Tag Archive for: यश

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०५

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

योग-चेतनेमध्ये भलेही तुमचा नुकताच प्रवेश झालेला असला तरी पण, एकदा का तो प्रवेश झाला की, सर्व काही करता येणे शक्य आहे, हे तुमच्या लक्षात येते. सुरुवात करणेच महत्त्वाचे असते. दिव्य शक्ती आणि दिव्य ऊर्जा तेथे असल्या की, अगदी प्रारंभसुद्धा पुरेसा असतो.

वास्तविक, यश हे बाह्य प्रकृतीच्या क्षमतेवर अवलंबून नसते तर, ते आंतरिक पुरुषावर (inner being) अवलंबून असते आणि आंतरिक पुरुषाला सर्व काही शक्य असते. मात्र व्यक्तीला आंतरिक पुरुषाशी संपर्क साधला आला पाहिजे आणि तिने बाह्य दृष्टिकोन व चेतना ही अंतरंगातून बदलली पाहिजे; हेच साधनेचे कार्य असते. प्रामाणिकपणा, अभीप्सा आणि सहनशीलता यामधून ते निश्चितपणे साधते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 31-32)

नैराश्यापासून सुटका – २७

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

ईश्वर जर अस्तित्वात आहे आणि त्याने जर तुम्हाला या मार्गासाठी हाक दिलेली आहे (आणि ती हाक आलेली आहे हे स्पष्ट दिसत आहे), तर मग या सगळ्या पाठीमागे निश्चितपणे ‘ईश्वरी मार्गदर्शन‌’ असले पाहिजे आणि सर्व प्रकारच्या अडीअडचणी असतानासुद्धा तुम्ही त्यांमधून पार व्हाल आणि या मार्गावर खात्रीपूर्वक येऊन पोहोचाल, अशी श्रद्धा तुम्ही विकसित करणे आवश्यक आहे. आणि ती तर्क व सामान्य जाणीव (common sense) यांच्याशी मिळतीजुळती देखील असेल.

तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही अशा सूचना देणाऱ्या विरोधी आवाजांकडे लक्ष देऊ नका; किंवा त्यांना प्रतिसाद देणाऱ्या अधीर, घाईगडबड करणाऱ्या प्राणिक आवाजांकडेदेखील लक्ष देऊ नका. पुष्कळ अडचणी असल्यामुळे यश मिळण्याची काही शक्यता दिसत नाही, या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तसेच ईश्वराने आत्तापर्यंत त्याचे अस्तित्व तुम्हाला जाणवू दिले नाही, त्यामुळे तो पुढेही स्वतःला कधीच प्रकट करणार नाही, अशा समजुतीवर मुळीच विश्वास ठेवू नका. ज्यांनी ज्यांनी आपले मन अतिशय महान व अवघड अशा एखाद्या ध्येयावर केंद्रित केलेले असते, त्यांची अशी भूमिका असते की, “मला यश मिळेपर्यंत मी वाटचाल करतच राहीन. मग भले कितीही अडचणी आल्या तरी, मी यशस्वी होईनच होईन.” अशीच तुमची भूमिका असू दे.

ईश्वरावर श्रद्धा असणाऱ्या मनुष्याच्या जोडीला आणखी एक गोष्ट असते, ती अशी की, “ईश्वर अस्तित्वात आहे, तो आहेच आणि जर तो अस्तित्वात आहे तर, मग मी त्याचे जे अनुसरण करत आहे, त्यामध्ये मला कधीही अपयश येऊच शकणार नाही. मला जोपर्यंत त्याचा शोध लागत नाही, तोपर्यंत कितीही दुःख वा संकटे आली तरी, त्यांवर मात करून, मी वाटचाल करतच राहीन.”

– श्रीअरविंद (CWSA 29 : 94)

नैराश्यापासून सुटका – ०४

 

अडचणींना सामोरे गेलेच पाहिजे आणि जेवढ्या आनंदाने तुम्ही त्या अडचणींना सामोरे जाल, तेवढ्या लवकर तुम्ही त्यांच्यावर मात करू शकाल. ”अमुक एक गोष्ट मी केलीच पाहिजे आणि ती मी करीनच,” असा दृढ संकल्प कायम राखणे हा यशाचा मूलमंत्र, हा विजयाचा निर्धार तुम्ही केला पाहिजे. हे अशक्य वाटते आहे का? अशक्य अशी कोणती गोष्टच मुळात अस्तित्वात नसते. अडचणी असू शकतात, गोष्टींना वेळ लागू शकतो, पण अशक्य असे काहीच नसते. व्यक्तीने एखादी गोष्ट करण्याचा एकदा का दृढ निश्चय केला की, आज ना उद्या ती शक्य होते.

