366)

साधना, योग आणि रूपांतरण – २७९

शरीराचे रूपांतरण

(श्रीअरविंद एका साधकाला लिहीत आहेत…)

साधनेच्या वाटचालीदरम्यान आता तुमची चेतना ही कनिष्ठ शारीर-प्रकृतीच्या (lower physical nature) संपर्कामध्ये आली आहे. आणि मनाद्वारे, किंवा अंतरात्म्याद्वारे किंवा आध्यात्मिक शक्तीद्वारे नियंत्रित केलेली नसताना ती जशी असते तशीच ती तुम्ही पाहत आहात. ही प्रकृती मुळातच कनिष्ठ आणि अंधकारमय इच्छावासनांनी भरलेली असते. मानवाचा तो सर्वाधिक पशुवत भाग असतो. तेथे काय दडलेले आहे हे कळावे यासाठी आणि त्याचे रूपांतरण करण्यासाठी व्यक्तीला या भागाच्या संपर्कात यावेच लागते.

पारंपरिक प्रकारातील बरेचसे साधक आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक प्रांतामध्ये उन्नत होण्यामध्ये धन्यता मानतात आणि या कनिष्ठ शारीर-प्रकृतीला आहे तशीच सोडून देतात. परंतु त्यामुळे ती होती तशीच, म्हणजे तिच्यामध्ये काही परिवर्तन न होता तशीच शिल्लक राहते. भलेही ती बहुतांशी शांत झाली असली तरीसुद्धा तिच्यामध्ये संपूर्ण रूपांतरण शक्य होत नाही.

उच्चतर ‘शक्ती’ने या अंधकारमय शारीर-प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवावे यासाठी तुम्ही अविचल व स्वस्थ राहा आणि त्या शक्तीला त्यावर कार्य करू द्या.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 359)

साधना, योग आणि रूपांतरण – २७८

शरीराचे रूपांतरण

(श्रीअरविंद एका साधकाला लिहीत आहेत…)

तुम्ही तुमच्या साधनेमध्ये दीर्घकालीन विश्रांतीच्या किंवा रितेपणाच्या कालावधीमध्ये पोहोचला आहात, असे मला जाणवले. विशेषतः व्यक्ती जेव्हा शारीर आणि बहिर्वर्ती चेतनेमध्ये ढकलली जाते तेव्हा सहसा हे असे घडून येते. अशा वेळी मज्जागत व शारीरिक भाग हे प्रमुख होतात आणि योगचेतना लुप्त झाल्यामुळे, ते भागच व्यक्तित्वाचे जणू प्रमाण असल्यासारखे वाटू लागतात. आणि तेव्हा मग तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे बाह्य, छोट्याछोट्या गोष्टींबाबत तुम्ही (अति)संवेदनशील होता. तथापि, नव्या प्रगतीपूर्वीची ही मध्यंतराची स्थिती असू शकते.

तुम्ही काय केले पाहिजे? तर, ध्यानासाठी काही वेळ राखून ठेवण्याबाबत आग्रही राहिले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ज्यावेळी अगदी कमीत कमी अडथळा येईल अशी दिवसभरातील कोणतीही वेळ निवडावी. ध्यानाच्या माध्यमातून तुम्ही (योगचेतनेच्या) पुन्हा संपर्कात आले पाहिजे. शारीर-चेतना ही अग्रभागी आल्यामुळे काही अडचणी येतील परंतु चिकाटीने बाळगलेल्या अभीप्सेमुळे, योगचेतना पुन्हा प्राप्त करून घेता येईल.

(अशा रीतीने) आंतरिक आणि बाह्य अस्तित्वामधील संबंध पुनर्प्रस्थापित झाल्याचे तुम्हाला एकदा का जाणवले की मग, सर्वाधिक बाह्य मन आणि अस्तित्वामध्ये नित्य चेतनेसाठी एक आधार तयार करण्यासाठी, (आवश्यक असणारी) शांती, प्रकाश आणि शक्ती बाह्य अस्तित्वामध्ये अवतरित व्हावी म्हणून त्यांना आवाहन करा. असे केल्यामुळे, ध्यानामध्ये आणि एकांतामध्ये जशी चेतना असते तशीच चेतना तुमच्यासोबत तुमच्या कर्मामध्ये, कृतींमध्येदेखील टिकून राहील.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 368)