Tag Archive for: प्रगती

नैराश्यापासून सुटका – ३०

(साधकांनी पत्राच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांना श्रीअरविंद पत्रोत्तरे देत असत. परंतु कधीकधी या कामाचा व्याप इतका वाढत असे की, त्यांना स्वतः पत्र लिहिणे अवघड होत असे, अशा वेळी ते आपल्या निकटवर्तीयाला पत्राचा मजकूर तोंडी सांगत असत आणि त्या बरहुकूम तो, संबंधित पत्रलेखकाला पत्रोत्तर पाठवीत असे. येथेही श्रीअरविंद तोंडी मजकूर सांगत असावेत, असे दिसते.)

नाउमेद होणे ही एक अशी गोष्ट आहे की, ज्यामध्ये साधकाने कधीही अडकून पडता कामा नये, असे त्याला सांगा. प्रगती अगदी वेगवान आणि सुकरतेने होत असेल किंवा प्रगतीचा वेग मंद असेल किंवा प्रगती खुंटलेली असेल, तरीही व्यक्तीने नेहमीच स्थिरपणाने वाटचाल करत राहिले पाहिजे. व्यक्ती नेहमीच योग्य वेळी तिच्या ध्येयाप्रत जाऊन पोहोचते. अडीअडचणी आणि अंधकाराचे कालावधी टाळता येण्यासारखे नसतात; त्यांना स्थिरचित्ताने आणि धैर्याने सामोरे जात, त्यांच्या पार जायचे असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 182)

जीवन जगण्याचे शास्त्र – २५

धीटपणा, धैर्य आणि चिकाटी हे आवश्यक असे पहिले गुण आहेत. तुम्हाला याची जाणीव असली पाहिजे की, तुम्ही जे जाणले पाहिजे त्याच्या तुलनेत तुम्ही जे जाणता ते म्हणजे काहीच नाही; तुम्ही जे करणे आवश्यक आहे त्याच्या तुलनेत तुम्ही जे करू शकता ते म्हणजे काहीच नाही आणि तुम्ही जे बनले पाहिजे त्याच्या तुलनेत तुम्ही आत्ता जे आहात ते म्हणजे काहीच नाही.

तुमच्या प्रकृतीमध्ये ज्याचा अभाव आहे ते प्राप्त करून घेण्याची, तुम्हाला अजूनपर्यंत जे माहीत नाही ते जाणून घेण्याची आणि तुम्हाला अजूनपर्यंत जे करता आलेले नाही ते करता यावे असा एक दृढ, अविचल संकल्प तुमच्यामध्ये असला पाहिजे. वैयक्तिक इच्छा-वासनारहिततेमधून येणाऱ्या शांतीमध्ये आणि प्रकाशामध्ये तुम्ही सतत प्रगती करत राहिले पाहिजे. “नेहमी अधिक चांगले, प्रगतिपथावर अधिक पुढे!” असा कृतिकार्यक्रमच तुम्ही ठरवून घेऊ शकता. ईश्वराचे आविष्करण करता यावे यासाठी त्याला जाणणे हेच तुमचे एकमेव ध्येय असले पाहिजे. चिकाटी बाळगा म्हणजे मग, तुम्ही आज जे करू शकत नाही ते तुम्हाला उद्या साध्य होऊ शकेल.

– श्रीमाताजी (CWM 16 : 430)

विचारशलाका ३८

 

(श्रीमाताजी येथे ‘विचार’ व्यापक करण्याच्या एका मार्गाबद्दल सांगत आहेत.)

 

समजा, तुमच्याबरोबर कोणी दुसरी एखादी व्यक्ती आहे.  ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगते, तेव्हा तुम्ही त्याच्या अगदी विरुद्ध असे काहीतरी त्या व्यक्तीला सांगता (विरोध करण्याच्या हिरिरीतून हे बहुधा नेहमीच घडते) आणि तुम्ही वादविवाद करायला सुरुवात करता. साहजिकच आहे की, तुम्ही कोणत्याच मुद्यापाशी येऊन पोहोचणार नाही; हो, तुम्ही जर भांडकुदळ असाल तर त्यातून भांडणं मात्र होतील.