 

– श्रीअरविंद (CWSA 29 : 116)

विचार शलाका – १७

आपला आदर्श वास्तवात उतरविण्यासाठी म्हणून ज्यांना स्वत:च्या क्षणभंगुर असणाऱ्या अशा संपूर्ण अस्तित्वाचा पुरेपूर लाभ करून घ्यायचा आहे त्यांनी सद्य घडीस स्वत:कडे असलेल्या समाधानाचा त्याग कसा करायचा हे जाणून घेणे ही एक मोठी कला आहे.

यशस्वी व्यक्तींच्या अनेकविध श्रेणी असतात. त्यांच्या आदर्शाच्या कमीअधिक व्यापकतेवर, उदात्ततेवर, जटिलतेवर, शुद्धतेवर, प्रकाशमानतेनुसार त्या श्रेणी ठरतात. एखादी व्यक्ती भंगारमालाच्या व्यवसायात ‘यशस्वी’ होईल तर, एखादी व्यक्ती या विश्वाचा स्वामी म्हणून ‘यशस्वी’ होईल किंवा एखादी व्यक्ती सिद्ध तपस्वी म्हणून ‘यशस्वी’ होईल; ही उदाहरणे अगदी वेगवेगळ्या पातळीवरची असली तरी, या तिन्ही उदाहरणांबाबत, व्यक्तीचे स्वत:वर कितपत समग्रपणे आणि कितपत ठोस प्रभुत्व आहे यावर ते ‘यश’ अवलंबून असते.

…ज्या व्यक्तीच्या इच्छांची परिपूर्ती पूर्णतया झालेली आहे, ज्या व्यक्तीने तिला स्वत:ला जे प्राप्त करून घ्यावयाचे होते ते साध्य केलेले आहे अशी व्यक्ती आणि एखादी अशी व्यक्ती की जिला काहीच साध्य झालेले नाही अशा टोकाच्या दोन व्यक्तींच्या दरम्यान अपरिमित असे मधले टप्पे असतात. ही व्याप्ती खरोखर खूपच जटिल असते कारण केवळ आदर्शाच्या प्राप्तीमध्येच फरक असतो असे नाही तर, खुद्द आदर्शाच्या प्रतवारीमध्ये देखील खूप फरक असतो. काही आकांक्षा या अगदी वैयक्तिक आवडीनिवडी, अगदी भौतिक, भावनिक वा बौद्धिक आवडीनिवडी अशाप्रकारच्या असतात; तर काही अधिक व्यापक, सामूहिक वा उच्चतर ध्येय गाठणे अशा प्रकारच्या असतात आणि काही तर अगदी अतिमानवी म्हणता येतील अशा असतात. म्हणजे अशा की, शाश्वत ‘सत्य’, शाश्वत ‘चेतना’ आणि शाश्वत ‘शांती’ यांच्या भव्यतेमुळे जी शिखरे खुली होतात ती कवळण्याची त्यांची अभीप्सा असते. व्यक्तीने जे ध्येय निवडले आहे त्याच्या व्यापकतेच्या आणि त्याच्या खोलीच्या प्रमाणात व्यक्तीच्या प्रयत्नांची आणि परित्यागाची ताकद असणार, हे सहज समजण्यासारखे आहे. ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे त्याग, त्यांचे स्वरूप आणि दुसऱ्या बाजूला, व्यक्तीमध्ये असणाऱ्या त्यागाची आणि आत्मनियंत्रणाची एकत्रित ताकद ह्यांचा परिपूर्ण असा समतोल फारच क्वचित आढळून येतो.

अगदी खालच्या स्तरापासून ते अगदी परमोच्च स्तरापर्यंत पाहिले तरीही फारच कमी वेळेला असा समतोल साधलेला आढळून येतो.

जेव्हा व्यक्तीच्या घडणीमध्ये अशा प्रकारचा परिपूर्ण समतोल आढळून येतो तेव्हा अशी व्यक्ती, या पार्थिव अस्तित्वाचा शक्य तेवढा पुरेपूर लाभ करून घेऊ शकते.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 121-122)