Tag Archive for: प्रामाणिकपणा

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २३

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

योग हा एक प्रयत्न असतो, ती तपस्या असते. व्यक्ती जेव्हा अतीव प्रामाणिकपणाने उच्चतर शक्तीच्या कार्याप्रत स्वतःचे समर्पण करते; ते समर्पण सतत जागते ठेवते आणि ते परिपूर्ण करत राहते तेव्हाच मग योगाचे तपस्यापण (म्हणजे त्यातील खडतरता) संपुष्टात येते.

योग म्हणजे सुसंगती नसलेली, तर्कहीन अशी काही एक कविकल्पना नाही किंवा योग म्हणजे निव्वळ चमत्कारही नाही. योगाचे स्वतःचे असे काही नियम असतात, काही अटी असतात आणि असे असताना, (स्वत: काहीही प्रयत्न न करता) कोणत्यातरी एखाद्या जबरदस्त चमत्काराद्वारे ईश्वरानेच सारे काही घडवून आणावे अशी तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा कशी काय करू शकता, हेच मला समजत नाही.

‘पूर्णयोग’ निर्धोक आहे असे मी कधीही म्हटलेले नाही, कोणताच योग निर्धोक नसतो. मानवी जीवनातील कोणत्याही महान उद्यमामध्ये असतात त्याप्रमाणेच, प्रत्येक योगमार्गाचे त्याचे त्याचे स्वतःचे असे काही धोके असतात. मात्र व्यक्तीमध्ये केंद्रवर्ती प्रामाणिकपणा आणि ईश्वराबद्दल निष्ठा असेल तर त्या धोक्यांमधून सहीसलामत पार पडता येते. (केंद्रवर्ती प्रामाणिकपणा आणि ईश्वराबद्दल निष्ठा) या दोन आवश्यक अटी आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 81, 43)

सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक

आमच्या AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

 

नैराश्यापासून सुटका – ०६

आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये सामर्थ्याला (strength) निश्चितच एक मूल्य असते, पण आध्यात्मिक साक्षात्कार हा केवळ सामर्थ्यामुळेच होऊ शकतो आणि तो अन्य कोणत्याच मार्गामुळे होऊ शकत नाही, असे म्हणणे ही खूपच अतिशयोक्ती ठरेल.

‘ईश्वरी कृपा’ ही काही एखादी काल्पनिक गोष्ट नाही, तर ती अनुभवास येणारी आध्यात्मिक वस्तुस्थिती आहे. विद्वान आणि सामर्थ्यवान व्यक्ती ज्यांना अगदी नगण्य समजतात अशा अनेक जणांना ‘ईश्वरी कृपे‌’मुळे आध्यात्मिक साक्षात्कार झालेला आहे. अशिक्षित असताना आणि कोणतीही मानसिक शक्ती किंवा प्रशिक्षण नसताना, व्यक्तित्वामध्ये (तुम्ही म्हणता तसे त्यांच्यापाशी) कोणतेही ‘सामर्थ्य’ नसताना किंवा संकल्पशक्ती नसताना देखील, त्यांनी (फक्त आणि फक्त) अभीप्साच बाळगली होती आणि त्यांना एकाएकी, अगदी अल्पावधीतच आध्यात्मिक साक्षात्कार झाला होता; कारण त्यांच्यापाशी श्रद्धा होती किंवा ते प्रामाणिक होते.

ही जी तथ्यं आहेत, ती आध्यात्मिक इतिहासातील तथ्यं आहेत आणि ती तथ्यं अगदी सार्वत्रिक आध्यात्मिक अनुभवाचा भाग आहेत. असे असूनही या गोष्टी काल्पनिक आहेत असे समजून, त्यांच्या बाबतीत एवढा उहापोह का केला जातो, त्यांच्या बाबतीत इतके युक्तिवाद का केले जातात, किंवा या गोष्टी नाकारल्या का जातात हेच मला कळत नाही.