पण तसे करण्याऐवजी, म्हणजे स्वत:च्या शब्दांमध्येच किंवा स्वत:च्या कल्पनांमध्येच बंदिस्त होऊन राहण्याऐवजी तुम्ही जर स्वत:ला सांगितलेत, “एक मिनिट थांब, मी प्रयत्न करून पाहातो आणि तो मला असे का म्हणाला ते समजावून घेतो. हो, तो मला तसे का बरे म्हणाला असेल?” तुम्ही चिंतन करता, “का? का? का?” तुम्ही प्रयत्न करत तिथेच थांबून राहता.

दुसरा माणूस मात्र बोलतच असतो, नाही का? – परंतु आता तो खूष होतो कारण तुम्ही आता त्याला विरोध करत नसता. तो तावातावाने बोलत राहतो; त्याला वाटते की, त्याने तुम्हाला त्याचे म्हणणे पटवून दिले आहे.

तो काय म्हणतो आहे त्यावर तुम्ही अधिकाधिक लक्ष एकवटू लागता; हळूहळू त्याच्या भावनेच्या आणि शब्दांच्या माध्यमातून जणू काही तुम्ही त्याच्या मनात प्रवेश करता. जेव्हा तुम्ही त्याच्या डोक्यात प्रवेश करता, तेव्हा एकदम तुम्ही त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये प्रवेश करता. आणि मग, तुमच्याशी तो तसा का बोलत आहे, याचे तुम्हाला आकलन होते.

आणि जर तुमच्याकडे पुरेसे बुद्धिचापल्य असेल आणि जर तुम्ही, तुम्हाला आधी जे माहीत होते ते आणि आत्ता जे समजले ते या दोन्ही गोष्टी जर शेजारी शेजारी ठेवल्यात तर आता तुमच्याकडे एकत्रितपणे दोन विचारसरणी असतील आणि त्या दोन्हींचा समेट घडविणारे असे सत्य तुम्ही शोधून काढू शकाल. आणि इथेच तुम्ही खरीखुरी प्रगती केलेली असेल.

स्वत:चे विचार व्यापक करण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग आहे.

तुम्ही जर एखाद्या युक्तिवादाला सुरुवात करणार असाल, तर ताबडतोब शांत व्हा. तुम्ही शांत राहिले पाहिजे, काहीही बोलू नका आणि ती दुसरी व्यक्ती गोष्टींकडे ज्या पद्धतीने पाहत आहे त्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे, तुम्ही तुमची पाहण्याची पद्धतच विसरून जाल, असे होणार नाही. त्याउलट, तुम्ही त्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे ठेवू शकाल. तेव्हा तुम्ही खरंच प्रगती केलेली असेल, एक खरीखुरी प्रगती!

– श्रीमाताजी [CWM 05 : 218-220]

विचारशलाका २९

 

धम्मपद : ज्याप्रमाणे रणक्षेत्रातील हत्ती धनुष्यातून सुटलेले बाण सहन करतो त्याप्रमाणे मी अपमान सहन करेन कारण या जगात अनेक दुष्ट मनाची माणसे आहेत.

पाळीव हत्ती हा रणक्षेत्रामध्ये नेला जातो, त्यावर राजा आरुढ होतो. जो शांतपणे अपमान, निंदा सहन करतो तो माणसांमध्ये उत्तम मनुष्य होय.

श्रीमाताजी : येथे मोठा चांगला सल्ला दिला आहे : रणक्षेत्रातील हत्ती, ज्याला चांगले प्रशिक्षण देण्यात आले असते तो बाणांच्या भडिमाराने इतस्तत: पळायला सुरुवात करत नाही. तो वेदना सहन करतो, एखाद्या वीराने प्रतिकार करावा त्याप्रमाणे वृत्ती राखत तो पुढे पुढे चालतच राहतो. ज्याला योगमार्गाचे अनुसरण करायचे असते, साहजिकपणेच त्याला सर्व प्रकारच्या वाईट इच्छांच्या हल्ल्यांना सामोरे जावेच लागते. कारण इतर जण त्याला केवळ समजून घेऊ शकत नाहीत असे नाही, तर त्यांना जे समजत नाही त्याचा ते द्वेष करू लागतात.

सामान्य माणसे तुमच्याविषयी जे द्वेषपूर्ण उद्गार काढतात त्यामुळे, जर तुम्ही चिंताग्रस्त झालात, दुःखी झालात किंवा नाउमेद झालात तर तुम्ही मार्गावर फार पुढे जाऊ शकणार नाही. अशा गोष्टी तुमच्यापर्यंत येतात कारण तुम्ही दुर्दैवी आहात किंवा तुमच्या नशीबातच सुख नाही असे नसून, उलट दिव्य ‘चेतने’ने व दिव्य ‘कृपे’ने तुमचा संकल्प गांभीर्याने घेतला आहे आणि तुमचा निश्चय किती प्रामाणिक आहे, मार्गातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही किती खंबीर आहात हे पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिस्थितीचा तिने एखाद्या (सोन्याचा) कस पाहणाऱ्या दगडाप्रमाणे (कसोटीचा दगड) म्हणून उपयोग केलेला असतो.

त्यामुळे जर का कोणी तुमचा उपहास केला किंवा कोणी तुमच्याविषयी निंदनीय शब्द उच्चारले तर पहिली गोष्ट तुम्ही ही केली पाहिजे की, अंतर्मुख होऊन, आपल्यातील कोणत्या दुर्बलतेमुळे वा कोणत्या अपूर्णतेमुळे असे घडले ते पाहिले पाहिजे. तसेच तुम्ही उदास, संतप्त किंवा उद्विग्न होता कामा नये, कारण तुमची खरी किंमत काय त्याची लोकांना कदर नसते. त्यापेक्षा तुमचा कोणता दोष, कोणती दुर्बलता वा कोणती विकृती दुरुस्त करायला हवी हे दाखवून दिल्याबद्दल तुम्ही दिव्य ‘कृपे’चे ऋणी असले पाहिजे.

आणि दुःखी होण्याऐवजी, तुम्ही पूर्णपणे संतुष्ट होऊ शकता आणि तुमच्या विरोधात, तुमचे अहित व्हावे म्हणून जो घाट घातला गेला होता त्याचा तुम्ही खूप फायदा करून घेऊ शकता.

तुम्हाला जर खरोखर या योगमार्गाचे अनुसरण करायचे असेल आणि योगसाधना करायची असेल, तर ती तुम्ही कोणत्याही कौतुकासाठी वा सन्मानासाठी करता कामा नये. ती तुमच्या जिवाची अनिवार्य अशी निकड असली पाहिजे, कारण तुम्ही त्याव्यतिरिक्त कोणत्याही इतर मार्गाने आनंदीच होऊ शकणार नाही, त्यासाठी तुम्ही ती केलीच पाहिजे. लोकांनी तुमची प्रशंसा केली काय किंवा नाही केली काय, ती गोष्ट अजिबात महत्त्वाची नाही. तुम्ही आधीच स्वत:ला हे समजावले पाहिजे की, तुम्ही सामान्य माणसांपेक्षा जेवढे अधिक प्रगत व्हाल, आणि जसजसे तुम्ही सामान्य जीवनपद्धतीला परके व्हाल, तेवढे लोकं तुमची प्रशंसा कमी करू लागतील; कारण साहजिकच आहे की, तुम्हाला ते नीट समजून घेऊ शकणार नाहीत. आणि मी पुन्हा एकवार सांगते की, हे अजिबात महत्त्वाचे नाही.

तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहूच शकत नाही म्हणून, मार्गावर प्रगत होत राहण्यामध्येच खरी प्रामाणिकता सामावलेली आहे. तुम्ही दिव्य जीवनासाठी स्वत:ला समर्पित करता कारण त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही; तुम्ही स्वत:चे रूपांतरण करण्यासाठी धडपडता, प्रकाशाला उन्मुख होता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही, कारण तेच तुमच्या जीवनाचे प्रयोजन असते. जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.