सामर्थ्य, जर आध्यात्मिक असेल तर, त्यामध्ये आध्यात्मिक साक्षात्काराची शक्ती असते; (पण) त्याहूनही अधिक शक्ती प्रामाणिकपणामध्ये असते; आणि सर्वाधिक शक्ती ‘ईश्वरी कृपे‌’मध्ये असते. कितीही वेळ लागला आणि कितीही अडचणी आल्या तरी, एखादी व्यक्ती जर प्रामाणिक असेल तर ती या सगळ्यामधून पार होतेच, हे मी असंख्य वेळा सांगितले आहे. मी अनेकवेळा ईश्वरी कृपे‌विषयीदेखील बोललो आहे. “शोक करू नकोस; मी तुला सर्व पापांमधून आणि अनिष्ट गोष्टींपासून मुक्त करेन,” (अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुच:) हे ‘गीते‌’मधील वचन मी अनेकवेळा उद्धृत केले आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 172)

साधना, योग आणि रूपांतरण – ०५

तुम्हाला जर खरोखरच या योगमार्गाचे (पूर्णयोगाचे) अनुसरण करायचे असेल आणि योगसाधना करायची असेल, तर ती तुम्ही कोणाकडून कौतुक किंवा मानसन्मान मिळावा यासाठी करता कामा नये; तर योगसाधना ही तुमच्या जिवाची अनिवार्य निकड असल्यामुळे केली पाहिजे, कारण त्याशिवाय अन्य कोणत्याच मार्गाने तुम्ही आनंदी होऊ शकणार नाही. लोकांनी तुमची प्रशंसा केली काय किंवा नाही केली काय, ती गोष्ट अजिबात महत्त्वाची नाही. तुम्ही अगोदरच स्वत:ला समजावले पाहिजे की, जसजसे तुम्ही सामान्य माणसाहून अधिक प्रगत होत जाल, त्यांच्या सामान्य जीवनपद्धतीहून अधिकाधिक दूर जाल, तसतशी लोकं तुमची प्रशंसा कमी प्रमाणात करू लागतील. आणि हे स्वाभाविकच आहे कारण की, ती लोकं तुम्हाला नीट समजून घेऊ शकणार नाहीत. मी पुन्हा एकवार सांगते की, या गोष्टीला अजिबात महत्त्व नाही.

तुम्ही प्रगती केल्याविना राहूच शकत नाही म्हणून (योग) मार्गावर प्रगत होत राहण्यामध्ये ‘खरा प्रामाणिकपणा’ सामावलेला आहे. तुम्ही ‘दिव्य जीवना’साठी स्वत:ला वाहून घेता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही; तुम्ही स्वत:चे रूपांतर करण्यासाठी धडपडता, प्रकाशाला उन्मुख होता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही. (हे सारे तुम्ही करता) कारण तेच तुमच्या जीवनाचे प्रयोजन असते.

जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.

– श्रीमाताजी (CWM 03 : 282-283)

आध्यात्मिकता १४

अध्यात्म-साधनेसाठी ‘प्रामाणिकपणा’ ही अगदी अत्यावश्यक गोष्ट असते आणि कुटिलता हा त्यामधील कायमचा अडथळा असतो. ‘सात्त्विक वृत्ती ही आध्यात्मिक जीवनासाठी नेहमीच योग्य आणि सज्ज असते आणि राजसिक वृत्ती ही मात्र इच्छाआकांक्षाच्या भाराने दबून गेलेली असते,’ असे मानले जाते.

त्याच वेळी हेही खरे आहे की, ‘आध्यात्मिकता’ ही गोष्ट द्वंद्वातीत असते आणि त्यासाठी जर का कोणती गोष्ट आवश्यक असेलच तर ती म्हणजे खरी ऊर्ध्वमुख अभीप्सा! आणि ही अभीप्सा सात्त्विक वृत्तीच्या व्यक्तीइतकीच राजसिक वृत्तीच्या व्यक्तीमध्येही उदित होऊ शकते. जशी एखादी सात्त्विक वृत्तीची व्यक्ती तिच्या गुणांच्या अतीत होऊ शकते तशीच, राजसिक वृत्तीची व्यक्तीही तिच्या अवगुणांच्या, इच्छाआकांक्षांच्या अतीत होऊन, ‘ईश्वरी विशुद्धता’, ‘प्रकाश’ आणि ‘प्रेम’ यांच्याकडे वळू शकते.