– श्रीमाताजी [CWM 03 : 282-284]

विचारशलाका २६

 

कधीकधी असे होते की, व्यक्ती तत्त्वज्ञानाचे एक आख्खे पुस्तक वाचून काढते पण, एका पाऊलदेखील तिची प्रगती होत नाही. कधी असेही घडते की, एखादी व्यक्ती अतिशय धर्मनिष्ठ असूनही, तिची अजिबात प्रगती होत नाही. अशीही काही माणसं आहेत की, ज्यांनी त्यांचे आख्खे आयुष्य हे ध्यानधारणेमध्ये व्यतीत केले आहे आणि तरीदेखील त्यांना काहीच प्राप्त झालेले नाही. (आणि दुसरीकडे) जुन्या चप्पलबूट शिवण्यासारखी अगदी साधी कामे करणारीसुद्धा काही माणसं आहेत की ज्यांना आध्यात्मिक अनुभव आलेला आहे. व्यक्ती काय विचार करते, काय बोलते यापेक्षा असे अनुभव या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. ती एक देणगी असते. आणि यासाठी काय आवश्यक असेल तर ते म्हणजे – त्या ‘ईश्वरा’शी एकत्व पावण्यामध्ये यशस्वी होणे आणि ‘ईश्वरा’मध्ये जीवन जगणे. कधीकधी तुम्ही पुस्तकातील एखादे वाक्य वाचता आणि तुम्हाला ते वाक्य तेथे घेऊन जाते. तर कधी तुम्ही धर्मग्रंथ किंवा तत्त्वज्ञानाची पुस्तकेच्या पुस्तके वाचूनही काही उपयोग होत नाही. हो, पण अशीही काही माणसं असतात की, तत्त्वज्ञानाची पुस्तके वाचल्यामुळे त्यांना प्रगती करण्यासाठी काही मदत झालेली असते. पण या सर्व गोष्टी दुय्यम आहेत.

एकच गोष्ट अतिशय महत्त्वाची असते : प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण इच्छा, संकल्प; कारण (प्रगती, अनुभव इत्यादी) गोष्टी निमिषार्धात होत नाहीत. त्यामुळे व्यक्तीने चिकाटी ठेवली पाहिजे.

एखाद्याला जेव्हा असे वाटते की, त्याची प्रगती होत नाहीये, अशावेळी त्याने नाउमेद होता कामा नये. त्याच्या प्रकृतीमध्ये असे काय आहे की, जे या गोष्टींना विरोध करत आहे ते त्याने शोधून काढले पाहिजे; आणि मग त्याने आवश्यक ती प्रगती केली पाहिजे. त्यामुळे व्यक्ती एकाएकी पुढे जाते. आणि जेव्हा तुम्ही शेवटापर्यंत जाता तेव्हा तुम्हाला अनुभव येतो.

आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, ज्या माणसांनी परस्परांहून अगदी विभिन्न असे मार्ग अनुसरलेले असतात, ज्यांच्या विभिन्न अशा मनोवृत्ती असतात, त्यांच्यापैकी काहीजण खूप भाविक असतात तर काही अगदी नास्तिक असतात, काही जण तर अगदी जडवादी असतात पण ते सारे एकाच प्रकारच्या अनुभवापाशी येऊन पोहोचतात; तो अनुभव सर्वांना सारखाच येतो. कारण तो ‘सत्य’ असतो – तो खरा असतो, कारण ते एकमेव वास्तव असते. एखादा त्याबद्दल काय बोलतो ते महत्त्वाचे नाही, तर महत्त्वाचे आहे ते तुम्ही तुमच्या मार्गाचे अनुसरण करणे, भले मग तो मार्ग कोणताही असो, त्याचे अनुसरण करणे हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे.

– श्रीमाताजी [CWM 06 : 26-27]

विचारशलाका १६

ज्या क्षणी तुम्ही समाधान पावून, अभीप्सा बाळगेनासे होता, तेव्हापासून तुम्ही मरणपंथाला लागलेले असता. जीवन ही एक वाटचाल आहे, जीवन हा एक प्रयास आहे; जीवन म्हणजे पुढे चालत राहणे, भावी प्रकटीकरण आणि साक्षात्काराप्रत उन्नत होणे. विश्रांती घेण्याची इच्छा बाळगणे याइतकी दुसरी कोणतीच भयानक गोष्ट नाही.

*

प्रगती हेच पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजन आहे. तुम्ही जर प्रगत होत राहणे थांबविलेत तर तुम्ही मृत्युमुखी पडाल. प्रगत न होता जो कोणता क्षण तुम्ही व्यतीत करता, तो प्रत्येक क्षण तुम्हाला स्मशानाच्या एक पाऊल जवळ घेऊन जाणारा असतो.

– श्रीमाताजी [CWM 15 : 75]

(‘अतिमानस आविष्करण आणि पूर्णत्व-संपादन’ या विषयी श्रीअरविंद लिखित एका उताऱ्याचे वाचन श्रीमाताजींनी केले. त्या उताऱ्यामध्ये मन, प्राण तसेच शरीर या आधाराचे महत्त्व प्रतिपादन करण्यात आले होते. त्याच दृष्टीने ‘श्रीअरविंद आश्रमा’त व्यायाम, योग-आसने, प्राणायामादी शरीर-साधनेला महत्त्व दिलेले आढळते. या पार्श्वभूमीवर पुढील संवाद झालेला आहे.)

साधक : माताजी, प्रगतीसाठी क्रीडा-स्पर्धा आवश्यक आहेत का ?

श्रीमाताजी : नैतिक शिक्षणाच्या दृष्टीने विचार करता, खरंतर, त्या आवश्यक असतात कारण जर एखाद्याने त्या स्पर्धांमध्ये योग्य वृत्तीने सहभाग घेतला तर स्वत:च्या अहंकारावर ताबा मिळविण्याची ती एक उत्तम संधी असते. पण स्वत:च्या दुर्बलता व कनिष्ठ वृत्ती ह्यांच्यावर मात करण्याच्या भूमिकेतून त्याकडे न पाहता, जर का एखादा नुसताच खेळत राहिला तर साहजिकच आहे की, त्याला त्यांपासून कसा व काय फायदा करून घ्यायचा ते माहीत नसेल आणि त्यामुळे त्याला त्याचा काहीच उपयोग होणार नाही. परंतु कोणत्याही हीन प्रकारच्या प्रवृत्तींशिवाय, म्हणजे द्वेषभाव वा महत्त्वाकांक्षा न बाळगता, जर एखादा योग्य वृत्तीने खेळायची इच्छा बाळगेल; एखादा जर, ज्याला ‘खिलाडू वृत्तीने खेळलेला नि:पक्षपाती खेळ’ (fair play) असे म्हटले जाते अशा अभिवृत्तीने (spirit) खेळ खेळेल, म्हणजेच सर्वोत्तम तेच करण्याचा प्रयत्न करणे आणि यशापयशाची चिंता न करणे, अशी अभिवृत्ती राखेल; समजा त्याला यश मिळाले नाही किंवा त्याला अनुकूल अशा गोष्टी घडल्या नाहीत तरी त्यामुळे अस्वस्थ न होता तो जर प्रयत्नांची पराकाष्ठा करू शकेल, तर त्या गोष्टी उपयुक्त ठरतील. याचा परिणाम म्हणून, या अशा स्पर्धांमधून, स्व-नियंत्रण व कर्मफलापासून अलिप्तवृत्ती या गुणांनी व्यक्ती संपन्न होईल. या गोष्टी व्यक्तीचे असामान्य चारित्र्य घडविण्यामध्ये अतिशय साहाय्यकारी ठरतात.