अर्थात, व्यक्ती जेव्हा स्वतःच्या कनिष्ठ प्रकृतीवर विजय प्राप्त करून घेईल आणि स्वतःमधून त्या कनिष्ठ प्रकृतीला हद्दपार करेल तेव्हाच ही गोष्ट घडून येईल. कारण ती जर पुन्हा कनिष्ठ प्रकृतीमध्ये जाऊन पडली, तर ती व्यक्ती मार्गच्युत होण्याची देखील (to fall from the path) शक्यता असते किंवा अगदीच काही नाही तर, जोपर्यंत ती कनिष्ठ प्रकृतीमध्ये रमलेली असते तोपर्यंत तिची आंतरिक प्रगती खुंटलेली असते.

परंतु धार्मिक आणि आध्यात्मिक इतिहासामध्ये, मोठमोठ्या गुन्हेगारांचे महान संतांमध्ये किंवा अवगुणी वा कमी गुणवान व्यक्तींचे आध्यात्मिक साधकांमध्ये आणि ईश्वर-भक्तांमध्ये रूपांतर होताना वारंवार आढळून आले आहे. उदाहरणार्थ युरोपमध्ये सेंट ऑगस्टिन, भारतामध्ये चैतन्याचे जगाई आणि मधाई (चैतन्य महाप्रभुंचे शिष्य), बिल्वमंगल आणि त्यांच्यासारखी अनेक उदाहरणे आहेत. जो कोणी ‘ईश्वरा’च्या घराचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावतो, त्याच्यासाठी ते कधीच बंद नसतात; मग त्या माणसाने भूतकाळात कितीही ठोकरा खाल्लेल्या असोत किंवा कितीही चुका केलेल्या असोत.

मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतरंगात असणाऱ्या ईश्वरी तत्त्वावर असणारी अनुक्रमे तेजस्वी व काळोखी आवरणे असतात. पण जेव्हा ही आवरणे भेदली जातात तेव्हा, ‘आत्म्या’च्या उच्चतेकडे जाताना, ती दोन्हीही चांगली भाजून निघतात.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 42]

जागरुकता (Vigilance) म्हणजे नित्य जागृत असणे, दक्ष असणे, ‘प्रामाणिक’ असणे – तुम्हाला कोणत्याच गोष्टीने आश्चर्याचा धक्का बसता कामा नये. जेव्हा तुम्हाला साधना करायची असते, तेव्हा तुमच्या जीवनात प्रत्येक क्षणाला तुम्हाला निवड करायची असते – ध्येयाप्रत जाणाऱ्या मार्गावर पाऊल टाकायचे की, गाढ झोपी जायचे, किंवा “आत्ताच नको, नंतर पाहू” असे म्हणत, मार्गात मध्येच बसून राहायचे, यांपैकी एकाची प्रत्येक क्षणी निवड करायची असते. तुम्हाला खाली खेचणाऱ्या गोष्टींना प्रतिकार करायचा एवढाच जागरूकतेचा अर्थ नाही; तर एखाद्या दुर्बलतेवर मात करण्याची संधी, प्रलोभनाला बळी पडण्यापासून रोखण्याची संधी, काहीतरी नवीन शिकण्याची संधी, एखाद्या गोष्टीमध्ये सुधारणा करण्याची संधी, कशावर तरी प्रभुत्व मिळविण्याची संधी यांपैकी कोणतीच संधी गमावू द्यायची नाही, म्हणजेच, प्रगतीकडे घेऊन जाणारी एकही संधी गमावू नये यासाठी जागरुक राहायचे हा सुद्धा त्याचा अर्थ आहे. एरवी तुम्हाला जी गोष्ट करायला काही वर्षे लागली असती तीच गोष्ट, तुम्ही जर जागरुक असाल तर, काही दिवसांतच साध्य करून घेऊ शकता. तुम्ही जर जागरूक असाल, दक्ष असाल तर, तुमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक कृतीला, प्रत्येक गतिविधींना, तुम्ही तुमच्या ध्येयाच्या निकट जाण्याचे निमित्त बनविता.

– श्रीमाताजी [CWM 03 : 202-203]

तुम्हाला असे वाटते की, तुम्ही खूप चांगले आहात, दयाळू आहात, विरक्त आहात आणि नेहमीच सद्भावना बाळगता. तुम्ही कधीच कोणाचे अकल्याण चिंतत नाही, तुम्ही नेहमी त्यांच्या भल्याचाच विचार करता, या आणि अशासारख्या गोष्टी तुम्ही स्वत:लाच आत्मसंतुष्टीने सांगत राहता. पण तुम्ही विचार करत असताना, जर स्वत:कडे प्रामाणिकपणे बघितलेत तर, तुमच्या असे लक्षात येईल की, तुमच्या डोक्यामध्ये असंख्य विचारांचा कल्लोळ असतो आणि कधीकधी त्यामध्ये अत्यंत भयावह असे विचारही असतात आणि त्याची तुम्हाला अजिबात जाणीवदेखील नसते.

उदाहरणार्थ, कधीतरी जेव्हा तुमच्या मनासारखे घडत नाही, तेव्हाच्या तुमच्या प्रतिक्रिया पाहा : तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, परिचितांना, किंवा कोणालाही सैतानाकडे पाठविण्यासाठी किती उतावीळ झालेले असता! तुम्ही त्यांच्याबद्दल किती नको नको ते विचार करता ते आठवून पाहा, आणि त्याची तुम्हाला जाणीवदेखील नसते. तेव्हा तुम्ही म्हणता, “यामुळे त्याला चांगलाच धडा मिळेल.” आणि जेव्हा तुम्ही टिका करता तेव्हा तुम्ही म्हणता, ”त्याला त्याच्या चुकांची जाणीव व्हायलाच हवी.” आणि जेव्हा कोणी तुमच्या कल्पनेनुसार वागत नाही तेव्हा तुम्ही म्हणता, ”त्याला त्याची फळे भोगावीच लागतील.” आणि असे बरेच काही…. तुम्हाला हे माहीत नसते, कारण विचार चालू असताना, तुम्ही स्वत:कडे पाहत नाही. जेव्हा तो विचार किंचितसा अधिक प्रबळ झालेला असतो तेव्हा तुम्हाला त्याची कधीतरी जाणीव होते देखील; पण जेव्हा तो विचार येऊन निघून जातो, तेव्हा तुम्हाला त्याचे अस्तित्वही जाणवत नाही – तो विचार येतो, तुमच्यामध्ये प्रवेश करतो आणि निघून जातो.

आणि मग केव्हातरी तुम्हाला उमगते की, आपल्याला खरोखर शुद्ध आणि पूर्णत: सत्याच्या बाजूचे बनायचे असेल तर, त्यासाठी जागरुकता, प्रामाणिकपणा, आत्मनिरीक्षण, आणि स्व-नियंत्रण या गोष्टी आवश्यक असतात, ज्या सहसा आढळत नाहीत. तुम्हाला तेव्हा जाणवायला लागते की, खरोखरीच प्रामाणिक असणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे.

– श्रीमाताजी [CWM 03 : 231]

‘प्रामाणिकपणा’चा अर्थ

‘प्रामाणिकपणा’मध्ये नुसत्या सचोटीपेक्षा (honesty) बराच अधिक अर्थ सामावलेला आहे. म्हणजे असे की, तुम्ही जे बोलता तेच तुम्हाला अभिप्रेत असते, तुम्ही जे प्रतिपादित करता त्याची तुम्हाला जाणीव असते, तसेच तुमच्या इच्छेमध्ये खरेपणा असतो. साधक जेव्हा ‘ईश्वरा’चे साधन बनण्याची आणि ‘ईश्वरा’शी एकरूप होण्याची अभीप्सा बाळगत असतो, तेव्हा त्याच्यातील ‘प्रामाणिकपणा’चा अर्थ असा असतो की, तो खरोखरच कळकळीने ‘अभीप्सा’ बाळगत असतो व ‘ईश्वरा’व्यतिरिक्तच्या इतर सर्व इच्छांना किंवा आवेगांना तो नकार देत असतो.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 50]