अर्थातच, तुम्ही जर त्या स्पर्धा अगदी सामान्य पद्धतीने, सर्व प्रकारच्या सामान्य व हीन क्रियाप्रतिक्रिया राखत खेळलात, तर त्यांपासून तुम्हाला काहीच लाभ होणार नाही. पण हे तर कोणत्याही कृतीबाबत म्हणता येईल. मग ते खेळात असो किंवा बौद्धिक क्षेत्रात असो, जर कोणी कोणतीही कृती सामान्य पद्धतीने करेल, तर तसे करणे म्हणजे वेळ वाया घालावणेच आहे.

पण जर तुम्ही स्पर्धेमध्ये, वा सामूहिक क्रीडास्पर्धांमध्ये योग्य वृत्तीने खेळलात, योग्य वृत्तीने सहभागी झालात तर, ते एक चांगले शिक्षण आहे कारण ते तुम्हाला विशेष प्रयत्न करायला आणि तुमच्या स्वत:च्या अशा मर्यादा ओलांडण्यास भाग पाडते. ज्या एरवी बहुधा सुप्तच राहिल्या असत्या अशा तुमच्यातील बऱ्याच गोष्टींबाबत, हालचालींबाबत सजग करण्याकरता तुम्हाला मिळालेली ती एक नक्कीच उत्तम संधी असते. पण अर्थातच, तुम्हाला मिळालेली ही एक संधी आहे आणि प्रगतीचे साधन आहे हे तुम्ही कधीही विसरता कामा नये.

जर तुम्ही स्वत:ला नुसतेच मोकळे सोडलेत आणि सामान्य पद्धतीनेच, नुसतेच खेळत राहिलात तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालविता आहात. पण हे सर्वच बाबतीत खरे आहे; केवळ खेळाबाबत आहे असे नाही, अगदी अभ्यास आणि इतर सर्व बाबतीतसुद्धा तेच खरे आहे. एखादा काय करतो यापेक्षा तो त्या गोष्टी कशा करतो, तो कोणत्या वृत्तीने त्या गोष्टी करतो यावर सारे काही अवलंबून असते.

…कोणतीही महत्त्वाकांक्षा बाळगू नका, कोणतेही ढोंग करू नका, आव आणू नका, प्रत्येक क्षणी तुमच्यातील चरम स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा. कोणतेही काम करीत असताना अशा स्थितीत राहणे, ही सर्वांगीण जीवनाच्या दृष्टीने आदर्श स्थिती आहे. आणि अशी स्थिती जर एखाद्याला साध्य झाली तर, तो पूर्णत्वाच्या मार्गावर फार पुढे निघून गेला आहे हे निश्चित…. पण अर्थातच हे सारे खरोखर प्रामाणिकपणे करायचे असेल तर, एक प्रकारची आंतरिक परिपक्वता आवश्यक आहे.

– श्रीमाताजी [CWM 09 : 97-98]

सद्भावना – १७

मी दोन अटी नेमून देत आहे. प्रगती करण्याची इच्छा असणे – ही खरोखरच अगदी साधीशी अट आहे. प्रगती करण्याची इच्छा असणे, तसेच अजून प्रत्येक गोष्ट पूर्ण व्हायची आहे, प्रत्येक गोष्टीवर विजय प्राप्त करून घ्यायचा आहे, हे ज्ञात असणे, ही पहिली अट. दुसरी अट अशी की, दररोज कोणतीतरी एखादी अशी कृती, असे एखादे काम, अशी एखादी गोष्ट की जी स्वतःसाठी केलेली नसेल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, जी सर्वांविषयीच्या सद्भावनेची अभिव्यक्ती असेल …तुम्ही जणू विश्वाच्या केंद्रस्थानी असल्यासारखे आणि सारे विश्व तुमच्या भोवती फिरत असल्यासारखे तुम्ही फक्त स्वतःपुरते जगत नाही, हे ज्यामधून दिसून येईल अशी एखादी कृती केली पाहिजे. आपण विश्वाच्या केंद्रस्थानी आहोत आणि सारे विश्व आपल्याभोवतीच फिरत आहे, अशीच बहुसंख्य लोकांची कल्पना असते आणि इतकेच काय, पण ते त्यांच्या गावीदेखील नसते. प्रत्येकाला याची जाणीव असली पाहिजे. अगदी सहजपणे, व्यक्ती स्वतःला विश्वाच्या केंद्रस्थानी ठेवते आणि सारे काही या ना त्या मार्गाने आपल्याकडेच आले पाहिजे अशी तिची इच्छा असते. परंतु प्रत्येक व्यक्तीने समग्रतेचे अस्तित्व ओळखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, इतकेच. म्हणजे व्यक्तीने स्वतःची चेतना विशाल करण्याचा म्हणजेच स्वतःचा संकुचितपणा कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 315-316)