प्रामाणिकपणा – ४७

प्रामाणिक असण्यामध्ये एक अद्भुत आनंद असतो. प्रामाणिकपणाच्या प्रत्येक कृतीमध्येच प्रामाणिकपणाचे स्वतःचे असे बक्षिस अनुस्यूत असते. शुद्धीकरणाची भावना, ऊर्ध्वमुख होत झेपावत जाणे, व्यक्तीने मिथ्यत्वाचा अगदी एखादा छोटासा कण दूर केला तरी त्यामुळे मिळालेली मुक्ती, या गोष्टी हे प्रामाणिकपणाचे बक्षिस असते. प्रामाणिकपणा हे सुरक्षाकवच असते, तेच संरक्षण असते, प्रामाणिकपणा हाच मार्गदर्शक असतो आणि अंतिमतः प्रामाणिकता ही एक रूपांतरकारी शक्ती असते.
– श्रीमाताजी [CWM 08 : 400]

प्रामाणिकपणा – ४६

एखाद्या व्यक्तीने भूतकाळात कितीही ठोकरा खाल्लेल्या असल्या किंवा कितीही चुका केलेल्या असल्या तरीसुद्धा, जर ती व्यक्ती ‘ईश्वरा’च्या निवासाचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावेल तर, तिच्यासाठी ते दरवाजे कधीच बंद नसतात. मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतर्यामी असणाऱ्या ‘ईश्वरी’ तत्त्वावरील तेजस्वी व काळोखी आवरणे असतात. हे ईश्वरी तत्त्व जेव्हाकधी त्या आवरणाचा भेद करते तेव्हा, आत्म्याच्या उत्तुंगतेकडे जाताना ते तत्त्व, त्या दोन्ही आवरणांचे दहन करू शकते.

श्रीअरविंद [CWSA 29 : 42]

प्रामाणिकपणा – ४५

तुम्हाला घरी राहून आणि कार्यमग्न असतानादेखील साधना करणे शक्य आहे. त्यासाठी सुरुवातीला ही गोष्ट आवश्यक असते की, जितके जमेल तितके श्रीमाताजींचे स्मरण ठेवावे, शक्य असेल तेवढा, त्या ‘दिव्य माता’ आहेत असा विचार करून, दररोज एका ठरावीक वेळी हृदयामध्ये श्रीमाताजींवर लक्ष एकाग्र करा, त्या तुमच्यामध्येच आहेत अशी जाणीव तुम्हाला व्हावी म्हणून अभीप्सा बाळगा. तुमचे सारे कर्म त्यांना अर्पण करा आणि त्यांनी तुम्हाला अंतरंगातून मार्गदर्शन करावे आणि तुमचा सांभाळ करावा, अशी त्यांच्याकडे प्रार्थना करा. ही प्राथमिक पायरी आहे पण बहुतेक वेळा या पायरीवरच बराच वेळ द्यावा लागतो. परंतु जर का एखादी व्यक्ती यातून प्रामाणिकपणे आणि चिकाटीने पार झाली तर, हळू हळू मानसिकता बदलू लागते आणि साधकामध्ये अशी एक नवीन चेतना उमलू लागते की, जिच्याद्वारे साधकाला अंतरंगामधून ‘श्रीमाताजीं’च्या उपस्थितीची अधिकाधिक जाणीव होऊ लागते; प्रकृतीमधील, जीवनातील त्यांच्या कार्याची जाणीव होऊ लागते किंवा मग अशा व्यक्तीला, साक्षात्काराच्या दिशेने द्वारे खुली करणाऱ्या इतर कोणत्यातरी आध्यात्मिक अनुभूतीची जाणीव होऊ लागते.

– श्रीमाताजी
[CWSA 32 : 186]