शरीरातील चैत्य अस्तित्वाची उपस्थिती हे नेहमीच सुरचना आणि परिवर्तनाचे केंद्र असते. म्हणून, दोन शारीर जन्मांच्या मधल्या संक्रमणाच्या काळात प्रगती होत राहते, असे समजणे किंवा काही जण मानतात त्याप्रमाणे, त्या काळात ही प्रगती अधिक पूर्णत्वाने आणि अधिक त्वरेने होते, असे मानणे ही मोठी चूक आहे. सर्वसाधारणत: त्या काळात कोणतीही प्रगती होत नाही; कारण चैत्य पुरुषाने विश्रांत स्थितीत प्रवेश केलेला असतो आणि इतर सर्व भाग, कमीअधिक क्षणिक जीवनानंतर त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये विसर्जित होऊन गेलेले असतात.

पृथ्वीवरील जीवन हेच प्रगतीचे स्थान आहे. इथे, या पृथ्वीवरच, पृथ्वीवरील जीवनकालावधीमध्येच प्रगती शक्य आहे. तो चैत्य पुरुष स्वत:च स्वत:च्या प्रगतीचे आणि उत्क्रांतीचे नियोजन करीत, एका जन्मामागून दुसऱ्या जन्मांमध्ये ही प्रगती घडवीत राहतो.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 270)

प्रश्न : चैत्य अग्नी (Psychic Fire) कसा प्रज्वलित करावा?

श्रीमाताजी : अभीप्सेच्या द्वारे ! प्रगतीसाठी केलेला संकल्प आणि परिपूर्णतेप्रत बाळगलेली आस यांद्वारे ! आणि सर्वांवर कळस म्हणजे, प्रगतीसाठीचा संकल्प आणि आत्मशुद्धीकरण यांद्वारे हा चैत्य अग्नी चेतवला जातो.

ज्यांच्यामध्ये प्रगतीची इच्छा तीव्र असते आणि जेव्हा ते ती इच्छा आध्यात्मिक प्रगती आणि शुद्धीकरण या दिशेने वळवितात तेव्हा, आपोआप त्यांच्यामधील चैत्य अग्नी प्रदिप्त होतो. एखाद्याला जर स्वत:मधील एखादा दोष, एखादी त्रुटी दूर करावयाची असेल, त्याच्या प्रकृतीमधील काहीतरी त्याला प्रगत होण्यापासून रोखत असेल, ते सारे जर त्याने या चैत्य अग्नी मध्ये फेकून दिले तर, हा अग्नी अधिक तीव्रतेने प्रज्वलित होतो. आणि ही केवळ प्रतिमा नाही, ती सूक्ष्म भौतिक पातळीवरील वस्तुस्थिती आहे.

कोणी त्या ज्योतीची ऊब अनुभवू शकतो, तर कोणी एखादा सूक्ष्म भौतिक स्तरावर त्या ज्योतीचा प्रकाशदेखील पाहू शकतो. जेव्हा प्रकृतीमध्ये असे काही असते की, जे प्रगत होण्यापासून रोखत असते; ते जर व्यक्तीने त्या अग्नीमध्ये फेकून दिले, तर ते जळू लागते आणि ती ज्वाला अधिकाधिक मोठी होत जाते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 251)